Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 6 December, 2008

मुख्यमंत्रिपदी अशोक पाटील, छगन भुजबळ उपमुख्यमंत्री

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी): विलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल ३१ तासानी कॉंग्रेसमधला घोळ संपला आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून अशोक शंकरराव चव्हाण यांचे नाव जाहीर झाले. शुक्रवारी संध्याकाळी परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी राजधानी दिल्लीत ही घोषणा केली आणि सगळ्याच राज्यवासीयांनी "हुश्श' केले. तथापि, या निवडीपेक्षा महसूलमंत्री नारायण राणे यांनी पुकारलेलं बंडच ' ब्रेकिंग न्यूज ' ठरले. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने छगन भुजबळ यांच्याकडे उपमुख्यमंत्री व गृहमंत्रिपद सोपवले आहे.
विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा मराठवाड्यातील नेत्याचीच निवड करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कॉंग्रेस हायकमांडने पुन्हा मराठा समाजाच्या व्यक्तीकडेच महाराष्ट्राची सूत्रे सोपवली आहेत. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून विलासरावांची ओळख होती. आता शंकररावांचे सुपुत्र असलेले अशोक चव्हाण विलासरावांचे राजकीय वारसदार बनले आहेत. मुंबईत २६ नोव्हेंबरला झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यानंतर मराठवाड्यातील केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील आणि आर. आर. आबांपाठोपाठ विलासराव देशमुख यांनाही राजीनामा देणे भाग पडले होते. लातूरच्या या दोन्ही नेत्यांना मुंबईच्या हल्ल्यानंतर घरी बसावे लागले. परंतु, आता नांदेडचे अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्याने पुन्हा एकदा मराठवाड्याचे भाग्य फळफळले आहे.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा वारसदार कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि नारायण राणे यांचा पत्ता कापत, अखेर उद्योग व सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बाजी मारली. कॉंग्रेस आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री निवडण्याचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना बहाल करण्यात आले होते. कॉंग्रेस निरीक्षक प्रणव मुखर्जी आणि ए. के. अँटनी यांनी आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा करुन त्यांचा कल जाणून घेतला.
त्यापैकी बहुसंख्य आमदारांनी अशोक चव्हाण यांच्या बाजूने कौल दिला होता. विलासरावांनीही अशोक चव्हाण यांच्याच उमेदवारीला पाठिंबा दर्शवला होता. नारायण राणे यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी अशोक चव्हाण यांच्या बाजूनं लॉबिंग केल्याचीही चर्चा आहे. सरतेशेवटी हा आमदारांचा कौल सोनिया गांधी यांच्या कानावर घालण्यात आला आणि अखेर, सगळ्या नाट्यानंतर अशोक चव्हाण यांचे नाव जाहीर झाले.
नारायण राणे यांच्या दबावतंत्रामुळे ही निवड खूपच लांबणीवर पडली होती. मात्र एवढे करूनही राणें यांचे स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी या निवडीबद्दल संताप व्यक्त केला. अशोक चव्हाणांपासून कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधीपर्यंत सगळ्यांवर त्यांनी टीकेची झोड उठवली आणि कॉंग्रेस सोडण्याचेच संकेत दिलेत. आगामी काळात त्यावरून मोठे राजकीय नाट्य रंगणार असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या निवडीपेक्षा राणेंचा बंडांचा झेंडाच उंच राहिला.
छगन भुजबळ उपमुख्यमंत्री
कॉंग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा घोळ काही केल्या संपत नसताना, राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाची धुरा छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात ही घोषणा केली. "पहले आप'च्या शर्यतीत राष्ट्रवादीनं आपले पत्ते ओपन केले.
येत्या काळात होणा-या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका, आणि ओबीसींमध्ये भुजबळांचं वाढतं प्रस्थ लक्षात घेऊनच मास्टरमाईंड पवारसाहेबांनी आपल्या या विश्वासातल्या माणसावर पुन्हा विश्वास दाखवल्याचं बोललं जातंय. परंतु, हे पद भुजबळांसाठी काटेरी मुकुटच ठरावा.
आत्ताच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या छगन भुजबळांनी गेल्या कार्यकाळात गृहमंत्रीपद अत्यंत समर्थपणे सांभाळले होते. परंतु तेलगी प्रकरण त्यांच्या चांगलंच अंगाशी आले. त्यावरून शरद पवारांनीच त्यांचा राजीनामा घेतला होता. परंतु, भुजबळ पवारांच्या मनातून उतरले नाहीत. म्हणूनच, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदासाठी जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांच्याऐवजी पवारांनी भुजबळांना प्राधान्य दिलं. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते आणि मंत्री, असा प्रवास करणा-या भुजबळ नव्या जबाबदारीमुळे पुन्हा प्रकाशझोतात आलेत.
शिवसेनेपासूनच अत्यंत धडाडीचे सैनिक म्हणून भुजबळ ओळखले जात. त्यांच्यातले वक्तृत्व आणि नेतृत्वगुण शरद पवारांनी तेव्हाच हेरले होते. शिवसेना सोडून भुजबळ कॉंग्रेसमध्ये आणि नंतर राष्ट्रवादीत गेल्यानंतर या गुणांचा पवारांनी योग्य वापर करून घेतला. शिवसेना-भाजप सरकारला धारेवर धरण्यासाठी त्यांनी भुजबळांना विरोधी पक्षनेतेपद दिलं. ती त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली आणि त्याच जोरावर ते पुढच्या सरकारात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र २३ डिसेंबर २००३ हा दिवस त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरला. अब्दुल करीम तेलगीच्या, बनावट मुद्रांक शुल्क घोटाळ्याप्रकरणी त्यांचं नाव समोर आले आणि त्यांना आपलं पद सोडावे लागले. त्यानंतर मात्र, भुजबळ पक्षात अडगळीत पडले. सध्याच्या सरकारात त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं सोपवण्यात आले होते.
राज्य मंत्रिमंडळात मोठं पद नसले तरी समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजात भुजबळांचा दरारा वाढतच होता. अगदी देशभरात त्यांच्या सभांना गर्दी होत होती आणि ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. याच कामाच्या बळावर त्यांनी गृहमंत्रिपद पुन्हा मिळवले, तथापि, मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांची पुढची वाट सोपी नक्कीच नाही.

'कॉंग्रेसला संपवणार' खवळलेल्या नारायण राणेंची गर्जना

मुख्यमंत्रिपद हुकल्याची हुरहूर
माझ्याविरुद्ध राजकीय कारस्थान
अशोक चव्हाण स्पर्धक, छे..

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्रिपद हुकल्याने दुखावले गेलेले नारायण राणे यांनी आज मी कॉंग्रेसला संपवल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही, असे सांगून आपल्या पक्षत्यागाचे स्पष्ट संकेत दिले. यापुढे आपण कॉंग्रेसमध्ये कोणतेही पद घेणार नाही, असे त्यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले आणि पक्ष योग्य वेळी सोडीन, असे सूचक उदगारही काढले.
नेतृत्वाने शब्द पाळला नाही, मी मुख्यमंत्री बनू नये यासाठी काही नेत्यांनी कारस्थान केले, कॉंग्रेसनेत्यांना लोकांची काहीही चिंता नाही, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रिपदासाठी लायक नसून ते माझे स्पर्धक होऊ शकत नाहीत, आमदारांची मते आजमावण्याचे नाटक केले गेले आदी आरोप राणे यांनी केले.
मावळते मुख्यमंत्री विलासराव देशमुख, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकरसिंह, तसेच दिल्लीतील एक नेता यांनी मिळून कट केला आणि अशोक चव्हाण यांचे नाव पुढे केले, असा दावा राणे यांनी केला.
ते म्हणाले की, यात विलासरावांनी अतिशय घाणेरडे राजकारण केले. आमदारांवर दबाव टाकला. कोणत्याही परिस्थितीत मी मुख्यमंत्री होऊ नये, यासाठी त्यांनी परवा रात्रीपासूनच प्रयत्न चालवले.
कोणत्याही कलंकाविना पायउतार होत असल्याचा विलासरावांचा दावा खोडून काढताना राणे म्हणाले की, मुंबईत दहशतवाद्यांच्या हल्ल्‌यांतील पाचशेवर बळी आणि जखमी हे पाप विलासरावांचेच आहे. ते राज्यावरील कलंक आहेत आणि त्यांचे कलंक मी पुढे जाहीर करीन.
निष्ठावंत या कल्पनेची टर उडविताना ते म्हणाले की, पक्षातून बाहेर जाऊन विधान परिषदेसाठी उभे राहायचे, शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्री बंगल्यावर जाऊन मदत मागायची आणि नंतर कॉंग्रेसचे मुख्यमंत्री व्हायचे (विलासरावसारखे) याला कॉंग्रेसमध्ये निष्ठावंत म्हणतात !
अशोक चव्हाण हे माझे स्पर्धक नाहीत. ते एक खाते नीट सांभाळू शकत नाहीत. त्यांच्याजवळ गुणवत्ता नाही, नेतृत्वाचे गुण नाहीत. त्यांची काय लायकी आहे, असे आरोपही त्यांनी केले.
केंद्रीय निरीक्षकांनी आमदारांची मते आजमावण्याचे नाटक केले, असा आरोप करताना राणे म्हणाले की, याआधी निरीक्षक यायचे आणि निकाल जाहीर करायचे. पण यावेळी तसे झाले नाही. कॉंग्रेसच्या कोणत्याही नेत्यावर माझा विश्वास राहिलेला नाही.
वास्तविक, जास्तीत जास्त (४०-५०) आमदारांनी माझ्या बाजूने कौल दिला होता आणि माझे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावयास हवे होते. पण कटकारस्थान करणा-यांनी हे होऊ दिले नाही, असाही आरोप त्यांनी केला.
अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करून कॉंग्रेसने शिवसेनेला पोषक निर्णय घेतला आहे, असा टोमणाही त्यांनी मारला.
तुमच्यासोबतच्या आमदारांची काय भावना आहे, असे विचारता राणे म्हणाले की, मी माझे मत सांगितले आहे. आमदार त्यांचे सांगतील.

वर्षा' वर निदर्शने, नारेबाजी
विलासरावांच्या "वर्षा' बंगल्याशेजारीच राणेंचा "ज्ञानेश्वरी' बंगला आहे. तेथे त्यांची पत्रपरिषद संपली आणि त्याचवेळी चव्हाण यांच्या नावाची घोषणा दिल्लीत झाली. त्यामुळे संतापून राणेसमर्थक वर्षावर चालून गेले आणि विलासरावांच्या विरोधात घोषणाबाजी करू लागले.
ज्ञानेश्वरी बंगल्याकडून लोंढ्‌याने कार्यकर्ते वर्षाच्या प्रवेशद्वाराकडे नारेबाजी करीत जाऊ लागले, तेव्हा पोलिसांना त्यांना आवरताना कठीण जात होते. हे लोक बंगल्यात घुसतात की काय, अशी स्थिती क्षणभर निर्माण झाली होती. परंतु, काही काळ घोषणाबाजी करून हे कार्यकर्ते ज्ञानेश्वरीकडे निघून गेले. ही घटना घडली तेव्हा विलासराव वर्षावर आणि राणे ज्ञानेश्वरीत हजर होते, हे विशेष!

पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त

नवी दिल्ली, दि. ५ : पेट्रोल आणि डीझेल स्वस्त झाले आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी पेट्रोलचे दर पाच रुपये तर डिझेल दोन रुपये प्रति लिटरने कमी करण्याची घोषणा केली आहे.
कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय दर कमी झाल्याचे लक्षात घेता सरकारने हे पाऊल उचलले आहे. ही हंगामी कपात असून शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. स्वयंपाकाचा गॅस आणि केरोसीनच्या किंमतीत मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. सरकारने जूनमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर क्रमशः पाच रुपये आणि तीन रुपये प्रति लिटरने वाढवले होतेहे वाचकांना आठवत असेलच.

चालतेबोलते 'नाट्यस्कूल' हरपले, जयदेव हट्टंगडी गेले

समांतर रंगभूमीवरील एक बिनीचा शिलेदार हरपला
प्रायोगिक नाटकांचे एक चालतेबोलते 'स्कूल' कायमचे काळाच्या 'पडद्या'आड गेले

नाट्य प्रशिक्षण घेतल्यानंतर थेट व्यावसायिक नाटक किंवा चित्रपटांची वाट चोखाळणारे अनेकजण सापडतील. तथापि, समर्थ नाट्य चळवळ उभी राहावी म्हणून व्यावसायिकतेची, झगमगाटाची दुनिया नाकारून संपूर्णपणे स्वतःचे आयुष्य नाट्यचळवळीला समर्पित केलेले जे मोजके नाट्यकर्मी आहेत त्यांपैकी एक अग्रक्रमाने येणारे नाव म्हणजे कै. जयदेव हट्टंगडी. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेतून प्रशिक्षित होऊन बाहेर पडल्यापासून ते आजतागायत हट्टंगडी समांतर रंगभूमीच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर नवनवीन प्रयोग करतच राहिले. "रंगायन'मधून फुटून निर्माण झालेली "आविष्कार' ही नाट्यसंस्था समांतर रंगभूमीला वाहून घेतलेली एक अग्रगण्य संस्था. जयदेव हट्टंगडी या संस्थेशी गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळ संबंधित होते. आविष्काराचे ते आधारस्तंभ होते."आविष्कार'च्या नाट्य प्रशिक्षण शिबिरांतून अगदी सुरुवातीपासून ते अगदी कालपरवापर्यंत त्यांनी अनेक होतकरू रंगयात्रींना मार्गदर्शन केले. या संस्थेतर्फे त्यांनी "भिंत', "पोस्टर',"मीडीया' यासारख्या अनेक यशस्वी नाटकांचे दिग्दर्शन केले. "चांगुणा' या नाटकासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाला. "बाकी इतिहास', "वारा भवानी आईचा', "कुत्ते' यासारखी वेगळ्या पठडीतली नाटके त्यांनी दिली.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अब्राहम अल्काझींच्या हाताखाली शिकून मिळवलेल्या अनुभवात स्वतःच्या स्वतंत्र शैलीची व प्रज्ञेची भर घालून हट्टंगडीनी "चांगुणा' हे नाटक बसवले आणि या पहिल्याच नाटकाने मराठी रंगभूमीने या समर्थ दिग्दर्शकाची दखल घेतली. "मीडीया' या दुसऱ्या नाटकाने नाटकाच्या विविध कंगोऱ्यांवरील त्यांच्या जबरदस्त प्रभुत्वावर शिक्कामोर्तब केले. नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, अभिनय या सर्वच बाबतीत "मीडीया' हे नाटक प्रायोगिक मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरले.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये जे अल्काझी शिकवायचे ते मराठी रंगभूमीवर रुजविण्याचे काम ज्या दोन दिग्गजांनी केले त्यांपैकी पहिले कमलाकर सोनटक्के, दुसरे जयदेव हट्टंगडी. एक अभिनेता म्हणून अपयशी ठरलेले हट्टंगडी एक दिग्दर्शक म्हणून टिकले पण एक नाट्यप्रशिक्षक म्हणून सर्वांना मानवले.
पाश्चात्त्य रंगभूमी, भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी इत्यादींचं त्याचं वाचन इतके प्रचंड होतं की त्यांची नाट्यशिबीरं म्हणजे नाट्यकर्मींसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरत असे. "मला सिन्सियर थिएटर करायचे आहे' हे त्यांचे परवलीचे वाक्य असायचे.
गोवा कला अकादमीची तीन शिबिरे कै. जयदेव हट्टंगडीनी घेतली. दोन मराठी रंगभूमीसाठी व एक तियात्रासाठी. (मूळ मंगलोरी असल्यामुळे ते कोकणीही उत्तम बोलत असत).
दिलीप देशपांडे, दिलीप बोरकर, डी. सतीश, महेश आंगले व डॉ. अजय वैद्य हे गोव्यातील त्यांचे निकटचे स्नेही.
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अजय वैद्य यांची यासंदर्भात भेट घेतली असता ते म्हणाले की, नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय इ.बद्दल अतिशय ताकदीने बोलणारा माणूस म्हणजे जयदेव हट्टंगडी. दिवसाचे सलग आठ तास ते एकट्याने शिबिर घेत असत. त्यात ते थिअरी तर शिकवतच; पण जास्त भर असायचा तो प्रात्यक्षिकांवर. त्यामुळे डॉ. वैद्यांच्या मते ते उत्कृष्ट नाट्यशिक्षक तर होतेच पण त्याहीपेक्षा नाट्यप्रशिक्षक म्हणून ते मोठे होते. अतिशय शिस्तप्रिय, वक्तशीर व शिबिरापुरते तापट असा त्यांचा खाक्या होता. नाटकाचा अचूक आकृतिबंध व सक्षम पात्रचित्रण ही त्यांची बलस्थानं होती. नेहमी परिपूर्णतेकडेे त्यांचा कटाक्ष असायचा. संवाद उच्चारताना भाषेच्या सौंदर्याच्या बाबतीत ते कधीच तडजोड करत नसत.
डॉ. वैद्य म्हणाले, की नाटक करताना आव्हान स्वीकारणे हा जयदेव हट्टंगडींचा धर्मच होता; अखेरच्या दिवसांत आतड्याच्या कर्करोगाशी झगडतानाही त्यांनी मृत्यूचे आव्हान स्वीकारलेलेच होते.

मुख्यमंत्र्यांकडून सभागृहाचा अवमान : दामोदर नाईक

भाजपची खास अधिवेशनाची मागणी फेटाळली
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षातर्फे गोव्याच्या सुरक्षेेबाबत खास विधानसभा अधिवेशन बोलावण्याच्या मागणीला मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवरून विरोधक चांगलेच आक्रमक बनले आहेत.
"सुरक्षेच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी खास विधानसभा अधिवेशन कशाला हवे. त्यात काय भाषणे करायची आहेत?,' अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हे उद्गार म्हणजे सभागृहावर दाखवलेला स्पष्ट अविश्वास असून त्यांनी सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते आमदार दामोदर नाईक यांनी केला आहे.
राज्याच्या सुरक्षेबाबत व्यापक चर्चा व्हायला हवी,अशी मागणी करून मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्याची सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच सुरक्षेच्या बाबतीत कायद्यातील बदल व सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वसमावेशक चर्चेची मागणी भाजपतर्फे करण्यात आली होती. या मागणीबाबत मुख्यमंत्री कामत यांना विचारले असता त्यांनी दिलेली प्रतिक्रिया धक्कादायकच असल्याचे आमदार दामोदर नाईक म्हणाले. विधानसभा अधिवेशनात केवळ भाषणे ठोकली जातात,असेच मुख्यमंत्र्यांना म्हणावयाचे आहे काय,असा सवाल त्यांनी केला. विधानसभेत चर्चा घडल्यानंतरच त्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी पुढे येतात व त्यानंतर जनहिताच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय घेतले जातात. मुळात जनतेसाठी काहीही चांगले करू न शकणाऱ्या सरकारला अधिवेशन नकोच असते, हे विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारने पूर्वीच दाखवून दिले आहे, त्यामुळेच गेल्या वर्षभरात अधिवेशनकाळात केलेली कपात त्याचेच उदाहरण असल्याची टीका श्री.नाईक यांनी केली.
विधानसभेत सरकारकडून दिलेली उत्तरे व वक्तव्ये ही थेट जनतेसाठी असतात. मुळातच राज्याच्या सुरक्षेबाबत सरकारने आपली विश्वासाहर्ता गमावली आहेच, आता याच कारणावरून अधिवेशन बोलावल्यास "उरलीसुरली'ही शिल्लक राहणार नाही, या भीतीनेच सरकार विरोधकांना सामोरे जाण्यास घाबरत असल्याचे श्री. नाईक म्हणाले.
गोवा सरकारने इ-प्रशासनाच्या नावाखाली गेल्या दोन वर्षापूर्वी कोणताही अभ्यास व तांत्रिक गोष्टींचा विचार न करता ४६६ कोटी रुपयांचा "ब्रॉडबॅंड' करार केला. हा करार सही करण्यापूर्वीच त्यात शेकडो कोटींचा घोटाळा असल्याचे विरोधकांनी तेव्हाच सांगितले होते; परंतु तरीही या योजनेचा शुभारंभ खुद्द देशाचे पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्या हस्ते करून त्या घोटाळ्याला लपवण्याचे प्रयत्न झाले. अखेर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेतच या घोटाळ्याचे विस्तृत विवेचन केल्यानंतर व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्याला साथ दिल्यानंतर आता या कराराची अर्धी रक्कम कमी झाली.
विधानसभेत विविध आमदार आपल्या जनतेच्या समस्या मांडत असतात. या प्रक्रियेला मुख्यमंत्री पोकळ भाषणांची उपाधी देत असतील तर हे गोव्यातील जनतेचे दुर्दैव असल्याचे आमदार नाईक म्हणाले. सरकार करीत असलेल्या गोष्टींवर जनतेने कोणताही प्रतिप्रश्न न करता मुकाट्याने त्या गोष्टींचा स्वीकार करावा, असेच जर मुख्यमंत्र्यांना म्हणावयाचे असेल तर ती लोकशाही नसून हुकूमशाही आहे, हे त्यांनी ध्यानात ठेवावे,असा टोलाही श्री.नाईक यांनी हाणला.

पाकमध्ये आत्मघाती स्फोटांमध्ये दहा ठार, शंभरहून अधिक जण जखमी

पेशावर, दि. ५ : पाकिस्तानातील वायव्य सरहद्द प्रांतातील कलाया येथे आज शुक्रवारी झालेल्या आत्मघाती बॉंबस्फोटात किमान दहा ठार, तर सुमारे शंभरहून अधिक जण जखमी झाले. इद उल अझा या सणासाठी लोक खरेदीत मग्न असतानाच हे धमाके झाले. त्यामुळे कित्येक इमारतींना आग लागली. त्यात होरपळून अनेक जण जखमी झाले. त्यापैकी कित्येकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. कानठळ्या बसवणाऱ्या या स्फोटांमुळे अनेक शक्तिशाली इमारतींचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. या स्फोटांची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. तथापि, पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणांना या स्फोटांमुळे जोरदार धक्का बसला आहे.

Friday 5 December, 2008

राजस्थान निवडणुकीत ६५ टक्के मतदान

जयपूर, दि. ४ - राज्यातील काही मतदार संघात उफाळलेला जातीय हिंसाचार आणि उमेदवारांच्या समर्थकांमधील संघर्षादरम्यानच राजस्थान विधानसभेच्या एकूण २०० जागांसाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत सुमारे ६५ टक्के मतदारांनी आपला हक्क बाजावला. मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.
मुख्यमंत्री वसुंधरा राजे, कॉंग्रेस महासचिव अशोक गेहलोत, राजस्थानच्या माजी विधानसभा अध्यक्ष सुमित्रा सिंग, पीसीसी अध्यक्ष सी.पी.जोशी यांच्यासह २१९४ उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी मतपेटीत बंद झाले. यात कॉंग्रेसच्या २००, भाजपाच्या १९३, बसपाच्या १९९ आणि १०१९ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
कोटा जिल्ह्याच्या लाडपुरा मतदार संघातील बडीखेरा गावात उग्र जमावाला पांगवण्यासाठी सीआरपीएफ जवानांना हवेत गोळीबार करावा लागला. गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिस महासंचालक के.एस.बैन्स यांनी दिली. तेथेच करौली जिल्ह्यातील टोडा भीम परिसरात एका मतदान केंद्राजवळ अनोळखी व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याचे तर काही ठिकाणी राजकीय पक्षांत हाणामारी झाल्याचेही वृत्त आहे.
जयपूर, अजमेर आणि सवाई माधोपूर जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) ऐनवेळी बिघाड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विनोद झुत्शी यांनी सांगितले. व यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे फेरमतदान घेतले जाऊ शकते असेही ते म्हणाले.
राजस्थानचे राज्यपाल एस.के.सिंग आणि त्यांच्या पत्नी मंजू यांना जयपुरातील हवासरक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी बराच वेळ तात्कळत उभे राहावे लागल्याची माहितीही मिळाली आहे.

सोनिया गांधी मुख्यमंत्री निवडणार

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) - विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेसचा नवा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक विधान भवनात झाली. कॉंग्रेसी परंपरेनुसार नवा नेता निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी देण्याचा ठराव आमदारांच्या बैठकीत संमत करण्यात आला. आता सर्व आमदारांशी चर्चा करुन कॉंग्रेस निरीक्षक आपला अहवाल सोनियांना देतील आणि त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल.
कॉंग्रेस हायकमांडच्या आदेशानुसार, मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज सकाळी राज भवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी आज सायंकाळी चार वाजता विधान भवनात कॉंग्रेस आमदारांची बैठक सुरु झाली. केंद्रीय विदेशमंत्री प्रणव मुखर्जी व महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस ए. के. अँटनी हे कॉंग्रेस निरीक्षक म्हणून यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे विलासराव देशमुख यांनी मांडला. पतंगराव कदम यांनी त्यास अनुमोदन दिले. सर्वानुमते हा ठराव संमत करण्यात आला.
आता विधान भवनात कॉंग्रेस निरीक्षक सर्व आमदारांना स्वतंत्रपणे भेटून त्यांची मते जाणून घेत आहेत. मुख्यमंत्री कोणाला करावे, याबाबत ते आमदारांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. त्यानंतर ते आपला अहवाल सोनिया गांधी यांना सादर करतील आणि मुख्यमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय सोनिया गांधीच घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राजीनामा दबावाखाली नाही : विलासराव
राजीनामा देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. अतिरेकी हल्ल्‌यानंतर उसळलेल्या जनभावनेचा आदर करीत मीच राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आणि पक्षश्रेष्ठींनी तो स्वीकारला, असे सांगत मावळते मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज निरोप घेतला.
राज्यपालांना राजीनामा सादर करण्याआधी सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या आपल्या शेवटच्या पत्रपरिषदेत ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा राजीनामा घेऊन माझ्या गच्छंतीची परिस्थिती निर्माण केली, हे म्हणणे खरे नाही. कॉंग्रेसचे निर्णय आमचा पक्ष स्वत:च घेतो.
चित्रपटनिर्माते रामगोपाल वर्मा यांना ताज हॉटेलच्या पाहणी दौ-यात नेणे भोवले का, या प्रश्नावर विलासराव उत्तरले की, कोण माणूस कोणाबरोबर फिरला एवढ्‌या क्षु?क मुद्द्यावरून असे महत्त्वाचे निर्णय होत नसतात. तसे म्हणणे अन्यायकारक आहे. मात्र, ती एक चूक होती आणि त्याबद्दल मी माफी मागितली आहे आणि आजही मागतो.
आबा होणार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष
उपमुख्यमंत्रिपद गमावलेले आर. आर. उपाख्य आबा पाटील यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष नेमण्याचा आणि पक्षसंघटनेत व मंत्र्यांमध्येही फेरबदल करण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी घेतला असल्याचे समजते.
सध्याचे प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन आबांसाठी ही जागा रिकामी केली जाणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आबाच प्रदेशाध्यक्ष होते. हे पद त्यांच्याकडे दुस-यांदा येत आहे. त्याद्वारे त्यांचा मान राखला जाईल आणि येत्या निवडणुकांमध्येही त्यांच्या प्रतिमेचा लाभ करून घेतला जाईल. कारण, पवारांनंतर आबा हेच पक्षाचा राज्यातील चेहरा सिद्ध झाले आहेत. कॉंग्रेसने मुख्यमंत्री मराठा समाजाचा केल्यास (तसेच होईल. कारण, सध्याच्या घडीला शर्यतीत असलेले तीनही नेते- नारायण राणे, अशोक चव्हाण व बाळासाहेब विखे पाटील मराठाच आहेत.) राष्ट्रवादी छगन भुजबळ यांच्या रूपात ओबीसी उपमुख्यमंत्री देणार आहे.
तथापि, गृहमंत्रिपदाचा त्यांचा तिढा अजून सुटलेला नाही. टॉपच्या एकाही नेत्याला आजच्या परिस्थितीत गृह खात्याचे लोढणे आपल्या गळ्यात नको आहे. पण शेवटी, जयंत पाटील किंवा दिलीप वळसे पाटील यांच्यापैकी एकाच्या गळ्यात ते बांधले जाण्याची शक्यता दिसत आहे.
नव्या मंत्रिमंडळाच्या निमित्ताने आपल्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही बदल करण्याचेही राष्ट्रवादीने ठरविले असल्याचे सांगण्यात येते. चांगल्या मंत्र्यांना पदोन्नती, तर अकार्यक्षम मंत्र्यांची सुट्टी, असे सूत्र वापरले जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

कोण होणार मुख्यमंत्री?
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नव्या नावांचीही चर्चा सुरु झाल्याने ही स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. सुशीलकुमार शिंदे आणि नारायण राणे हे या रेसमध्ये सर्वात आघाडीवर आहेत. मात्र बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव आज नव्यानेच पुढे आले आहे. त्याशिवाय उद्योगमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचीही चर्चा आहेच. आज रात्री उशिरा किंवा उद्याच नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होईल, असे समजते.

राजस्थान निवडणुकीत ६५ टक्के मतदान

जयपूर, दि. ४ - राज्यातील काही मतदार संघात उफाळलेला जातीय हिंसाचार आणि उमेदवारांच्या समर्थकांमधील संघर्षादरम्यानच राजस्थान विधानसभेच्या एकूण २०० जागांसाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत सुमारे ६५ टक्के मतदारांनी आपला हक्क बाजावला. मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.
मुख्यमंत्री वसुंधरा राजे, कॉंग्रेस महासचिव अशोक गेहलोत, राजस्थानच्या माजी विधानसभा अध्यक्ष सुमित्रा सिंग, पीसीसी अध्यक्ष सी.पी.जोशी यांच्यासह २१९४ उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी मतपेटीत बंद झाले. यात कॉंग्रेसच्या २००, भाजपाच्या १९३, बसपाच्या १९९ आणि १०१९ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
कोटा जिल्ह्याच्या लाडपुरा मतदार संघातील बडीखेरा गावात उग्र जमावाला पांगवण्यासाठी सीआरपीएफ जवानांना हवेत गोळीबार करावा लागला. गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिस महासंचालक के.एस.बैन्स यांनी दिली. तेथेच करौली जिल्ह्यातील टोडा भीम परिसरात एका मतदान केंद्राजवळ अनोळखी व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याचे तर काही ठिकाणी राजकीय पक्षांत हाणामारी झाल्याचेही वृत्त आहे.
जयपूर, अजमेर आणि सवाई माधोपूर जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) ऐनवेळी बिघाड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विनोद झुत्शी यांनी सांगितले. व यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे फेरमतदान घेतले जाऊ शकते असेही ते म्हणाले.
राजस्थानचे राज्यपाल एस.के.सिंग आणि त्यांच्या पत्नी मंजू यांना जयपुरातील हवासरक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी बराच वेळ तात्कळत उभे राहावे लागल्याची माहितीही मिळाली आहे.

पिंपळेश्वर दत्त मंदिरात कलशस्थापना

प. पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींची खास उपस्थिती

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - प. पू. श्री ब्रम्हेशानंदाचार्य स्वामी कुंडई मठाधीश यांच्या शुभ हस्ते आज गुरुवारी सकाळी चिंचोळे पणजी येथील श्री पिंपळेश्र्वर दत्तमंदिराच्या शिखर कलशाची स्थापना करण्यात आली.
त्यानिमित्त आज पहाटेपासून अनेक धार्मिक विधी करण्यात आले. पहाटे श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रीस पंचामृत पूजा, अभिषेक पूजा पाठ व अन्य विधी पार पडले. यावेळी पणजी भागातील भाविकांनी अलोट गर्दी केली होती. त्यांनी श्रींचे दर्शन घेतले. सकाळी ठीक ९ वाजता पवित्र मंत्रघोषात मंदिराच्या शिखरावर प. पू. ब्रम्हेशानंदाचार्य स्वामी यांनी कलशाची स्थापना केली. उपस्थित भाविकांनी प. पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे दर्शन घेतले. त्यानंतर महामंगलारती झाल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यापूर्वी काल बुधवारी या कलशाची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

कोकण रेल्वेच्या कंटेनरात मिळाला कुजलेला मृतदेह

मडगावातील घटनाः पोलिसही चक्रावले - मंगळूरहून पार्सल
मडगाव, दि. ४ (प्रतिनिधी) : मुंबईतील गेल्या आठवड्यातील घटनांचे प्रकरण ताजे असतानाच आज येथील कोकण रेल्वे स्टेशनवर एका सीलबंद कंटेनरमध्ये एक कुजलेला मृृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली. नंतर पोलिसांना पाचारण करून तो कंटेनरच पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. तो हॉस्पिसियोच्या शवागरात ठेवण्यात आला आहे.
उद्या शुक्रवारी शवचिकित्सेनंतरच तो पुरुष की महिला ते उघड होणार आहे.
कोकण रेल्वे पोलिस अधीक्षक वामन तारी यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या मे महिन्यात निळ्या रंगाच्या व ३ फूट ऊंचीच्या स्वरूपातील हे सीलबंद पार्सल मंगळूरहून आले होते व कोणीही दावा न केल्याने रेल्वेच्या स्टोअररूममध्ये पडून होते. रेल्वेच्या नियमावलीनुसार दावा न करता राहिलेली पार्सले तशीच ठेवली जातात व सहा महिन्यांचा काळ उलटताच उघडली जातात. नंतर त्यांचा लिलाव पुकारला जातो.
सदर पीव्हीसी पिंपाच्या स्वरूपातील पार्सल तथा कंटेनर सहा महिन्यांचा काळ उलटल्यानंतर सील फोडून उघडला असता त्यातून असह्य दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पार्सल विभागाचे श्रीधर भट यांनी कळविताच कोकण रेल्वेचे पोलिस उपनिरीक्षक हिरू कवळेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह येऊन पंचनामा केला. त्यांच्याकडून संदेश मिळताच अधीक्षक वामन तारी व उपअधीक्षक गुरुप्रसाद म्हापणे यांनी मडगावला भेट देऊन सदर कंटेनरची पहाणी केली व सर्व माहिती जाणून घेतली.त्यांनी कोकण रेल्वे स्टेशन अधिकाऱ्यांना या कंटेनरबाबतचे सर्व कागदपत्र लगेच सादर करण्यास सांगितले; मात्र सायंकाळपर्यंत कागदपत्रे सादर केली गेली नव्हती.
तो मृतदेह कपड्यात गुंडाळलेला तो मृतदेह फुगून कुजला आहे. कंटेनर जशाचा तसा हलविणेही दुर्गंधीमुळे पोलिसांना असह्य झाले होते.
मंगलोरहून तो कोणी व कोणाच्या पत्यावर पाठविला होता ती माहिती मात्र कोकण रेल्वेकडे मिळू शकली नाही. रेल्वे कामकाजातील ही हेळसांड असल्याचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी मान्य केले.
दरम्यान, खास सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ३१ मे रोजी जोधपूरहून मडगावसाठी पाठवलेली बरीच पार्सले मंगळूरला पोंचली होती. नंतर ती मंगळूर वेर्णा लोकलमधून मडगावात आली. त्यात हेही पार्सल असावे असा कयास आहे. सदर कंटेनरवर "मडगाव' एवढाच उल्लेख आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार कोणीतरी खून करून विल्हेवाट लावण्यासी ते पार्सल पाठविलेले असावे. यावरून अशाप्रकारे येणाऱ्या पार्सलांची कोणतीच नोंद रेल्वेकडे नसते हे दिसून आले व त्यातून ताज्या सुरक्षा उपाययोजनेच्या अनुषंगाने रेल्वेच्या व्यवस्थेत अनेक त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले.
अधिकृत दुजोरा मिळू न शकलेल्या वृत्तानुसार सीलबंद असतानाही सदर कंटेनरमधून असह्य दुर्गंधी येऊ लागल्यावर रेल्वे पार्सल विभागातील कोणा कर्मचाऱ्याने एका मालवाहू रिक्षावाल्याला बोलावून तो पिंप दूरवर नेऊन टाकायला लावला. तो पिंप दूरवर नेऊन रिकामा करण्याच्या प्रयत्नात असताना त्याला मृतदेहाचा पाय बाहेर आलेला दिसला. त्यामुळे घाबरून त्याने तो पिंप परत आणून रेल्वेच्या लोकांच्या हवाली केला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अर्थात, कोकण रेल्वे पोलिस अधीक्षक वामन तारी व जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी या वृत्ताचा इन्कार केला. आज दिवसभर मडगावात याच प्रकाराची चर्चा सुरू होती.

गोव्याची गुप्तहेर यंत्रणा खिळखिळी

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या गोव्यालाही दहशतवादी कारवायांपासून धोका असल्याचे स्पष्ट होत असतानाच पोलिस खात्याचा कणा समजला जाणाऱ्या गुप्तहेर विभागाची स्थिती अत्यंत बिकट असल्याचे उघड झाले आहे. गोवा पोलिस खात्याच्या गुप्तहेर विभागात गुप्त माहिती गोळा करण्यासाठी केवळ १२० पोलिस आहेत. त्यातील ९० टक्के कर्मचारी राजकीय घडामोडी सामाजिक संघटनाच्या बैठकांतील माहिती आणि पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांची छाननी करणे यातच गुंतलेला असतो, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
"गुप्तहेर विभागाच्या "स्पेशल सेल'ला २५० पोलिसांची गजर असून यात सुमारे १५० पोलिसांची चणचण भासत आहे. तसेच या विभागाकडे एकही चार चाकी वाहन नसून संपूर्ण गोव्यात या विभागाकडे केवळ १४ दुचाक्या आहेत. ही माहिती या विभागाचे अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली. या विभागाला ४ चारचाकी वाहने, १५ दुचाक्यांची गरज आहे. तसेच कळंगुट या सतत गजबजलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर विदेशी मंडळींचा राबता असतो. त्यामुळे तेथील गुप्त माहिती गोळा करण्यासाठी स्पेशल सेल केंद्र सुरू करण्याची गरज आहे. संपूर्ण राज्यात ४ केंद्रे सध्या कार्यरत असून या विभागाची सात "स्पेशल सेल'ची केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. तथापि, "एटीएस' प्रमाणेच या विभागाचाही प्रस्ताव पोलिस मुख्यालयातच धूळ खात पडला आहे, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे.
कळंगुट व कोलवा येथे "स्पेशल सेल' केंद्र सुरू करणे निकडीचे बनले आहे. दहशतवादी कारवाया केंद्रबिंदू ठेवून माहिती गोळा करण्याचे काम या विभागाकडून होत नसल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मान्य केले. म्हापसा येथील गुप्तहेर विभागाला तेरेखोल पेडणे ते बेती वेऱ्यापर्यंत लक्ष ठेवावे लागते. ही बाब व्यावहारिक नसल्याने अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचप्रमाणे खबऱ्यांचे जाळे विणण्याच्या बाबतीतही पोलिसांचा गुप्तहेर विभाग खूपच मागे असल्याचे अनेक गोष्टींवरून स्पष्ट झाले आहे.
"सिमी' या दहशतवादी संघटनेचा रझीउद्दीन नाझीर याला हुबळी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने गोवा आमच्या "हिटलिस्ट'वर असल्याची माहिती दिली होती. त्याला गोवा "टार्गेट' करण्यासाठी "इंडियन मुजाहिद्दीन'चा मास्टरमाईंड सफदर नागोरीने आदेश दिला होता, असा गौप्यस्फोट त्याने पोलिस तपासात उघड केला होता. त्यानंतर दोनवेळा दहशतवाद्यांनी गोव्यात येऊन टेहळणी करून अनेक ठिकाणची छायाचित्रे आणि महत्त्वाची माहिती गोळा केली होती. सफदर नागोरी याचे लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेशी घनिष्ठ संबंध असल्याने लष्करे ए तोयबा या संघटनेचीही गोव्यावर वक्रदृष्टी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

"अल् कायदा'ची गोव्यावर वक्रनजर!

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - "अल-कायदा' या दहशतवादी संघटनेकडून गोव्याला लक्ष्य बनवण्याचे स्पष्ट संकेत राज्य सरकारला गुप्तचर यंत्रणेकडून मिळाल्याची खळबळजनक माहिती उपलब्ध झाली आहे. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर या माहितीचा थेट परिणाम
पर्यटन उद्योगावर जाणवेल या भीतीने राज्य सरकारकडून त्याबाबत गुप्तता पाळली जात असली तरी संपूर्ण राज्याच्या सुरक्षा यंत्रणेचा फेरआढावा घेण्याचे काम गृह खात्याकडून सुरू झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
मुंबईवरील हल्ल्यांची गंभीर दखल राज्याच्या गृह खात्याने घेतली आहे. त्यादृष्टीने संपूर्ण पोलिस खात्याचा फेरआढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. राज्यावर लटकत असलेली दहशतवादाची टांगती तलवार व राज्याअंतर्गत वाढती गुन्हेगारी यामुळे पोलिस खात्यावर जबरदस्त ताण पडला आहे. सध्या पोलिसांची उणीव जाणवत असल्याने सचिवालय, विधानसभा संकुल, राजभवन, आग्वाद तुरुंग आदी काही महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यासाठी खात्याकडे फौजफाटा नसल्याचीही माहिती उघड झाली आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांमुळे गोव्यातील गृह खात्याचेही धाबे दणाणले आहे. सरकारने तात्काळ केंद्रीय राखीव पोलिसाची एक तुकडी स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
परवा झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी जागेची पाहणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या खास पोलिस दलाचा वापर राज्यात व राज्याबाहेर केवळ अंतर्गत सुरक्षेसाठी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वी ८ नोव्हेंबर २००४ रोजी पहिल्या तुकडीसाठी परवानगी दिली होती. या दलातील पोलिसांना सुरक्षा सेवा,"पीसीआर' व वाहतूक सेवेसाठी तैनात करण्यात आले आहे, त्यात एक कंपनी नियमितपणे प्रशिक्षणासाठी सज्ज असल्याने राखीव पोलिस दल रिकामे पडत चालले आहे. सध्या तशीच गरज भासल्यास इतर पोलिस स्थानकांतील फौजफाटा वापरात आणला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आर्थिक चणचण भासत असल्याने २२ जानेवारी २००८ रोजी राज्य सरकारने केंद्र सरकारला केंद्रीय राखीव दल स्थापन करण्यासाठी एक प्रस्ताव पाठवला व त्यात किमान पहिल्या पाच वर्षांचा खर्च केंद्राने उचलावा आणि नंतर त्याची जबाबदारी राज्य सरकारकडे देण्यात यावी,असे म्हटले होते. केंद्र सरकारने वाढत्या सुरक्षेबाबतची गंभीर दखल घेत ३१ मार्च २००८ व ३ सप्टेंबर २००८ रोजी दोन राखीव दलासाठी परवानगी दिली. या दलाचा ७५ टक्के खर्च व पायाभूत सुविधांसाठीचा ५० टक्के खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.सद्यरिस्थितीत १००७ जवानांची एक तुकडी स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या तुकडीसाठी वेर्णा सांकवाळ येथील जागा घेण्याचा प्रस्ताव सरकारकडे असून त्यासाठी १०० प्रतिचौरसमीटर प्रमाणे ३ कोटी ३५ लाख ५० हजार रुपये खर्च येणार आहे. या ठिकाणी २० टक्के जागा रहिवासी वसाहतीसाठी तर ८० टक्के बॅरेकसाठी वापरण्यात येईल. यासाठी संपूर्ण खर्च ३० कोटी रुपये होणार असल्याचा प्राथमिक अंदाज करण्यात आला आहे. हे दल पूर्ण कार्यन्वित झाल्यावर वर्षाकाठी सुमारे १४ कोटी रुपये अतिरिक्त खर्च राज्य सरकारला करावा लागेल. राज्य सरकारने सद्यस्थितीत १००७ जवानांचे एक दल स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याच्याही हालचालींना वेग आला आहे.

Thursday 4 December, 2008

'तो' हवालदार आणि शिपाईसुद्धा निलंबित: 'चेक नाक्या'वरील हलगर्जीपणा

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): पत्रादेवी "चेक नाक्यावर' पैसे आकारून वाहने सोडत असल्याचे उघड होताच निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांच्यापाठोपाठ त्यावेळी तेथे ड्युटीवर असलेले पोलिस हवालदार दत्ताराम परब व पोलिस शिपाई आत्माराम गावकर यांना आज (बुधवारी) निलंबित करण्यात आले. काल रात्री पोलिस खुद्द महानिरीक्षक किशन कुमार यांनी या चेक नाक्यावर टेहळणी करून त्यानंतर छापा टाकला होता. चेक नाक्यावर पैसे आकारून वाहने जाण्यास दिली जात असल्याूद्दल त्यांची खात्री पटताच त्यांनी थेट या कृत्याला पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक आल्बुकर्क यांना जबाबदार धरून निलंबित केले होते. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई झाल्याने आज दिवसभर पोलिस मुख्यालयात दबक्या आवाजात त्यासंदर्भात चर्चा सुरू होती.
चेक नाक्यावर तपासणीकामी हलगर्जीपणा केल्याने तिन्ही पोलिसांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही चौकशी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना करण्यास सांगितल्याची माहिती महानिरीक्षक किशन कुमार यांनी दिली. चेक नाक्यावर वाहनांची तपासणी करण्याचे कडक आदेश देऊनही त्यांचे पालन केले जात नसल्याने ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ही समस्या गांर्भीयाने घेतली आहे. पैसे घेऊनच वाहने सोडायची असतील तर चेक नाक्यावर पोलिसांची गरजच काय, असा संतप्त सवाल करीत शंभर टक्के वाहनांची तपासणीही करणे शक्य नसले तरी, पैसे घेऊन वाहने जायला देणे पोलिसांना शोभणारे नाही, अशी प्रतिक्रिया श्री. कुमार यांनी आज दिली.
या घटनेमुळे धास्तावलेल्या काणकोण पोलिसांनी आज सायंकाळी काणकोण चेक नाक्यावर हेल्मेट न घालता येणाऱ्या दुचाकी चालकांना "तालांव' देण्यात सपाटा लावला. यावेळी तेथे असलेले पोलिस मात्र आपल्या ओळखीच्या व्यक्तींना कोणताही दंड न देता जाऊ देत होते. याविषयी पोलिसांना काही दुचाकीस्वारांनी विचारले असता, तुम्ही काय ते न्यायालयात सांगा, असे त्यांना पोलिसांकडून सांगितले जात होते, असे वृत्त आमच्या पैंगीण वार्ताहराने दिले आहे.

दहशतवाद्यांना सोपविण्याची मागणी झरदारी यांनी फेटाळली

न्यूयॉर्क, दि. ३ : मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात नसल्याचे स्पष्ट करून पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी लष्कर- ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईदसह अन्य २० जहाल दहशतवाद्यांना सोपविण्याची मागणी फेटाळून लावली. तसेच मुंबईत अटक झालेला दहशतवादी पाकिस्तानी असल्यावरही त्यांनी संशय व्यक्त केला.
मुंबई हल्ल्याचा तीव्र विरोध करताना भारताने दोन दिवसांपूर्वी २० जहाल दहशतवाद्यांना सोपविण्याची पाकिस्तानकडे मागणी केली होती. ही मागणी देखील झरदारी यांनी फेटाळून लावली आहे.
आम्हाला पुरावे देण्यात आले तर आम्ही या आतंकवाद्यांविरुद्ध आमच्या न्यायालयांमध्ये खटले दाखल करू आणि आम्हीच त्यांना शिक्षा करू, अशी सारवासारव झरदारी यांनी मंगळवारी रात्री सीएनएन वाहिनीवरील "लॅरी किंग लाईव्ह' या कार्यक्रमात बोलताना केली.
अनेक दहशतवादी घटनांमध्ये हव्या असलेल्या २० जहाल आतंकवाद्यांच्या नावांची यादी भारताने पाकिस्तानकडे दिली होती. त्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, लष्कर-ए­- तोयबाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद, जैश- ए- मोहम्मद प्रमुख मसूद अझहर यांच्या नावांचा समावेेश आहे.
भविष्यातील कारवाई आणि पर्यायांवर विचार करण्यापूर्वी भारत यासंदर्भात पाकिस्तानच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहे. भारताला आपल्या भूमीचे रक्षण करण्याचा अधिकार असून यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल. कारण पाकिस्तानकडून होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा आता अगदी मुळापासून सफाया करण्याची वेळ आली आहे असे देशाला वाटत असल्याची प्रतिक्रिया विदेशमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिली. सोबतच पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी शिबिरांवर लष्करी कारवाई करण्याचेही त्यांनी नाकारले नाही.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांदरम्यान भारतीय सुरक्षा दलांनी ज्या बंदुकधारी आतंकवाद्याला अटक केली, तो पाकिस्तानी असल्यावरच आपल्याला संशय आहे, आणि तो पाकिस्तानी असल्याचे सिद्ध होईल असा कोणताही पुरावा आम्हाला देण्यात आला नाही असे झरदारी म्हणाले. त्याचप्रमाणे भारतावर झालेल्या सर्वात मोठया दहशतवादी हल्ल्यात पाकचा हात नसल्याचे सांगून दहशवाद्यांना कोणत्याही देशाबद्दल काहीच घेणे-देणे नसते असे झरदारी म्हणाले.
संपूर्ण जगावर ताबा मिळविण्याची, सर्वसामान्यांना हादरवून सोडण्याची असुरी इच्छा बाळगणाऱ्या लोकांनीच भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला. यात पाकिस्तानचा हात नाही. यासंदर्भात व्हाईट हाऊस व अमेरिकन गुप्तचर संघटना सीआयएनेही पाकला क्लीन चिट दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.
भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता खारीज करतानाच लोकशाहीवर विश्वास ठेवणारे देश युद्धाकडे अग्रेसर होत नाहीत. पाकमध्ये हुकूमशाही असताना भारत व पाकिस्तानदरम्यान तीन युद्धे झालीत. मात्र ही वेळ संयुक्तपणे चौकशी करून समस्येवर तोडगा काढण्याची आहे. मुंबई किंवा भारतालाच नव्हे तर पाकिस्तान,अफगानिस्तानसह संपूर्ण जगालाच दहशतवादाचा धोका असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
मी, माझा देश आणि आम्ही सर्वच दहशतवादाचा सध्या सामना करीत आहोत. दहशतवादामुळे कुटुंब कसे उद्ध्वस्त होते ते मी बघितले आहे. मी जेव्हा माझ्या मुलांकडे बघतो तेव्हा मला त्याच्या भयाणतेची जाणीव होते. त्यांच्या डोळ्यात मला भय दिसते. माझी पत्नी बेनझीरमुळे हे दु:ख माझ्या वाट्याला आले आहे, अशी भावना पाकच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनीही अन्य पाकिस्तानी नेत्यांप्रमाणेच गुळमिळीत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ही जगाने बंदी घातलेली दहशतवादी संघटना आहे. आणि लष्करचा या हल्ल्यामागे हात असल्याची माहिती आम्हाला नाही. अल कायदासारख्या जहाल संघटना तर आपण विचारही करणार नाही, अशा प्रकारे ती संघटना कारवाया करीत असते. असे असले तरी या हल्ल्यासंदर्भात संपूर्ण सहकार्याचे पाकिस्तानने भारताला आश्वासन दिले आहे.
आम्ही अण्वस्त्रांवर बंदी घालण्याचे समर्थक असून दक्षिण आशियाला जर अण्वस्त्रमुक्त करायचे असेल तर भारतानेही या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही पाकच्या राष्ट्राध्यक्षांनी केले.
-----------------------------------------------------
ओसामा पाकमध्ये असल्याचे वृत्त कपोलकल्पित : झरदारी
न्यूयॉर्क, दि. ३ : संपूर्ण जगाला हादरविणारी जहाल दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन पाकिस्तानात लपून असल्याच्या वृत्तात तत्थ्य नसून ते कपोलकल्पित असल्याचे सांगतानाच दहशतवादी कारवायांसाठी संपूर्ण जगाला हवा असलेला लादेन जर पाकिस्तानात सापडला तर त्याची तमा बाळगली जाणार नाही. त्याला अटक करून कठोर शिक्षा ठोठावली जाईल असे पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारींनी म्हटले आहे.
अमेरिका, अन्य देशांचे सुरक्षा दल आणि गुप्तचर संघटना गेल्या आठ वर्षांपासून लादेनच्या मागावर आहेत. त्यांच्याकडे आमच्या तुलनेत अत्याधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानही आहे. असे असताना त्यांना अद्याप अल कायदाच्या प्रमुखाला शोधून का काढता आले नाही असा प्रश्नही पाकच्या राष्ट्राध्यक्षांनी विचारला.
--------------------------------------------------------
पाकची अण्वस्त्रे सुरक्षित : झरदारी
न्यूयॉर्क, दि. ३ : पाकिस्तानातील अण्वस्त्रे सुरक्षित आहेत. त्यामुळे ती दहशतवाद्यांच्या हाती पडण्याचा धोका नाही असे आश्वासन पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी जागतिक समुदायाला दिले आहे.
अण्वस्त्रांना अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले असून त्यांच्यासाठी आमच्याकडे नियंत्रण प्रणाली आहे. अत्यंत जबाबदारीने आम्ही त्यांचे रक्षण करीत आहोत असेही पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.
लवकरच दहशतवादी एखाद्या महत्त्वपूर्ण शहरावर विध्वंसक अस्त्रांच्या आधारे हल्ला करतील. यासाठी ते अस्थिर राजकीय स्थिती असलेल्या पाकिस्तानमधून अण्वस्त्रांसारखे घातक अस्त्र मिळविण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही, अशा शब्दात अमेरिकेने पाकला इशारा दिला होता. याकडे लक्ष वेधले असता झरदारी म्हणाले, मी संपूर्ण जगासोबतच आमच्या शेजाऱ्यांना अशी अपील करतो की त्यांनी एकत्रितपणे या समस्येवर तोडगा शोधावा.

अजूनही तळ्यात-मळ्यात विलासरावांच्या राजीनाम्यावर अद्याप निर्णय नाही

नवी दिल्ली, दि. ३ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्याबद्दल आजही कोणताच निर्णय झाला नाही. मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला होता.
कॉंग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशमुखांच्या राजीनाम्यावर अद्यापी कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यानच्या काळात कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते प्रणव मुखर्जी, ए.के.ऍन्टनी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते यांच्यात आज संध्याकाळी चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्रातल्या युती सरकारमधील प्रमुख घटक पक्ष आहे.
एका बाजूला पक्ष नेतृत्वाला राज्यात बदल हवा आहे तर दुसऱ्या गटाच्या म्हणण्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी काही महिने अगोदर राज्यात नेतृत्व बदलाची गरज नाही. महाराष्ट्रातील घडामोडींबाबत ए.के.ऍन्टनी यांनी काल दिवसभरात देशमुख यांच्यासह पक्षातल्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यावर निर्णय घेतला नसल्याची माहिती बातमीदारांना दिली. देशमुख यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी पक्षाच्या निर्णयाचे आपण पालन करु असे मुख्यमंत्री देशमुख यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोनिया गांधी यांच्याबरोबर चर्चा झाल्यावर देशमुख मुंबईत परतले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी दहशतवादी हल्ल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारुन आपला राजीनामा सोमवारीच दिला होता. पाटील यांच्या राजीनाम्यामुळे विलासराव देशमुख यांच्यावर मुख्यमंत्री पद सोडण्यासाठी दबाव वाढला होता.

शिवाजी टर्मिनसला पुन्हा बॉंब सापडल्याने खळबळ

मुंबई, दि. ३ : शिवाजी टर्मिनस येथे आठ किलो आरडीएक्स असलेला बॉम्ब सापडल्यामुळे मुंबईत पुन्हा खळबळ माजली. पार्सल विभागामधील हा बॉम्ब पोलिसांनी तात्काळ निकामी केला.
आज संध्याकाळी मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावरुन पार्सल विभागात आठ किलो वजनाचा एक बॉम्ब सापडला. तात्काळ हालचाल करुन रेल्वे पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि बॉम्ब निकामी केला. ही माहिती रेल्वे पोलिस आयुक्त अशोक शर्मा यांनी दिली.
घटनास्थळी मुंबई अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. पोलीस, अग्नीशमन दल व बॉम्ब निकामी पथकाने अतिशय सावधानपूर्वक हा बॉम्ब निकामी केल्यामुळे पोलिसांनी व प्रवासी नागरिकांनी निःश्वास सोडला.

गोव्याला मिळणार दोन शस्त्रसज्ज बोटी

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): मुंबईत घुसलेले दहशतवादी समुद्रमार्गे आल्याचे नक्की झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने गोवा कोस्टल पोलिसांना एप्रिल २००९ पर्यंत मोठ्या व मध्यम आकाराच्या शस्त्रसज्ज बोटी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. केंद्राने देशातील किनारी भागांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व राज्यांतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावली असून आज रात्री गोव्याचे पोलिस महानिरीक्षक दिल्लीला रवाना झाले.
उच्च अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गोव्यास दोन बोटी पुरवल्या जाणार असून, एका बोटीची क्षमता १२ टन इतकी असेल व ती १२ नॉटिकल मैलाहून अधिक अंतर गाठू शकेल तर दुसऱ्या बोटीची क्षमता ५ टन असून ती १२ नॉटिकल मैलाच्या आत सक्रिय असेल. याशिवाय केंद्रीय मंत्रालयाने बोलवलेल्या बैठकीत किनारी भागाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि सुरक्षा रक्षकांना अत्याधुनिक सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने सारासार विचार केला जाईल. तसेच किनारी भागाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यात घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांवरही चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्र सरकारने गोव्यातील किनारी भागांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकूण नऊ बोटी पुरवण्याचे आदेश दिले आहेत. या बोटी गोवा शिपयार्ड लिमिटेडद्वारे तयार केल्या जाणार असून, त्यात ६ मोठ्या आणि तीन मध्यम आकाराच्या बोटींचा समावेश असेल. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारद्वारे या बोटींसाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे.
केंद्राने जरी सुरक्षेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असल्या तरी गोवा सरकार मात्र सुस्त असल्याचे सांगितले जाते. एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जवळपास ८० नवी पदे तयार करण्यात आली असून, त्यात तांत्रिकबाजू सांभाळणाऱ्या कर्मचारी वर्गाचाही समावेश आहे. मात्र अद्याप त्यांची नियुक्ती करण्यात आली नसून, हा प्रस्ताव सरकार दरबारी जवळपास ६ महिन्यांपासून शीतपेटीत पडून आहे. राज्यात तीन किनारी पोलिस स्थानके असून, मुरगाव बंदर, बेतूल आणि शिवोलीत असलेल्या या पोलिस स्थानकांवर ६५ पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत. २५ पोलिस मुरगाव बंदरावर असून, शिवोली आणि बेतूल याठिकाणी प्रत्येकी १५ पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत.

Wednesday 3 December, 2008

विधानसभेचे खास अधिवेशन बोलवा गोव्याच्या सुरक्षेवर व्यापक चर्चा हवीच: भाजप

पणजी,दि.२ (प्रतिनिधी): मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा गोव्यासाठी धोक्याची घंटाच असून येत्या काळात दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी गोवा सज्ज आहे का, याबाबत आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. गोव्याच्या सुरक्षेबाबत व्यापक चर्चा होण्याची आहे. तसेच दहशतवादाचा सामना करण्यासाठी आवश्यक कायदा तयार करण्याचीही आवश्यकता आहे. त्यामुळे केवळ सुरक्षेबाबत चर्चेसाठी सभापती प्रतापसिंग राणे यांनी खास विधानसभा अधिवेशन बोलवावे,अशी मागणी भाजपचे विधिमंडळ उपनेते फ्रान्सिस डिसोझा यांनी केली.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप विधिमंडळ प्रवक्ते आमदार दामोदर नाईक हजर होते. मुंबईत होणारे दहशतवादी हल्ले व बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर गोव्याने धडा घेण्याची गरज आहे. गोव्याच्या सुरक्षेची चिंता केवळ भाजपला आहे,असा गैरसमज कुणी करून न घेता हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे, त्यामुळे गोव्यात जनता कशी सुरक्षित आहे व सुरक्षेची नक्की कोणती उपाययोजना राज्य सरकारने आखली आहे, याची माहिती सर्वसामान्य जनतेला होण्याची गरज आहे,असे मतही आमदार डिसोझा यांनी व्यक्त केले. याप्रकरणी एकत्रितपणे निर्णय घेण्याची गरज असून जनतेला विश्वासात घेण्याची नितांत गरज असल्याचेही आमदार म्हणाले. बाटलू प्रकरण, सेंट ऍण्ड्र्यू चर्चमधील स्फोट तसेच कर्नाटक येथे अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून गोव्यातील हालचालींबाबत मिळालेले संकेत या सर्व घटना पाहता येथील जनतेत सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जाणे स्वाभाविक असल्याचे आमदार डिसोझा म्हणाले. गेल्या नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने गोवा हे दहशतवाद्यांच्या नकाशावर असल्याचे संकेत गुप्तहेर संघटनांकडून मिळाले होते, त्यामुळे आता लवकरच नववर्षाच्या निमित्ताने एकूण राज्याच्या सुरक्षेसंबंधी सखोल व व्यापक चर्चा होण्याची गरज असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रत्येक वेळी केंद्रीय सुरक्षा दलावर अवलंबून राहणे आपल्याला परवडणारे नाही. सुरक्षेसंबंधी पायाभूत सुविधा उभारणे, गुप्तहेर यंत्रणेला सज्ज करणे, तसेच आवश्यक रुग्णवाहिका,अग्निशमन वाहने व अद्ययावत शस्त्रे आदींची पूर्तता करणे आवश्यक आहे. यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी लागणार असल्याने त्यामुळे विधानसभेत चर्चा आवश्यक असल्याची माहिती त्यांनी दिली. विधानसभेत सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेबाबत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांना सरकारकडून मिळालेल्या उत्तरांनुसार दहशतवादाचा सामना करण्यासाठी सरकारची तयारी अपुरी असल्याचे आढळते,असेही ते म्हणाले.
पोलिस खात्यातील २३२ शिपायांना कमांडो प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता या शिपायांचा वापर फक्त हप्ते गोळा करण्यासाठी, किंवा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो,असा ठपकाही यावेळी ठेवण्यात आला. या सर्व पोलिसांना एकत्रित करून स्वतंत्र कमांडो विभाग स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार डिसोझा म्हणाले. उत्तर व दक्षिण गोव्यासाठी कायमस्वरूपी जलद कृती दलाची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. ९ सप्टेंबर रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचा बोध त्यांनी घेतल्यानंतर त्यानंतर अमेरिकेत एकही प्रकार घडला नाही, याचा धडा आता भारतानेही घेण्याची गरज आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

'तुलपन'ला सुवर्ण मयूर, 'इफ्फी'चा थाटात समारोप

- सर्वोत्तम होतकरू दिग्दर्शकाचा रौप्य मयूर सर्जी दोस्तेवोए यांना
- खास परीक्षकांचा रौप्य मयूर श्रीलंकेच्या मालिनी फोन्सेकांना

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): ३९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात कझाकस्तान-जर्मनीच्या "तुलपन' या चित्रपटाने पहिले दोन पुरस्कार पटकावून विक्रम केला. यंदाचा उत्कृष्ट चित्रपटासाठी असलेला सुवर्ण मयूर व उत्कृष्ट होतकरू दिग्दर्शकासाठी असलेला रौप्य मयूर पुरस्कार या चित्रपटाचे दिग्दर्शक व पटकथाकार सर्जी दोत्सेवोए यांनी पटकावला. स्पर्धात्मक विभागासाठी असलेला खास परीक्षकांचा रौप्यमयूर पुरस्कार "आकाश कुसुम' या श्रीलंकन चित्रपटाच्या अभिनेत्री मालिनी फोन्सेका यांना घोषित करण्यात आला.
गेल्या २२ नोव्हेंबर रोजी धडाक्यात उद्घाटन झालेल्या या महोत्सवाची सांगता आज कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात झाली. यावेळी नामांकित अभिनेते, दिग्दर्शक कमल हसन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्यमंत्री दिगंबर कामत, केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे संयुक्त सचिव व्ही. बी. प्यारेलाल, चित्रपट महोत्सव संचालक एस. एम. खान, पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगीस, अभिनेते कबीर बेदी, सुरेश ओबेरॉय, प्रसिद्ध अमेरिकी दिग्दर्शक जॉल लेंडीस यांचीही उपस्थिती होती. यावेळी स्पर्धात्मक विभागाच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष पीटर चॅन यांनी पुरस्कारांची घोषणा केली. परीक्षक मंडळाचे इतर सदस्य मार्को म्युलर,निकी करीमी व लाव दियाझ यावेळी खास उपस्थित होते.परीक्षक मंडळाच्या भारतीय सदस्य अभिनेत्री तबस्सुम हश्मी खान (तब्बू) ची तब्बेत बिघडल्याने ती गैरहजर राहिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
व्ही.बी.प्यारेलाल यांनी यंदाच्या महोत्सवाला मिळालेल्या जोमदार प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त केले. या महोत्सवाला प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रतिनिधींची ८० ते १०० टक्के उपस्थिती होती, यावरूच हा महोत्सव खऱ्या अर्थाने यशस्वी ठरल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गोवा हे कायमस्वरूपी ठिकाण असल्याचे ठणकावून सांगितले. चित्रपट महोत्सवासाठी गोवा हेच योग्य ठिकाण असल्याचा पुरस्कार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गोव्याच्या "अंतनार्द' या चित्रपटाला गेल्यावेळी पाच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले यावरून गोव्यात चित्रपट संस्कृती नसल्याचे निमित्त पुढे करणाऱ्यांना चांगलीच चपराक असल्याचेही श्री.कामत म्हणाले. पणजी प्रमाणे मडगाव येथील रवींद्र भवन आवारात "आयनॉक्स' सिनेमागृह उभारले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. सध्याच्या मडगावातील रवींद्र भवनात दक्षिण गोव्यातील चित्रपट व्यावसायिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील,असे आश्वासनही मुख्यमंत्री कामत यांनी दिले. "फिल्म सिटी',"फिल्म कॉलेज' व इतर अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीही राज्य सरकार पुढाकार घेणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी महोत्सव संचालक एस. एम. खान, गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव व सरव्यवस्थापक निखिल देसाई यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे कौतुक केले.
चित्रपट महोत्सवाचे संचालक एस.एम.खान यांनी सुरुवातीला मुंबई येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला व या हल्ल्यात शहीद झालेले जवान व बळी गेलेल्या लोकांच्या कुटुंबांप्रती सहानुभूती व्यक्त केली. या हल्ल्यांत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. महोत्सवाच्या आयोजनाबाबत श्री.खान यांनी समाधान व्यक्त केले. एकूण ४४ देशांतील १८५ चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात आले. सुमारे ६ हजार प्रतिनिधींनी या महोत्सवाचा लाभ घेतला. यंदा फिल्म बाजारालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे सांगून हा महोत्सव खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.
"इफ्फी' निमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची रक्कम यंदा वाढवण्यात आल्याने जगात कुठल्याही चित्रपट महोत्सवातील सर्वाधिक रक्कम यावेळी देण्यात आल्याचे श्री.खान यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सुवर्ण मयूर पुरस्काराची रक्कम १० लाखांवरून ४० लाख रुपये करण्यात आली आहे, तर रौप्य मयूर विजेत्यांना प्रत्येक अडीच लाखांच्या बदल्यात यंदापासून प्रत्येकी १५ लाख रुपये देण्यात आले आहेत.
यावेळी मुख्यमंत्री कामत व महापौर टोनी रॉड्रिगीस यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. समारोप कार्यक्रमावेळी प्रत्यक्ष व्यासपीठावरील थोडा गोंधळ सोडल्यास व प्रत्यक्ष विजेत्यांची नावे घोषित करताना झालेली घाई सोडल्यास हा कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पडला. समारोप सोहळ्यानंतर दिग्दर्शक मजिद मजिदी यांचा इराणी चित्रपट "द सॉग ऑफ स्पॅरोज' चे प्रदर्शन करण्यात आले. समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन सिमॉन सिंग यांनी केले.
------------------------------------------------------
कमल हसनलाही गोवा भावला...
"इफ्फी' च्या उद्घाटन सोहळ्यावेळी भाषण करताना अभिनेत्री रेखा यांनी भविष्यात गोव्यात राहणार असल्याचे सांगितले होते; तर समारोप सोहळ्यावेळी अभिनेता कमल हसन यांनीही आपल्याला गोव्यात राहणे आवडेल,अशा शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गोव्यात प्रत्येक वेळी आल्यानंतर येथील गोड स्मृती घेऊन आपण परततो. गोव्यात आपण अनेकदा येतो. आपण गोव्याचेच आहात काय,असा सवाल केला जातो तेव्हा आपण होय,असे उत्तर दिले आहे व नंतर त्याचा खुलासाही केला आहे. यापुढे गोव्यात यायला व राहायला आपल्याला नक्कीच आवडेल,असेही त्यांनी सांगितले. चित्रपट हेच आपले जीवन असल्याचे ते म्हणाले, त्यामुळे हा महोत्सव आपल्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

आसाममध्ये अतिरेक्यांच्या बॉंबस्फोटात ४ ठार

दिफू(आसाम), दि.२ : पूर्वात्तर भागातल्या अतिरेक्यांच्या एका गटाने, आसामच्या करबी अंग्लॉंग जिल्ह्यातील दिफू येथे एका प्रवासी ट्रेनमध्ये घडवून आणलेल्या बॉंबस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला असून ३५हून जास्त व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
ट्रेनच्या साधारण दर्जाच्या डब्याच्या दाराशीच लावलेल्या या बॉंबचा सकाळी ८ वाजता स्फोट झाला असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. गाडी दिफू रेल्वेस्थानकाजवळ येत असतानाच टायमर लावलेल्या बॉंबचा स्फोट झाला. या स्फोटानंतर काही तासातच केएलएनएलएफ अतिरेक्यांनी जिल्ह्याच्या दालामारा भागात स्वयंचलित शस्त्रांनी हल्ला चढवला. एका हिंदी भाषिक जोडप्याला त्यांनी गोळ्या घातल्या. रेल्वे स्थानकावर सापडलेले स्फोट न झालेले काही बॉंब पोलिसांनी निकामी केले आहेत.

महाराष्ट्राच्या नेतेपदाचे दोन्ही चेंडू दिल्लीमध्ये!

*विलासरावांकडून मोठी मोर्चेबांधणी
*राष्ट्रवादीचे सर्वाधिकार शरद पवारांना

मुंबई, दि. २ (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोण असावे, हा वाद आता देशाच्या राजधानीत पोचला असून, त्याचा निर्णयही तेथेच, बहुदा उद्या अपेक्षित आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारासंदर्भात कॉंग्रेसकडून कोणीही आपली भेट घेतली नाही, याबद्दल नाराजी व्यक्त करीत शरद पवार यांनी आज ठरलेली कॉंग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक उद्यापर्यंत पुढे ढकलल्यामुळे हा निर्णय आणखी एक दिवस लांबणीवर पडल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसचा मुख्यमंत्री ठरत नाही, तोपर्यंत आमचा उपमुख्यमंत्री आम्ही ठरविणार नाही, अशी भूमिका पवार यांनी घेतली असल्याचे समजते.
दरम्यान, राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री व गृहमंत्री ठरविण्याचा सर्वाधिकार पक्षाच्या आमदारांनी पवारांना देण्याचा निर्णय आज मुंबईतील बैठकीत झाला. त्यामुळे एकप्रकारे मुख्यमंत्रिपदाच्या चाव्यादेखील पवारांच्या हाती गेल्याचे मानले जात आहे.
वास्तविक, काल रात्रीपासून आज दुपारपर्यंत राष्ट्रपती प्रतिभा पाटील मुंबईत असल्यामुळे, राजशिष्टाचार पाळण्यासाठी विलासरावांबद्दलचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. दुपारनंतर अपेक्षित असलेला हा विलंबित निर्णय आता आणखी एक दिवस लांबण्याची चिन्हे दिसत आहेत.
याचे कारण, विलासरावांनी दिल्लीत लावलेली फिल्डिंग असल्याचे सांगितले जाते. काल स्वत:च पद सोडण्याची आपली तयारी जाहीर करणाऱ्या विलासरावांनी लगेच आपली माणसे कामाला लावून मुख्यमंत्रिपद वाचविण्याचे प्रयत्न जोरात सुरू केले. त्यानुसार, राज्य मंत्रिमंडळातील त्यांच्या निकटचे मंत्री, त्यांना मानणारे कॉंग्रेस व अपक्ष आमदार आणि इतर कॉंग्रेसनेते यांनी दिल्ली गाठली आणि विलासरावांना यावेळी काढणे कसे अयोग्य होईल, याचा प्रचार पक्षश्रेष्ठींच्या वर्तुळात सुरू केला. याचवेळी त्यांच्या विरोधकांनीही दिल्लीला धाव घेत दुसरी बाजू लावून धरण्याचा प्रयत्न चालविला.
सायंकाळी आपली बाजू थोडी कमजोर पडत आहे, असे लक्षात येताच विलासरावांनी पर्यायी मुख्यमंत्री म्हणून आपल्या विश्वासातील बाळासाहेब थोरात यांचे नाव पुढे केल्याचे सांगण्यात येते. थोरात हे सध्या राज्याचे कृषिमंत्री असून, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचे आमदार आहेत. तसेच ते मुख्यमंत्र्यांच्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना मुख्यमंत्री केल्यास उत्तर महाराष्ट्राला प्रथमच या पदाची संधी मिळेल, असा युक्तिवाद विलासराव समर्थकांकडून केला जात असल्याचे कळते.
मराठ्यांचे राजकारण
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोन्ही पदांचा घोळ होण्यामागे प्रामुख्याने मराठा राजकारण असल्याचे बोलले जाते.
विलासरावांच्या जागी कॉंग्रेसने पुन्हा मराठा नेता दिला, तर राष्ट्रवादी उपमुख्यमंत्रिपदासाठी छगन भुजबळ (ओबीसी) यांचा विचार करू शकते. याउलट, मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होणार असतील तर राष्ट्रवादीचा वेगळा माणूस (शक्यतो दिलीप वळसे पाटील) उपमुख्यमंत्री होऊ शकतो. दोन्ही स्थितींमध्ये पुढाकार कॉंग्रेसलाच घ्यावा लागणार आहे आणि त्याचीच वाट राष्ट्रवादी पाहत आहे, असेकळते. समजा छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री करावे लागले तरी, गृहमंत्रिपद त्यांना न देता दिलीप वळसे पाटील यांना देण्याचेही राष्ट्रवादीत घाटत असल्याचेही समजते.

राजीनामा मंजूर करा; अन्यथा रोष वाढेल, गोविंदराव आदिक यांचा इशारा

मुंबई, दि. २ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपली खुर्ची टीकावी म्हणून दिल्लीत लॉबींग सुरू केले असताना त्यांचे विरोधकही सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे कडवे विरोधक आणि कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गोविंदराव आदिक यांनी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी विलासरावांचा राजीनामा मंजूर करायला वेळ लावत असल्याचे पाहून तो मंजूर करावा; अन्यथा कॉंग्रेस विरोधात जनतेत निर्माण झालेला रोष वाढेल, असा इशारा पक्षश्रेष्ठींना देत विलासरावांविरोधात तोफ डागली आहे.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना नैतिक जबादारी स्वीकारून राजीनामा द्यायचाच होता तर त्यांनी थेट राज्यपालांकडे राजीनामा दयायला हवा होता. सोनिया गांधींकडे राजीनामा द्यायची आवश्यकता नव्हती, असा सवाल उपस्थित करून गोविंदराव आदिक यांनी विलासरावांच्या प्रामाणिकपणावरही संशय व्यक्त केला आहे.
राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री पदासाठी जबरदस्त चुरस सुरू आहे. विलासराव देशमुख आपली खुर्ची टीकावी म्हणून आपल्या समर्थकांच्या मदतीने पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढविण्याच्या प्रयत्नात होते; तर त्यांचे विरोधक आणि मुख्यमंत्रीपदाचे अन्य ईच्छूकही मोर्चेबांधणी करीत होते. मात्र आदिक यांनी मुंबईत पत्रपरिषद घेऊन विलासरावांच्या विरोधातील असंतोषाला वाट मोकळी करून दिली.
देशमुख यांनी दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून लोकशाही मूल्यांची बूज राखण्यासाठी राजीनामा देण्याचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींपुढे ठेवला आहे. त्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून पक्षश्रेष्ठींनी तो मान्य करावा, अशी सूचना गोविंदराव आदिक यांनी पक्षश्रेष्ठींना पत्राव्दारे केली आहे. तसेच पक्षश्रेष्ठींनी राजीनामा स्वीकारण्यास विलंब लावला तर त्यांचे परिणाम कॉंग्रेसला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईवर झालेल्या भिषण दहशतवादी हल्ल्याला सरकारची दुबळी यंत्रणा जबादार आहे. त्यामुळे या हल्ल्यानंतर जनतेत कॉंग्रेस विरोधातील रोष वाढला आहे. आधीच पक्ष सर्व आघाडयांवर अपयशी ठरल्याने अप्रिय बनला आहे. अशावेळी विलासरावांना अभय मिळाले तर पक्षाची आणखी हानी होईल, अशा शब्दात आदिक यांनी विलारावांच्या राजीनाम्याचे समर्थन केले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन

वॉशिंग्टन, दि.२ : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हिलरी क्लिंटन यांना परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली आहे. सोबतच विद्यमान संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांचे मंत्रालय कायम ठेवण्यात आल्याचेही सांगितले आहे.
शिकागो येथे ओबामा यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. ते म्हणाले की, हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या पहिल्या महिला नागरिक राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अमेरिकेला फायद्याचा ठरणार आहे. सध्या बुश यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या रॉबर्ट गेट्स यांच्यावर विश्वास व्यक्त करीत ओबामा यांनी त्यांना आपल्या प्रशासनातही संरक्षणमंत्री म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय एरिजोनाचे गव्हर्नर जॅनेट नॅपोलिटानो यांना गृहमंत्रालय, इरिक होल्डर अटर्नी जनरल, निवृत्त नौदल प्रमुख जेम्स जोन्स यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि प्रदीर्घ काळपर्यंत सल्लागार राहिलेल्या सुसान राईस यांना संयुक्त राष्ट्राचे राजदूत नियुक्त केले आहे. या चमूच्या मदतीने आपण अमेरिकेत नवे युग आणू, असा विश्वासही ओबामा यांनी व्यक्त केला.

Tuesday 2 December, 2008

आर.आर. पाटील यांचा राजीनामा

विलासराव देशमुखांची गच्छंती अटळ, राजीनामा श्रेष्ठींना सुपूर्द

नवे मुख्यमंत्री सुशीलकुमार की पृथ्वीराज चव्हाण?

मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) - मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेमुळे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची खुर्ची गेल्यानंतर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनीही आपला अंतरात्मा जागा झाल्याचे सांगत आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान देशमुख यांचीही उचलबांगडी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुंबईतील अतिरेकी हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील कॉंग्रेस पश्रश्रेष्ठींकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची ऑफर दिली होती. याबाबत आता श्रेष्ठीच निर्णय घेतील. हायकमांडने घेतलेला निर्णय मला मान्य असेल, असे सांगत श्री.देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय श्रेष्ठींच्या कोर्टात ढकलला आहे.
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आर. आर. पाटील तातडीने राजीनामा देतील, अशी अपेक्षा होती. तथापि,राजीनाम्याची गरज नाही, असे सांगत यापूर्वी संसदेवर आणि अक्षरधामवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपचे लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी यांनी कुठे राजीनामे दिले होते, असा उलटसवाल आर.आर. यांनी रविवारी सकाळी केला होता. मात्र २४ तास उलटल्यानंतर आता आर.आर. पाटील यांना उपरती झाली आहे. त्यांचा अंतरात्मा जागा झाला असून, त्यामुळेच आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात स्पष्ट केले आहे.
राजीनामा देण्यासाठी आर. आर. पाटील यांच्यावर प्रचंड दबाव होता. गेल्या शनिवारी शरद पवार आणि आर. आर. पाटील यांची खास भेट झाली होती. त्यानंतरही आर.आर.पाटील यांनी राजीनामा देणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु मिडियातून सातत्याने होणारी टीका आणि जनमताचा रेटा यामुळे आबा अस्वस्थ होते. रविवारी रात्रभर ते धड झोपू शकले नव्हते. आधीच पोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे भावनाविवश झालेल्या आबांचा अंतरात्मा अखेर जागा झाला. सोमवारी सकाळीच त्यांनी तातडीने "वर्षा' या अधिकृत निवासस्थानी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवून दिला. आबांच्या जागी आता नवे गृहमंत्री म्हणून माजी गृहमंत्री छगन भुजबळ व जलसंपदामंत्री अजितदादा पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
आम्हाला विचारुनच मुख्यमंत्री ठरवा ः राष्ट्रवादी कॉंग्रेस
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवण्यापूर्वी कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसशी चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आधी आमच्याशी चर्चा करावी, असे ते म्हणाले.
विलासरावांवर संक्रात निश्चित
आमचा पक्ष हा सदैव देशातील जनतेकरिता जबाबदार राहिला आहे. मुबंईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा बेजबाबदारपणा दिसून आल्यास त्या कार्यकर्त्यास पदाचा राजीनामा द्यावा लागेल असे सांगत कॉंग्रेसच्या प्रवक्त्या जयंती नटराजन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे अप्रत्यक्षरीत्या येथील पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
नटराजन पुढे म्हणाल्या की, कॉंग्रेसच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्याच्या नावांबद्दल चर्चा झाली आहे. तथापि, या नावांबद्दल सध्याच काही सांगण्याबाबत त्यांनी नकार दिला. महाराष्ट्राचे प्रभारी तथा केंद्रीय संरक्षण मंत्री ए.के.ऍन्टनी दोन दिवसांनी महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .
दरम्यान, पक्षाने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी आणि संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांचे पाहणी मंडळ पाठविल्याची माहितीही पक्षाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
पवारांना कळवून राजीनामा
आज सकाळी आर.आर.पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दूरध्वनी करून राजीनामा देण्याची परवानगी मागितली. नंतर त्यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना दूरध्वनी केला आणि राजीनामा पाठवित असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या पोलिस उच्चस्तरीय समितीच्या बैठकीला आपण येऊ शकणार नाही, याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.
त्यानंतर सर्व सरकारी वाहने आपल्या चित्रकूट बंगल्यात सोडून, खाजगी स्कोडा गाडीतून ते सांगली जिल्ह्यातील आपल्या गावाकडे (अंजनी) रवाना झाले. त्यामुळे मुंबईत राजकीय गदारोळ होत असताना आबा येथे नाहीत.
मात्र, आर.आर. पाटील यांनी आपल्या राजीनामापत्रात कोणतेही कारण नोंदविलेले नाही. त्यांचा राजीनामा केवळ एका ओळीचा आहे, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितले.
निर्णय श्रेष्ठींना विचारा : विलासराव
परवा कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मी राजीनाम्याची तयारी दाखविली होती. पण अजून त्याबद्दल काहीही संकेत मला प्राप्त झालेला नाही, असा दावा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केला आहे.
आज सकाळी "वर्षा' बंगल्यावर पत्रपरिषदेत बोलताना ते म्हणाले की, मुंबईवरील हल्ल्‌याच्या संदर्भात माझी काही जबाबदारी असेल तर त्याबद्दल श्रेष्ठींनी निर्णय घ्यावा, तो मला मान्य राहील, असे मी सांगितले आहे.
तुमच्या प्रस्तावावर काय निर्णय झाला, असे विचारता मुख्यमंत्री म्हणाले की, ते आमच्या श्रेष्ठींना विचारा ना. हा प्रश्न मला कसा काय विचारला जाऊ शकतो ?
संपूर्ण पत्रपरिषदेत मुख्यमंत्र्यांनी स्वत:बद्दल एकदाही "राजीनामा' हा शब्द उच्चारला नाही. मी प्रस्ताव दिला (आय हॅव ऑफर्ड...) यावर ते कायम राहिले. एकदा तर ते म्हणाले की, मी अतिशय स्पष्ट व समजेल अशा शब्दांमध्ये सांगितले आहे. आणि, आपल्या (प्रश्नकर्त्याच्या) आकलनशक्तीवर माझा विश्वास आहे.
आपले काही पक्षांतर्गत विरोधक सक्रिय झाले आहेत काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, एकाची दुसऱ्याला या पद्धतीने लागण होत असते !
ताज व ओबेराय हॉटेल्सना दिलेल्या भेटीत मुलगा रितेश व चित्रपटनिर्माते रामगोपाल वर्मा यांना सोबत नेण्याचे एकप्रकारे समर्थन करताना विलासराव म्हणाले की, ते काही गुन्हेगार किंवा परदेशी नागरिक नाहीत. आणि, मोहीम संपल्यानंतर अनेक लोक तेथे जाऊन आले आहेत. शिवाय, या दौऱ्याची व्हिडिओ कॅसेट आमच्या सरकारनेच वाहिन्यांना पुरविली. कारण तेथे वाहिन्यांचे प्रतिनिधी नव्हते, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, आमच्या मनात खोट असती तर आम्ही असे केले असते का ?
भुजबळ इच्छुक
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदासाठी छगन भुजबळ हे इच्छुक असून त्यांनी आपली इच्छा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे बोलून दाखविल्याची चर्चा आहे. शरद पवार यांना मोबाईलवरून एसएमएस पाठवून आपल्याला एकदा संधी द्यावी, अशी विनंती केल्याचे समजते. मात्र, पवारांनी त्यासंदर्भातील "एसएमएस' राज्यातील अन्य एका मंत्र्याकडे "फॉरवर्ड' केल्याने भुजबळ यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारकडून सहकार्य नाही - सौ. स्नेहा भोबे

म्हापसा नगराध्यक्षांचा राजीनामा
म्हापसा, दि. १ (प्रतिनिधी)- म्हापसा नगराध्यक्ष स्नेहा भोबे यांनी आज आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गेली दोन वर्षे म्हापसा शहराच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील होते. परंतु, गोवा सरकार व पालिका मुख्याधिकारी यांच्याकडून अपेक्षेप्रमाणे सहकार्य मिळत नसल्याने शेवटी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे स्नेहा भोवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
म्हापसा पालिकेला संबंधित खाते व प्रशासनातर्फे सापत्न वागणूक मिळत असल्याने गेली दोन तीन वर्षे विकासाची कामे होऊ शकली नाहीत. गेल्या तीन वर्षांत पालिकेला केवळ ३७ लाख अनुदान देण्यात आले. यातील २५ लाख रुपये हे वार्षिक अनुदान असून केवळ विज्ञान व तंत्रज्ञान यासाठी थोडी रक्कम मंजूर झाली होती. एवढी रक्कम एखाद्या गावाच्या पंचायतीला अनुदान म्हणून देण्यात येते, पालिकेसाठी ही रक्कम तुटपुंजी ठरते. त्यामुळे पालिकेला एवढी कमी रक्कम अनुदानस्वरुप देणे एक प्रकारची चेष्टा असल्याचे सौ. भोबे यांनी यावेळी सांगितले.
गेल्या दोन वर्षांच्या अनुभवानुसार "आम आदमी'चे सरकार त्याला केवळ "जाम' करत असल्याचे दिसून आले. शहराच्या विकासासाठी आजपर्यंत शंभराहून अधिक ठराव घेण्यात आले. परंतु, व्यावसायिक स्तरावर त्यांची अंमलबजावणी मात्र शक्य झाली नाही. राजकीय हस्तक्षेप व ढवळाढवळ यामुळे आपल्याला नगराध्यक्षपदाचा कंटाळा आला असून आपण अभिमानाने राजीनामा देत असल्याचे सौ. भोबे यांनी सांगितले.
सौ. भोबे पुढे म्हणाल्या की, एका महिन्यापूर्वी ऍड. सुभाष नार्वेकर यांच्या गटातील सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता, पण भाजप डगमगले नाही. आपल्या गटातील सर्व नगरसेवकांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगून उच्च स्तरावरील गलिच्छ राजकारणामुळे या पदावर राहणे अशक्य असल्याने २७ नोव्हेंबर रोजी नगरविकास संचालकांकडे राजीनामा सुपूर्द केल्याची त्यांनी सांगितले.

"इफ्फी'चा आज समारोप

कमल हसनची खास उपस्थिती
पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - "३९ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' "इफ्फी-०८' चा समारोप उद्या २ रोजी संध्याकाळी ५ वाजता येथील कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात होणार आहे. या सोहळ्याला सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते,दिग्दर्शक कमल हसन प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित राहणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले असले तरी त्याबाबत काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. पर्शियन फिल्म " द सॉग ऑफ स्पॅरोज' ने महोत्सवाची सांगता होणार आहे.
देशातील ३९ वा तर गोव्यातील हा पाचवा महोत्सव असून यंदा या महोत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिनिधींचा प्रतिसाद लाभला. या समारोप सोहळ्याला मुख्यमंत्री दिगंबर कामत, केंद्रीय माहिती व प्रसारण सचिव नीरज कुमार, केंद्रीय चित्रपट संचालनालयाचे संचालक एस. एम.खान, गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव आदी उपस्थित असतील. मुंबई येथील दहशतवादी हल्ला व माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांचे निधन यामुळे या महोत्सवातील उत्साह काही प्रमाणात ओसरला. तथापि, चित्रपट चाहत्यांनी या महोत्सवात दर्जेदार चित्रपटांचा मनसोक्त आनंद घेतला. राज्यात राष्ट्रीय दुखवटा घोषित करून स्थानिक पातळीवरील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला. या महोत्सवानिमित्त गोव्यात आलेल्या विविध प्रादेशिक तथा विदेशी प्रतिनिधींनी आता आपल्या परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली आहे.
उद्या समारोप सोहळ्यावेळीही सुरक्षेचे कडेकोट उपाय करण्यात आले आहेत. महोत्सव परिसरात ठिकठिकाणी "क्लोज्ड सर्किट कॅमेरे बसवण्यात आले असून केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या दोन कंपन्या खास "इफ्फी' साठी तैनात करण्यात आल्या आहेत.

सुवर्ण मयूराची घोषणा
"इफ्फी'समारोपावेळी सुवर्ण मयूर पुरस्कार कुणाला मिळणार याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.. चित्रपट महोत्सवाचा हा सर्वांत महत्त्वाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. यंदा या पुरस्काराची रक्कमही वाढवण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

जुने गोवेच्या फेस्तासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था

पणजी, दि.१ (प्रतिनिधी) - मुंबई येथील ताज हॉटेलवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात "हाय ऍलर्ट' जारी करण्यात आल्याने येत्या ३ रोजी जुने गोवे येथे होणाऱ्या "गोंयच्या सायबाच्या फेस्ता'त सुरक्षेची मोठी जबाबदारी गोवा पोलिस खात्यावर आली आहे. हजारो भाविकांची या उत्सवाला गर्दी लोटत असते व त्यातच या उत्सवाला पर्यटनाचेही महत्त्व असल्याने विदेशी लोकांचीही मोठी उपस्थिती असते. त्यामुळे सुरक्षेची तयारी करणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची सध्या तारेवरील कसरत सुरू आहे.
उद्या २ रोजी "इफ्फी'चा समारोप होत असल्याने त्यासाठीची सर्व सुरक्षा यंत्रणा "फेस्ता'साठी वापरण्यात येणार आहे. पाळी पोटनिवडणूक व "इफ्फी' निमित्ताने बोलावण्यात आलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या दोन कंपन्या राज्यात असून त्या सर्वांना जुने गोवे येथे तैनात करण्यात येतील. गोवा राखीव पोलिस दल, गोवा सशस्त्र पोलिस दल तसेच जलद कृती दलाचे पोलिसही या सुरक्षा यंत्रणेचा भाग असतील. ठिकठिकाणी पोलिस व वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून संपर्काची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या उत्सवासाठी उद्यापासूनच गोव्याबाहेरून हजारो लोकांचे आगमन होण्यास सुरुवात होणार असल्याने उद्या सकाळपासूनच पोलिसांना त्यांच्या जागा देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक किशन कुमार यांनी दिली. ठिकठिकाणी मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. काही पोलिस खाजगी वेशातही तैनात करण्यात आले असून कुणीही संशयितरीत्या फिरताना आढळल्यास त्याला लगेच ताब्यात घेण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन सेवेसाठी "१०८' रुग्णवाहिका व अग्निशमन दलाची वाहनेही सज्ज करण्यात आली आहेत. काही महत्त्वाच्या ठिकाणी "क्लोज्ड सर्किट कॅनेऱ्यांची सोय करण्यात आल्याचे ते म्हणाले.
पार्किंग व्यवस्थेची वेगळी सोय
उद्या २ व ३ रोजी याठिकाणी पार्किंगसाठी वेगळी सोय करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस विभागाचे अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली.पणजीहून आलेल्या कार व दुचाकी बाकीया यांच्या जमिनीत पार्क करण्यात येतील. नेवरामार्गे मडगाव व वास्को येथून येणारी वाहने एला फार्म व पशुसंवर्धन मैदानावर पार्क करण्यात येतील. फोंडामार्गे येणारी कार व दुचाकी यांच्यासाठी पिंटो गॅरेज जवळील जागेत पार्किंगची सोय करण्यात आली आहे.विविध धर्मगुरूंच्या वाहनांसाठी बॉम जीझस बॅसिलिका चर्चच्या कुंपणात सोय असेल. अतिमहनीय व्यक्ती किंवा अपंगासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या जागेत सोय करण्यात आली आहे. दरम्यान,या उत्सवामुळे सर्वसामान्य जनतेला काही प्रमाणात गैरसोय सहन करावी लागणार असल्याने त्यांनी पोलिस व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिकांत नाराजी
पोलिस खात्याकडून सुरक्षेबाबत ग्वाही देण्यात येत असली तरी जुने गोवे भागातील जनतेत मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मबंईत घडलेल्या प्रकाराची व्याप्ती पाहिल्यास तेथे पुरवण्यात आलेली सुरक्षा ही केवळ नाममात्र असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. फेस्तासाठी प्रचंड गर्दी लोटत असल्याने व चालणेही कठीण बनत असल्याने अशावेळी ही सुरक्षा कितपत पुरेशी आहे,याबाबत मात्र जनतेच्या मनातच संभ्रम निर्माण झाला आहे.

आणि तो अतिरेक्यांशी संबंधित असेल तर...

पोलिसी निष्क्रियतेचा इरसाल नमुना
पणजी, दि. १ (विशेष प्रतिनिधी) - मुंबईत दहशतवाद्यांनी घातलेल्या थैमानानंतर देशभरात जे संशयाचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे, त्याला गोवाही अपवाद नाही. समुद्र किनारे आणि सुशेगाद पोलिस खाते यामुळे हे राज्य "सॉफ्ट टार्गेट' मानले जात असल्याने तर येथील नागरिक भीतीच्या छायेखालीच राहात आहेत. कोणत्या ठिकाणी कधी काय होईल, याचा नेम नाही. या स्थितीला सामोरे जाण्यास गोवा पोलिस कसे "अपात्र' आहेत, याचा प्रत्यय रविवारी बार्देश तालुक्यातील एका खेडेगावातील रहिवाशांना आला.
घटना छोटीशीच पण काय होऊ शकेल याचे भयावह चित्र उभी करणारी. आपल्या गावात कोणीतरी अनोळखी तरुण मोटारसायकलने आले आहेत, त्यापैकी एक जण पाकिस्तानी नागरिक आहे, याचा सुगावा लागल्याने काही जागृत नागरिकांनी "१००' क्रमांकावर फोन केला. वेळ होती रात्री दहाची. ते दोघे तरुण कोणत्या ठिकाणी गेले आहेत, याचीही माहिती रहिवाशांनी पोलिसांना कळविली. संशयाला जागा होती कारण यापैकी एक तरुण दोन वर्षापूर्वी याच गावात अधूनमधून येत असे, त्याने एका कुटुंबातील दोघी मुलींशी जवळीक केली होती. मैत्रीच्या नात्याने तो तेथे येत असे. त्यावेळी याच तरुणाच्या शोधार्थ आलेल्या पोलिसांनी लोकांशी विचारपूस केली होती, तो पाकिस्तानी नागरिक असल्याचे पोलिसांनीच त्यावेळी सांगितले होते. तो त्यानंतर कधीच दिसला नाही. लोकही त्याला विसरून गेले होते. आता अचानक तोच तरुण पुन्हा प्रकटला, त्यावेळी त्याच्याविषयी रहिवाशांना संशय आला. मुंबईला दोनच दिवसांपूर्वी स्फोट झाले होते, त्यामुळे या संशयिताबद्दल लोकांच्या मनात पाल चुकचुकली. एक-दोघांनी थेट "१००' क्रमांकावर संपर्क साधून किमान त्याची चौकशी करा म्हणजे संभाव्य अनर्थ टळू शकेल, असे पोलिसांना सुचविले! पोलिसांनी नेहमीच्या सवयीने आपण आपल्या जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधा, असे उलटेच सुनावले! त्या रात्री पोलिस तेथे फिरकलेच नाहीत. तो तरुणही पुन्हा कुठे दिसला नाही. कदाचित एखाद्या कटातही गुंतला असण्याची शक्यता आहे. तो ज्याठिकाणी गेला होता, तेथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता म्हणजे तब्बल १४ तासांनी हळदोणे पोलिसांनी चक्कर टाकली खरी; पण विशेष माहिती हाती लागली नाही, असे ते सांगतात. रडत गेलेली व्यक्ती एखाद्याच्या मृत्यूचीच बातमी आणते, अशी एक म्हण आहे. पोलिसांना ती तंतोतंत लागू पडते. तो ज्यांना भेटायला गेला होता, त्यांच्याशी त्याचा "संपर्क'क्रमांक अथवा पत्ता मिळू शकेल, या दृष्टीने चौकशी करण्यात आली का?
जर तो तरुण खरोखरच अतिरेक्यांशी संबंधित असेल तर...आता याची सारी जबाबदारी गृहमंत्रालयावर; सर्व काही ठाकठीक असल्याचा दावा करणारे रवी नाईक पोलिसांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी काही करणार आहेत का? प्रथम त्यांना आपली मानसिकता बदलावी लागेल, अशा घटना गांभीर्याने घेण्याचा आदेश द्यावा लागेल. नपेक्षा...आलीया भोगासी असावे सादर असे म्हणत गोमंतकीयांना दिवस काढावे लागतील. समुद्रकिनारे, वास्कोच्या इंधन टाक्या, महत्त्वाची ठिकाणे यासाठी कोणती सुरक्षा अस्तित्वात आहे, ते एकदा स्थानिक सरकारने जनतेला सांगावे.जनतेच्या मनातील भीती घालवण्याची जबाबदारी आपली आहे, याचाही विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे का?

मुंबईत अजूनही पाच अतिरेकी?

मुंबई, दि. १ - मुंबईत अजूनही पाच खतरनाक अतिरेकी लपले असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. याच माहितीच्याआधारे पोलिसांनी संपूर्ण महानगर पिंजून काढले असून अद्याप या अतिरेक्यांचा शोध न लागल्यामुळे चितेंचे वातावरण पसरल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.
अतिरेकी ज्या "कुबेर' बोटीतून मुंबईत आले ती बोट मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली. त्या बोटीचे निरीक्षण केल्यानंतर त्या बोटीमध्ये १५ व्हिंटर जॅकेट, १५ टी शर्ट-पॅन्ट, १५ शेव्हिंग सामान, टूथ ब्रश, १५ चादरी व ब्लॅंकेट या सर्व वस्तू १५ च्या संख्येने सापडल्या.या वस्तूंवर "मेड इन पाकिस्तान' असे स्पष्ट शब्दांत छापले आहे. यावरुन मुंबईत एकूण १५ अतिरेकी आले असून ९ मारले गेले; तर एक पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी आज मुंबईत ठिकठिकाणी "कॉंबिंग ऑपरेशन' करुन अतिसंवेदनशील भागात झडती घेतली. अनेक संशयितांची कसून चौकशीही केली. मुंबई "एटीएस' व क्राइम ब्रॅंंचचे अधिकारी या कॉंबिंग ऑपरेशनमध्ये गुंतले असून मुंबई पोलिसांनी आता खऱ्या अर्थाने या अतिरेकी हल्ल्याची गंभीर दखल घेतली असल्याचे समजते.दरम्यान अमेरिकेचे एफबीआय हे पोलिसांचे चौकशी पथक मुंबईत दाखल झाले असून एफबीआयचे अधिकारी या हल्ल्याची स्वतंत्र चौकशी करीत आहेत.

Sunday 30 November, 2008

धुमश्चक्री संपली

तब्बल ५९ तासांच्या अथक मेहनतीनंतर ताजमहाल हॉटेलमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांचा खातमा करण्यात एनएसजीच्या कमांडोंना शनिवारी सकाळी यश आले. तिघा दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर ऑपरेशन ताज संपल्याची घोषणा एनएसजीचे महासंचालक जी. के. दत्ता यांनी सांगितले . मुंबईवर हल्ला करुन ताजमधील लोकांना वेठीस धरणा-या दहशतवादाचा अंत झाल्यानंतर कमांडो, लष्करी जवान, मुंबई पोलिस व अग्निशामक दलाच्या जवानांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. या हल्ल्यांतील मृतांची संख्या १९५ तर, जखमींची संख्या सुमारे चारशेच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अतिरेक्यांनी किमान पाच हजार जणांना ठार करण्याचा कट रचला होता, अशी ताजी माहिती उपलब्ध झाली आहे.
शुक्रवारी दुपारी हॉटेल ओबेरॉय आणि रात्री नरिमन हाऊस बिल्डिंगमधून कमांडोंनी दहशतवाद्यांना नेस्तनाबूत केले होते. तथापि, ताज हॉटेलमध्ये लपलेले अतिरेकी कमांडोंना दाद देत नव्हते. ओबेरॉय व नरिमन हाऊसमधील कारवाया यशस्वी झाल्यानंतर , अंगात उत्साहाचे बळ संचारलेल्या एनएसजी कमांडोंनी शनिवारी पहाटे ऑपरेशन ताज आणखी वेगवान केले. कमांडोंच्या ताज्या तुकड्या सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबरच हॉटेलमध्ये घुसल्या. अतिरेक्यांना कंठस्नान घालण्याच्या इराद्यानेच ते आत शिरले होते. आतमध्ये जाताच त्यांनीही अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
अतिरेक्यांनी हा हल्ला परतवून लावण्यासाठी प्रयत्न केले. आपल्याकडील ग्रेनेडमार्फत त्यांनी जवानांवर हल्ले केले. त्याशिवाय एके ५६ रायफलीमधून बेछूट गोळीबारही केला. एवढेच नव्हे तर पहिल्या व दुस-या मजल्यातील कारी रुमना आगही लावली. ही आग एवढी प्रचंड होती की , आगीचे लोट ताजच्या खिडक्यांतून बाहेर पडत होते. संपूर्ण ताज हॉटेल काळ्या धुराने माखून गेले. ही धुमश्चक्री सुरु असतानाच , तळमजल्यावरच्या खिडकीतून एका व्यक्तीला आतून बाहेर टाकण्यात आले. ही व्यक्ती म्हणजेच गेल्या दोन दिवसांपासून सर्वांना वेठीला धरणारा दहशतवादी असल्याचे नंतर स्पष्ट झाले. आणखी एका दहशतवाद्याला पोलिसांनी हॉटेलमध्येच कंठस्नान घातले. दोघांना ठार केल्यानंतर ऑपरेशन ताज यशस्वी झाल्याची घोषणा मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी केली.
दरम्यान , कमांडो व पोलिस ताज हॉटेलची कसून तपासणी करत आहेत. ताज हॉटेलमध्ये असंख्य मृतदेह पडले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय आणखी काहीजण आतमध्ये अडकून पडले असल्याची भीतीही वर्तवली जात आहे.
पत्रकार सबिन सेहगल मृत्युमुखी
ताजच्या सहाव्या मजल्यावर अडकलेल्या, टाइम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ पत्रकार सबिना सेहगल सैकिया दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यांचा मृतदेह हॉटेलमधून बाहेर काढण्यात आल्याचं त्यांच्या मित्रांनी सांगितलं.
बुधवारी एका लग्नासाठी सबिना ताजमध्ये गेल्या होत्या. नेमका तेव्हाच, दहशतवाद्यांनी ताजवर कब्जा मिळवला आणि अंदाधुंद गोळीबार केला. हॉटेलमधल्या अनेक रहिवाशांना त्यांनी ओलिस धरलं. या हल्ल्यात सबिना त्यांच्या खोलीत अडकल्या होत्या. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत त्या एसएमएसच्या माध्यमातून कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या संपर्कात होत्या, पण त्यानंतर हा संवाद तुटला आणि नेमकं काय झालंय, हे कुणालाच कळेनासं झालं. गुरुवारी पहाटे दोन वाजता, आपण बाथरुममध्ये अडकल्याचा निरोप त्यांनी आपल्या पतीला, शंतनु सैकिया यांना पाठवला होता.
त्यामुळे सबिना यांचे सारेच मित्र त्यांची आतूरतेने वाट पाहत होते. परंतु, दुर्दैवानं त्यांच्या मृतदेहाचं दर्शन घ्यायची वेळ सगळ्यांवर आली. सबिना ज्या मजल्यावर होत्या, त्याच मजल्यावर एक मोठा स्फोट झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.

त्या अतिरेक्याला जगायचंय
मला जगायचंय, मला मरायचं नाहीये. मला सलाईन लावा, हे वाक्य आहे बेछूट गोळीबार करून अनेक निरपराध लोकांचे प्राण घेणा-या आणि मुंबईला वेठीस धरणा-या दहशतवाद्यांपैकी एकमेव जिवंत दहशतवाद्याचे.
आझम अमीर कासम असे या २१ वर्षीय दहशतवाद्यांचे नाव आहे. अस्खलीत इंग्रजी बोलणारा हा दहशतवादी पाकिस्तानमधील फरिदकोट जिल्ह्यातील गरीपालपुरा या तालुक्याचा रहिवासी आहे. हा एकमेव दहशतवादी आहे की जो जिवंत असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मुंबईला ५९ तास वेठीस धरणाऱ्या दहशतवाद्यांपैकी सर्वात प्रथम कॅमेऱ्यात टिपला गेलेला दहशतवादी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दहशतवादी हल्ल्याचा कट कसा रचला गेला याची सर्व माहिती आता हाच दहशतवादी देणार आहे. त्याच्या फोटोमुळेच हा दहशतवाद्याची ओळख पटली आणि त्यामुळे त्याला पकडणे शक्य झाल्याचे एटीएसच्या प्रवक्त्यांनी सांगितले. आझम आणि त्याच्या साथीदाराने बुधवार आणि गुरूवारी मुंबईत दहशत पसरवली. त्यांनी सर्वप्रथम सीएसटी स्टेशन, टाइम्स इमारतीच्या मागे, मेट्रो येथे थैमान घातल्यानंतर पोलिसांच्या चोरलेल्या क्वालिस गाडी आणि नंतर ती खराब झाल्यावर त्यांनी स्कोडा गाडी चोरली. त्यानंतर ते गिरगाव चौपाटीवर परिसरात गेले. त्यावेळी त्यांची आणि गावदेव पोलिस स्टेशच्या पथकाची चकमक झाली. यात आझम याने सहाय्यक पोलिस इन्स्पेक्टर तुकाराम उंबाळे यांच्यावर गोळीबार करून त्यांना धारातीर्थी पाडले.
याच चकमकीत मात्र आझमच्या साथीदाराला पोलिसांनी कंठस्नान घातले. आझम याला हाताला जखम झाली. हे दोघेही ठार झाल्याचे लक्षात घेऊन त्यांचे देह नायर इस्पितळात दाखल केले. यातील एक दहशतवादी श्वास घेत असल्याचे एका पोलिसाच्या लक्षात आले. तो जिवंत असल्याचे पाहून नायर हॉस्पिटल रिकामे करण्यात आले आणि दहशतवादविरोधी पथकाला पाचारण करण्यात आले. आझम याला शुद्धीवर आल्यावर शेजारी पडलेला साथीदाराचा मृतदेह पाहून ओरडू लागला. मला जगायचे, मला मरायचं नाही आहे. मला सलाईन लावा, अशी विनंती त्याने नायर येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केली.
"ओबेरॉय'ची हानी मोजणे कठीण
ओबेरॉय या पंचताराकिंत हॉटेलची नेमकी किती हानी झाले ते मोजणे कठीण असून अजूनही आम्ही त्याचा अंदाज करू शकत नसल्याचे मत ओबेरॉय ग्रुपचे चेअरमन पीआरएस ओबेरॉय यांनी व्यक्त केले आहे. हॉटेल कधी सुरू होईल , हे सांगणंही कठीण असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
अजून आम्हीच हॉटेलच्या आत गेलेलो नाही , जाऊ शकलेलो नाही. ओबेरॉयमधील सर्व मृतदेह आता बाहेर काढले असून हॉटेलच्या साफसफाईचे काम सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले की , हॉटेलच्या नुकसानीबाबत काहीही सांगणे अशक्य आहे. हॉटेल असोसिएशनकडे तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी आम्ही त्याबाबत बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ओबेरॉयच्या एकूण दहा कर्मचा-यांना जीव गमवावा लागल्याचे सांगून ते म्हणाले की , या सर्व कर्मचा-यांच्या घराची आणि नातेवाईकांची आम्ही योग्य ती काळजी घेऊ. आमच्या ज्या कर्मचा-यांना जीव गमवावा लागला त्यांच्यापैंकी कोणीही ओबेरॉय हॉटेलवर हल्ला करण्यात सामील नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानात इस्लामाबाद येथील मॅरिएट हॉटेलवरही याच प्रकारचा हल्ला झाल्याचे आम्ही ऐकले होते , मात्र आपल्याकडे असे काही होईल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता असे सांगून ते म्हणाले की , हॉटेलची सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही योग्य ती पावले उचलूच. हल्ला होण्याच्या काही वेळापूर्वीच मी एका पारितोषिक वितरण समारंभाला जाण्यासाठी ओबेरॉयमधून बाहेर पडलो होतो. नाहीतर कदाचित मीही तुम्हाला दिसलो नसतो.
दरम्यान, सकाळी साडेआठच्या सुमारास ऑपरेशन ताज पूर्ण झाले , त्यानंतर एनएसजीचे जवान या वास्तुची तपासणी करत असून, अग्निशमन दल आग लागलेल्या भागावर नियंत्रण मिळवत आहे. त्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाशी साधलेल्या संवादात अनेक महत्त्वाचे मुद्दे सामोरे आले. हल्ल्याच्या या सा-या घटनांमध्ये अग्निशमन दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सतत होणारा हॅण्डग्रेनेडचा वर्षाव आणि सतत गोळीबार होत असूनही या वास्तुला लावलेली आग अग्निशमन दलाने जीवावर उदार होऊन विझवली. त्यासाठी अग्निशमन दलाचा २० फायर इंजिन आणि १५० जवान डोळ्यात तेल घालून होते , अशी माहिती डेप्युटी फायर ऑफिसर राजन काटकर यांनी दिली. त्यामुळेच अग्निशमन दलाच्या या अतुलनीय शौर्यामुळेच ही वास्तू भस्मसात होण्यापासून वाचली हे विसरता येणार नाही.
ताज हॉटेलमध्ये ऑपरेशन पूर्ण झाल्यावर सुरू असलेल्या शोधप्रक्रियेत या ऐश्वर्याने भरलेल्या वास्तुची अवस्था भग्न , नष्ट झाली आहे. आतील ऐश्वर्याच्या अनेक खुणांची राखरांगोळी झाली आहे. भरजरी पडद्यांची पायपुसणी झाली आहेत , तर श्रीमंतीचे प्रतीक असणाऱ्या काचांचा जमिनीवर खच पडला आहे.


आझमकडे सॅटेलाईट फोन, शस्त्रे व नकाशे
या कारवाईत जिवंत हाती लागलेल्या आझम अमीर कासम या अतिरेक्याकडे पोलिसांनी शस्त्रास्त्र, सॅटेलाइट फोन आणि छत्रपती शिवाजी टर्मीनसचा नकाशा सापडला. या तरुण दहशतवाद्याने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे. हा दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा मास्टर माइंड महिन्यापूर्वी मुंबईत येऊन गेला असेही त्याने सांगितले. त्याने अनेक महत्त्वाच्या भागांचे फोटो काढले. तसेच चित्रिकरण करून त्याने आपल्या गटाला प्रशिक्षित केले. शेवटच्या क्षणापर्यंत जास्तीत जास्त लोकांना मारा असे त्याने सांगितल्याचे आझम याने गुपीत उघड केले.

पाळी कॉंग्रेसकडेच

प्रताप गांवस यांचा १५३४ मतांनी विजय दृष्टिक्षेपात निकाल
प्रताप गावस यांना ७८६७ मते
डॉ. प्रमोद सावंत यांना ६३३३ मते
डॉ. सुरेश आमोणकरांना ३६८२ मते

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - भाजपचे बंडखोर नेते डॉ.सुरेश आमोणकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे झालेल्या मतविभाजनाचा लाभ उठवत पाळी मतदारसंघावर पुन्हा एकदा आपला झेंडा रोवण्यात कॉंग्रेसला यश मिळाले आहे. पक्षाचे उमेदवार तथा माजी आमदार स्व.गुरूदास गावस यांचे बंधू प्रताप गावस यांचा १५३४ मतांच्या आघाडीने विजय झाला. त्यांना एकूण ७८६७ मते मिळाली. भाजपचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंत यांना ६३३३ तर, अपक्ष उमेदवार डॉ.सुरेश आमोणकर यांनी ३६८२ मते प्राप्त केली. सेव्ह गोवा फ्रंटचे जुझे लोबो यांना १५८ व अन्य अपक्ष उमेदवार राजेंद्र राणे यांना ३५१ मते मिळवली.
पणजी कांपाल येथे गोवा गृहविज्ञान महाविद्यालयात सकाळी ठीक ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. एकूण तीन टप्प्यांत घेतलेल्या मतमोजणीत पहिल्या दोन फेऱ्यांत प्रताप गांवस यांनी आघाडी मिळवली, तर शेवटच्या फेरीत भाजपचे डॉ.सावंत यांना केवळ २३८ मतांची आघाडी घेता आली. एकूण १८३९१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. सरकारची विश्वासार्हता सांभाळण्यासाठी कॉंग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवून जोरदार प्रचार करूनही त्यांना अपेक्षित आघाडी मात्र अजिबात घेता आली नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.डॉ.आमोणकर यांनी उमेदवारी नाकारल्याच्या रागातून भाजपशी केलेल्या बंडखोरीमुळेच कॉंग्रेसला ही जागा परत मिळवता आली, हे निकालाच्या आकड्यांव्दारे स्पष्ट झाले आहे. भाजप व डॉ.आमोणकर या दोघांना मिळालेल्या मतांची बेरीज १००१५ होते, त्यामुळे या मतांत पडलेली फूट कॉंग्रेसच्या पथ्यावर पडल्याचे सिद्ध झाले आहे.
गेल्या निवडणुकीचीच पुनरावृत्ती
गेल्या २००२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्व.गांवस हे १५९१ मतांच्या आघाडीने निवडून आले होते. यावेळी प्रताप गांवस हे १५३४ मतांच्या आघाडीने निवडून आले, त्यामुळे पाळी मतदारांवर सरकार पक्षाच्या प्रचाराचा काहीही परिणाम झाला नसल्याचे उघड झाले आहे. गेल्यावेळी म.गो पक्षाचे उमेदवार महेश गांवस यांनी ४०३२ मते मिळवली होती. यावेळी डॉ.आमोणकर यांनी ३६८२ मते मिळवल्याने कॉंग्रेसविरोधी मतांचे विभाजन होऊन कॉंग्रेसच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेस सरकार सत्तेवर असूनही मोठी आघाडी मिळवता आली नाही,असा सवाल केला असता मुख्यमंत्री कामत यांनी या मतदारसंघात कॉंग्रेसला तसे स्थान नव्हतेच, तरीही जनतेने कॉंग्रेसवर विश्वास दाखवला. आघाडीपेक्षा विजय मिळाला हे महत्त्वाचे असे सांगत या विषयाला बगल दिली.
चोख प्रत्युत्तर ः डॉ.आमोणकर
आपल्याला कारण नसताना उमेदवारी नाकारण्यात आले. आपण पक्षाशी कोणतीही बंडखोरी केली नाही. काही खास कारणांमुळे आपणास अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागली,अशी प्रतिक्रिया डॉ.आमोणकर यांनी व्यक्त केली. निवडणुकीचा निकाल हे भाजपला चोख प्रत्युत्तर असल्याचेही ते म्हणाले.
मतदारांची नावे गहाळ झाल्यानेच पराजय ः डॉ.सावंत
पाळी मतदारसंघातील मतदारयादीतून अनेक मतदारांची नावे ऐनवेळी गहाळ झाल्याचे डॉ.प्रमोद सावंत म्हणाले.या मतदारांना मतदानाचा हक्क मिळाला नाही, त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले. राणे पितापुत्रांनी प्रत्यक्ष कॉंग्रेससाठी सक्रिय काम केल्याने कॉंग्रेसचा विजय झाला,असेही ते म्हणाले. डॉ.आमोणकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने भाजपची मते विभागली गेली व त्याचमुळे भाजपला पराजयाचा सामना करावा लागला, हे त्यांनी मान्य केले.
स्व.गांवस यांची पुण्याईः प्रताप गांवस
पाळी मतदारसंघाचा कायापालट करण्याचे स्वप्न स्व.गुरूदास गांवस यांनी बाळगले होते. पराजयाचा सामना करीत अखेर त्यांनी यश मिळवले, परंतु प्रत्यक्षात काम करण्याची संधी हाती आली असता त्यांचा देहांत झाला. स्व.गांवस यांच्या स्वप्नपूर्तीसाठी निवडून देण्याच्या केलेल्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिल्यानेच आपला विजय झाला,असे प्रताप गांवस म्हणाले. मुख्यमंत्री दिगंबर कामत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व सभापती प्रतापसिंग राणे यांचे प्रचारातील योगदान महत्त्वाचे ठरले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर व सर्व पक्ष कार्यकर्ते हेच या विजयाचे खरे मानकरी आहेत असे ते म्हणाले.

पाळीत पैशाचा धूर व यंत्रणेचा गैरवापर

भाजपचा घणाघाती आरोप
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांचा धूर तसेच सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून कॉंग्रेस पक्षाने पाळी मतदारसंघ शाबूत ठेवला, असा घणाघाती आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केला आहे. कॉंग्रेसचा हा नैतिक विजय नसून केवळ आकड्यांचा विजय असल्याचेही ते म्हणाले.पाळी मतदारसंघात भाजपचा पराभव आपण स्वीकारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.आज पणजी येथे भाजप मुख्यालयात पत्रपरिषदेत ते बोलत होते.यावेळी सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते.
गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपला जास्त मते मिळाली. भाजपचे प्रदेशाध्यक्षपदाची दोन वेळा जबाबदारी स्वीकारलेल्या डॉ.आमोणकर हे पक्षाबरोबर राहतील, असा विश्वास होता; परंतु त्यांनी वैयक्तिक अहंभावामुळे अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने मतविभाजन झाले. त्यामुळे कॉंग्रेसचा मार्ग अधिक सोपा झाला, भाजपकडे यावेळी नवीन मते आली. मात्र डॉ.आमोणकर यांची काही प्रमाणातील वैयक्तिक मते त्यांना गेल्याने भाजपला पराभव पत्करावा लागला,असे श्री. नाईक म्हणाले.
डॉ.आमोणकर यांच्याबाबतीत पक्ष कार्यकर्त्यांत पसरलेली नाराजी पाहता ही उमेदवारी त्यांना दिली असती तर भाजपला आत्ताच्यापेक्षा कमी मते मिळाली असती,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कॉंग्रेस पक्षातर्फे सरकारी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी दाखल करूनही काहीही कारवाई करण्यात आली नसल्याचेही ते म्हणाले.अनेक सरकारी अधिकारी सरकारचे "एजंट' बनून त्यांना साहाय्य करीत होते,असा ठपकाही श्री.नाईक यांनी ठेवला.
दहशतवादी हल्ल्याचा निषेध
दरम्यान, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भाजपतर्फे निषेध करण्यात येत असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले. गोव्याचे दोन सुपुत्र या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याने त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करायची परमेश्वर ताकद देवो,अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. गोव्यातही कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. सांकवाळ येथील पंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज काढणाऱ्या पंच सदस्याला मारहाण करणाऱ्या इतर पंच सदस्यांना अटक करण्याचे सोडून तक्रार दाखल करायला गेलेल्या त्याच्या भावालाच अटक करण्यात आल्याचा त्यांनी धिक्कार केला.मडकई मारहाणप्रकरणी एकाचा मृत्यू झाल्याने त्याचीही दखल पोलिस घेत नाहीत, असेही ते म्हणाले.

डाडा.. डाडा... या आर्त किंकाळीनंतर मोबाईल हातून निसटला तो कायमचा

प्रीतेश देसाई
पणजी, दि. २९ - मुंबईतील "हॉटेल ताज'मध्ये पाकिस्तानी भेकड दहशतवाद्यांच्या बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडलेला गोव्यातील २३ वर्षीय तरुण शेफ(आचारी) बोरिस दो रेगो याच्यावर आज सायंकाळी दिवाडी येथे हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बोरिस याचे मित्रपरिवार, नातेवाईक आणि गोव्यातील "हॉटेल ताज'चे पदाधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सकाळी गृहमंत्री रवी नाईक व सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी दिवाडीतील मयत बोरिस याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सकाळी विमानाने बोरिस याचा मृतदेह गोव्यात आणण्यात आला. "बोरिस हा गोव्यात पंचतारांकित हॉटेलमधे येणार म्हणून होता, मुंबईत चांगला अनुभव जास्त मिळेल त्यामुळे मीच त्याला गोव्यात येऊ नको असे म्हटले, त्याचे दुख आज जास्त होते,' अशी खंत त्याचे वडील आणि हॉटेल ताजचे माजी शेफ उरबानो रेगो यांनी व्यक्त केली. केव्हिन हा थोरला व बोरिस हा धाकटा मुलगा. विज्ञान शाखेची पदवी मिळवल्यानंतर त्याने मिरामार येथे "आयआयएएस'मधून केटरिंगची पदवी संपादन केली. त्यानंतर तो दिल्लीत एका हॉटेलमधे प्रशिक्षण घेण्यास गेला. तेथूनच तो गेल्या ऑगस्ट महिन्यात "हॉटेल ताज'मध्ये रुजू झाला होता. या घटनेच्या काही दिवसापूर्वी म्हणजे १५ ते १७ नोव्हेंबरला रजा काढून घरी आला होती. मात्र त्याच दरम्यान हॉटेलमधे "इटालियन फुड फेस्टिवल'चे आयोजन केल्याने त्याला त्वरित बोलावून घेण्यात आले. त्यामुळे तो रजा संपण्यापूर्वीच निघाला होता.
मुलाच्या मृत्यूपेक्षा हॉटेल जळताना पाहिलेले दृश्य मला अधिक दुःख देऊन गेले, अशी प्रतिक्रियाही उरबानो यांनी व्यक्त केली. "त्या दिवशी फुटबॉल मॅच पाहण्यासाठी टीव्ही लावला असता दहशतवाद्यांनी हॉटेलमधे बेछूट गोळीबार करून निरपराध पाहुण्यांचे प्राण घेतल्याचे भयानक चित्र पाहायला मिळाले. त्यावेळी त्वरित बोरिसशी संपर्क साधला. त्याने त्यावेळी आपण सुखरूप असल्याचे सांगितले. त्याच्याबरोबर अन्यही शेफही होते. त्यावेळी पहाटेचे ३ वाजले होते. आम्ही दर पंधरा मिनिटांनी त्याच्याशी संपर्क साधत होचो. पहिल्यावेळी दूरध्वनी केला त्यावेळी बोरिस तळमजल्यावर होता. त्यावेळी त्याने त्या हॉटेलच्या एका जाणत्या वेटरला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार करताना पाहिले. ही माहिती बोरिसने मोबाईलवरून दिली. त्यानंतर काही मिनिटात त्याने आम्ही वरच्या मजल्यावर जात असल्याचे सांगितले. रात्री मला झोपच लागत नव्हती. बोरिसने मला झोपायला जा, असेही सांगितले होते. पण मी जागाच होतो. राहवले नाही म्हणून पुन्हा पहाटे ४.३० वाजता बोरिसशी मोबाईलवर संपर्क साधला. यावेळी बोरिस एकदम दबक्या आवाजात केव्हिन... केव्हिन...त्यानंतर डाडा...डाडा...हे दोन शब्द मी त्याच्या तोंडातून एकले आणि मोबाईल खाली पडला...
त्यावेळी बोरिसच्या पोटाच्या दहशतवाद्यांची गोळी लागली होती. सुमारे वीस मिनिटे तो तसाच पडून राहिल्याने आणि रक्त वाहत राहिल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचठिकाणी दहशतवाद्यांनी एका महिला शेफची गोळ्या घालून हत्या केली होती, अशी माहिती आपल्याला मित्रांकडून मिळाली आहे, असे उरबानो यांनी "गोवा दूत'शी बोलताना सांगितले.


"आम्ही कॉंग्रेसचे असे सांगायचीही लाज वाटते'
हॉटेल ताजमधे दहशतवाद्यांचा बळी ठरलेला बोरिस रेगो याच्या कुटुंबीयाची गोवा सरकारने साधी दखलही घेतलेली नाही. मुख्यमंत्री तब्बल तीन दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. हॉटेलच्या व्यवस्थापनेनेच बोरिसचा मृतदेह विमानाने गोव्यात पाठवला. तो विमानतळावरुन आणण्यास एक पोलिस शिपाईही सरकारने तेथे पाठवला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया बोरिसच्या याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या तरुणांनी व्यक्त केली. आम्ही सर्व कॉंग्रेसचेच कार्यकर्ते. पण आज आम्हाला कॉंग्रेस हा शब्द म्हणायचीही लाज वाटते. आमचे नाव उघड झाल्यास उद्या आम्हांला पक्ष कार्यालयात बोलावून आम्ही खरडपट्टी काढली जाईल. राहवत नाही म्हणून सांगतो जर "मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असते तर त्यांनी सर्वतोपरी मदत केली असती,' अशी प्रतिक्रिया या तरुणांनी दिली. बोरिसच्या कुटुंबीयाला सरकारचा पैसा नको आहे. पण गोव्याचा एक तरुण दहशतवादी कारवयांत गतप्राण होतो आणि सरकार साधी दखलही त्याची घेत नाही, याचीच सर्वाधिक टोचणी त्यांना लागून राहिली आहे.

अनुसूचित जमात राज्यव्यापी जागृती रथयात्रा आजपासून

कुंकळ्ळी, दि. २९ (प्रतिनिधी) - गोव्यातील गावडा, कुणबी व वेळीप समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळून पाच वर्षे पूर्ण होऊनही या समाजाला त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. राज्यातील सर्व समाजबांधवांना त्यांच्या हक्कांबाबत अवगत करण्यासाठी तसेच सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यासाठी "युनायटेट ट्रायबल असोशिएशन अलायन्स' तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी जनजागृती रथयात्रेला उद्या रविवारपासून प्रारंभ होणार आहे.
ही रथयात्रा ८ डिसेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात फिरवली जाणार आहे. या रथयात्रेदरम्यान संघटनेचे नेतेआमदार रमेश तवडकर,आमदार वासुदेव मेंग गावकर,आमदार पांडुरंग मडकईकर तसेच संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. संघटनेचे इतर पदाधिकारी व हजारो कार्यकर्तेया यात्रेत सहभागी होणार आहेत. या जनजागृती रथ यात्रेची सुरुवात काणकोण तालुक्यातून होणार आहे. उद्या सकाळी ९ वाजता गावडोंगरी काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानातून ही यात्रा सुरू होईल. त्यानंतर १ डिसेंबर रोजी केपे, २ रोजी सांगे, ३ रोजी सावर्डे, ४ रोजी सासष्टी, ५ रोजी तिसवाडी,६ रोजी बार्देश,७ रोजी सत्तरी व ८ रोजी फोंडा तालुक्यात म्हार्दोळ फोंडा येथील क्रांती मैदानावर या रथयात्रेचा समारोप होईल.
या यात्रेत समाजाचे सुमारे ६० हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने सह्यांची मोहीम राबवण्यात येणार असून यात्रेनंतर या सह्यांचे निवेदन राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पाठवण्यात येणार आहे. ही यात्रा पूर्णपणे लोकशाही पद्धतीने होईल,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ८ जानेवारी २००३ साली अथक प्रयत्नानंतर गावडा, कुणबी व वेळीप समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला. प्रत्यक्ष विकासापासून वंचित राहिलेल्या या घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनेत अनेक अधिकार दिले आहेत. अर्थसंकल्पातील महत्त्वाचा भाग हा या घटकांच्या विकासासाठी वेगळा ठेवण्यात येतो. हे अधिकारी व हक्क या लोकांना देण्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न सुरू नसल्याचे निमंत्रक रमेश तवडकर यांनी सांगितले.
गोव्यातील या समाजाला त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवले जात असल्याने मुळात या लोकांनाच त्यांचे हक्क काय आहेत, याबाबत जागृत करणे महत्त्वाचे आहे, असे सांगून यामुळेच ही रथयात्रा काढण्यात येत असल्याचे ते म्हणाले. या रथयात्रेत या समाजाचे सर्व बांधव सहभागी होणार असून वैयक्तिक मतभेद दूर सारून या घटकाची ताकद या रथयात्रेव्दारे सरकारला दाखवून देण्याचाही हा प्रयत्न असेल,असेही आमदार तवडकर यांनी सांगितले. अनुसूचित जमात आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असले तरी या महामंडळाला आवश्यक निधी पुरवण्यात येत नसल्याने अनेक योजना धूळ खात पडल्या आहेत. केंद्र तथा राज्य सरकारकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. आता राष्ट्रपती व पंतप्रधानांचेही दरवाजे ठोठावण्यात येतील,अशीही माहिती यावेळी देण्यात आली.