Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 26 February, 2010

बेकायदा खाण व्यवसायात खुद्द मुख्यमंत्र्यांचाच हात

विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर गरजले
निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा
सर्व आरोपांचे पुरावे सादर करू

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): राज्यात बेदरकारपणे सुरू असलेल्या बेकायदा खाण व्यवसायात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह इतरही काही मंत्र्यांचा थेट सहभाग आहे, असा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. सरकारला एवढीच हिंमत असेल तर त्यांनी निवृत्त न्यायाधीशामार्फत या व्यवहाराची चौकशी करावी, आपण सर्व आवश्यक पुरावे सादर करू, असे जाहीर आव्हानही पर्रीकर यांनी दिले.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर यांनी विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. गेले दोन महिने इतर कामात व्यस्त राहिलेले मनोहर पर्रीकर हे तब्बल दोन महिन्यांनी पत्रकारांना संबोधित करीत होते. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार हे नखशिखांत भ्रष्टाचारात बरबटलेले आहे. विधानसभेत विरोधकांना सामोरे जाण्याचे धारिष्ट या सरकारात राहिलेले नाही, त्यामुळे अल्प कालावधीचे अधिवेशन बोलावून जनतेच्या प्रश्नांना बगल देण्याचा घाटच घातल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला. मुळात अधिवेशन सहा दिवसांचे जरी असले तरी प्रत्यक्षात कामकाज मात्र तीनच दिवस चालणार आहे. या तीन दिवसात महागाई व बेकायदा खाण या दोनच महत्त्वाच्या विषयांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा निर्धारही पर्रीकर यांनी व्यक्त केला.
खाण धोरणाची घोषणा करण्याबाबत सरकारची भूमिका हीच मुळी फसवेगिरी आहे. प्रमुख खनिज मालाचा समावेश घटनेच्या पहिल्या परिशिष्टात आहे, त्यामुळे त्याबाबत राज्य सरकारला धोरण ठरवण्याचा अधिकारच नाही. आपण दिल्लीत केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांच्याकडे यासंबंधी चर्चा करणार असल्याचेही पर्रीकर म्हणाले. आता खनिज वाहतुकीवर निर्बंध व पर्यावरणाचे रक्षण या माध्यमाने खाण व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार सरकारला आहे. परंतु, सरकारची तशी अजिबात तयारी दिसत नाही, असेही ते म्हणाले. ट्रक व्यवसाय व इतर रोजगाराचे आमिष दाखवून बेकायदा खाण व्यावसायिकांनी समाजात फूट घालण्याचे काम केले. सुमारे २० टक्के खाण व्यवसाय बेकायदेशीरपणे सुरू आहे. गेल्या २००५ सालाच्या तुलनेत खनिजाचे उत्पन्न यंदाच्या वर्षात दुप्पट अर्थात ४३ अब्ज टनावर पोचले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. सुमारे दीड हजार हेक्टर वनक्षेत्र खाण व्यवसायाने व्यापले आहे. २२ टक्के खनिजाचे उत्खनन हे वनक्षेत्रातून करण्यात येते. या सर्व बेकायदा व्यवहाराला राजकीय आश्रय मिळतो व त्यात खुद्द मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचा थेट आरोपही पर्रीकर यांनी केला. बेकायदा खाणींसाठी वनक्षेत्राचा वापर केला जातो पण कुडचडे बायपास रस्त्यासाठी केवळ १७ हेक्टर वनक्षेत्राची जागा मिळत नाही, याचा अर्थ काय, असा सवालही पर्रीकर यांनी केला. बेदरकार खनिज वाहतुकीमुळे स्थानिक लोकांचे जगणे हैराण झाले आहे. गेल्या पाच वर्षापूर्वीचे रस्ते कायम आहेत व खनिज उत्पन्न मात्र दुप्पट झाले आहे. यंदापासून सुमारे चारशे कोटी रुपये रॉयल्टीच्या माध्यमातून सरकारला मिळणार आहेत. त्याचा वापर साधनसुविधा निर्माण करण्यासाठी नियोजित पद्धतीने केला तर काही समस्यांवर मात करता येणे शक्य आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
राजीव यदुवंशीचा एवढा लळा का?
खाण, वन आदी महत्त्वाची खाती सांभाळणारे सनदी अधिकारी राजीव यदुवंशी हे निव्वळ भ्रष्टाचारात मुख्यमंत्र्यांची साथ देतात, यामुळेच गेली सात वर्षे तीन वेळा बदली आदेश येऊनही ते गोव्यातच ठाण मांडून बसले आहेत. त्यांचा बदली आदेश रद्द करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच हस्तक्षेप केला असा आरोप करून मुख्यमंत्र्यांना त्यांचा एवढा लळा कसा काय, हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील, अशी टीका पर्रीकर यांनी केली. गोव्यात येणारे सनदी अधिकारी जास्तीत जास्त तीन ते चार वर्षे इथे राहतात पण मुख्यमंत्री मात्र या सनदी अधिकाऱ्याला सोडण्यास तयार नाहीत, असेही ते म्हणाले.

मद्यघोटाळ्याची चौकशी का रखडतेय?

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): गेल्या विधानसभा अधिवेशनात अबकारी खात्यातील कोट्यवधी रुपयांच्या मद्यघोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला. मात्र, या घोटाळ्याची चौकशी गेले दोन महिने का रखडत आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. या घोटाळ्याची चौकशी करणारे वित्त सचिव उदीप्त रे हे एकतर या घोटाळ्यात सामील असावेत किंवा वित्तमंत्रि
पद सांभाळणारे मुख्यमंत्री दिगंबर कामत हे या चौकशीत हस्तक्षेप करीत असावेत, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
सर्व कागदपत्रांसह सुमारे शंभर कोटी रुपयांची व्याप्ती असलेल्या या घोटाळ्याचा कागदपत्रांसह पर्दाफाश करून दोन महिने उलटले तरीही कारवाई होत नाही, याचा अर्थ हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालीत आहे, असा आरोप पर्रीकरांनी केला. ही चौकशी "सीबीआय' मार्फत करावी अशी मागणी आपण केली होती पण ही चौकशी वित्त सचिवांकडे सोपवण्यात आली. आता दोन महिने उलटले तरी वित्त सचिवांनी आपल्याकडे या घोटाळ्याबाबत काहीही चौकशी केली नाही, याचा अर्थ काय होतो, असा सवाल पर्रीकर यांनी केला. एकतर वित्त सचिव या नात्याने त्यांचाही या घोटाळ्यात समावेश असावा किंवा मुख्यमंत्री कामत चौकशीत आडकाठी आणत असावेत, असा ठपकाही पर्रीकर यांनी ठेवला.
भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकायुक्तांची तत्काळ नियुक्ती झाली पाहिजे. दक्षता खाते हे पूर्णपणे सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे त्यांना अजिबात धारिष्ट नाही, असेही पर्रीकर म्हणाले.
रामनवमीला कुणाचा विरोध आहे ते स्पष्ट करा
अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ ते २६ या काळात घोषित करण्यात आले आहे. मुळात या वर्षीचे पहिले अधिवेशन असल्याने पहिला दिवस राज्यपालांचे अभिभाषण, दुसऱ्या दिवशी अभिभाषणावरील चर्चा, अर्थसंकल्प सादरीकरण, अतिरिक्त पुरवण्या मागण्यांना मंजुरी व अर्थसंकल्पाला मान्यता असा कार्यक्रम निश्चित झाल्याने जनतेचे प्रश्न व समस्या उपस्थित करण्याची संधीच प्राप्त होणार नाही, अशी खंत पर्रीकर यांनी व्यक्त केली. निव्वळ भ्रष्टाचारात गुंतलेल्या सरकारला जनतेचे काहीही पडून गेलेले हेच यावरून स्पष्ट होते. २४ रोजी रामनवमी उत्सव आहे व त्या दिवशी कामकाज घेण्यास भाजपचा तीव्र विरोध राहील. मुख्यमंत्री दिगंबर कामत हे एरवी देवभक्त आहेत पण रामनवमीच्या उत्सवादिवशीच अधिवेशन भरवण्याची रावणाची बुद्धी त्यांना कशी सुचली हे मात्र कळत नाही, अशी टरही पर्रीकरांनी उडवली. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करणार आहे. एवढे करूनही सरकार मान्य करीत नसेल तर सभागृहात कामकाज कार्यक्रमात दुरुस्ती करण्याचा ठराव सादर केला जाईल. मग प्रत्येक आमदाराला रामनवमीबाबत आपली भूमिका जाहीरपणे उघड करणे भाग पडेल, असेही पर्रीकर म्हणाले. केवळ रामनवमीच नव्हे तर इतर कोणत्याही धर्माच्या उत्सवादिवशी अधिवेशन भरवण्यात येऊ नये, अशी भाजपची भूमिका आहे, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.
कायदा खाते "कॅसिनो'चे तारणहार
मांडवी नदीतून कॅसिनो जहाजे खोल समुद्रात हटवली जातील असे दोन वेळा विधानसभेत आश्वासन देण्यात आले व तसा निर्णय मंत्रिमंडळानेही घेतला. कॅसिनोमालकांनी मात्र या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊन स्थगिती मिळवली. ही स्थगिती हटवण्यात अजूनही आपले ऍडव्होकेट जनरल यांना यश येत नाही. मुळात ही स्थगिती कायम ठेवण्यात सरकारच्या कायदा खात्याचाच हात असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. राज्याचे ऍडव्होकेट जनरल हे तर पूर्णपणे निष्क्रिय आहेत. कायदेशीर गुंता तयार करून कॅसिनोमालकांना दिलासा देण्याचीच कृती त्यांच्याकडून होत असल्याची टीकाही पर्रीकर यांनी केली. खुद्द गृहमंत्री रवी नाईक राज्यात अंमलीपदार्थाचा व्यवहार नाही असे वक्तव्य करतात व पोलिस मात्र एकामागोमाग एक छापे टाकून अंमलीपदार्थ पकडतात, यावरून कायदा सुव्यवस्थेची काय अवस्था बनली आहे, याचे दर्शन घडते, असेही पर्रीकर म्हणाले. लोकायुक्त विधेयक तात्काळ लागू करण्याची मागणी करणार असल्याचे सांगून लोकायुक्तांची नेमणूक झाल्यास किमान दहा प्रकरणे पुराव्यासहित सादर करू, असेही ते म्हणाले. व्यावसायिक कराबाबतही भाजप आंदोलन छेडणार असून येत्या विधानसभेत या विषयावरून प्रत्येक आमदाराला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल, असेही पर्रीकर म्हणाले.
-------------------------------------------------------------------
रिंगा रिंगा 'रे'
अबकारी खात्यातील कथित मद्यघोटाळ्याच्या चौकशीबाबत विचारणा करण्यासाठी वित्त सचिव उदीप्त रे यांच्याशी सकाळपासून मोबाईलवर संपर्क साधला असता ते फोन उचलत नसल्याचे आढळून आले. त्यांचा मोबाईल रिंग होतो पण ते उचलत नसल्याने त्यांच्या मोबाईलवर केवळ रिंगा रिंगा "रे' चाच प्रतिसाद मिळाला.

पकडले ड्रग निघाले खत

पणजी, दि. २५ (प्रीतेश देसाई): अंमलीपदार्थ विरोधी पथकाने एका वर्षापूर्वी छापा टाकून जप्त केलेले "कोकेन' वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत चक्क "युरिया' (खत) निघाले आहे तर, "हेरॉईन' हे "पेरासिटामॉल' गोळ्यांची पावडर असल्याचे सिद्ध झाले आहे. जप्त करण्यात आलेले पदार्थ "ड्रग' नाही तर मग अंमलीपदार्थ विरोधी पथकाने रीतसर पंचनामा करून छाप्यात जप्त केलेले ते अंमलीपदार्थ गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला असून वरिष्ठ पोलिस अधिकारीही या प्रकाराने अवाक झाले आहे. या दोन प्रकरणांत जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थ चाचणीचा अहवाल नुकताच आला असून या अहवालामुळे अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे पितळ उघडे पडले आहे.
या पथकाची गोपनीय कागदपत्रे ड्रग माफियांच्या घरात सापडण्याचा प्रकार उजेडात आलेला असतानाच दोन वेगळ्या प्रकरणात दोघा संशयितांकडे ड्रग मिळाल्याचा दावा करून त्यांना अटक करून त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला पदार्थ "ड्रग' नसून भलतेच काही असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकारामुळे दोन्ही संशयितांना नाहक या प्रकरणात गोवण्याचा प्रकार झालेला नाही ना, अशी शक्यता खुद्द वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या दोन्ही प्रकरणात दोन्ही संशयितांनी एक वर्ष तुरुंगवासही भोगलेला आहे. गेल्या वर्षी अंमलीपदार्थविरोधी पथकाने कालिदास शेट्ये या पोलिस हवालदाराला अटक करून त्याच्याकडून "कोकेन' जप्त केले होते. या प्रकरणात त्याला त्वरित निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर खात्याअंतर्गत करण्यात आलेल्या चौकशीनंतर त्याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्याचप्रमाणे, दुसऱ्या प्रकरणात राजस्थान येथील एका व्यावसायिकाच्या पुत्राकडून "हेरॉईन' जप्त करून त्यालाही अटक करण्यात आली होती. परंतु, तब्बल एका वर्षानंतर आलेल्या त्या "ड्रग' चाचणीच्या अहवालात ते "हेरॉईन' नसून तो पेरासिटामॉलच्या गोळ्यांची पावडर असल्याचे उघड झाले आहे.
जप्त करण्यात आलेले पदार्थ ड्रग नव्हते तर मग ते जप्त का करण्यात आले आणि जर ते खरोखरच ड्रग होते तर ते कुठे गेले, असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. कालिदास शेट्ये याच्यावर एका वर्षापूर्वी अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या निरीक्षकानेच छापा टाकून त्याला अटक केली होती. त्यावेळी त्यांनी पंचनामा करून सदर पदार्थ व्यवस्थित "पॅकिंग' करून चाचणीसाठी पाठवला होता. कोणत्याही प्रकरणात अंमलीपदार्थ सापडल्यानंतर त्याची प्राथमिक चाचणी अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडे असलेले "ड्रग कीट' वापरून केली जाते. यावेळी ते "कोकेन' नसून "युरिया' असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्या ड्रगची परस्पर विक्री करून त्यात कोणी "युरिया' भरले नसेल ना, असाही संशय व्यक्त केला जात आहे. "हेरॉईन'च्या बाबतीत ही ते झालेले असून हा प्रकरणात पंचनामा एका उपनिरीक्षकाने केला होता, अशी माहिती मिळाली आहे. या सर्व अधिकाऱ्यांची गेल्या काही महिन्यापूर्वीच अंमलीपदार्थविरोधी पथकातून बदली करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली असून त्याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

साटेलोटे सिद्ध झाल्यास कठोर कारवाई : बस्सी

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): अंमलीपदार्थ विरोधी पथकाची गोपनीय कागदपत्रे "डुडू' याच्या बंगल्यावर सापडल्याच्या घटनेची पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात कोणताही अधिकारी दोषी आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. महासंचालक बस्सी आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
अंमलीपदार्थ तस्करी किंवा व्यवसाय अजिबात सहन केला जाणार नसल्याची गर्जना पोलिस महासंचालकांनी केली. दिल्ली येथील बैठकीनंतर गोव्यात दाखल झालेल्या पोलिस महासंचालकांनी गोव्यात येताच सर्वप्रथम अटक करण्यात आलेला ड्रग माफिया "डुडू' याचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचा आदेश अंमलीपदार्थविरोधी पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया "डुडू'ला तब्बल १२ वर्षानंतर अटक करण्याचे धाडस करणाऱ्या पथकाचे अभिनंदन करत त्यांना बक्षीस जाहीर केले.
दरम्यान, "डुडू' याची आज दिवसभर चौकशी करण्यात आली असून याद्वारे धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. "डुडू' वापरत असलेले वाहन सॅंट्रो कार ही सहा महिन्यांपूर्वी भाड्याने चालवायला घेतली होती. तरीही या वाहनाची वाहतूक खात्यात अद्याप नोंदणीच झालेले नाही, अशी माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे. २००६ साली सदर वाहन मडगाव येथील एका "ब्रोकर'ला विकण्यात आले होते. त्यानंतर ते वाहन कळंगुट येथील एका व्यक्तीने विकत घेतले, त्याने त्या वाहनाची नोंदणी न करताच "डुडू' याला वापरण्यासाठी दिले, असे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सहा महिन्यापूर्वी "डुडू' याने नवीकोरी ब्रीझ ही दुचाकी विकत घेतली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अन्न, वस्त्र, निवारा हरवतो तेव्हा...

वास्को, दि. २५ (पंकज शेट्ये): बुधवारी चिखली येथील एका घरात झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे येथील अन्य दोन घरांतील मालमत्ता पूर्णपणे खाक होऊन या घरांत राहणाऱ्या दोन्ही परिवारांचा संसारच उद्ध्वस्त झाला आहे. या घटनेमुळे अत्यंत गरिबीतून उभा केलेला संसार चालवत असलेल्या या दोन्ही परिवारांतील १२ सदस्यांवर जणू आभाळ कोसळे आहे. अन्न, वस्त्र आणि उद्ध्वस्त झालेल्या डोईवरील छतासह संसार पुन्हा उभा करण्यासाठी सरकारबरोबरच दात्यांकडूनही साह्यतेची अपेक्षा या पीडितांनी व्यक्त केली आहे.
चिखली येथे भज्यांचा गाडा चालवून खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या मोहन नाईक यांच्या तोंडची चवच पळाली असून सध्या एकवेळचे जेवण कसे करायचे असा मोठा प्रश्न त्यांच्या परिवारापुढे आऽऽऽ वासून उभा राहिला आहे. उत्तरडोंगरी येथे राहणाऱ्या मोहन नाईक यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट एवढा भयानक होता की त्याने शेजारच्या दोन घरांना आपल्या कवेत घेतले. सदर घटनेत मोहन नाईक यांच्या घरातील मालमत्तेबरोबरच बाबू आंबेकर यांच्या घरातील मालमत्ता जळून खाक झाली तर जॉर्ज यांनाही नुकसानी सोसावी लागली. सध्या मोहन व बाबू यांच्या परिवारातील सदस्य उघड्यावर आले आहेत. दोन्ही परिवारातील मिळून १२ सदस्यांना आता काय करावे, असा प्रश्न पडला आहे. मोहन नाईक यांच्या परिवारात त्याची बायको, मुले - मुलगी मिळून पाच सदस्य आहेत तर बाबू आंबेकर यांच्या घरात आई - वडील, बायको व तीन बहिणी मिळून सात सदस्य आहेत. मोहन नाईक चिखली येथे भजी, सामोसा आदी खाद्यपदार्थांचा गाडा चालवून महिन्याकाठी सुमारे पाच हजारांची कमाई करून आपली बायको मालिनी, मोठी मुलगी आशा (वय १४), मुलगा सतीश (१३) व महेश (वय १२) याचा पोट भरतात. पण सध्या आपल्या स्वतःच्या परिवाराचे पोट भरणे कठीण झाले आहे. बाबू यांचे वडील मच्छीमार नौकेवर तर त्याच्या दोन बहिणी छोट्या पगाराची नोकरी करून रामरगाडा चालवण्यास हातभार लावतात. त्यांच्या घरची स्थिती काही वेगळी नाही.
आज त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या घराला भेट दिली असता आगीच्या विकट खेळाची अनुभूती आली. गरिबीत संसार चालवत दोन वर्षांपूर्वी भाड्याने राहत असलेली ही घरे विकत घेतल्याची माहिती बाबू यांचे वडील लक्ष्मण यांनी यावेळी दिली. स्फोटानंतर जीवनात जणू अंधकार पसरलेला असून सध्या अन्नासाठी पैसे शिल्लक नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पुन्हा घरे उभारण्यासाठी सुमारे तीन लाख खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहन नाईक यांनी आपल्या गाड्यावर सामान आणण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच बॅंकेतून काढून घरात ठेवलेले तीस हजार रुपये, बायको व मुलीसाठी केलेले सुमारे दीड लाखाचे सोन्याचे दागिने तसेच घरातील इतर सामान या आगीत भस्मसात झाले आहे. इतकेच नव्हे तर एकवेळच्या जेवणाचे काय, हा प्रश्न आऽऽऽ वासून उभा राहिला आहे. कालच्या घटनेनंतर वाड्यावरील लोकांनी मोठ्या प्रमाणात मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला. पण आमचा संसार पुन्हा उभारण्यासाठी कोण मदत करणार, याबद्दल लक्ष्मण व मोहन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. दरम्यान, घटनेवेळी परिवारातील कोणताच सदस्य घरात नसल्याने देवानेच एकप्रकारे आम्हाला मोठ्या संकटातून वाचवले अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना आता त्यानेच आमचा संसार पुन्हा रुळावर आणण्यास मदत पाठवावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
सरकारने या दोन्ही परिवारांना तातडीने मदत करण्याची गरज आहेच, शिवाय सामाजिक कार्यात गुंतलेल्या दात्यांनी सढळहस्ते साह्य करणे तेवढेच आवश्यक आहे, तरच रुळावरून उतरलेली गाडी पुन्हा मार्गी लागणार आणि खवय्यांच्या जिभेवर गरमागरम भज्यांची चव रुळणार.

साडेचार लाखांचे अंमलीपदार्थ जप्त

म्हापसा, दि. २५ (प्रतिनिधी): राज्यातील अंमलीपदार्थांच्या व्यवहारावर अंकुश घालण्याचा विडाच जणू पोलिसांनी उचलला असून आज हणजूण व कोलवाळ भागातून म्हापसा व हणजूण पोलिसांनी सुमारे साडेचार लाख किमतीचे अंमलीपदार्थ जप्त केले. वागातोर येथून दोघा काश्मिरी युवकांकडून सुमारे १.२० लाखांचा तर कोलवाळ येथून एका नेपाळी महिलेकडून ३.५० लाखांचा चरस पोलिसांनी हस्तगत केला.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी वागातोर येथील हॉटेल हिलटॉपजवळ शंकर दास (२५) व मुश्ताक अहमद जब्बर (२२) हे जम्मू येथील युवक संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याजवळ सुमारे १.२ किलो चरस सापडला. याची किंमत स्थानिक बाजारात सुमारे १.२० लाख रुपये होते. हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, आज सकाळी एक महिला अंमलीपदार्थांसह गोव्याच्या दिशेने येत असून ती कोलवाळ परिसरात उतरणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. म्हापसा पोलिस स्थानकाचे उपअधीक्षक सॅमी तावारीस व निरीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस पथकाने सदर महिलेला बिनानी बसथांब्यावर संशयास्पदरीत्या फिरत असताना ताब्यात घेतले. जयमाया बुडा (४०) असे या नेपाळी महिलेचे नाव असून तिच्याजवळ सुमारे ३.२ किलो चरस सापडले आहे. तिच्याजवळ असलेल्या बॅगेत सुमारे ६० पिशव्यांमध्ये या अंमलीपदार्थांचा साठा ठेवण्यात आला होता. सदर महिलेला उद्या न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पोलिसांनी आज केलेल्या कारवाईत सुमारे साडेचार लाखांचा चरस जप्त केला आहे.

पोस्टमास्टर जनरलला लाच घेताना अटक

पणजी,दि. २५ (प्रतिनिधी): महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल मनजीतसिंग एस. बाली यांना दोन कोटी रुपयांची लाच घेताना मुंबई येथील "सीबीआय' ने रंगेहाथ पकडले आहे. "सीबीआय'च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाली यांना रात्री उशिरा ही लाच घेताना अटक केली. पोस्टाच्या जागेसंबंधी व्यवहारातून त्यांनी ही लाच मागितली होती. त्यासंदर्भात लाच देणाऱ्याने "सीबीआय'शी संपर्क केल्यानंतर "सीबीआय' ने बाली यांना सापळा रचून अटक केली. बाली यांच्या घरावरही "सीबीआय'ने छापा टाकून बेहिशेबी परकीय चलनही जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मीरा भाईंदर येथे दोन हजार चौरस मीटरच्या आरक्षित भूखंडावरील २५ टक्के जमिनीवर टपाल कार्यालय उभारण्यात येणार होते. या जमिनीचा विकास एक बिल्डर करत असून, ना हरकत दाखल्यासाठी त्याने बाली यांच्याशी माजी नगरसेविका रीता शहा यांच्यामार्फत संपर्क साधला. दाखल्यावर सही करण्यासाठी बाली यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती.
बाली याने बिल्डरची मध्यस्थ असलेल्या रीता शहा यांना बुधवारी संध्याकाळी कुलाबा भागातील एका आलिशान उपाहारगृहात पैसे घेऊन येण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात बिल्डरमार्फत रीता शहा यांनी "सीबीआय'शी संपर्क साधला आणि या संदर्भात तक्रार नोंदविली. "सीबीआय'च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून याच उपाहारगृहात बाली यांना अटक केली.
दरम्यान, बाली यांच्या घराची झडती घेतली असता, एका ब्रीफकेसमध्ये १०,७२२ डॉलर, ३,०५० ब्रिटिश पौंड, ३,४७० युरो मिळून एकूण ३४ लाख रुपये रोख सापडले. त्याशिवाय वेगवेगळ्या २२ बॅंकांमधील खात्यांसह पंचकुला, द्वारका, नवी दिल्ली, ग्वाल्हेर, भोपाळ आणि गुडगाव येथे कोट्यवधी रुपयांच्या मिळकती असल्याचे उघड झाले. ग्वाल्हेरच्या एका बॅंकेत लॉकर असल्याचे उघड झाले असून, ते उघडण्यासाठी काही अधिकारी रवाना झाले आहेत. शिवाय मुंबईतील घरात परदेशी बनावटीच्या ४५ मद्याच्या बाटल्या आणि पाच लाख रुपये किमतीचे ७ लॅपटॉपही सापडले आहेत. या प्रकरणी त्याचे साथीदार असलेले हर्ष आणि अरुण दालमिया यांनाही "सीबीआय' ने अटक केली आहे.
----------------------------------------------------------------
लाचलुचपत प्रकरणात महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे चीफ पोस्टमास्तर जनरल मनजीतसिंग एस. बाली यांचे गोव्यातही एक घर असल्याची माहिती मिळाली असून मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाचे एक पथक गोव्यात दाखल झाले आहे. या घराची झडती घेऊन अनेक महत्त्वाचे दस्तावेज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे, गोव्यात त्यांची किती मालमत्ता आहे, तसेच त्यांनी आपल्या अन्य कोणत्या नातेवाइकाच्या नावावर मालमत्ता ठेवली नाही ना, याचाही तपास लावला जात आहे.

Thursday 25 February, 2010

...आणि सारा गोवा 'सचिन'मय

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): "और इसी के साथही सचिन तेंदुलकरने वनडे क्रिकेटमें दोहरा शतक लगाया, वो तो सचमुच क्रिकेटका भगवान है,' असे उद्गार समालोचकांच्या तोंडून बाहेर पडताच सारा गोवा एका आगळ्या अनुभूतीने थरारला. पाठोपाठ सुरू झाली ती फटाक्यांची आतषबाजी. अनेकांनी शेजारील हलवायाच्या दुकानांतून मिठाई आणून उपस्थितांचे तोंड गोड केले. जणू स्वतःच द्विशतक झळकावल्याचा आनंद गोव्यातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या चेहऱ्यावर झळकत होता. ग्वाल्हेरमधील रूपसिंग स्टेडियममध्ये सचिनने शतक ठोकले तेव्हा तमाम गोवेकरांनी परस्परांना शुभेच्छा देऊन त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यानंतर सचिनने द्विशतकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली व राजधानी पणजीतील रस्ते सुनसान बनले. कधी काळी "रामायण' आणि "महाभारत' या लोकप्रिय मालिकांचे प्रसारण सुरू झाले की, असेच चित्र गोव्यात जागोजागी दिसत असे. त्याची बुधवारी प्रकर्षाने आठवण झाली. पणजीतील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या प्रत्येक शोरूमला आज जणू रसिकांनी गराडाच घातला होता. एवढेच नव्हे तर सरकारी कार्यालयातील उपस्थितीही नंतर रोडावत गेली. जेथे टीव्ही पाहण्याची सोय आहे तिकडे या मंडळींनी धाव घेतली. आपल्या कामांसाठी आलेल्या गोवेकरांनाही मग राहवले नाही. त्यांनीही या कर्मचाऱ्यांचाच कित्ता गिरवला. "पैरे पै सचिन बरे पेटयता' असे सहजच प्रत्येकजण आपल्या सहकाऱ्याला सांगत होता. सचिनच्या फटकेबाजीचा मनमुराद आस्वाद घेताना रसिकांचे चेहरे क्षणाक्षणाला फुलताना दिसत होते. हर्ष, उल्हास, चैतन्य, उन्मेष, उत्साह अशा भावनांच्या हिंदोळ्यावर स्वार झालेल्या रसिकांचे चेहरे "वाचणे' हाही आगळा अनुभव होता. बसमधून प्रवास करणारी मंडळी अरेरे आपल्याला सचिनची खेळी चुकली अशी खंत व्यक्त करताना दिसत होती. त्यांनी मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करून दुधाची तहान ताकावर भागवली. दुपारी भारताचा डाव सुरू झाला आणि सलामीवीर वीरेंद्र सेहवाग झटपट बाद झाला. त्यानंतर मात्र सचिनने रूपसिंग स्टेडियमवर मांड ठोकली आणि रसिकांच्या मनावरही. उत्तरोत्तर त्याची खेळी बहरत गेली. त्यामुळे बाजार, दुकाने, विविध आस्थापने, खाजगी आणि सरकारी कार्यालये, एवढेच नव्हे तर इस्पितळांतही सचिन हाच परवलीचा शब्द बनला होता. साहजिकच तमाम गोवेकरांसाठी हा "सचिनपुरस्कृत बंद' जेवढा अद्भुत तेवढाच अविस्मरणीय ठरला..!

पंचवाडीवासीयांची परवड

सुनावणी एक महिना पुढे ढकलली
अतिरिक्त पंचायत संचालकांच्या निर्णयावर नाराजी

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): पंचवाडीतील नियोजित खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असतानाही सत्ताधारी पंचायत मंडळाने अवैधरीत्या ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाला दिलेल्या आव्हानाची सुनावणी आज थेट एक महिना पुढे ढकलण्यात आली. अतिरिक्त पंचायत संचालकांच्या या एकतर्फी कृतीबाबत पंचवाडी बचाव समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पंचवाडी ग्रामपंचायतीतर्फे गेल्या ७ रोजी झालेल्या ग्रामसभेत नियोजित कोडली ते पंचवाडी खनिज रस्ता व बंदर प्रकल्पाला बहुसंख्य ग्रामस्थांचा विरोध असतानाही सत्ताधारी पंचायत मंडळाने अवैध पद्धतीने या प्रकल्पाला समर्थन करण्याचा ठराव संमत केला होता. या वादग्रस्त ठरावाला पंचवाडी बचाव समितीने आव्हान दिले होते. या आव्हान याचिकाप्रकरणी आज अतिरिक्त पंचायत संचालकांसमोर सुनावणी होती. यावेळी पंचवाडी बचाव समितीचे पदाधिकारी सुनावणीसाठी हजर राहिले असता पंचायतीतर्फे उपस्थित राहिलेल्या वकिलांनी पुढील तारीख मागितली व अतिरिक्त पंचायत संचालकांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून न घेता ही सुनावणी थेट १ एप्रिल पर्यंत पुढे ढकलली.
अतिरिक्त पंचायत संचालकांच्या या निर्णयामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांची मात्र बरीच निराशा झाली. राजकीय दबाव टाकूनच ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचा आरोपही समितीने केला. पंचवाडी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांची अशा प्रकारे सतावणूक करून त्यांचा विरोध मोडून काढण्याची स्वप्ने सरकारने पाहू नयेत. समिती व पंचवाडीतील जनता हा लढा कदापि सोडणार नाही, असे सांगून पंचवाडी गाव शाबूत राहिला तरच हे ग्रामस्थ राहतील, त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत हा लढा देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पंचवाडीच्या या लढ्यात आता थेट राजकीय हस्तक्षेप सुरू झाल्याने समितीच्या पदाधिकाऱ्यांची सरकारी खात्यांकडून अशीच परवड होणार आहे. त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा आता बदलणे भाग आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी लवकरच समितीची बैठक घेतली जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

डुडूच्या घरात अटकेच्या आदेशाची प्रत

पणजी, दि. २४ (प्रीतेश देसाई): इस्रायली ड्रग माफिया "डुडू' याच्या घराच्या घेतलेल्या झडतीत अंमलीपदार्थ विरोधी पथकाची गोपनीय कागदपत्रे सापडल्याने पोलिस मुख्यालयात खळबळ माजली आहे. दोन वर्षांपूर्वी "डुडू' याला अटक करण्यासाठी काढण्यात आलेल्या आदेशाची एक प्रत त्याच्याच घरी सापडली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "डुडू'ला अटक करण्यासाठी एक आदेश अंमलीपदार्थ विभागाकडे पाठवला होता. त्या आदेशाची फाईल अत्यंत गोपनीय होती, तसा शेराही त्याच्यावर मारण्यात आला होता. तरीही त्या आदेशाची एक प्रत "डुडू' याच्या हणजूण येथील बंगल्यात सापडल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहे. या प्रकारामुळे त्याचे पोलिस अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याचे आणि त्याला पोलिसांचे संरक्षण मिळत असल्याचे उघड झाले आहे. ही प्रत त्याला कोणी आणि कशी दिली, याची चौकशी पोलिस खात्याने सुरू केली आहे. हे गोपनीय दस्तावेज "डुडू'कडे सापडल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही पोलिस अधिकारी कचाट्यात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या दहा वर्षांत "डुडू' याला कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याने हात लावण्याचे धाडस केले नव्हते. उलट त्याला संरक्षण देऊन त्याच्याकडून लाखोंची "माया' जमवण्यात आल्याचेही तपासात उघड होत आहे. "डुडू' म्हणजे काही अधिकाऱ्याचे "एटीएम मशीन'च बनले होते. कधीही जा आणि लाखो रुपये उचलून घेऊन या. त्या सर्व अधिकाऱ्यांची नावे त्याने आता उघड करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे, एका डायरीसह काही बड्या व्यक्तींची नावे पोलिसांच्या हाती लागली आहेत. हे बडे उद्योजक त्याचे ग्राहक होते, अनेक वेळा ते "डुडू'कडून अंमलीपदार्थाची खरेदी करीत होते. मात्र, तो वापरत असलेला मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही, अशी माहिती पथकाचे अधीक्षक वेणू बंसल यांनी दिली.
तस्करीसाठी "कुरिअर'चा वापर?
"डुडू' हा अंमलीपदार्थाची तस्करी करण्यासाठी "कुरिअर' कंपनीचा वापर करीत असल्याची माहिती हाती आली आहे. त्याला कोठून "कुरिअर' येत होते आणि तो कुठे "कुरिअर' करीत होता याचा तपास लावला जात आहे. "डुडू' याची उझबेकिस्तान येथील प्रेयसी असून तिच्या नावेही त्याने अनेक वेळा कुरिअर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
"डुडू'ची करोडोंची मालमत्ता!
"डुडू' याची करोडो रुपयांची मालमत्ता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून याबाबत शोधाशोध करण्याचेही काम पोलिसांनी हाती घेतले आहे. मात्र ही मालमत्ता आपले मित्र, प्रेयसी तसेच अन्य व्यक्तींच्या नावे केली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. अंमलीपदार्थाच्या तस्करीत किंवा व्यवसायात गुंतलेल्या व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकताच त्या व्यक्तीची मालमत्ता आणि बॅंक खाती जप्त करण्याचे अधिकार पोलिसांनी देण्यात आले आहे. "एनडीपीएस' कायदा कलम ६८नुसार त्या व्यक्तीची मालमत्ता जप्त करता येते. या पूर्वी या कायद्याचा वापर केला जात नव्हता, असे श्री. बंसल यांनी सांगितले. याच कायद्याच्या आधारे "डुडू' याची सर्व मालमत्ता जप्त केली जाणार असल्याचे ते म्हणाले. तसेच, गेल्या महिन्यात अटक करण्यात आलेला सदानंद ऊर्फ भूमी चिमुलकर याची सावंतवाडी ते काणकोण पर्यंतची करोडो रुपयांची मालमत्ता आणि बॅंक खाती जप्त करण्यात आली असल्याचेही श्री. बंसल यांनी सांगितले. "भूमी' हा "डुडू' याच्याकडून अंमलीपदार्थ घेऊन व्यवसाय करीत होता, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, "डुडू'च्या कंपनीचा संचालक तथा बंगल्याचा खरा मालक सागर हाडेलकर याची आज चौकशी करण्यात आली असून त्याच्याकडून कोणतीही अधिक माहिती हाती लागलेली नाही. मात्र, "डुडूू' याच्या दोन कंपन्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. १९९८साली "प्युअर वाखोजा' नावाची कंपनी डुडू याने सुरू केली होती. त्यानंतर २००४साली "डुडू डिव्हीजन इंपोर्ट एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी सुरू केली होती. या कंपन्या केवळ डोळ्यांना पाणी लावण्यासाठी सुरू करण्यात आल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले.
-----------------------------------------------------------------
'आजपर्यंत अमली पदार्थ विरोधी पथकाचे नाव बदनाम होते. पोलिसांचे मनोबल वाढवल्यास कोणत्याही माफियाला सहज अटक करणे शक्य आहे'' असे मत आज अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक वेणू बंसल यांनी व्यक्त केले. "डुडू' याला पकडण्यासाठी तब्बल आठ महिने त्याच्या घरावर पाळत ठेवण्यात आली होती, असेही त्याने सांगितले. "डुडू' याच्या एकदम जवळ असलेल्या आणि पोलिसांच्या हालचालींची माहिती त्याच्यापर्यंत पोचवणाऱ्या "व्यक्तीं'चीच नकळत मदत या पथकाने घेतल्याने "डुडू' अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

प्रकाश थळी यांचे निधन

कोट्यवधींचा साहित्यिक
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): प्रसिद्ध गोमंतकीय नाट्यदिग्दर्शक, लेखक, श्रेष्ठ अनुवादक तथा आपल्या अनोख्या "कोट्या'च्या निर्मिती कलेमुळे सर्वत्र "कोट्यधीश' म्हणून परिचित असलेले प्रा. प्रकाश थळी यांचे आज दुपारी अल्प आजाराअंती निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते व त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. चोडण येथे त्यांच्या जन्मस्थळी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजर राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
गोमंतकीय साहित्यविश्वात आपल्या अमूल्य योगदानामुळे एक वेगळे स्थान प्राप्त केलेले प्रा. थळी यांचा जन्म १९४५ साली चोडण येथे झाला. लेखक, अनुवादक, कोशकार, संपादक अशा विविध भूमिका त्यांनी वठवल्या. कोकणी, मराठी व इंग्रजी भाषेवर त्यांची मक्तेदारी अतुलनीय अशीच होती. विशेष करून कोकणी व मराठी एकांकिका व नाट्यलेखनाद्वारे त्यांनी आपली एक वेगळीच छाप पाडली होती. नाट्यलेखनाबरोबर दिग्दर्शनाची जबाबदारीही तेवढ्याच ताकदीने सांभाळून त्यांनी गोव्यासह महाराष्ट्रातही अनेक पुरस्कार प्राप्त केले. मुंबई येथील पी. डी. लायन्स महाविद्यालय व मडगाव येथील दामोदर वाणिज्य महाविद्यालयात त्यांनी इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणूनही काही काळ काम केले. गोव्यातील एकमेव कोकणी दैनिक "सुनापरान्त'चे वृत्तसंपादक आणि सहसंपादक म्हणूनही त्यांनी काम केले. कोकणी कथांचे इंग्रजीत अनुवाद करून कोकणी साहित्याला एक वेगळी उंची प्राप्त करून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. डॉ. माधवी सरदेसाई व कवी संजीव वेरेकर (व्हिलेज इव्हिनिंग) या पुस्तकांचा त्यात समावेश होतो.
भारतीय संविधानाचा कोकणी भाषेतून अनुवाद करून त्यांनी गोव्याच्या राजभाषेला इतर प्रतिष्ठित भाषांच्या मांदियाळीत बसवले. यू. आर. अनंतमूर्ती यांची "संस्कार' ही कादंबरी त्यांनी कोकणीत अनुवादीत केल्याने त्यांना उत्कृष्ट अनुवादासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कारही प्राप्त झाला. "वासांनी जीव पिसो', "खतखतें', "टेंपोचा प्रवास' हे त्यांचे ललित साहित्य बरेच गाजले. "फुलां आनी फोगोट्यो' (निबंध आणि लेखसंग्रह), वेटींग फॉर घासलेट आणि इतर एकांकिका (मराठी), "पुलिस पुलिस मार पिल्लुक' (नाट्यरूपांतर ), अजिबपुरांतली कल्पकथा (नाट्यरूपांतर ), एक आसलो आबू (नाट्यरूपांतर), सगिना महतो (अनुवादीत नाटक) हयवदन (अनुवादीत नाटक), इंग्रजी - कोकणी शब्दकोश, तियात्राचो इतिहास (संशोधनात्मक पुस्तक), लक्ष्मणराव सरदेसाई (मोनोग्राफ), बाकीबाब बोरकर (मोनोग्राफी), क्रांतीसंगीत (संकलन), बंकीमचंद्र (चरित्र), लक्ष्मणराव सरदेसाई (साहित्य अकादमी, इंग्रजी), भारतरत्न (मान्यवरांची बालचरीत्रे) आदींचा समावेश आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सरोजिनी, पुत्र पृथ्वीराज, कन्या ऍड. आकाश असा परिवार आहे. ऍड. सुहास थळी, राज्यपुरस्कार प्राप्त मधुसुदन थळी, सुरेश थळी, श्रीपाद थळी यांचे ते बंधू होत. नाट्यकलाकार अजित केरकर हे त्यांचे मेहुणे तर आकाशवाणीचे निवेदक मुकेश थळी हे त्यांचे पुतणे होत.
आज संध्याकाळी चोडण येथे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहिलेल्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी विष्णू वाघ, दामोदर मावजो, अमृत कासार, श्रीधर कामत बांबोळकर, प्रेमानंद म्हांबरे, धर्मा चोडणकर, शंभू भाऊ बांदेकर उपस्थित होते.

गेल्या दोन वर्षांपासून चीनची घुसखोरी कायम

केंद्र सरकारची अखेर कबुली
नवी दिल्ली, दि.२४ : भारतीय सीमेत चीनची घुसखोरी नसून त्याविषयी चिंता करण्याचे कारण नाही, असे वारंवार सांगणाऱ्या केंद्र सरकारने, चीन गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे भारतात घुसखोरी करीत असल्याची कबुली दिली आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून चीन सातत्याने भारताच्या सीमा क्षेत्रात घुसखोरी करीत असल्याचे लक्षात आले आहे. लडाख, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या सीमा क्षेत्रातून चीन वेगवेगळ्या प्रकारने घुसखोरी करीत आहे. कधी आपली निगराणीची वाहने सोडून, कधी बोटींच्या माध्यमातून तर कधी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चीनने भारतीय हद्दीत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, त्यातील बहुतांश वेळा सीमारेषेविषयी ज्ञान नसल्याने वाहने शिरल्याचे लक्षात आले आहे.
चीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारताने सीमेवर एखादी भिंत किंवा कुंपण उभारले आहे का, असे विचारले असता मंत्र्यांनी नकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले की, चीनलगत असणारे भारतीय सीमाक्षेत्र हे बहुतांश पर्वतीय आहेत. त्यामुळे तेथे भिंत किंवा कुंपण उभारणे शक्य नाही.

मास्टरचा द्विशतकी ब्लास्ट

ग्वाल्हेर, दि. २४ : जागतिक क्रिकेट आणि विक्रम यामधील दुवा असलेल्या सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून सर्वोच्च धावसंख्येचे आणखी एक क्षितिज निर्माण केले. क्रिकेटच्या देवतेने आज ग्वाल्हेरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धावांची बरसात करत देशातील क्रीडाशौकिनांना चिंब भिजवतानाच पाकिस्तानच्या सईद अन्वरचा आणि झिंबाब्वेच्या चार्ल्स कॉंवेंट्रीचा १९४ धावांचा विक्रम लीलया मागे टाकला. एकदिवसीय सामन्यातील अस्पर्श्य असणारा दोनशे धावांचा टप्पा क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सचिनने गाठला. डॉन ब्रॅडमन यांचा आदर्श आयुष्यभर डोळ्यापुढे ठेवणाऱ्या सचिनने १४७ चेंडूत २५ खणखणीत चौकार आणि तीन उत्तुंग षटकाराच्या हा टप्पा पार केला. तत्पूर्वी सचिनने आपले ४६ वे शतक ९० चेंडूत १४ चौकारांच्या साहाय्याने शतक पूर्ण केले. त्यानंतरच्या शंभर धावा त्याने ५७ चेंडूत काढल्या.
गेली २० वर्षे निरंतर साथ देणाऱ्या तमाम भारतीय क्रिकेट शौकिनांना हे शतक अर्पण करत असल्याचे भावोद्गार देशवासीयांचा चाहता असलेल्या सचिन तेंडुलकरने काढले. सचिनच्या या अनोख्या कामगिरीची दखल घेत ग्वाल्हेरच्या कॅप्टन रुपसिंग स्टेडियमच्या एका स्टॅंडला सचिनचे नाव देण्याचा निर्णय या सामन्यानंतर घेण्यात आला.

एकदिवसीय सामन्यातील
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

सचिन तेंडुलकर (२००)
चार्ल्स कॉंवेंट्री (१९४)
सईद अन्वर (१९४)
व्हीव्ह रिचडर्‌स (१८९)
सनथ जयसूर्या (१८९)
गॅरी कर्स्टन (१८८)
सचिन तेंडुलकर (१८६)
एम. एस. धोनी (१८३)
सौरव गांगुली (१८३)
मॅथ्यू हेडन (१८१)

'सासाय-श्रीदामबाब भक्तीसार' चे प्रकाशन

मडगाव, दि. २४ (प्रतिनिधी): बुयांव थिएटर्स गोंय यांनी तयार केलेल्या "सासाय- श्रीदामबाब भक्तीसार' या श्रीदामोदरावरील कोकणी भक्तिगीतांच्या सीडीचे प्रकाशन आज मडगाव येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांच्या हस्ते झाले.
गोवा वूडलॅंडस हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष भाई नायक, गायक नंदन हेगडे देसाई, श्रीधर कामत, साईश पाणंदीकर, संदेश हेगडे देसाई, यतीन तळावलीकर उपस्थित होते. या सीडीतील गाणी स्वप्निल बांदोडकर व नंदन हेगडे देसाई यांच्या आवाजातील आहेत.
सीडीचे प्रकाशन केल्यानंतर बोलताना आमदार दामू नाईक यांनी गोमंतकीय संस्कृतीवर आधारित ही १२ वी सीडी काढण्याच्या बुयांव थिएटर्सच्या उपक्रमाचे कौतुक केले व गोव्याचे वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी अशाच प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले. भक्ती ही डोळ्यांना दिसत नसते, त्यासाठी ती शब्दबद्ध करून व गाण्यांच्या रूपांतून साकार करण्याचा प्रयत्न पूर्णतः यशस्वी झाल्याचे सांगून गोव्याच्या ढासळत चाललेल्या प्रतिमेकडे त्यांनी लक्ष वेधले व अशा वेळी गोव्याची परंपरा सांभाळण्याचा प्रयत्न होणे ही मोठी गोष्ट असून विविध देवतांवरील गाणी संग्रहित करून ती सीडीच्या रूपात आणण्याचा प्रयत्न होण्याची गरज त्यांनी प्रतिपादिली.
भाई नायक यांनीही बुयांव यांना शुभेच्छा दिल्या व दामबाबाच्या शिमग्यावरच एक सीडी काढावी व आगामी शिमग्यापूर्वी ती प्रकाशित व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी मठग्रामस्थ हिंदू सभा आवश्यक ती सर्व मदत करेल असेही ते म्हणाले.
प्रथम सीडीचे निर्माते सिद्धनाथ बुयांव यांनी स्वागत केले व या सीडीची कल्पना कशी पुढे आली ते त्यांनी सविस्तरपणे सांगितले. ही सीडी सर्वसामान्यांनाही उपलब्ध व्हावी यासाठी ती माफक दरात (रु. ५०) उपलब्ध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन अनंत अग्नी यांनी केले तर नंदन हेगडे देसाई यांनी आभार मानले. सिद्धनाथ बुयांव यांनी आपल्या "व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' या सीडी विक्रीतून मिळालेला रु. ५० हजारांचा नफा आपल्या घोषणेप्रमाणे काणकोण पूरग्रस्त निधीस दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Wednesday 24 February, 2010

थातोडी खाणीतून हजारो टन खनिजाची तस्करी

वन खात्याकडून कारवाईचे नाटक
यंत्रसामग्री आणि ट्रक ताब्यात

पणजी, २३ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या राजवटीत राज्यामध्ये बेदरकार खाण व्यवसायाने सध्या बेसुमारीचा उच्चांक गाठला असतानाच अनेक ठिकाणी चक्क सरकारच्याच आशीर्वादाने चालणाऱ्या बेकायदा खाणींची एकाहून एक प्रकरणे आता उघड होऊ लागली आहेत. थातोडी - धारबांदोडा येथे अशाच एका मोठ्या बेकायदा खाणीतून गेल्या काही महिन्यांत हजारो टन हायग्रेड खनिज राजरोस काढले गेल्याची घटना नुकतीच उजेडात आली आहे. त्यानंतर सदर खाणीला टाळे ठोकण्यात आले असले तरी खाण आणि वन खात्याच्या आशीर्वादानेच चालणाऱ्या या खाणीवर सर्वोच्च न्यायालयाच्या बडग्याच्या भीतीपोटीच हे कारवाईचे नाटक रचले जात असल्याचे समजते.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, सदर कंपनीच्या दोन खाणी थातोडी परिसरात चालतात. त्यांपैकी एक खाण धारबांदोडा - मोले हमरस्त्याला लागून आहे; तर दुसरी आतील भागात आहे. त्यातील सील ठोकलेल्या या दुसऱ्या खाणीला जोडून राखीव वनक्षेत्र असून माल उत्खनन करता करता कंपनीने चक्क एक किलोमीटर भागातील वनक्षेत्रात घुसून मोठ्या प्रमाणात झाडांची आणि परिसराची नासधूस केली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी इतक्या खोलवर जाऊन उत्खनन करण्यात आले आहे की खोलाई पाण्याच्या पातळीपर्यंत आत गेली आहे. आतील काळाकभिन्न हायग्रेड खनिज मालावर हात मारताना खाण कंपनीने कोणत्याही प्रकारचे विधिसंकेत पाळलेले नाहीत. खोदाईचा आकार, व्याप्ती आणि खोली पाहिली तर काही हजार टन माल या जागेतून काढला गेला आहे हे घटनास्थळी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पाहणीवरून आणि घेतलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट होते.
आश्चर्याची आणि चीड आणणारी गोष्ट म्हणजे, तेथील बेकायदा खनिज उत्खनन गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होते. शेकडो ट्रक आणि अवाढव्य यंत्रे लावून माल काढला जात होता. वनाची, झाडांची कत्तल केली जात होती; परंतु स्वतः वन खाते अथवा खाण खात्याने ते रोखण्याचा प्रयत्न केला नाही. सगळे काही कायदेशीर चालले आहे अशा थाटात गोष्टी सुरू होत्या. मात्र, चार-पाच दिवसांपूर्वी अचानकपणे "वरून' सूत्रे हालली आणि सदर खाणीवर कारवाई करण्याचे आदेश निघाले. ते करण्यापूर्वी खाण आणि वन खात्याच्या काही अधिकाऱ्यांनी "खाल्ल्या मिठाला' जागून संबंधित खाण कंपनीला सतर्कही केले. सावध होण्याचा इशारा मिळतात एका झटक्यात ट्रक, मशीनरी आणि काम करणाऱ्या सर्वांना सदर परिसर मोकळा करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. पणजी, फोंडा येथून वन अधिकारी पोहोचण्यापूर्वीच जवळपास सगळा परिसरच रिकामा करण्यात आला होता. मात्र शेवटी दहा चाकांचे दोन मोठे ट्रक आणि दोन यंत्रे आत अडकली. खाण खात्याने ती ताब्यात घेतली. त्यांपैकी मोडलेले एक यंत्र अजूनही आतील भागात सील ठोकलेल्या अवस्थेत आहे. दुसरेही त्याच परिसरात आहे. तसेच ते दोन महाकाय ट्रक मात्र वन खात्याच्या धारबांदोडा येथील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आले आहेत. हे प्रकरण मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचालीही सुरू असल्याचे समजते.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या इतक्या बेकायदा आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडलेल्या असतानाही वन किंवा खाण खात्याने अद्याप कोणाविरुद्धही गुन्हा नोंदवला नाही की कोणालाही अटक केलेली नसल्याचे समजते. ज्याप्रमाणे आंबेली - सत्तरी येथे एका वरिष्ठ राजकारण्याने शेकडो ट्रक खनिज मालाची तस्करी करून काहीच घडले नाही अशा थाटात हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालविला आहे; त्याच प्रकारे हे प्रकरणही दडपून टाकले जाण्याची दाट शक्यता आहे. धारबांदोडा, थातोडी, मोले, कुळे या भागांमध्ये सध्या सील ठोकण्यात आलेल्या या खाणीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. वन खाते किंवा सरकारचे खाण खाते या संदर्भात नेमकी कोणती कारवाई करते याकडे अनेकांचे लक्ष सध्या लागून राहिले आहे.

हा निव्वळ "मूर्खपणा'!

केंद्रीय मंत्रालयाच्या निर्णयावर मनोहर पर्रीकर यांचा टोला
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांच्या गोव्यात नव्या खाण परवान्यांना स्थगिती देण्याच्या निर्णयाबाबत त्यांच्या प्रामाणिकपणाची आपण कदर करतो, पण राज्यातील बेकायदा खाणींचा उच्छाद व पर्यावरणाची दयनीय अवस्था पाहिल्यास हा निर्णय म्हणजे निव्वळ "मूर्खपणा'च आहे, असा टोला विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी लगावला.
केंद्रीय मंत्रालयाच्या निर्णयाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पर्रीकर यांनी खाण व्यवसायाबाबत राज्य सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. जयराम रमेश यांनी नव्या परवान्यांवर बंदी घातली खरी पण गेल्या दोन वर्षांत पर्यावरण दाखले देण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे त्याचे काय, असा खडा सवाल पर्रीकर यांनी केला. हा परवाना देण्यासाठी एक टोळीच कार्यरत होती व त्यांनी खाण सुरू करण्याची जागा कोणाच्या नावावर आहे, याबद्दल शहानिशा न करता परवाने दिलेले आहेत, असेही ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांतील खाण परवान्यांची चौकशी केल्यास आपण पुरावे देण्यास तयार आहोत, असे आव्हानही पर्रीकर यांनी दिले.
गेल्या काही अधिवेशन काळात आपण अशी अनेक प्रकरणे उघडकीस आणली. सरकारकडून केवळ अल्पकालीन अधिवेशन ठेवून आपली कात वाचवण्याचे प्रयत्न केला जातो, त्यामुळे सविस्तरपणे हे विषय सभागृहासमोर ठेवणे शक्य होत नाही. केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी हा निर्णय घेण्यामागे त्यांच्या मनातील प्रामाणिक हेतू समजू शकतो; पण मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मात्र केंद्रीय मंत्रालयाला गृहीत धरले, अशी टीकाही पर्रीकर यांनी केली. खाण धोरण निश्चित होईपर्यंत परवाने नाहीत हे ठीक पण मुळात खाण धोरण हेच जर बेकायदा खाण व्यवसाय करणाऱ्यांचे हित जपणारे असेल तर त्याचा काय उपयोग, असा टोलाही पर्रीकर यांनी हाणला. या खाण धोरणात खाणग्रस्त लोकांच्या प्रश्नांची उत्तरे असायला हवीत. पायाभूत सुविधा, पर्यावरणाचे रक्षण, भूजलाचे भीषण संकट आदींबाबतही या धोरणात स्पष्टीकरण हवे, असेही पर्रीकर म्हणाले. खाणींबाबत राज्य सरकारने श्वेतपत्रिकाच जाहीर करावी, अशी मागणीही पर्रीकर यांनी केली.
गेल्या २००५ सालापासून खनिजाला तेजी आली व गेल्या पाच वर्षांत हा व्यवसाय दुप्पट वाढला. पण या पाच वर्षांत साधनसुविधा मात्र काहीच उभारण्यात आल्या नाहीत, यावरून काय भीषण परिस्थिती उद्भवली आहे याची जाणीव होते. बेकायदा खाण व्यवसायात गुंतलेल्यांत राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. या लोकांनी समाजात फूट घातली आहे व पैशांचे आमिष दाखवून घराघरांत भांडणे लावून दिली आहेत. जयराम रमेश यांनी आपल्या मंत्रालयातर्फे गेल्या दोन वर्षांत दिलेल्या परवान्यांची चौकशी केली तर हा सगळा गैरव्यवहार उघड होईल, असेही पर्रीकर म्हणाले.

पर्वरी अपघातात २ विद्यार्थिनी ठार

म्हापसा, दि. २३ (प्रतिनिधी): काल रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पर्वरी येथे पेट्रोलपंपच्या ठिकाणी बस आणि दुचाकीत झालेल्या अपघातात हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयात (आयएचएम) शिक्षण घेणाऱ्या मुंबई येथील दोन तरुणी जागीच ठार झाल्यात तर, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. तन्वी संतोष साळकर (२१) व हेतल ललित ठक्कर (२१) या मूळ मुंबई येथील तरुणींचे निधन झाले. तर, जखमी प्रकाश झिंटा (२२) याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज सायंकाळी दोन्ही मृतदेह शवचिकित्सेनंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघाताला कारणीभूत ठरलेला बसचालक पोलिकुरपो फर्नांडिस (५४) याच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेनंतर पुन्हा एकदा पर्वरी येथील व्यावसायिक महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रात्रीअपरात्री फिरण्याचा प्रकार ऐरणीवर आला आहे. बाहेरील राज्यातून आलेला विद्यार्थिवर्ग मोठ्या संख्येने पर्वरी भागात पेईंग गेस्ट म्हणून राहत आहे. यातील काही तरुण तरुणींचा गट रात्री अपरात्री भरधाव वेगाने दुचाक्या घेऊन फिरत असल्याच्या अनेक तक्रारी पर्वरी पोलिस स्थानकात येतात. या प्रकारावर महाविद्यालयाच्या प्रशासनाने अंकुश आणण्याची मागणी पोलिसांतर्फे केली जात आहे.
अधिक माहितीनुसार तन्वी आणि हेतल या दोघी पर्वरी येथे "आयएचएम'मध्ये शिक्षण घेत होत्या व पीडीए कॉलनीत पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या. काल रात्री त्या प्रकाश याच्याबरोबर पार्टीला गेल्या होती, अशी माहिती मिळाली आहे. रात्री सुमारे १ च्या दरम्यान प्रकाश झिंटा एमएच ०१ एके ४६८५ या दुचाकीवरून दोघींना सोडण्यासाठी पीडीए कॉलनीत जात होता. यावेळी पेट्रोलपंपच्या ठिकाणी रस्ता ओलांडत असताना म्हापशाहून पणजीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या जीए ०१ टी ४२८५ या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तिघेही रस्त्यावर फेकले गेले. याची माहिती मिळताच पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना इस्पितळात हालवले. मात्र दोघी तरुण मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी सदर बस ताब्यात घेतली असून बसच्या चालकालाही अटक केली आहे. याविषयीचा अधिक तपास पर्वरी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक सगुण सावंत करीत आहेत.

गुंड आश्पाक बेंग्रेसह १० जणांवर आरोपपत्र

बिच्चू हल्लाप्रकरण
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): सुपारी देऊन गुंड "बिच्चू' याच्यावर जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर प्राणघातक हल्ला घडवून आणलेला कुविख्यात गुंड आश्पाक बेंग्रे आणि अन्य नऊ जणांविरुद्ध आज न्यायालयात पणजी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले. भा.दं.सं. ३०७, ३२४, १२०(ब) व शस्त्र कायदा ४ व ५ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद करून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दि. २६ नोव्हेंबर २००९ रोजी भर दुपारी जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर तलवार आणि चॉपरने बिच्चू याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांनी हल्ला चढवला होता. यात बिच्चू आणि त्याचा अन्य एक साथीदार गंभीर जखमी झाले होते. हा हल्ला झाला न्यायालयीन तुरुंगात असलेला आश्पाक बेंग्रे याने पन्नास हजार रुपये देण्याच्या करारावर हल्ला घडवून आणल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. प्रत्यक्ष हल्ला झाला त्यावेळी या हल्ल्याची सुपारी देणारा बेंग्रे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर उभा होता.
या घटनेनंतर पणजी पोलिसांनी चोवीस तासात हल्ला करणाऱ्या टोळीला गडाआड केले होते. यात फ्रान्सिस डायस, रमेश दळवी, मोहमद रेहमान, संजय लिंगुडकर, प्रवीण भातखंडे, नदीम खान, श्याम नाईक, सुलेमान किंडवर व ज्योकिम रिबेलो या सर्वांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला करण्यासाठी या सर्वांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून सध्या हे सर्व संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत.

मुख्यमंत्री म्हणतात, माय नेम इज 'खाण'!

भाजयुमो उत्तर गोवा उपाध्यक्ष
रुपेश हळर्णकर यांची टीका

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील कॉंग्रेस आघाडीचे नेते शाहरूख खानच्या "माय नेम इज खान' चित्रपटाला सुरक्षा देण्यात गर्क आहेत तर इकडे बेकायदा खाणींना संरक्षण देता देता स्वतः "खाण सम्राट' बनलेले कॉंग्रेस नेते "माय नेम इज खाण' अशा आविर्भावातच वावरत आहेत, अशी खरमरीत टीका भाजप युवा मोर्चाचे उत्तर गोवा उपाध्यक्ष रुपेश हळर्णकर यांनी केली.
युवक कॉंग्रेस उत्तर गोवा समितीच्या अध्यक्षपदी जितेश कामत यांची नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली. याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. हळर्णकर म्हणाले की, गोवा राज्यातील डळमळीत राज्यकारभार पाहता इथे कामत, लवंदे, कामत कंपनीशिवाय पर्यायच राहिला नाही की काय, असा संशय येतो आहे. देशात ज्या प्रकारे गांधी, गांधी, आणि गांधी नामाचा जप सुरू आहे तसेच गोव्यात कामत, लवंदे, कामत... या शिवाय कॉंग्रेसला काहीच दिसत नाही. सगळीकडेच कामत, लवंदे, कामत यांची दादागिरी दिसून येते, असेही ते म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री बनल्यापासून कामत यांची जी घुसमट सुरू आहे ती अजूनही तशीच कायम आहे. अनेकदा त्यांचे आसन डळमळीत करण्याचा प्रयत्न त्यांच्याच सहकाऱ्यांकडून झाला. राज्यात महागाई, बेरोजगारी, दहशतवाद, बलात्कार, खून, दरोड्यांचे प्रकार वाढतच आहेत पण कामत यांना त्याचे काहीच पडून गेलेले नाही. ते फक्त आपली खुर्चीच सांभाळण्यातच व्यस्त असतात, असे ते म्हणाले.
आपली खुर्ची वाचवण्यासाठी त्यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील काही नेत्यांना खाण व्यवसायाची चटक लावली आहे. कामत यांच्या कृपाशीर्वादानेच राज्यात "मधू कोडां' ची संख्या वाढत चालली आहे. सरकारातील मंत्र्यांनी आपलेच सगे- सोयरे व इष्ट आप्तेष्टांच्या नावावर खाणींना बेलाशक परवाने देण्याचा सपाटा लावला आहे. कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी चित्रपटांच्या नावावर टीका करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांवर आधारित ""माय नेम इज "खाण' '' असा चित्रपट काढण्याचा सल्ला रुपेश हळर्णकर यांनी दिला आहे.
राज्यातील बेकायदेशीर खाण उद्योगांच्या विरोधात वेळोवेळी स्थानिकांनी आवाज उठविला. परंतु, त्यांची कामत यांनी कधीच पर्वा केली नाही, याची दखल म्हणून गोवा सरकार जोपर्यंत खाण धोरण तयार करत नाही तोपर्यंत गोव्यातील खाणींना पर्यावरणीय परवाना दिला जाणार नाही, असे केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील महागाईच्या तीव्र झळांमुळे आम आदमीची होरपळ होत असताना महागाई आटोक्यात आणण्यात कामत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. म्हणून या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून दिगंबर कामत यांनी राजीनामा द्यावा व गोव्यात आम आदमींना कामत, लवंदे व कामत कंपनीकडून मुक्त करावे, असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रुपेश हळर्णकर यांनी केले आहे.

वेर्णा अपघातात युवक जळून ठार

वास्को, दि. २३ (प्रतिनिधी): वेर्णा बगलमार्गाजवळ मडगावहून पणजीच्या दिशेने येत असलेल्या "ट्रेलर'ला दुचाकीस्वाराने मागून जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीला आग लागून दुचाकीस्वार पीटर लोबो याचा जळून मृत्यू झाला. काल रात्री झालेल्या या भीषण अपघाताचे दृश्य पाहून येथून ये - जा करणाऱ्या वाहनचालकांबरोबरच पोलिसांच्याही अंगावर काटे उभे राहिले होते.
काल दि. २२ रोजी रात्री १२.१५ च्या सुमारास सदर अपघात घडला. इंग्रजीवाडो, केळशी येथील पीटर लोबो हा ३१ वर्षीय युवक आपल्या "हंक' दुचाकीवरून (जीए ०८ एच ९३७०) वेर्णा येथील बायपास जंक्शन समोर पोचला असता त्याची धडक पुढे जात असलेल्या ट्रेलरला (एपी १६ टीटी ३२१३) बसली. सदर अपघात एवढा भीषण होता की दुचाकीने पेट घेतला. अपघातात फसलेल्या पीटरला आगीने कवटाळल्याने त्याचे जागीच निधन झाले. वेर्णा पोलिसांना सदर अपघाताची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटना स्थळावर दाखल होऊन सदर अपघाताचा पंचनामा केला.
हा अपघात एकदम भयावह दृश्य निर्माण करणारा होता. अपघातानंतर दुचाकीला आग कशा प्रकारे लागली याबाबत स्पष्टीकरण झालेले नाही. पीटरचा मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवण्यात आल्याची माहिती वेणा पोलिसांनी दिली आहे. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक राजन प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुशांत गावस पुढील तपास करीत आहेत.

'केनिलवर्थ' धुराच्या विळख्यात

स्फोटामुळे ५० लाखांचे नुकसान
मडगाव, दि. २३ (प्रतिनिधी): उतोर्डा येथील केनिलवर्थ या तारांकित हॉटेलमध्ये काल मध्यरात्री मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणेत स्फोट होऊन संपूर्ण हॉटेलच धुराच्या विळख्यांत सापडल्याने मोठा हलकल्लोळ माजला. या घटनेत कोणीही जखमी झालेले नसले तरी हॉटेलात उतरलेल्या पर्यटकांना हालवावे लागले तसेच हॉटेलचे साधारण ५० लाखांचे नुकसान झाले.
मडगाव अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री बारा वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. दलाच्या दोन गाड्या उतोर्डाकडे रवाना झाल्या; मात्र तेथे आग लागलेली नसल्याने त्याचा उपयोग झाला नाही. हॉटेलच्या तळघरात मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणेत स्फोट झाल्याने यंत्रणेच्या वाहिन्यांतून क्षणभरातच संपूर्ण हॉटेलात धूर पसरला व घबराट माजली.
यावेळी बहुतेक पर्यटक जेवणासाठी मोकळ्या जागी गेल्याने बचावले पण नंतर काही खोल्यांत असलेल्या लोकांना हालवावे लागले. आत कोणी अडकलेले नाही याची खातरजमा करून अग्निशामक दल परतले. वेर्णा पोलिसांशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांना त्याची काहीच माहिती नसल्याचे आढळून आले, त्याची नोंदही तेथे झालेली नाही.
हॉटेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सदर यंत्रणेत स्फोट कसा झाला त्याचा शोध घेतला जात आहे. पण, त्या यंत्रणेच्या वाहिनीतून धूर संपूर्ण हॉटेलात पसरल्याने प्रत्येक खोलीतील भिंती काळवंडल्या आहेत. सदर यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून एकूण आकडा ५० लाखांच्या आसपास असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महागाईच्या मुद्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ

विरोधक आक्रमक कामकाज तहकूब
नवी दिल्ली, दि. २३ : दिवसेंदिवस महागाई भडकतच असून त्यात जनता पोळून निघत आहे. महागाईच्या मुद्यावरून आज अंदाजपत्रकीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसदेत विरोधक अतिशय आक्रमक झाल्यामुळे प्रचंड गदारोळ उडाला. विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अखेर दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करावे लागले.
महागाईच्या मुद्यावर कोणत्या नियमाअंतर्गत चर्चा व्हावी यावरून विरोधक व सत्ताधारी यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने अंदाजपत्रकीय अधिवेशनाचा आजचा दिवस गोंधळाने गाजला. लोकसभा व राज्यसभेचे कामकाज प्रारंभी एक वेळा स्थगित करण्यात आले. दुसऱ्यांदा दोन्ही सभागृहांचे कामकाज पुकारण्यात आल्यानंतर तेव्हाही गोंधळ कमी होण्याऐवजी वाढलेला पाहून दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले.
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष व सरकारला बाहेरून समर्थन देणाऱ्या काही पक्षांनी मतविभाजनाअंतर्गत चर्चा व्हावी, अशी मागणी केली. परंतु ही मागणी सरकारने फेटाळून लावली. मागणी फेटाळून लावण्यात आल्याने विरोधक संतप्त झाले. या गोंधळातच सभागृहाच्या पटलावर काही आवश्यक कामकाजाची कागदपत्रे मांडण्याशिवाय कोणतेही कामकाज झाले नाही.
आज सकाळी लोकसभेच्या कामकाजास प्रारंभ झाल्यानंतर औपचारिक कार्यवाही झाल्यानंतर लगेचच विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी महागाईचा मुद्दा उपस्थित करत यावर स्थगन प्रस्तावाअंतर्गत चर्चा व्हावी अशी मागणी केली. महागाईच्या मुद्यावर याआधीही विविध नियमाअंतर्गत चर्चा झालेली आहे, परंतु सरकारने या विषयावर गांभीर्य दाखविलेले नाही. सबब आता आम्हाला या विषयावर कामकाज स्थगन प्रस्तावाअंतर्गत चर्चा हवी आहे, असे सुषमा स्वराज यांनी म्हटले.
समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनीही सुषमा स्वराज यांच्या म्हणण्याला दुजोरा देत सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. यावर संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बंसल यांनी म्हटले की, महागाईच्या मुद्यावर गेल्या सहा वर्षांत संसदेत चर्चा होत आली आहे, हे खुद्द विरोधी पक्षाच्या नेत्यांनीच मान्य केले आहे. हा काही नवीन विषय नाही, त्यामुळे कामकाज स्थगितीअंतर्गत या विषयावर चर्चा होऊ शकत नाही, असे बंसल यांनी म्हटले. नियम-५८(२) व ५८(३)नुसारच ताज्या विषयांवर कामकाज स्थगिती अंतर्गत चर्चा होऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संसदीय कामकाज मंत्र्यांनी असे उत्तर देताच सरकारला बाहेरून समर्थन देणाऱ्या पक्षांसह संपूर्ण विरोधी पक्षाचे सदस्य लोकसभा सभापतींच्या आसनासमोर एकत्र झाले व घोषणा देऊ लागले. वारंवार सांगूनही सदस्य आपल्या स्थानी जात नाही तसेच शांत होत नाहीत, असे पाहून सभापती मीराकुमार यांनी सभागृहाचे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केले.
१२ वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री बंसल म्हणाले, महागाई असा मुद्दा आहे की ज्याला केवळ केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारेही जबाबदार आहेत. जे विषय केवळ केंद्र सरकारच्याच अधिकारात येतात त्याच विषयांवर कामकाज स्थगिती प्रस्तावाअंतर्गत चर्चा होऊ शकते. त्यामुळे इतर कोणत्या नियमाअंतर्गत महागाईच्या मुद्यावर चर्चा करण्यास सरकार तयार आहे.
बंसल यांच्या उत्तरानंतरही विरोधी बाकांवरील सदस्य संतुष्ट झाले नाहीत ते आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने गोंधळ जारीच राहिला. अखेर सव्वाबाराच्या सुमारास सभापती मीराकुमार यांनी सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब केले.
राज्यसभाही तहकूब
लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही असेच चित्र होते. आज सकाळी ११ वाजता राज्यसभेचे कामकाज सुरू होताच महागाईच्या मुद्यावर विरोधकांनी गोंधळ सुरू केला. राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी पाच मिनिटे वाट पाहून गोंधळ कमी होत नाही, असे लक्षात आल्यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले. १२ वाजता सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच रालोआ, माकपा, सपा व बसपाच्या सदस्यांनी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून मतविभाजनाची तरतूद असलेल्या नियम १६७ अंतर्गत महागाईच्या मुद्यावर चर्चा घेतली जावी, अशी मागणी केली, तर सत्ताधारी बाकावरून या मागणीला विरोध करण्यात आला.
आज देशातील जनता महागाईने भरडून निघत आहे, असे सांगून विरोधी पक्षनेते अरुण जेटली पुढे म्हणाले, आज आम्ही अध्यक्षांना दोन नोटिसा दिल्या आहेत. महागाईवरील चर्चेसाठी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्यात यावा असे पहिल्या नोटिशीत म्हटले आहे, तर दुसरी नोटीस ही नियम १६७ अंतर्गत महागाईवर चर्चा करण्यासाठीची आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महागाईने आज सर्वच जण त्रस्त आहेत, असे म्हणत माकपा नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले की, नियम १६७ अंतर्गत यावर चर्चा व्हावी. दुपारी बारानंतर राज्यसभेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच विरोधी बाकांवरील सदस्य उभे झाले व नियम १६७ अंतर्गत महागाईच्या मुद्यावर चर्चा व्हावी अशी मागणी लावली. भाजपचे अनेक सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येऊन १६७ अंतर्गत महागाईच्या मुद्यावर चर्चा व्हावी यासाठी मागणी करू लागले.
विरोधकांचा हा गोंधळ सुरू असतानाच उपाध्यक्ष रहमान खान यांनी आवश्यक कागदपत्रे सभागृहाच्या टेबलावर ठेवली. यानंतर त्यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार महागाईच्या मुद्यावर अल्पकालीन चर्चा करण्यास संमती देण्यात आलेली आहे, याकडे रहमान यांनी सदस्यांचे लक्ष वेधले. विरोधी सदस्यांनी दिलेल्या नोटिशीला अनुरूप ही संमती देण्यात आलेली आहे. त्यामुळे सदस्यांनी गोंधळ न घालता अल्पकालीन चर्चेअंतर्गत हा मुद्दा उपस्थित करावा, असे म्हटले.
याउपरही सभागृहात विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने व कामकाज चालविणे अशक्य आहे हे लक्षात घेऊन उपाध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी बारा वाजून सात मिनिटांनी दिवसभरासाठी तहकूब केले.

Tuesday 23 February, 2010

गोव्यातील नवे खाण परवाने रोखले

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची सरकारला सणसणीत चपराक

'निरी' मार्फत पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करणार
धोरण निश्चित होईपर्यंत नव्या खाणींना परवानगी नाही

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): गोव्यातील वाढत्या बेकायदा खाण व्यवसायामुळे विविध भागातील स्थानिक लोकांत प्रचंड प्रमाणात असंतोष पसरत चालला आहे. या असंतोषाचा उद्रेक झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याचीच जास्त शक्यता असल्याने केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने गोव्यातील खाण परवान्यांना मान्यता देण्यास स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. खाण व्यवसायामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास "राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था'(निरी) यांच्यामार्फत केला जाईल. राज्याचे खाण धोरण निश्चित होईपर्यंत ही स्थगिती कायम राहील, असेही मंत्रालयाने ठणकावल्याने राज्य सरकारला सणसणीत चपराक बसली आहे.
केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांनी यासंबंधीचे पत्र मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पाठवले आहे. आपल्या खात्यालाही त्यांनी या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. राज्य सरकारकडे सुमारे २४६ नवीन खाण परवाने सादर झाल्याची माहिती अलीकडे खुद्द खाणमंत्री तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली होती. सध्या शंभराहून जास्त कायदेशीर व अनेक ठिकाणी बेकायदा खाणी सुरू आहेत. या अनिर्बंध खाणींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर सुरू आहेच पण त्याही पलीकडे प्रत्यक्ष स्थानिकांच्या वस्त्यांपर्यंत या खाणी पोचल्याने लोकांत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. गोव्यातील खाण व्यवसायाचा आढावा घेतल्यास सद्यःस्थिती ही सर्वंकष पर्यावरणीय परिणाम अहवाल तयार करण्याची योग्य वेळ आहे, असे श्री. रमेश यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या अहवालात केवळ परिणामांबाबतच अभ्यास केला जाणार नाही तर पर्यावरणाचा नाश रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना हाती घेता येतील, याबाबतही सूचना मांडण्यात येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
नागपूरस्थित राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) यासंबंधी योग्य पद्धतीने अभ्यास करू शकेल. गेली अनेक वर्षे खाण खाते मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडेच आहे. या खात्यातील अनागोंदी कारभार व बेकायदा खाणींचा उच्छाद यावरून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी वेळोवेळी गंभीर आरोप करूनही मुख्यमंत्री मात्र निमूटपणे हा प्रकार चालू देण्यास मंजुरी देत आहेत. या खात्यावरील टीकेला उत्तर देण्याचे सोडाच पण त्याबाबत उघडपणे बोलण्यासही मुख्यमंत्री टाळतात, यामुळे स्थानिक लोकांत वातावरण अधिकच स्फोटक बनत चालले आहे. गेल्यावेळी गोवा भेटीवर आलेले पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांना या गोष्टीची सार्वजनिक सुनावणीवेळी कल्पना आली होती. बेकायदा खाणींबाबतच्या तक्रारी दिल्लीत त्यांच्याकडेही पोचतात, त्यामुळे अखेर त्यांना यासंबंधी कडक पवित्रा घेणे भाग पडले आहे, असेही सांगण्यात येते.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या या आदेशामुळे राज्य सरकारला सणसणीत चपराक तर बसली आहेच परंतु खाण व्यवसायाच्या पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास केला जाणार असल्याने आत्तापर्यंत खाण कंपन्यांकडून गोव्याचा कसा नायनाट करण्यात आला, याचाही पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. कामत यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व सत्ताधारी पक्षातील नेते खाण व्यवसायात गुंतले आहेत, त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या या आदेशामुळे त्यांनाही जरब बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अद्याप या पत्रासंबंधी अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत अनेकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.

ड्रग्ज माफियाला हणजूण येथे अटक

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): हणजूण भागात अंमलीपदार्थ व्यवसायात सक्रिय असलेला इस्रायली "माफिया' डेव्हिड ऊर्फ "दुदू' याला काल रात्री अंमलीपदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. "दुदू' याला अटक केल्याने अंमलीपदार्थाच्या व्यवसायात खळबळ माजली असून अनेक "पॅडलर' भूमिगत झाले आहेत. "दुदू'च्या अटकेने पोलिसांच्या हाती मोठे यश लागले असून गेल्या १२ वर्षांत त्याला अटक करण्याचे धाडस कोणीही केले नव्हते. पोलिसांच्या आशीर्वादानेच तो या व्यवसायात गब्बर झाला होता. इतकेच नव्हे तर काही पोलिस अधिकाऱ्यांसाठी दुदू म्हणजे एक "एटीएम मशीन' असल्याचेही चौकशीत स्पष्ट होत आहे. आपला काळा धंदा लवण्यात तो "दुदू डिव्हीजन इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमीडेट' या नावाने कंपनी चालवत असल्याचे भासवत होता, अशी माहिती अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे पोलिस अधीक्षक (आयपीएस) वेणू बंसल यांनी दिली.
डोक्याने हुशार आणि पैशांनी गब्बर असलेल्या या "ड्रग्ज माफिया'ला अटक करण्यासाठी गेल्या एका महिन्यापासून सापळा रचण्यात आला होता. काल रात्री पोलिसांना त्याला ताब्यात घेण्यात यश आले. छापा टाकला त्यावेळी त्याच्याकडे सुमारे ३ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा अमली पदार्थ आढळला असून तो जप्त करण्यात आला. त्याच्याकडे १४४ एक्स्टसी गोळ्या, ५ ग्रॅम हेरॉईन पावडर, ६.५ ग्रॅम कोकेन, ७.३० ग्रॅम एलएसडी, १.१६५ ग्रॅम चरस आढळून आल्याची माहिती पोलिस अधीक्षक वेणू बंसल यांनी दिली. तर, जीए ०२ एस ६४९२ क्रमांकाची सॅंट्रो गाडी आणि पाच हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार गेल्या महिन्यात हणजूण भागातील "ड्रग्ज पॅडलर' सदानंद ऊर्फ भूमी चिमुलकर याला या पथकाने अटक केली होती. अंमलीपदार्थ दुदू याच्याकडून पुरवला जात असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. काल मध्यरात्री ३.३५ वाजता सेंट अँथनी चॅपेल पेरीसवाडा हणजूण येथे त्याला ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी दुदू याला २००८ साली मुंबई पोलिसांच्या "एटीएस'च्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात घेतले होते.
दुदू याने हणजूण येथे एक मोठे घर घेतले असून त्याठिकाणी अनेक ड्रग्ज पार्ट्यांचेही आयोजन केले जात होते. यात देशी तसेच विदेशी तरुणींचा भरणा असायचा. तसेच अनेक बडे उद्योजक आणि तरुण मंडळी यात पार्टीत सहभागी होत असे, असे पोलिसांना आढळून आले आहे. गेल्या १४ फेब्रुवारी रोजी "दुदू' याने याच घरात "व्हॅलेंटाइन डे' पार्टीचे आयोजन केले होते. त्यात अनेक मंडळी सहभागी झाली होती, अशीही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. "दुदू'हा आपल्या हाताने कधीही अमली पदार्थ देत नव्हता तसेच स्वतःकडे बाळगतही नव्हती. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागली, असे सूत्रांनी सांगितले. पोलिस आपल्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचत असल्याची ठोस माहिती त्याला मिळाल्यानेच तो त्याच्याकडे असलेला अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी आला असता त्याला पोलिसांनी आपल्या जाळ्यात घेतले.
सदर छापा अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक वेणू बंसल याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नरेश म्हामल, उपनिरीक्षक सुनील गुडलर, पोलिस शिपाई महादेव नाईक, महाबळेश्वर सावंत, नागेश पार्सेकर, समीर वारखंडेकर व इरमय्या गुरय्या यांनी हा टाकला.
------------------------------------------------------------------
ड्रग्ज माफिया दुदू
कोणाच्या आशीर्वादाने "दुदू' गोव्यात होता...

२००६ साली दुदूच्या व्हिसाची मुदत संपल्याने त्याला भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, त्याने याविरोधात दाद मागून न्यायालयातून स्थगिती मिळवली. त्यानंतर, २००६ साली त्याला पुन्हा भारत सोडण्यासाठी आदेश देण्यात आले. यावेळी त्याने व्यावसायिक व्हिसा घेऊन आपण कंपनी चालवत असल्याचे भासवण्यास सुरुवात केली. अधिक माहितीनुसार या कंपनीचा नफा केवळ ३२ हजार रुपये असल्याचे दाखवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडे आहे. सदर दुदू राहत असलेले घर कोणाच्या नावावर आहे, याचा शोध सुरू आहे.

कळंगुट खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): कळंगुट येथे कामगाराचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी आरोपी रघू ब्रजेंद्र नारायण सरंगल (४६) याला आज जलद गती न्यायालयाच्या न्यायाधीश विजया पळ यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दि. १४ मार्च २००८ साली रेहमान नामक व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा तत्कालीन कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुषार वेर्णेकर व उपनिरीक्षक राहुल परब यांनी गुन्हा सिद्ध होण्यासाठी सर्व पुरावे न्यायालयात सादर केल्याने आरोपी रघू याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ज्या दिवशी खून झाला त्याच्या काही तासांपूर्वी रेहमानला रघूबरोबर जाताना एका बारमालकाने पाहिले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याच बारच्या मागील बाजूस रेहमान याचा मृतदेह आढळून आला होता. यावेळी रघू याच्या शोध घेतला असता तोही बेपत्ता असल्याने त्याच्यावर संशय बळावला होता. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी रघू याला कळंगुट पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांनी हा खून आपण केल्याचे मान्य केले होते. तसेच खून करण्यासाठी वापरण्यात आलेला दगडही पोलिसांच्या ताब्यात दिला होता.
घटनेच्या रात्री रघू, रेहमान व मणी नामक व्यक्ती कळंगुट येथील डिकुन्हा बारमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते. काही तासांनी तिघेही झोपण्यासाठी निघून गेले. काही वेळात मणीने धावत येऊन रेहमान आणि रघू भांडत असल्याची माहिती बारमालकाला दिली होती. यावेळी त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली असता रेहमान हा पाण्याच्या टॅंकमध्ये पडल्याचे आढळून आले तर त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. यावेळी त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचाराला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याच्या मृत्यू झाला होता.

पंचवाडी ग्रामसभेतील 'तो' ठरावच बेकायदा!

पर्रीकर विचारणार सरकारला जाब
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): कोडली ते पंचवाडी येथील नियोजित खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणारी जमीन अजूनही लोकांच्या नावावर आहे. या पार्श्वभूमीवर पंचवाडी पंचायतीकडून सेझा गोवा खाण कंपनीला प्रकल्प उभारण्यास "ना हरकत' दाखला देण्याबाबत ठराव कसा काय घेतला जाऊ शकतो, असा खडा सवाल विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. या ठरावासाठी उत्सुक असलेल्यांचा या व्यवहारात नक्कीच काहीतरी स्वार्थ असेल, त्यात सत्ताधारी पक्षामधील काही नेत्यांचे अभय त्यांना मिळत असल्यानेच त्यांच्याकडून ही बेकायदा कृती घडत आहे, असा दावा त्यांनी केला.
पंचवाडी बचाव समितीतर्फे आज पर्वरी येथील सचिवालयात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. पंचवाडीसारख्या निसर्गदत्त गावात येऊ घातलेल्या सेझा गोवा खाण कंपनीच्या नियोजित बंदर प्रकल्पामुळे हा गाव नष्ट होणार अशी भीती व्यक्त करून पंचवाडीवासीयांना वाचवा, असे आवाहन समितीतर्फे पर्रीकर यांना करण्यात आले. कोडली ते कापशे या बगलमार्गाला समितीचा अजिबात विरोध नाही; पण बगलमार्गाचे निमित्त पुढे करून पंचवाडी गावच्या केंद्रस्थानी विजर खाजन येथे खनिज हाताळणी प्रकल्प उभारण्याचा डाव मात्र कपटी कारस्थान असल्याचे यावेळी समितीने पर्रीकर यांना पटवून दिले.
या प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या लोकांच्या जमिनी जात नाहीत. हे लोक प्रत्यक्ष गावात स्थायिक नसल्याने त्यांना या प्रकल्पाच्या परिणामांशी काहीही देणेघेणे नाही. यामुळे या लोकांच्या पाठिंब्याला काहीही अर्थ नाही. पुढील पिढ्यांसाठी हा गाव सुरक्षित ठेवणे व गावातील नैसर्गिक संपत्ती त्यांच्यासाठी जपून ठेवणे ही काळाची गरज आहे. केवळ काही पैशांसाठी आपली भूमी खाण कंपनीच्या घशात घालण्याचा डाव काही लोकांनी आखला आहे. जिवात जीव असेपर्यंत तो साध्य होऊ देणार नाही, असा निर्धारही समितीने पर्रीकर यांच्यासमोर व्यक्त केला.
पर्रीकर यांनी यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हा लढा उभारून त्याविरोधात दाखवलेल्या चिकाटीची स्तुती केली. आपण येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावरून सरकारकडून स्पष्टीकरण मागवणार असल्याचे आश्वासन त्यांनी समितीला दिले. लोकांच्या इच्छेविरोधात एकही प्रकल्प गावात उभारता कामा नये, असे सांगून पैशांच्या आमिषांना बळी न पडता पंचवाडी गावच्या रक्षणासाठी लोक एकत्रित राहिल्यास कोणीही याठिकाणी प्रकल्प उभारण्याचे धाडस करणार नाही,असेही ते म्हणाले.
दरम्यान, ग्रामस्थांच्या जमिनीवर परस्पर प्रकल्प उभारण्यास "ना हरकत' दाखला देण्याबाबतचा ठराव पंचवाडी पंचायत कशी काय घेऊ शकते? हा ठरावच बेकायदा आहे, असेही पर्रीकर म्हणाले. अविचारी पद्धतीने अशा प्रकारे आमिषांना बळी पडून या प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या लोकांचे काहीतरी हित जपले आहे. काही स्थानिक सत्ताधारी नेत्यांचाही त्यांना पाठिंबा मिळत आहे, म्हणूनच हा बेकायदा प्रकार सुरू आहे,अशी टीकाही पर्रीकर यांनी केली. या प्रसंगी समितीचे नेते क्रिस्टो डिकॉस्ता, दुर्गेश शिसाणे, नाझारेथ गुदिन्हो, पंच लीना डिकॉस्ता आणि पंचवाडी चर्चचे फादरही उपस्थित होते.

पर्रीकरांनी महासचिवपद नाकारले, एखाद्या राज्याचे प्रभारीपद स्वीकारणार

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): राज्याचे विरोधी पक्षनेते तथा भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकर यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा प्रस्ताव सविनय नाकारल्यानंतर पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी, निदान एखाद्या राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारण्याची त्यांना विनंती केली आहे. पर्रीकरांनीही ही विनंती मान्य केली असून पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होताच त्यांची एखाद्या राज्याच्या प्रभारीपदी निवड केली जाणार आहे.
गोव्याचे प्रदेश भाजपध्यक्ष प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीच "गोवादूत'शी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणावर एखाद्या महत्त्वाच्या पदी नियुक्ती केली जाणे हे अनेकांचे स्वप्न असते. तथापि, यापूर्वी अनेकदा विविध राष्ट्रीय पदांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर परवा इंदूरच्या राष्ट्रीय अधिवेशनावेळी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी गोव्याच्या प्रतिनिधी मंडळासमोरच पर्रीकरांना पुन्हा एकदा महासचिव होण्याची गळ घातली. "तुमचे नाव माझ्या टीममध्ये घालण्यात आले आहे', असे गडकरींनी सांगताच, "कृपया राग मानू नका, कौटुंबिक आणि गोवा भाजप या दोन कारणांमुळे तूर्त आपण ही जबाबदारी पेलू शकणार नाही', असे पर्रीकरांनी विनम्रपणे सांगून त्यांचा प्रस्ताव नाकारला. एखाद्या राजकीय व्यक्तीच्या आयुष्यातला हा मोठा त्याग असून या घटनेने पर्रीकरांबद्दलचा आपल्या मनातला आदर अधिकच वाढला असे प्रा. पार्सेकर म्हणाले.
गोव्याच्या राज्य कार्यकारिणीचा घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल; परंतु तत्पूर्वी दक्षिण गोवा जिल्हा समितीची घोषणा पुढील एक दोन दिवसात केली जाईल असे त्यांनी सांगितले. महागाई व राष्ट्रीय सुरक्षा हे विषय हाताळण्यास केंद्रातील "युपीए' सरकारला आलेल्या अपयशाबद्दल केंद्राचा निषेध करण्यासाठी देसभरातून सुमारे दहा कोटी सह्या गोळा केल्या जाणार असून मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून गोव्यासह देशभरात हे काम सुरू होणार असल्याचेही प्रा. पार्सेकर यांनी सांगितले.

वास्कोत कामगाराचा खून, तिघांना अटक

वास्को, दि. २२ (प्रतिनिधी): हरवलेल्या "मोबाईल'वरून झालेल्या वादानंतर एल. गोपाळ नामक कामगाराचे त्याच्याच तीन साथीदारांनी अपहरण करून त्याला जबर मारहाण करून त्याचा चेहरा दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार मुरगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. अपहरणाबाबत मुरगाव पोलिसात तक्रार नोंद करण्यात आल्यानंतर काही तासांच्या आत पोलिसांनी अपहरण करणाऱ्या तीनही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर या खून प्रकरणावर उजेड पडला.
मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान येथील मूळ एल. गोपाळ (३५) हा एमपीटीमध्ये कामाला असलेला कंत्राटी कामगार आपल्या अन्य साथीदारांबरोबर सडा येथे असलेल्या कचरा प्रकल्पाच्या मागील चाळीत राहत होता. काल (दि २१) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गोपाळ याचा साथीदार गणेश याचा मोबाईल गायब झाल्याचे लक्षात येताच दोघांनी संशयावरून त्यांच्यासोबत कामाला असलेल्या ख्रिस्तोफर मायकल (२९), परेश प्रजापती (३४) व किरण महाजन (३२) यांना मोबाईलबाबत विचारले. यावेळी या तिघांनी गणेश याला मारण्यास सुरुवात केली. यावेळी गोपाळने आपल्या गणेशला त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी उलट गोपाळवर हल्लाबोल केला. नंतर त्याचे राहत असलेल्या चाळीतून अपहरण केले. या तिघांनी गोपाळचे अपहरण केल्याचे गणेशच्या लक्षात आल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला व शेवटी गोपाळचे पर्यवेक्षक सेबिस्तियो कार्व्हालो यांनी मुरगाव पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्वरित कारवाई करून रात्री तीन वाजण्याच्या सुमारास अपहरण कर्त्यांपैकी परेश प्रजापती व किरण महाजन यांना ते लपलेल्या ठिकाणाहून ताब्यात घेतले, यानंतर एका तासाच्या आत ख्रिस्तोफर मायकल सापडला. गोपाळबाबत विचारण्यास सुरवात केली असता त्यांनी त्याचा खून केल्याचे उघडकीस आले. संशयित ख्रिस्तोफर, परेश व किरण यांनी प्रथम गोपाळ याची जबर मारहाण करून नंतर त्याचा चेहरा दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
आज सकाळी मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलिसांनी एल. गोपाळ याचा मृतदेह कचरा प्रकल्पाच्या मागे असलेल्या डोंगराळ भागातून ताब्यात घेतला. मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवून देण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांविरुद्ध भा.दं.सं. ३०२ व ३६४ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. दरम्यान, आज संध्याकाळी या तीनही संशयित आरोपींना वास्कोच्या प्रथम श्रेणी न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना चार दिवसांच्या पोलिस कोठडीत घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

तपोभूमीवर 'जन्माष्टमी महोत्सव' थाटात

फोंडा, दि.२२ (प्रतिनिधी): प.पू. श्री पद्मनाथ शिष्य संप्रदाय, श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठाचे विद्यमान पीठाधीश्र्वर प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांचा "जन्माष्टमी महोत्सव' श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ कुंडई येथे आज(दि.२२) विविध कार्यक्रमासह थाटात साजरा करण्यात आला.
यानिमित्त सकाळी रक्तदान शिबिर घेण्यात आले तर संध्याकाळच्या सत्रात प्रकट कार्यक्रम झाला. यात गोव्यातील सुमारे १६० देवस्थान समिती पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, प्रतिमा देऊन प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या वेळी सौ. ब्राह्मी देवी, सत्कारमूर्ती हिंदूधर्म आचार्य सभा राजकोटचे महासचिव प.पू. श्री परमात्मानंद सरस्वती स्वामीजी, नाशिक येथील गुरुगंगेश्वरानंद वेदविद्यालयाचे संचालक किसनलालजी सारडा, पुरातन देवस्थान संशोधक रोहित फळगावकर, "गोवा ३६५' वृत्तवाहिनीचे संचालक सुहान कारकल, दोडामार्ग येथील प्रमोद महादेव गावस (जवान) उपस्थित होते.
मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, तपोभूमीचे आचार्य नवराज भट्ट, प्रसाद द्विवेदी, राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, संप्रदाय समितीचे अध्यक्ष गुरुदास शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री पद्मनाथ शिष्य संप्रदाय धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असून यापुढे शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा पदार्पण करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे, असे समितीचे अध्यक्ष गुरुदास शिरोडकर यांनी सांगितले. गोव्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी पद्मनाथ शिष्य संप्रदायाच्या कार्याचे स्तुती केली. आजच्या कलियुगात सुद्धा गुरुभक्तीची परंपरा अखंड सुरू ठेवण्याचे काम पद्मनाथ शिष्य संप्रदाय करीत आहे. संस्कृती, संस्कृत, अध्यात्म, वेदाभ्यास या क्षेत्रातील संप्रदायांच्या कार्यामुळे संस्कृतीच्या रक्षणासाठी निश्चित हातभार लागेल, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.
प.पू. श्री परमात्मानंद सरस्वती स्वामीजी, किसनलालजी सारडा, रोहित फळगावकर, सुहान कारकल, प्रमोद महादेव गावस यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
प्रकट कार्यक्रमाची सुरुवात सांप्रदायिक प्रार्थनेने झाली. सौ. व श्री. राजेंद्र वासू नाईक यांनी स्वामींची पाद्यपूजा केली. तपोभूमीचे बटू प्रवीण व इतरांनी विष्णू स्तुती सादर केली. गुरुदास शिरोडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सच्चिदानंद नाईक यांनी केले. स्वामींच्या जन्माष्टमी महोत्सवानिमित्त तपोभूमीच्या परिसरात वातावरण चैतन्यमय बनले होते. भाविक, भक्तगणांची तपोभूमीवर रीघ लागली होती. तपोभूमीत आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली होती. गृहमंत्री रवी नाईक, वाहतूक खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी तपोभूमीवर जाऊन स्वामींचे अभीष्टचिंतन केले.

Monday 22 February, 2010

रशियन पर्यटकांच्या दादागिरीचे मोरजी ग्रामसभेत संतप्त पडसाद

पेडणे, दि. २१ (प्रतिनिधी): किनारी भागात वाढलेल्या रशियन पर्यटकांच्या दादागिरीवर आज प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत मोरजी ग्रामसभेत गरमागरम चर्चा झाली. मोरजीत बेकायदा धंदे करणाऱ्या व दादागिरी करणाऱ्या रशियन नागरिकांना थारा देऊ नये असे आवाहन पार्सेकर यांनी यावेळी केले.
रशियन नागरिक कॉस्ता याने स्थानिक टॅक्सीचालक रोहिदास शेटगावकर याला मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. रोहिदास याच्या मृत्यूचे पडसाद आजच्या या ग्रामसभेत उमटले. मृत शेटगावकर यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रा. पार्सेकर यांनी सांगितले.
मोरजीची ग्रामसभा आज सरपंच रत्नाकर शेटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच धनंजय शेटगावकर, पंच रेखा भिवशेट, हर्षदा पालयेकर, जितेंद्र शेटगावकर, अनंत सावळ, संदीप मोरजे, रितेश नारोजी, पंचायत सचिव अभय सावंत, गटविकास कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून पालयेचे सचिव उमेश शेटगावकर उपस्थित होते.
मरडीवाडा येथील टॅक्सीचालक रोहिदास शेटगावकर कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्याचा ठराव मोरजीचो एकवट संघटनेचे अध्यक्ष वसंत शेटगावकर यांनी मांडला. तो मंजूर करण्यात आला.
आबा शेटगावकर यांनी सूचना करताना सांगितले की स्थानिकांच्या नावावर शॅक्सचा परवाना घेऊन एखादा विदेशी पर्यटक ते चालवत असल्याचे आढळून आल्यास तो त्वरित रद्द करण्याची तरतूद हवी. किंबहुना तशा प्रकारचा नियम घालूनच परवाना देण्याची गरज आहे. रशियन नागरिकांच्या दादागिरीचे अनेक घटना यावेळी नागरिकांनी कथन केल्या. त्यावरून ग्रामसभेचे वातावरण चांगलेच तापले. आमदार पार्सेकर यांनी रशियन नागरिकांचा विषय पुढील महिन्यात विधानसभा अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले. किनारी भागात दिसणारे रशियन फलक हटविण्याची मागणीही नागरिकांनी यावेळी केली. रशियन नागरिक चालवत असलेल्या हॉटेल्समध्ये रात्री उशिरापर्यंत पार्ट्या चालू असतात. त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने त्यांची दादागिरी वाढल्याची माहितीही अनेकांनी यावेळी दिली. किनाऱ्यावर फिरणाऱ्या अर्धनग्न महिलांवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली.
आमदार पार्सेकर यांनी प्रथमच मोरजी ग्रामसभेस उपस्थिती लावली. रोहिदास शेटगावकर यांच्या मृत्यूसंबंधी दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. रशियन नागरिक केवळ पर्यटक म्हणून येत नसून त्यांनी आपल्या नावावर जागाही विकत घेतल्याचे पार्सेकर यांनी यावेळी सांगितले. एखादी घटना घडल्यास पोलिस वेळेवर पोचत नाहीत. रात्रीच्या गस्ती घालत नाहीत. या भागात तेच तेच पोलिस बदली घेऊन येतात. त्यांचे वरपर्यंत वजन असते. ते पोलिस "थारावणी' करण्यासाठी येतात व विदेशी नागरिकांचे चोचले पुरवितात असा आरोप आमदारांसह नागरिकांनी केला.
प्लॅस्टिक कचऱ्यावरही सभेत गरमागरम चर्चा झाली. गाव प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जनजागृती करण्याचे ठरले. अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात आली. सीआरझेड कायद्याअंतर्गत येणाऱ्या घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी सरकारी पत्रक आल्याची माहिती सचिव अभय सावंत यांनी दिली.

खनिज चढउताराचा 'तो' ठराव जनक्षोभापुढे बारगळला

कुळेवासीयांच्या एकजुटीचा विजय
कुळे, दि. २१ (प्रतिनिधी): येथील रेल्वे यार्डात खनिज मालाचा चढउतार करण्यास स्थानिक ग्रामस्थांचा कडाडून विरोध असल्याने व त्याअनुषंगाने गावातील वातावरण तणावपूर्ण बनल्यानेअखेर आज ग्रामपंचायतीने यासाठी "ना हरकत दाखला'देण्याच्या विषयालाच ग्रामसभेत बगल दिली, त्यामुळे हा या परिसरातील जनतेच्या एकजुटीचा दणदणीत विजय असल्याच्या प्रतिक्रिया गावात उमटल्या.हा ठराव चर्चेला येणार हे समजल्याने कुळे, शिगाव व या परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध करण्याचा चंगच बांधला होता, त्यासाठी आज मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तथापि तंग वातावरणात सभेला आरंभ होताच," स्थानिक पंचायत कायद्यानुसार खनिज मालाचा चढउतार करण्यासाठी ना हरकत दाखला देऊ शकत नसल्याचे स्पष्ट करीत रेल्वे यार्डचे स्थलांतर आणि बगल रस्त्याची अंमलबजावणी होत नाही, तोवर हा विषय भविष्यात ग्रामसभेच्या कार्यक्रम पत्रिकेवर येणार नाही. तसेच, तसा प्रयत्नही केला जाणार नाही' असे आज सरपंच संदीप देसाई यांनी ग्रामसभेत जाहीर केले. हा मुद्दा ग्रामसभेच्या कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्यात यावा, यासाठी कुळे नागरिक समितीने कंबर कसली होती. तर, दै. गोवादूतने या मागणीचा सतत पाठपुरावा केला होता. शेवटच्या दोन दिवसांत शिगाव नागरिक समितीनेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याने अखेर आज कुळे पंचायतीने हा मुद्दा कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्यात येत असल्याचे जाहीर केले. तसेच. यापुढे हा विषय ग्रामसभेच्या कार्यक्रमपत्रिकेवर आणला जाणार नसल्याचेही उपस्थित ग्रामस्थांना आश्वासन दिले. सरपंच संदीप देसाई यांनी जनहित लक्षात घेऊन लोकशाहीची कदर राखल्याने ग्रामस्थांनी पंचायत मंडळाचे अभिनंदन केले.
हॉस्पेट येथून खनिज माल आणून तो कुळे रेल्वे यार्डात चढउतार करण्यासाठी आज दि. २१ रविवारी खास ग्रामसभा बोलावण्यात आली होती. परंतु, याला कोणत्याही परिस्थिती नागरिकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माल हाताळणी करायला द्यायचा नाही, निर्धाराने मोठ्या संख्येने ग्रामस्थ आज पंचायत सभागृहात उपस्थित होते. सदर विषय चर्चेस आला त्यावेळी सरपंचांनी पंचायत कायद्यानुसार खनिज मालाची चढउतार करण्यासाठी ना हरकत दाखला देऊ शकत नसल्याचे जाहीर करून लोकांना सुखद धक्का दिला. येथील ज्येष्ठ साहित्यिक पु.शि.नार्वेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना असा ठराव ग्रामसभेत आणलाच जाऊ शकत नाही, असे सांगून जनतेने एकजूट दाखवल्यानेच पंचायतीने हा विषय टाळल्याचे म्हटले आहे.
या निर्णयाबद्दल उपस्थित असलेल्या माजी सरपंच सौ. ऊर्मीला उमेश नाईक यांना विचारले असता त्यांनी हा महिलाशक्तीचा विजय असल्याचे मत व्यक्त केले. जेव्हा हा विषय ग्रामसभेत यायचा त्या-त्यावेळी एकजुटीने महिलावर्गाने जोरदार विरोध केला आहे. सरपंचांनी आणि इतर सदस्यांनी कायद्याचा अभ्यास करून या विषयाला कायमचा पूर्णविराम दिल्याने महिलांच्यावतीने समाधान व्यक्त केले.
अन्यायाविरुद्ध व जनहितासाठी तसेच येथील पर्यावरण व निसर्गसौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी झटणाऱ्या कुळे नागरिक समितीचे अध्यक्ष संतोष मसुरकर व सचिव ज्योकीम डिकॉस्ता यांनी हा सांघिक लढ्याचा विजय असल्याचे सांगितले. तसेच, कुळे ग्रामस्थांनी व शिगाव नागरिक समिती व इतर मंडळांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याचे सांगून यापुढे कुळे ग्रामस्थांना निरोगी जीवन जगता येणार असल्याचे मत व्यक्त केले.
१९९८ सालच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी सरपंच नरेश शिगांवकर यांनी या निर्णयाचे स्वागत करून अशा निर्णयाबाबत गाफील न राहण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.
२००५ साली असाच निर्णय त्यावेळी पंचायत मंडळाने दिला होता. त्यानंतर सदर विषय पुन्हा पाच वर्षांनी ग्रामसभेत आल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. गरज भासल्यास हा लढा असाच पुढे चालू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नीलेश वेळीप यांनी यापुढे ग्रामसभा अहवाल स्थानिक भाषेतून लिहिला जावा, जेणे करून सामान्य नागरिकांना तो वाचता येईल, अशी मागणी केली. पत्रकार कालिदास काणेकर यांनी ग्रामस्थांना मतदान ओळखपत्र आणण्याची सक्ती का करण्यात आली, अशा प्रश्न यावेळी केला. या प्रश्नाला उत्तर देताना सरपंचांनी सांगितले की, यापुढे ओळखपत्र आणण्याची सक्ती कायम ठेवण्यात येईल व ते आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
सचिव दत्तू राऊत देसाई यांनी सन २०१० ते २०११ सालचे अंदाजपत्रक सादर केले. सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत नरेश शिगांवकर, संतोष मसूरकर, ज्योकीम डिकॉस्ता, कालिदास काणेकर, श्रीमती. शिला वेरेकर, सौ. ऊर्मीला नाईक, नीलेश वेळीप, दीपक वेळीप व इतर ग्रामस्थांनी भाग घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्यात सुरुवातीला सरपंच संदीप देसाई यांनी उपस्थित ग्रामस्थांचे स्वागत करून सभेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शेवटी माजी सरपंच सुधाकर गावकर यांनी आभार व्यक्त केले.

भाजप कार्यकारिणीत युवा नेत्यांना प्राधान्य?

नवी दिल्ली, दि.२१ : पक्षात आता चौथ्या पिढीतील युवकांना संधी देण्यावर भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांचा भर राहणार आहे. अनेक नव्या चेहऱ्यांना पक्ष पदाधिकारी म्हणून गडकरी समोर आणणार आहेत.
भाजपाध्यक्षांच्या नव्या टीममध्ये ज्यांचा समावेश होऊ शकतो त्यात गोव्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, शहनवाज हुसेन, बी. सी. खंडुरी, अर्जुन मुंडा, किरण माहेश्वरी, नवज्योतसिंग सिध्दू व अमित थाकेर यांचा प्रामुख्याने समावेश राहण्याची शक्यता आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रमुख म्हणून हिमाचल प्रदेशचे मुख्यमंंत्री प्रेमकुमार धुमल यांचा मुलगा खा. अनुराग ठाकूर यांची निवड होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षपदीही युवा नेत्याची निवड केली जाण्याची शक्यता आहे. नव्या टीमची घोषणा फेब्रुवारीअखेरपर्यंत करण्याची शक्यता आहे.

पुणे स्फोट : बळींची संख्या १५

पुणे, दि. २१ : १३ फेब्रुवारी रोजी पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटातील जखमींपैकी आणखी दोन जण दगावल्याने यातील बळीसंख्या १५ वर पोहोेचली आहे.
२४ वर्षी विकास तुलसियानी आणि २३ वर्षीय राजीव अग्रवाल हे दोघे जखमी अवस्थेत जहांगीर रुग्णालयात उपचार घेत होते. तब्बल आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर या दोघांची प्राणज्योत मालवली. त्यापैकी विकास हा पुण्याचाच होता. आज सकाळी जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. राजीव हा काल रात्री उशिरा दगावला.
राजीव अग्रवाल हा कोलकात्याचा रहिवासी होता. तो पुण्यातील सिंबॉयसिस महाविद्यालयात विधी शाखेत शिकत होता. स्फोट झाला तेव्हा राजीव हा त्याच्या चार मित्रांसमवेत जर्मन बेकरीत होता. स्फोटात सर्वजण जखमी झाले होते. त्यातील अभिषेक सक्सेनाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. अन्य मित्रांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे.
राजीवला कार्पोरेट लॉमध्ये करिअर करण्याची इच्छा होती. त्याची शैक्षणिक प्रगती उत्तम होती, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.
जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटात ९ जण जागीच मृत्युमुखी पडले, ५ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अद्याप जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या जखमा खोलवर असल्याने प्रकृती सुधारण्यास काही अवधी लागेल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

तेलंगण आंदोलन चिघळणार

हैदराबाद, दि. २१ : वेगळ्या तेलंगणाच्या मागणीसाठी शनिवारी श्रीपुरम् यादय्या या युवकाने आत्मदहन केले होते. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने हे आंदोलन पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
उस्मानिया विद्यापीठ म्हणजे वेगळ्या तेलंगणावाद्यांचा बालेकिल्लाच बनला आहे. तेथे शेजारच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील नागाराम गावातील हा विद्यार्थी वेगळ्या तेेेलंगणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आला होता. आंदोलनाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विद्यापीठाच्या आवारात त्याने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतले.
या प्रकाराने तेथील पोलिसही क्षणभर गोंधळून गेले. नंतर तातडीने हालचाल करून त्यांनी आग विझवली. प्रयत्नांची शिकस्त करून त्यांनी त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आणि अपोेेलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्या बॅगमध्ये काही प्रमाणपत्रे आणि मृत्यूचे कारण सांगणारे पत्र सापडले आहे.
त्या पत्रात त्याने म्हटले आहे की, तेलंगणाच्या प्रस्तावाला सरकार प्रतिसाद देत नाही म्हणून माझ्यासारख्यांना नोकऱ्या मिळत नाही. वेगळ्या तेलंगणात नव्या नोकऱ्या निर्माण होतील म्हणून या आंदोलनात मी माझ्या प्राणाची आहुती देत आहे. तेलंगणा वेगळे होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवा, असेही त्याने तेलुगूमध्ये लिहून ठेवले आहे.
आज उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह गावकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला.

Sunday 21 February, 2010

रोहिदासच्या कुटुंबाला त्वरित अर्थसाह्य द्यावे

विदेशींची "दादागिरी'खपवून घेणार नाही
आज मोरजीची ग्रामसभा "गाजणार'

पेडणे, दि. २० (प्रतिनिधी): मोरजीत विदेशी नागरिकांच्या वाढत्या दादागिरीचा बळी ठरलेल्या मरडीवाडा येथील रोहिदास शेटगावकर या स्थानिक टॅक्सीचालकाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर भीषण संकट ओढवले आहे. रोहिदास हाच या कुटुंबातील कर्ता पुरुष होता, त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकारने ताबडतोब लक्ष घालावे व रोहिदासच्या कुटुंबाला अर्थसाह्य मिळवून द्यावे, अशी जोरदार मागणी "मोरजीचो एकवट' आणि मोरजी पंचायत यांनी संयुक्तरीत्या बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केली.
आज मोरजी विकास मंच कार्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सरपंच रत्नाकर शेटगावकर, मोरजीचो एकवट संघटनेचे अध्यक्ष वसंत ऊर्फ आबा शेटगावकर यांनी ही माहिती दिली. यावेळी मोरजीचे फादर मिनिनो वॉलीस, "मोरजीचो एकवट' संघटनेचे उपाध्यक्ष शाणू दाभोलकर, सुधीर कान्नाईक, खनिजदार लक्ष्मण शेटगावकर, सहखजिनदार बाबू ऊर्फ मच्छिंद्रनाथ शेटगावकर, सचिव मेर्लिन फर्नांडिस, भक्तदास बागकर, उल्हास मोरजे आदी हजर होते.
उद्या २१ रोजी मोरजी पंचायतीची ग्रामसभा होणार असून त्यात रोहिदास शेटगावकर याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याबरोबर मोरजी गावातील विदेशी लोकांच्या वाढत्या उपद्रवांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
विदेशींनी गोव्यात पर्यटक म्हणून यावे व पर्यटक म्हणूनच राहावे. इथे वास्तव्य करून पर्यटन व्यवसायात उतरलेल्या विदेशी नागरिकांनी आता स्थानिकांना धमकावण्याचे व त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रकार सुरू केल्याने हा विषय सर्वत्र नेला जाईल, अशी माहिती वसंत शेटगावकर यांनी दिली. विदेशी लोकांवर हल्ला किंवा त्यांच्याबाबतीत काही घडल्यास त्याची सर्वत्र प्रसिद्धी करून गोव्याला बदनाम केले जाते; पण विदेशींकडून जेव्हा दंगामस्ती केली जाते किंवा स्थानिकांवर हल्ला करण्यात येतो तेव्हा त्यास व्यापक प्रसिद्धी दिली जात नाही, अशी खंतही व्यक्त करण्यात आली. मयत रोहिदास शेटगांवकर याला तीन मुलगे आहेत. सर्वांत छोटा मुलगा अपंग आहे. रोहिदास हाच या कुटुंबाचा आधार होता, त्याच्या अकाली जाण्याने या कुटुंबावर महासंकट कोसळले आहे. मोरजी गावातर्फे रोहिदासच्या कुटुंबाला मदत करण्याचे प्रयत्न होतीलच; पण राज्य सरकारकडूनही त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी उद्या ग्रामसभेत ठराव संमत करण्याचा विचार सुरू आहे,अशी माहितीही देण्यात आली.
राष्ट्रवादीने बाऊ करू नये
राष्ट्रवादीच्या नेत्या तथा मांद्रेच्या माजी आमदार तथा माजीमंत्री संगीता परब व त्यांच्या पक्षपदाधिकाऱ्यांनी रोहीदास शेटगांवकर प्रकरणी सरकारवर केलेली टीका व पेडणेचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या बदलीची केलेली मागणी ही या प्रकरणाला राजकीय स्वार्थासाठी केलेला वापर असल्याची टीका यावेळी करण्यात आली. या नेत्यांना रोहीदास शेटगांवकर याची एवढीच सहानुभूती होती तर त्यांनी तो बांबोळी इथे मृत्यूशी झुंज देत होता, त्यावेळी विचारपूस का केली नाही,असा सवालही उपस्थित करण्यात आला. पेडणेचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत व त्यांनी या संपूर्ण प्रकरणी स्थानिकांना पूर्ण सहकार्य दिले, असा निर्वाळाही यावेळी देण्यात आला.

आजची ग्रामसभा वादळी ठरणार!

कुळे परिसरात तणाव
कुळे, दि. २० (प्रतिनिधी): लोकांच्या मागणीप्रमाणे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी १९९८ साली दिलेल्या आदेशाची कार्यवाही होईपर्यंत कोणत्याही स्थिती कुळे रेल्वे यार्डमधून खनिज मालाची चढउतार करू दिली जाणार नाही, असा ठाम निर्णय कुळे नागरिक समितीने इतर समित्या, पालक शिक्षण संघ व नागरिकांच्या पाठिंब्याद्वारे घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (रविवारी) या विषयावर होणारी ग्रामसभा अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारी यंत्रणेच्या बळावर नागरिकांचा विरोध चिरडून टाकण्याची सर्वतोपरी तयारी सरकारने चालवली असतानाही हे दडपण झुगारून देण्याचा निर्धार कुळे, शिगाव व आसपासच्या जनतेने केला आहे.
हॉस्पेट येथून खनिज माल आणून तो कुळे रेल्वे यार्ड मध्ये चढउतार करण्याचा चंग स्थानिक आपमतलबी ठेकेदारांनी काही पंच सदस्यांना हाताशी धरून बांधला आहे. त्यामुळे कुळे नागरिक समितीने एक पत्रक प्रसिद्ध करून ग्रामस्थांना ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून पूर्वीप्रमाणे आपला आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले आहे.
धूळ व आवाजाचे प्रदूषण व रस्त्यावर पाणी शिंपल्यानंतर होणारा घाण आणि चिखल यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर हैराण झालेल्या ग्रामस्थांनी आपल्या मागणीसाठी १९९८ साली जोरदार आंदोलन छेडले होते. त्यानंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून एक आदेश मिळविला होता. जोवर लोकांच्या मागण्या मान्य होत नाही तोवर सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या खाण व्यवसायाला परवानगी दिली जाणार नाही असे सदर आदेशात नमूद केले असल्याचे पत्रकात म्हटले आहे. लोकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून २००५ साली परत एकदा खाण माल हाताळण्यासाठी तेव्हाच्या सरपंचानी खास ग्रामसभा बोलावली होती; पण लोकांचा विरोध पाहून पंचायत मंडळाने जोपर्यंत रेल्वे यार्ड स्थलांतर व बगलरस्ता होत नाही तोपर्यत भविष्यात या विषयावर ग्रामसभा भरवली जाणार नसल्याचे स्पष्ट करून लोकांना नैसर्गिक न्याय दिल्याचे पत्रकात पुढे म्हटले आहे.
या परिसरात कायद्याचे पालन, पर्यावरण सांभाळून व गावच्या युवावर्गाला रोजगार देणाऱ्या खाण व्यवसायाला आपला विरोध नाही असे नमूद करून कुळे रेल्वे यार्ड स्थलांतरीत होऊ शकतो व याचं जिवंत उदाहरण म्हणून "डुक्करकोंड - काले' येथील यार्डकडे पाहता येईल असे म्हटले आहे.
फक्त इच्छा असण्याची आवश्यकता आहे. पण गेल्या बारा वर्षात असा प्रयत्न झालेला दिसत नाही. पंचायत मंडळ लोकशाहीची कदर करून व लोकांचे हित लक्षात घेऊन पुन्हा एकदा नैसर्गिक न्याय लोकांना बहाल करेल, अशी अपेक्षा नागरिक समितीने पत्रकात शेवटी व्यक्त केली आहे.

बाबूशचा बळी देऊन मंत्रिपद नकोच..!

कामत यांच्या डावपेचांना मडकईकरांचा कोलदांडा
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत फूट घालण्याचे प्रयत्न कामत व त्यांच्या मोजक्याच समर्थकांनी चालविले असून आता पांडुरंग मडकईकर यांना विरोधी गटापासून बाजूला काढण्यासाठी बाबूश मोन्सेरात यांचे मंत्रिपद त्यांना देण्याचे सूतोवाच कामत गटाकडून केले जात आहे. मात्र, बाबूश यांचे मंत्रिपद काढून आपणास ते दिले जाणार असेल तर ते आपणास मान्य नसल्याचे मडकईकर यांनी स्पष्ट केले आहे.
कामत यांच्याविरोधात आक्रमक बनलेल्या गटाने काहीही झाले तरी नेतृत्वबदल घडवून आणणारच, असा विडा उचलला असल्याने या गटाला कमकुवत करण्यासाठी सध्या कामत गटाकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या आणि युक्त्या लढवल्या जात आहेत. मात्र अशा युक्त्यांना बळी पडणार नाही, असा ठाम निर्धार या गटाने केला आहे.
कुंभारजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनीच सुरुवातीला कामत यांच्याविरोधात बंडाला सुरुवात केली व त्याचे पर्यवसान सध्याच्या अस्थिरतेत झाले आहे. पांडुरंग मडकईकर यांचे मंत्रिपद काहीही कारण नसताना काढून घेण्यात आल्याने ते खूपच नाराज झाले आहेत. त्यांना मंत्रिपद देण्याची लालूच वारंवार श्रेष्ठींकडून दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात काहीच होत नाही. त्यामुळे त्यांची श्रेष्ठी थट्टा तर करीत नाही ना, अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांची बनली आहे.
मुख्यमंत्री कामत यांनी आता नव्याने मडकईकर यांना मंत्रिपदाचा प्रस्ताव सादर केला असून शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे मंत्रिपद काढून त्यांना देण्याचाही घाट घातला आहे. बाबूश यांना शिक्षण खाते दिल्याने सुरुवातीला अनेकांनी सरकारवर टीका केली खरी; पण शिक्षणमंत्री या नात्याने बाबूश यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे जनताही त्यांच्यावर खूष आहे. ते प्रत्यक्षात काम करीत असताना त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची कृती पांडुरंग मडकईकर यांना मान्य नाही, अशी नवी माहिती मिळाली आहे.
कामत यांना मंत्रिपदाची जागाच खाली करायची असेल तर त्यांनी मंत्रिमंडळातील सपशेल अपयशी ठरलेल्यांची खुर्ची खाली करावी,असा सल्ला श्री.मडकईकर यांनी दिल्याचे समजते. बाबूश यांचे मंत्रिपद काढून मडकईकर यांना बहाल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा बेत ही राजकीय चाल आहे. बंडखोर गटांत मतभेद निर्माण करण्याचाच हा डाव असल्याने हा प्रस्ताव धुडकावून लावण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.
दरम्यान, काल शिवजयंतीनिमित्त फर्मागुडी येथे झालेल्या कार्यक्रमात गृहमंत्री रवी नाईक हे भलतेच आक्रमक बनले होते. त्यांनी आपल्या भाषणांत तर चक्क आपल्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली. काल सकाळी नव्यानेच राजकारणात उतरलेल्या काही नेत्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचे ते म्हणाले. त्यांच्या भाषणातील रोख थेट आरोग्यमंत्री विश्वजित राणे, सुदिन ढवळीकर यांच्यावर होता, अशी कुजबुज तेथे उपस्थित नागरिकांत लगेच सुरू झाली. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आप्रत्यक्षरीत्या राजकारणातील नीतिमत्तेचे चार शब्द सुनावून रवी नाईक यांच्यावर शरसंधान केले असेही सांगितले जाते. एकंदरीत आतापर्यंत छुप्या पद्धतीने एकमेकांना पाण्यात पाहणारे हे नेते आता उघडपणे एकमेकांसमोर उभे ठाकल्याने कॉंग्रेस आघाडी सरकारातील हेवेदावे अधिक तीव्रपणे जनतेसमोर येऊ लागले आहेत.

तेलंगण पेटले... विद्यार्थ्यांचा हल्लाबोल

हैदराबाद, दि. २० : स्वतंत्र तेलंगण राज्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी आज (शनिवारी) आंध्र प्रदेश विधानसभेवर हल्लाबोल केला. संयुक्त संघर्ष समितीच्या विद्यार्थ्यांनी विधानसभेकडे जाणारे सर्व रस्ते रोखले असून शहर प्रशासनाच्या नाकी नऊ आणले आहेत.
उस्मानिया विद्यापीठाच्या परिसरात शनिवारी सकाळी हजारो विद्यार्थ्यांनी जमून विधानसभेकडे कूच केले. त्यातील काही विद्यार्थ्यांनी उस्मानिया विद्यापीठाचे कुलगुरू तिरुपती राव यांच्या कार्यालयावर दगडफेकही केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने शहरभर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विधानसभेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आजच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. स्वतंत्र तेलंगण साठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

विधानसभेपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असणा-या विद्यानगर परिसरात पोलिसांनी विद्यार्थ्यांचा हा मोर्चा अडवला. पण तरीही विद्यार्थ्यांची ' जय तेलंगण ' ची घोषणाबाजी आणि वाद्ये वाजवणे सुरूच होते. पोलिसांना न जुमानता विद्यार्थी पुढे येण्यासाठी प्रयत्न करत होते.

पोलिसांनी ही रॅली बेकायदेशीर असल्याचे सांगत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच या आंदोलनाला वेसण घालण्यासाठी शहरातील महत्त्वाचे रस्ते बंद केले. रेल्वेमार्गावर बॉंब पेरण्यात आल्याच्या अफवा पसरल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. हैदराबाद-वारंगळ मार्गावरील अनेक ट्रेनही थांबवण्यात आल्या. दक्षिण-मध्य रेल्वेनेही हैदराबाद सिकंदराबाद शहरे जोडणा-या अनेक ट्रेन रद्द केल्या.

सरपोतदार यांचे निधन

मुंबई, दि. २० : मुलुखमैदान तोफ म्हणून प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मधुकर सरपोतदार यांचे आज (शनिवारी) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेवर शोककळा पसरली आहे.
सकाळपासून त्यांची प्रकृती खालावू लागली, उपचारांना प्रतिसाद देणे कमी-कमी होत गेले आणि दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
बुधवारी सकाळी छातीत दुखू लागल्यानं सरपोतदार यांना "हिंदुजा'च्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. काल त्यांच्या तब्येतीत थोडीफार सुधारणा दिसली, पण ती तात्पुरतीच ठरली. अनेक जाहीर सभांमध्ये आणि संसद-विधिमंडळात कधीच माघार न घेणारे सरपोतदार मृत्युशी झुंज देण्यात अपयशी ठरले. त्यांच्यावर उद्या, (रविवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, मनसे सरचिटणीस अतुल सरपोतदार आणि सून शिल्पा सरपोतदार असा परिवार आहे.
शिवसेनेला मध्यमवर्गीय पांढरपेशा शिक्षित वर्गाची संघटना, अशी प्रतिमा देण्यामध्ये मधुकर सरपोतदार यांचा मोठा वाटा होता. स्वतः एका आंतराराष्ट्रीय कंपनीत पर्सनल मॅनेजर असल्यामुळे कामगार कायद्याचे उत्तम ज्ञान त्यांना होता. त्याचाच फायदा शिवसेनेला झाला. विविध कारखान्यांमध्ये शिवसेनेने युनियन स्थापन केल्या. त्यासाठी सरपोतदारांनी अथक परिश्रम घेतले. याशिवाय, रिक्षाचालक संघटनांसारख्या संघटना स्थापन करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. दादर, शिवाजी पार्क, पार्ले, ठाणे, मुलुंड या मध्यमवर्गीय विभागात शिवसेना पोहोचवण्यात सरपोतदार यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती.

मुंबईतल्या खेरवाडी मतदारसंघातून १९९० आणि १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत सरपोतदार आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९६ आणि ९८ मध्ये त्यांनी वायव्य लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवला. पण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीतले असूनही ते मंत्रिपद मिळवण्यात कमनशिबीच ठरले होते. शिवसेना-भाजप युतीची राज्यात सत्ता आली, तेव्हा मुंबईतून किती मंत्री करायचे, या गणितात त्यांचं नाव मागे पडलं. रालोआच्या काळात ते खासदार होते, पण त्यावेळीही मंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये त्यांचं नाव नव्हतंच.

एक अत्यंत कट्टर आणि आक्रमक शिवसैनिक अशी त्यांची ख्याती होती. ९२-९३ च्या दंगलीच्या काळात सरपोतदारांच्या गाडीत शस्त्रं सापडली होती. त्याबद्दल दोषी ठरवून त्यांना एक वर्षाची शिक्षाही सुनावण्यात आली होती.

गेली काही वर्षं ते किडनीच्या विकाराने आजारीच होते. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून त्यांना दूर जावं लागलं. त्यातच, अतुल आणि शिल्पा सरपोतदार यांनी मनसेत प्रवेश केल्यानं त्यांचं स्थान आणखीच डळमळीत झालं होतं. असं असलं तरी, शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात मधुकर सरपोतदार हे नाव येईलच येईल.

मधुकर सरपोतदार यांच्या निधनाबद्दल शिवसेना नेते आणि अन्य पक्षातल्या नेत्यांनीही दुःख व्यक्त केलंय. एक कट्टर, निष्ठावान शिवसैनिक हरवल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

ब्रह्मेशानंदांचा उद्या 'जन्माष्टमी महोत्सव'

कुंडई, दि. २० : प.पू. श्री पद्मनाभ शिष्य संप्रदाय श्रीक्षेत्र तपोभूमी गुरूपाठाचे विद्यमान पीठाधीश्र्वर श्रीमद् सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांचा "जन्माष्टमी महोत्सव' येत्या २२ रोजी म्हणजेच फाल्गुन शुद्ध अष्टमी तिथीला श्री क्षेत्र तपोभूमी गुरूपीठावर भक्तिभावाने साजरा होणार आहे.
त्यानिमित्त सोमवारी सकाळी १०.३० वा. प. पू. सद्गुरू श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून हरिश मेलवानी- (खाण उद्योजक, गोवा) उपस्थित राहणार आहेत. सकाळच्या सदरात सद्गुरूंच्या हस्ते अनाथ मुलांना दानधर्म केला जाणार आहे. संध्याकाळी ६.३० वा. तपोभूमीच्या भव्य व्यासपीठावर प्रकट कार्यक्रमात गोमंतक, महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रतिभासंपन्न सेवाभावी कर्तृत्वान देवस्थान पदाधिकारी भक्तांचा महनीय मान्यवरांच्या उपस्थितीत पू. सद्गुरूंच्या हस्ते प्रातिनिधिक गुणगौरव ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार आहे. तसेच या महोत्सवाला विशेष सत्कारमूर्ती म्हणून प.पू. श्री परमात्मानंद सरस्वती स्वामीजी (महासचिव, हिंदूधर्म आचार्य सभा, राजकोट), श्री. किशनलालजी सारडा (संचालक, गुरूगंगेश्वरानंद वेदविद्यालय, नासिक), श्री. रोहित फळगावकर, संशोधक, पुरातन देवस्थान, श्री. सुहान करकल, संचालक, गोवा ३६५ न्यूज चॅनल, मा. श्री. प्रमोद महादेव गावस, देशरक्षक जवान, संत समाज दोडामार्ग, गोवा यांची महनीय उपस्थिती लाभणार आहे. पद्मनाभ संप्रदायाचे संचालित श्री ब्रह्मेशानंद वेद पाठशाळा, हातुर्लीचे गुरूजी श्री. सतीश वर्मा व श्री. ब्रह्मेशानंद वेद पाठशाळेचे गुरूजी श्री. प्रवीण वर्मा यांना ईश्वरी कार्याचे श्रीफळ पू. सद्गुरूंच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर खास उपस्थित राहणार आहेत.
श्रीक्षेत्र तपोभूमी गुरूपीठावर हजारो भाविकांच्या साक्षीने होणाऱ्या या दिव्य गौरव सोहळ्याला देवस्थान प्रमुखांनी उपस्थित राहून सद्गुरूंच्या अमृततुल्य आशीर्वादास पात्र व्हावे. उद्या तपोभूमी गुरूपीठावर जन्माष्टमी सोहळ्याला सुमारे दहा हजार भाविकांची उपस्थिती लाभणार आहे. तरी भव्य व्यासपीठ, मंडप आदी तयारी तपोभूमीवर सुरू आहे. सर्व भाविक गुरूबंधूभगिनींनी सोहळ्याला उपस्थित राहून ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन पद्मनाभ संप्रदायाचे सचिव श्री सच्चिदानंद नाईक यांनी केले आहे.

मोगूबाई संगीत संमेलनाचे मडगावी शानदार उद्घाटन

मडगाव, दि. २० (प्रतिनिधी): संगीताचे शिक्षण आत्मसात करण्यासाठी गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांनी अपार कष्ट सोसून संगीतसाधना केली आणि गोव्याला शास्त्राय संगीताची अद्भुत देणगी दिली. त्यांचाच संपन्न वारसा आज त्यांची कन्या किशोरी आमोणकर पुढे चालवत आहेत. स्वरमंच संस्था गेली नऊ वर्षे या महान गायिकेच्या नावाने खास संगीत संमेलन आयोजित करत आहे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन फातोर्ड्याचे आमदार तथा संमेलनाध्यक्ष दामोदर नाईक यांनी आज येथे केले.
रवींद्र भवनाच्या परिषदगृहात "स्वरमंच मडगाव', कला व संस्कृती खाते आणि उदयपूर येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर स्मृती संगीत संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते व्हायचे होते; पण ते अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ गायिका डॉ. अलका देव-मारूलकर यांच्या हस्ते संमेलनाचा शुभारंभ झाला.
अलका मारूलकर व आमदार दामू नाईक यांनी समई प्रज्वलित करून आणि स्व. मोगूबाई कुर्डीकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार घालून उद्घाटन केले. त्यावेळी संमेलनाच्या प्रसिद्धी माध्यम दै. "गोवादूत'चे विपणन व्यवस्थापक सागर अग्नी, सरव्यवस्थापक ज्योती धोंड, अध्यक्ष किरण नायक, डॉ. श्रीपाद वाघुर्मेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वरमंच संस्था ४६ वर्षांपूर्वी स्थापन झाली होती. संगीताची परंपरा पुढे नेण्यासाठी ती प्रयत्नत आहे. संस्थेचे निष्ठेने कार्य करत आहेत सांगून दामोदर नाईक म्हणाले, "स्वरमंच' संस्थेची स्वतःची वास्तू असावी अशी इच्छा असून ती उभारून तिचे संगीत अकादमीत रूपांतर करण्याची मनीषा आहे. ती स्तुत्य असून त्यासाठी सरकारकडून आर्थिक अनुदान मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करीन.
या संमेलनासाठी ग्रामीण भागांतील संगीताचे शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी वाहनाची व जेवणाची व्यवस्था संस्थेने केल्याबद्दल श्री. नाईक यांनी संस्थेचे अभिनंदन केले. ही व्यवस्था करणारी एकमेव संस्था आहे.
आपला कित्येक वर्षांपासून स्वरमंच संस्थेशी जवळचा संबंध आहे. या संस्थेचे संस्थापक माधव पंडित यांच्यामुळे संस्थेशी आपला संबंध आला, असे डॉ. अलका मारूलकर यांनी सांगितले.
आपल्या वडिलांबद्दल मोगुबाईना अत्यंत प्रेम होते. आजारपणातही मी भेटायला गेले तेव्हा वडिलाच्या प्रकृतीबद्दल व माझ्या गायनाबद्दल त्यांनी सर्वप्रथम विचारले होते, अशी आठवण अलकाताईंनी सांगितली.
ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. संस्थेचे अध्यक्ष किरण नायक यांनी स्वागत करून संस्थेची माहिती दिली "गोवादूत' नेहमीच प्रसिद्धीमाध्यम राहिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. ही संस्था गोव्यातील अत्यंत जुनी संस्था आहे. गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न असून यंदा निवास १०० टक्के लागला. ५ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. देव कुटुंबांनी या संस्थेचे कार्य बघून तीन विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणासाठी शिष्यवृत्या देण्यास कायम ठेव दिली आहे.
यावर्षी सदर शिष्यवृत्या संजना देसाई, शानवी कुंकळ्येकर व ऐश्र्वर्या शानभाग यांना देण्यात आल्या. संस्थेचे सचिव सुनील नाईक यांनी आभार मानले. गिरीश वेळगेकर यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनानंतर गोव्याचे योगराज बोरकर यांचे सितारवादन पार पडले. तसेच श्रुती आरती ठाकूर व पं. एम. व्यंकटेशकुमार यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

आगामी काळ भाजपच्या वैभवाचा इंदूर अधिवेशनाने दिली नवी उर्जा

प्राचार्य पार्सेकर यांचा विश्वास
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): मध्य प्रदेशातील इंदूर येथील एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आणि दोन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनाने भारतीय जनता पक्षाच्या आमदार, खासदार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये "न भुतो न भविष्यती' असा आत्मविश्वास निर्माण झाला असून या चैतन्यदायी वातावरणामुळे आगामी काळात पक्ष संपूर्ण देशात एक नवी उभारी घेईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज व्यक्त केला.
गोव्यातील पक्षाचे १४ आमदार, एक खासदार व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मिळून ४० जाणांच्या गटाचे सर्व सदस्य आज इंदूरहून गोव्यात परतले. इंदूरमध्ये मिळालेली उर्जा, भावी वाटचालीचा स्पष्ट असा दिशादर्शक नकाशा, योजना, कार्यक्रम आणि येणाऱ्या काळातील उद्दिष्टे इतकी सुस्पष्ट आहेत की, येणारा काळ हा भाजपच्या वाढीचा, वैभवाचा आणि जबरदस्त कार्यक्रमांनिशी सामान्य जनतेचा विश्वास जिंकण्याचा असेल, असे प्राचार्य पार्सेकर म्हणाले.
ते म्हणाले की, इंदूरचे संमेलन हा पक्षाच्या ध्येयधोरणांना गती आणि शक्ती देणारा एक उर्जास्त्रोत होता. पक्षाचे सर्वच्या सर्व लहान मोठे पदाधिकारी, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे नेते एका पातळीवर येऊन एकदिलाने भावी वाटचालीचा विचार करत आहेत. हा अनुभव इतका अद्भुत होता की, तीन दिवसांनी गोव्यात परतलेले आम्ही एक वेगळा उत्साह घेऊन आलो आहोतच परंतु हा उत्साह संपूर्ण देशातील कार्यकर्त्यांना एक नवीन उमेद देईल.
पक्षाचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्वतः निवड कशी योग्य होती याचाच प्रत्यय या अधिवेशनात आणून दिला. ज्या आत्मविश्वासाने त्यांनी सूत्रे हाताळली, अधिवेशनाला दिशा दिली, विचार दिला ती त्यांची क्षमता केवळ वादातीत होती. कधी काळी पक्षाच्या तिसऱ्या फळीत समावेश होणारा हा नेता आज पहिल्या फळीत आला तेव्हा त्याच्यातली क्षमता आणि आत्मविश्वास काठोकाठ भरलेला दिसला. अशा तरूण नेत्याच्या हाती पहिल्यांदाच पक्षाच्या सूत्रे आली असल्याने सगळ्याच पातळ्यांवर एक नवसंजीवनी पसरली असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले, असे प्रा. पार्सेकर म्हणाले.
महागाई आणि राष्ट्रीय सुरक्षा हे विषय हाताळण्यास केंद्रातील "युपीए' सरकारला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरातून वीस लाख सह्या गोळा करण्याचा निर्धार अधिवेशनात पक्का करण्यात आला. याच विषयांवरून सुमारे पाच लाखांचा विराट मोर्चा संसदेवर नेऊन संसदेला घेराव घातला जाईल. असे अनेक कार्यक्रम अधिवेशनात निश्चित करण्यात आले असून त्याची तितक्याच जोरदारपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.
अधिवेशनात पक्षाचे जवळपास एक हजार आमदार - खासदार आणि पदाधिकारी प्रतिनिधी मिळून पाच हजार सदस्य उपस्थित होते. त्यांच्यासाठी हजारो तंबूंची सोय करण्यात आली होती. लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, नितीन गडकरी असे सगळेच तंबूत राहिले होते. सगळे मजेत आणि आनंदात राहिले. सगळे एकत्रित राहण्याचा तो आनंद वेगळाच होता. एकसंधतेची उर्जाही वेगळी होती, असे सांगून ही उर्जा येणाऱ्या दिवसांत सर्वत्र पाहायला मिळेल असा विश्वास प्राचार्य पार्सेकर यांनी व्यक्त केला.
पहिल्या दिवशीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला स्वतः पार्सेकर, खासदार श्रीपाद नाईक, विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर, राजेंद्र आर्लेकर व महासचिव अविनाश कोळी हे उपस्थित होते. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीच्या अधिवेशनात गोव्यातून गेलेले चाळीसही जण हजर होते, असेही त्यांनी सांगितले.