Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 21 August, 2010

आता 'पीपीपी' तत्त्वावर आरोग्य खातेही चालवा

भाजपचा आरोग्यमंत्र्यांना खोचक सल्ला
'आझिलो'प्रकरणी चालढकल संतापजनक
पणजी,दि.२० (प्रतिनिधी): म्हापशातील जुन्या आझिलो इस्पितळातील काही विभाग नव्या जिल्हा इस्पितळाच्या इमारतीत हालविण्यासंबंधी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याबाबत अद्याप काहीही हालचाली होताना दिसत नाहीत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या डोक्यात "पीपीपी' चे भूतच नाचत असल्याने त्यांनी आता आपले आरोग्य खातेही "पीपीपी' तत्त्वावर चालवण्यासाठी निविदा मागवणेच रास्त ठरेल,असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हाणला.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर हजर होते.उत्तर गोव्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या सध्याच्या आझिलो इस्पितळाची दुर्दशा सर्वांनाच परिचित आहे. या इस्पितळाची दुर्दशा भाजपने सरकारसमोर मांडल्यानंतर खुद्द आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनीही त्याची खातरजमा केली होती. भाजपने याप्रकरणी १५ ऑगस्टची मुदत सरकारला दिली होती. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी विधानसभेत दिलेल्या आश्वासनामुळे भाजपने आपले आंदोलन स्थगित ठेवले असले तरी अजूनही या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने या विषयावरून भाजपला पुन्हा रस्त्यावर येणे भाग पडेल,असा इशारा यावेळी प्रा.पार्सेकर यांनी दिला.
जिल्हा इस्पितळ सुरू करण्याबाबत सरकार जनतेची फसवणूक करीत आहे हे जरी खरे असले तरी न्यायालयाचीही दिशाभूल करण्याची कृती सरकारकडून होत असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. या इस्पितळावरून आरोग्य खात्याचे अवर सचिव दत्ताराम सरदेसाई यांनी आत्तापर्यंत सहा वेळा न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून वेळोवेळी भूमिका बदलल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. या इस्पितळातील अद्ययावत यंत्रणा हाताळण्यास डॉक्टर,सल्लागार व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शवल्याने हे इस्पितळ "पीपीपी' पद्धतीवर सुरू करण्याचा विचार असल्याचे खात्यातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. ही असमर्थता दर्शवणारे हे अधिकारी कोण, हे सरकारने उघड करावे,अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ही यंत्रणा वापरण्यास आरोग्य खात्याचे अधिकारी असमर्थ आहेत याची खबर ही यंत्रणा खरेदी करताना लक्षात आली नाही काय,असाही सवाल यावेळी प्रा.पार्सेकर यांनी केला.
जुने आझिलो इस्पितळ पूर्णतः नव्या जागेत स्थलांतरित करणे एका फटक्यात शक्य नसले तरी बाह्य रुग्ण विभाग(ओपीडी) व शवागार जिल्हा इस्पितळ इमारतीत तात्काळ स्थलांतरित करण्याचे आश्वासन सरकारने विधानसभेत दिले होते. मात्र अजूनही त्या दृष्टीने सरकार चालढकलपणा करीत असल्याचा आरोप प्रा.पार्सेकर यांनी केला. या प्रकरणी सरकारचा चालढकलपणा म्हणजे जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार असून येत्या चतुर्थीपूर्वी या इस्पितळाचे स्थलांतर झाले नाही, तर भाजपला रस्त्यावर उतरणे भाग पडेल,असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. स्वाईन फ्लू प्रकरणे वाढत चालली आहेत. आरोग्य खात्याचा एकूण कारभारच हाताळण्यात आरोग्यमंत्री अपयशी ठरल्याने त्यांनी आता हे खातेच "पीपीपी' धर्तीवर चालवण्यास द्यावा,असा उपरोधिक टोला यावेळी प्रा.पार्सेकर यांनी हाणला.

पणजी पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांत 'टोळीयुद्ध'

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): आल्तिनो येथील सरकारी पॉलिटेक्निकमध्ये आज सायंकाळी विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीवरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांत जोरदार धुमश्चक्री उडाली. विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत मुलांनी पैशांचा वापर तसेच बाहेरून आणलेल्या "बाऊन्सर'चाही वापर करण्यात आल्याचा आरोप महाविद्यालयाचे प्राचार्य लुईस फर्नांडिस यांनी केला आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या दंगामस्तीची तक्रार पणजी पोलिस स्थानकात नोंद झाली नव्हती.
अधिक माहितीनुसार आज सकाळी ३३ वर्गप्रतिनिधींची निवडणूक झाली होती. यात काही विषयांत नापास झालेले विद्यार्थी तसेच महाविद्यालयात दंगामस्ती करणारे तीन विद्यार्थी पैशांच्या बळावर जिंकून आल्यावर त्या तीनही वर्गाची पुन्हा निवडणूक घेतली जाणार असल्याचा निर्णय महाविद्यालयातर्फे घेण्यात आला. त्यामुळे सायंकाळी सरचिटणीस (जीएस) पदाची होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांवर महाविद्यालयात कारवाई झाली आहे अशा विद्यार्थ्यांना निवडणूक लढविता येत नाही, असा नियम असल्याने, याची दखल घेऊन ही निवणूक पुढे ढकण्यात आल्याचे प्रा. फर्नांडिस यांनी सांगितले.
तीन वर्ग प्रतिनिधींची निवड रद्द ठरवल्याने आणि सरचिटणीसपदाची निवडणूक पुढे ढकल्याने प्रा. फर्नांडिस यांनी दोन्ही गटांना आपल्या केबिनमध्ये घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांचे दोन्ही गट समाधानी दिसले पण आपल्या केबिनमधून बाहेर गेल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या एका गटाने आणलेल्या "बाउंसर'नी दंगामस्ती करण्यास सुरुवात केली, असे प्रा. फर्नांडीस यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस त्या बाउन्सरनी अडवली. तसेच एका विद्यार्थ्याला बस मधून बाहेर काढून मारहाण करण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे. या निवडणुकीत पैसा आणि बळ वापरण्यात आल्याने सायंकाळी होणारी सरचिटणीसपदाची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. ही निवडणूक येत्या आठवड्यात घेतली जाणार असल्याचे प्राचार्य फर्नांडिस यांनी सांगितले.

आजपासून भाजपतर्फे जाहीर निषेध सभा

सरकारचा गलथान कारभार उघड करणार
पणजी, दि.२० (प्रतिनिधी): विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार सर्वच पातळीवर पूर्णतः अपयशी ठरले आहे, याचा पर्दाफाशच विरोधी भाजपने पावसाळी अधिवेशनात केला आहे. या अधिवेशनात सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांना हरताळ फासण्याचाच प्रकार सुरू असून ही असमर्थता आता थेट जनतेच्या दरबारात नेण्याचा संकल्प भाजपने केला आहे. उद्या २१ पासून सर्व तालुक्यात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले असून सरकारच्या भ्रष्टाचाराचे पाढेच जनतेसमोर वाचून दाखवले जातील,अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली.
आज इथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. वाढती महागाई,आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ, सरकारी नोकऱ्यांचा बाजार,बेकायदा खाण व्यवसायाचा उद्रेक व विविध खात्यांतील सुरू असलेला सावळागोंधळ या सभांच्या निमित्ताने जनतेसमोर नेला जाणार असल्याचे यावेळी प्रा.पार्सेकर म्हणाले.उद्या २१ रोजी पहिली जाहीर सभा वास्को येथील टुरिस्ट सभागृहात संध्याकाळी ५ वाजता होईल. या सभेसाठी "काश्मीर बचाव' चा नारा देण्यात येणार आहे. या सभेसाठी गोवा प्रदेश भाजपच्या नवनियुक्त प्रभारी आरती मेहरा हजर राहणार आहेत. या सर्व सभा संध्याकाळी ५ वाजता होणार असून आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमांनुसार २२ - कुडचडे, २५ - पेडणे - कोरगाव, २६ वेळगे- साखळी, २७- काणकोण,२८- माशेल,२९-डिचोली,३१- शिरोडा,१- मेरशी,४ फातोर्डा व ५ केपे अशा सभा होणार आहेत.
साखळी पुराला सरकारच जबाबदार
साखळीत ओढवलेल्या पूर परिस्थितीला सरकारच्या व्यवस्थापनातील भोंगळपणाच जबाबदार आहे,अशी टीका आज प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली.अंजुणे धरणाचे पाणी सोडताना त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यास अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.अंजुणे धरणाचे पाणी साखळीत आले असता तिथे पंप सुरू करण्यासाठी कर्मचारीच गैरहजर राहणे, हा सरकारच्या बेफिकीर कारभाराचा भाग आहे. साखळीत पुरप्रतिबंधक कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याने सरकार याप्रकरणी उघडे पडल्याचा ठपकाही यावेळी प्रा.पार्सेकर यांनी ठेवला.

'गोमेकॉ'त आणखी रॅगिंगचे प्रकार

अनुसूचित जाती, जमातीच्या दोन विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्गाच्या अनुसूचित जाती व जमातीतील दोन विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी अचानक वैद्यकीय शिक्षण सोडल्याने यामागे रॅगिंगचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे. याविषयीची एक तक्रार दाखल झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालयात उच्चभ्रू विद्यार्थी जातिवाचक शब्द वापरून गेल्या काही दिवसांपासून या विद्यार्थ्यांचे रॅगिंग करीत होते, असेही या तक्रारीत म्हटले असून या तक्रारीची प्रत गोव्याचे राज्यपाल डॉ. एस एस. सिद्धू, सर्व मंत्री तसेच जनजाती आयोगालाही तक्रार पाठवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रकार जोरात सुरू असून काल उघडकीस आलेला प्रकार हे हिमनगाचे टोक असल्याची चर्चा आज सुरू होती. रॅगिंग प्रकरणात नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई होताच आता रॅगिंगची आणखी प्रकरणे उघडकीस यायला लागली आहेत.
दरम्यान, काल सात विद्यार्थ्यांनी रॅगिंगची दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्या नऊ विद्यार्थ्यांवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे. आज दिवसभर त्यांनी त्या विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. मनीष उज्ज्वल या विद्यार्थ्यांच्या बळावरच हे रॅगिंग चालत होते. तसेच हा विद्यार्थी गोव्यातील काही विद्यार्थ्यांनाही हाताशी धरून पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे रॅगिंग करीत होता, अशी माहिती आज उघडकीस आली आहे. या रॅगिंगला कंटाळून पूर्वांचलातील एका विद्यार्थ्याला हॉस्टेल सोडणे भाग पडले होते. राष्ट्रीय कोट्यातून त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याचा एक भाऊही गोव्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असून तो घरापासून ५ हजार ५०० किलोमीटर लांब गोव्यात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आला आहे.
या घटनेनंतर आता स्थानिक विद्यार्थ्यांनीही रॅगिंग होत असल्याच्या तक्रारी द्यायला सुरुवात केली आहे. यात एका गोव्यातील उच्चभ्रू विद्यार्थ्यांच्या विरोधात एक तक्रार दाखल झाली असून त्याने मनीष उज्ज्वल याच्या मदतीने जातिवाचक शब्द वापरून आई, वडील तसेच प्रेयसीवरून अश्लील शिव्या देऊन रॅगिंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, संपूर्ण कपडे काढून वर्गासमोर उभे केले जाणार असल्याचीही धमकी त्याला दिली जात होती."आम्ही उच्चवर्णीय आहोत' असे म्हणूनही हॉस्टेलमध्ये छळ केला जात होता. त्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी दोन विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सोडले आहे. त्या दोघा विद्यार्थ्यांनंतर आता तो उच्चभ्रू विद्यार्थी व मनीष आता मला सतावत आहेत, असेही या विद्यार्थ्याने राज्यपालांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या दोघांबरोबर आणखी एका विद्यार्थ्याचा समावेश असून त्याचे आपल्याला नाव माहित नसल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.

बड्या धेंड्यांचा भ्रष्टाचार रोखल्यासच 'कदंब' तरेल

कर्मचारी संघटनेचा इशारा
पणजी,दि.२०(प्रतिनिधी): कदंबच्या चालक व वाहकांवर कारवाई करून महामंडळातील भ्रष्टाचार निपटून काढण्याचा आभास सध्या व्यवस्थापनाकडून निर्माण केला जात आहे. कदंब परिवहन महामंडळ डबघाईस येण्यास येथील बडी धेंडेच जबाबदार आहेत व जोपर्यंत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार नाही तोपर्यंत महामंडळ साफ होणार नाही, अशी प्रतिक्रिया कदंब चालक व इतर सहकर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्योकीम फर्नांडिस यांनी दिली.
कदंब परिवहन महामंडळाचे अध्यक्ष मगोचे आमदार दीपक ढवळीकर यांनी ताबा घेतल्यानंतर महामंडळाच्या साफसफाईचे काम हाती घेतल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. महामंडळातील गैरकारभारांवर कडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. राज्यांतर्गत व आंतरराज्य मार्गांवरील कदंब महामंडळाच्या बसगाड्यांवरील वाहकांकडून होणाऱ्या गैरकारभारांची तपासणी सुरू झाली आहे. आपल्या सेवेशी अप्रामाणिक असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज आहेच परंतु ही कारवाई नियम व कायद्याला धरून व्हावी. एखाद्याकडून गैरकारभार झाला तर त्याची योग्य पद्धतीने चौकशी करून नंतरच कारवाई करण्यात यावी,असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कदंब महामंडळातील बड्या धेंड्यांना मोकळे सोडून केवळ चालक व वाहकांनाच लक्ष्य बनवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. व्यवस्थापनांत अनेक झारीतील शुक्राचार्य आहेत व त्यांचा पर्दाफाश होण्याचीही तेवढीच गरज आहे. महामंडळाच्या खरेदी विभागाकडून मोठ्या प्रमाणात बनावट मालाची खरेदी केली जाते हे सर्वपरिचित आहे. पण याबाबत कुणीच कारवाई करीत नसल्याने या घोटाळ्यांत सगळेच सामील आहेत की काय,अशी शक्यता निर्माण झाली आहे. कदंब गाड्या कंत्राटावर देण्याच्या व्यवहारांचीही चौकशी व्हावी,अशी मागणीही यावेळी फर्नांडिस यांनी केली. महामंडळ कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केला असला तरी अद्याप योग्य पद्धतीने वेतनश्रेणी लागू न केल्याने कर्मचाऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत व्यवस्थापनाचा वाटाही योग्य पद्धतीने जमा केला जात नाही. महामंडळाकडे निधीची कमतरता असल्याचे कारण पुढे केले जात असले तरी हा कर्मचाऱ्यांवरील अन्याय असल्याचा आरोप यावेळी फर्नांडिस यांनी केला. चालक तथा वाहकांना एक दिवसाच्या आजारी रजेसाठीही वैद्यकीय दाखला आणण्याची सक्ती केली जात आहे. या प्रकारामुळेच गैरहजेरीचे प्रमाण वाढले असून एक दिवसासाठी वैद्यकीय दाखला आणावा लागत असेल तर त्यापेक्षा तीन दिवस घरी राहणेच कर्मचारी पसंत करतात,अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
महामंडळाच्या अधिकारिवर्गांची लॉबीच बनली असून आपल्या मर्जीतील अध्यक्षांची निवड झाली की तिथे ठरावीक अधिकाऱ्यांची घोळका त्यांच्यामागे असतो व आपापल्या बढत्या व इतर कामे करून घेतली जातात,अशी टिकाही यावेळी करण्यात आली. महामंडळाची आर्थिक परिस्थितीत बेताची असल्याने माजी व्यवस्थापकीय संचालक अमरसिंग राणे यांनी अधिकाऱ्यांची वाहने काढून घेतली होती. अमरसिंग राणे यांच्या बदलीनंतर आता ही वाहने पुन्हा या अधिकाऱ्यांना बहाल करण्यात आली. महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न हवेत, असेही यावेळी ज्योकीम फर्नांडिस यांनी सांगितले.
झाडूवाल्यांचा संप मागे
कदंब महामंडळाअंतर्गत विविध बसस्थानकांवर काम करणाऱ्या सफाई कामगारांना अखेर कंत्राटदाराने किमान वेतन देण्याचे मान्य केल्याने त्यांनी काल १९ पासून सुरू केलेला संप मागे घेण्यात आल्याची माहितीही यावेळी श्री.फर्नांडिस यांनी यावेळी दिली.

आण्विक उत्तरदायित्व विधेयक संसदेत मांडण्याचा मार्ग मोकळा

आक्षेपार्ह 'ऍण्ड' शब्द वगळला
नवी दिल्ली, दि. २० : प्रमुख विरोधी पक्ष भाजप आणि डाव्या पक्षांच्या दबावापुढे नमते घेत सरकारने आज आण्विक उत्तरदायित्व विधेयकातून आक्षेप असलेला "ऍण्ड' हा वादग्रस्त शब्द वगळल्याने हे विधेयक संसदेत मांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एघाद्या अणुप्रकल्पात निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघाताची नुकसान भरपाई ठरविताना विधेयकातील तरतुदीत असलेल्या "ऍण्ड' शब्दाने ही जबाबदारी कमी होत असल्याचा विरोधी पक्षांचा दावा होता. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा वादग्रस्त शब्द वगळण्याबाबत विचारविनिमय झाला आणि अखेर हा शब्द वगळून हे विधेयक संसदेत मांडण्यास मंत्रिमंडळाने परवानगी दिली. विधेयकाच्या सध्याच्या मसुद्यातील दोन उपतरतुदींमध्ये असलेल्या ऍण्ड शब्दावर विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला होता.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या स्थायी संसदीय समितीने शिफारस केलेल्या जवळपास सर्वच महत्वपूर्ण सूचना मंत्रिमंडळाने मान्य केल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी स्थायी समितीने आपला अहवाल संसदेत मांडला होता. आता हे विधेयक संसदेत मांडण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे विधेयक मांडण्याची तारीख निश्चित करण्यात येईल. या विधेयकाबाबत एकमत झाल्याचे दिसत असतानाच डाव्या पक्षांनी विधेयकातील १७(अ) आणि १७(ब) या दोन उपतरतुदींमध्ये "ऍण्ड' हा शब्द टाकल्याने सरकारवर जोरदार टीका केली होती. आधी या विधेयकाला पाठिंबा देण्याची घोषणा करणाऱ्या भाजपानेही डाव्यांच्या सुरात सूर मिसळत हा शब्द वगळण्यासाठी सरकारवर दबाव टाकला होता.

Friday 20 August, 2010

"गोमेकॉ'च्या नऊ विद्यार्थांना अटक

रॅगिंगप्रकरणी कडक कारवाईचा बडगा
-हॉस्टेलमधून निलंबित


पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षाच्या सात मुलांचे रॅगिंग केल्याप्रकरणी अंतिम वर्षाच्या ९ विद्यार्थ्यांना आज महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधून निलंबित करण्यात आले. तर, महाविद्यालयाच्या रॅगिंगविरोधी समितीने दिलेल्या पोलिस तक्रारीवरून रात्री उशिरा या नऊ विद्यार्थ्यांना अटक करून वैयक्तिक जामिनावर सोडून देण्यात आले. या प्रकरणात मनीष उज्ज्वल, वैभव सायक्या, अंकित जैन, मयूर गुप्ता, ललितकुमार दास, भानू मिश्रा, विवेक कासिर, प्रविणसेन जैन व प्रोसेनजीत हलदार या विद्यार्थ्यांना अटक झाली आहे. दरम्यान, रॅगिंगला बळी पडलेल्या त्या सातही विद्यार्थ्यांनी जबानी पोलिसांनी नोंद करून घेतली आहे.
रॅगिंगविरोधी समितीने केलेल्या प्राथमिक चौकशीत हे नऊ विद्यार्थी दोषी आढळल्याने त्यांच्याविरुद्ध भा.दं.सं. १४३, ३४१, ३५२, ५०४ व १४९ कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे यांनी दिली. रॅगिंग प्रकरणी गोव्यात विद्यार्थ्यांना अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे. न्यायालयात या विद्यार्थ्यांवर गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना वैद्यकीय शिक्षणावर पाणी सोडावे लागणार आहे. काल रात्री वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये पहिल्या वर्षाच्या सात विद्यार्थ्यांचे रॅगिंग सुरू असल्याचे उघडकीस आले होते. यावेळी हॉस्टेलचे वॉर्डन डॉ. सी पी. दास यांनी वरिष्ठ विद्यार्थी रॅगिंग करीत असल्याचे प्रत्यक्ष पाहिल्याने आज सकाळी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र हे रॅगिंग प्रकरण दि. १० ऑगस्टपासून सुरू होते, अशी माहिती मिळाली आहे.
अधिक माहितीनुसार काल रात्री ९ ते १ पर्यंत हा रॅगिंग प्रकार सुरू होता. "एमबीबीएस' अभ्यासक्रमासाठी पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रात्रीचे जेवण झाल्यानंतर खाली बोलावण्यात आले. यावेळी वरिष्ठ विद्यार्थ्यांनी त्या सातही विद्यार्थ्यांना गुडघ्यावर उभे करून प्रत्येकाला सलाम ठोकण्याचे आदेश दिले. त्यावरून प्रत्येक विद्यार्थी आपले नाव, गाव, वय असा परिचय देऊन गुडघ्यावरच थांबून वरिष्ठ विद्यार्थ्यांना सलाम ठोकत होते. यावेळी सुरू असलेला गोंधळ ऐकून रात्री १ वाजता हॉस्टेलचे वॉर्डन आल्याने त्यांनी प्रत्यक्ष हा प्रकार पाहिला. तसेच, रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्याची नावे नोंद करून घेतली.
आज सकाळी या प्रकाराची माहिती महाविद्यालयाचे डीन डॉ. जिंदाल यांना दिला असता, त्वरित रॅगिंगविरोधी समितीची बैठक बोलावण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या चौकशीत त्या नऊही विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याचे सिद्ध होताच त्याची आगशी पोलिस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली. महाविद्यालयाच्या सर्व भिंतीवर तसेच हॉस्टेलमध्ये रॅगिंगविरोधी पोस्टर व रॅगिंग करताना आढळल्यास पोलिस कारवाई होऊ शकते, अशी माहिती दिलेली असतानाही रॅगिंगचा प्रकार झाल्याने याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याविषयीचा अधिक तपास आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे करीत आहे.

दहा दिवसांनी जाग आली!
दि. १० ऑगस्टपासून सुरू असलेल्या रॅगिंगचा प्रकार रॅगिंगविरोधी समितीला एवढ्या उशिरा कसा लक्षात आला, याबद्दल आज महाविद्यालयात जोरदार चर्चा सुरू होती. हॉस्टेलमध्ये रॅगिंग होऊ नये, म्हणून त्याठिकाणी गस्तीसाठी दोन डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. हे डॉक्टर कुठे होते, तसेच विद्यार्थ्यांचे ९ वाजता सुरू झालेले रॅगिंग वॉर्डनच्या ११ वाजता कसे लक्षात आले, रात्री ११ पर्यंत हॉस्टेलचे वॉर्डन कुठे होते, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेले सर्व विद्यार्थी दि. ५ ऑगस्ट रोजी सर्व हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी आले होते. दुसऱ्या दिवसापासूनच रॅगिंग होत असल्याने दिल्ली येथील एका मुलाने आपल्या वडिलांना दिल्लीतून बोलावून घेऊन हॉस्टेल सोडले होते, अशी माहिती मिळाली आहे. रॅगिंगच्या नावाने रात्री २ पर्यंत काही विद्यार्थ्यांना गुडघ्यांवर उभे ठेवले जात होते, असेही सूत्रांनी सांगितले.

निवृत्त शिक्षक खूनप्रकरणी दिल्लीत संशयितास अटक

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - शेट्येवाडा म्हापसा येथील आल्बर्ट लुईस या निवृत्त शिक्षकाचा गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी आज दिल्ली येथे एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. हा तरुण काही महिन्यांपासून याठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी त्याचे नाव उघड करण्याचे टाळले आहे.
रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथे गेलेल्या एका पथकाने या तरुणाला अटक करून गोव्यात आणले आहे. आज सायंकाळी रेल्वेमार्गे हे पथक संशयितासह गोव्यात आले असून त्याची चौकशी केली जात आहे. उत्तर गोवा जिल्हा अधीक्षक अरविंद गावस, म्हापसा उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सेमी तावारिस, निरीक्षक राजेश कुमार त्याची चौकशी करीत होते. चौकशी प्राथमिक स्तरावर असल्याचे कारण देऊन त्याविषयीची कोणताही अधिक माहिती देण्याचे पोलिसांनी टाळले.
दि. ३ ऑगस्ट रोजी चामर्स रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या आल्बर्ट लुईस यांच्या भर दुपारी कानफटीत गोळी झाडून खून करण्यात आला होता. यावेळी यावेली मयत आल्बर्ट याची मुलगी विद्यालयातून घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली होती. खुनामागचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. दिल्ली येथून गोव्यात आणलेल्या संशयिताला कोणी खुनाची सुपारी दिली होती की त्याने अन्य कोणत्या कारणासाठी त्याचा खून केला, याचा तपास पोलिस लावत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी संशयिताच्या हाताचे ठसे सापडले होते. त्या ठस्यांचा पोलिस आधार घेत आहेत, त्यामुळे उद्यापर्यंत या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वरिष्ठ पोलिसांनी व्यक्त केली आहे.

भाजप युवा मोर्चा आणि विद्यार्थी विभागाचा विद्यापीठ कुलगुरू व कुलसचिवांना घेराव

विद्यार्थी मंडळ निवडणूक तातडीने घेण्याचे आश्वासन

पणजी,दि. १९ (प्रतिनिधी)- गोवा विद्यापीठातील गेली तीन वर्षे सतत पुढे ढकलण्यात येणारी विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक त्वरित घेण्यात यावी या मागणीसाठी आज भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा व विद्यार्थी विभागाच्या सदस्यांनी गोवा विद्यापीठात जाऊन कुलगुरू प्रा. दिलीप देवबागकर आणि कुलसचिव मोहन सांगोडकर यांना घेराव घातला.
दोन वर्षांपूर्वी विद्यार्थी मंडळावर भाजप पुरस्कृत पॅनल निवडून आले होते. मात्र सदर निवडणूक ग्राह्य धरण्यात आली नव्हती. त्यावेळी भाजप पुरस्कृत पॅनलने जोरदार निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर भाजपपुरस्कृत पॅनेल व भाजप युवा मोर्चातर्फे वारंवार निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली; मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे चवताळलेल्या भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी आज भाजप युवा मोर्चा अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत,सरचिटणीस सिद्धेश नाईक व विद्यार्थी विभाग प्रमुख आत्माराम बर्वे यांच्या नेतृत्वाखाली गोवा विद्यापीठावर धडक देऊन कुलगुरू प्रा. दिलीप देवबागकर व कुलसचिव मोहन सांगोडकर यांना घेराव घातला व गेली दोन वर्षे घेण्यात न आलेली विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ निवडणूक त्वरित घेण्याची तसेच परीक्षेचा निकाल देण्यास होत असलेला विलंब टाळावा अशी मागणी केली.
सर्वप्रथम या मंडळीने कुलसचिव मोहन सांगोडकर यांना घेराव घातला. त्यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती केली आणि त्यांना भंडावून सोडले. सुमारे एक तास सांगोडकर यांना युवा कार्यकर्त्यांच्या प्रश्नांच्या भडिमाराला तोंड द्यावे लागले. यावेळी युवा कार्यकर्त्यांनी "भारतीय युवा मोर्चा व विद्यार्थी विभागाचा विजय असो' अशा जोरदार घोषणा देऊन विद्यापीठ परिसर दणाणून सोडला. त्यानंतर कुलगुरूंच्या कक्षात जाऊन त्यांच्याकडे निवडणूक विलंबाचा खुलासा मागण्यात आला. कुलगुरू प्रा.देवबागकर यांनी या वर्षी विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाची निवडणूक घेण्याचे ठरले आहे, असे सांगितले. मात्र युवा कार्यकर्त्यांनी, त्वरित निवडणूक अधिसूचना जारी करण्याची मागणी लावून धरली व कुलगुरूंना स्पष्ट आश्वासन देण्याबाबत सुनावले. युवा कार्यकर्त्यांच्या जोरदार मागणी नंतर कुलगुरूंनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून आणून परवाच निवडणुकीची अधिसूचना काढण्याचा आदेश दिला. तसेच निकालाबाबत असलेला घोळ दूर करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले.
युवा मोर्चा अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, सरचिटणीस सिद्धेश नाईक, विद्यार्थी विभाग प्रमुख आत्माराम बर्वे, मिलिंद होबळे, रूपेश महात्मे, भगवान हरमलकर, दीपक कळंगुटकर, आदेश उसगावकर, दुर्गादास कामत, अपूर्वा पारकर, मनाली नाईक, सिद्धी नाईक,डेहला डेनिस, निकिता गावकर यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी या घेराव कार्यक्रमात भाग घेतला.
या यशस्वी घेरावानंतर डॉ. प्रमोद सावंत, सिद्धेश नाईक व आत्माराम बर्वे यांनी आपल्या मागण्या मान्य झाल्याचे स्पष्ट केले. भाजप युवा कार्यकर्ते विद्यार्थ्यांसाठी कार्य करतात व त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यात यशस्वी होतात हे आज पुन्हा सिद्ध झाल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

रसिकाला सात दिवस कोठडी

टोळी नसल्याचा पोलिसांचा दावा
डिचोली, वाळपई, दि. १९ (प्रतिनिधी) - गाडगीळ आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित रसिका ऊर्फ रशिगंधा शेटये या तरुणीला आज डिचोली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करून सात दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही टोळी नसल्याचे स्पष्ट केले आहे. रसिका ही एकटीच गाडगीळ यांना "ब्लॅकमेल' करीत होती, तिच्यासोबत अन्य कोणीही या प्रकरणात नाही, असा दावा डिचोली उपविभागीय पोलिस उपअधीक्षक बोसुयट सिल्वा यांनी केला आहे. रसिकाला सात दिवसांच्या पोलिस कोठडीत घेण्यात आले असून आम्ही तिची कसून चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गाडगीळ याच्या मृतदेहाच्या पॅंटच्या खिशात पोलिस निरीक्षकांच्या नावाने लिहून ठेवण्यात आलेली चिठ्ठी पोलिसांनी मिळाली होती. त्यात रसिका हिच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच अन्य पाच जणांचे मोबाईल क्रमांकही गाडगीळ यांनी लिहून या क्रमांकावरून धमकीचे दूरध्वनी येथ असल्याचे म्हटले होते. त्यातील काही मोबाईल क्रमांक हे रसिका हिच्या प्रियकराचे असल्याचे पोलिसांची म्हणणे असले तरी, त्या प्रियकराचा या प्रकरणात सहभाग नसल्याची "क्लिनचीट' पोलिसांनी त्याला दिली आहे.
त्याचप्रमाणे, जे "अश्लील क्लिपींग' दाखवून रसिका मयत गाडगीळ यांना ब्लॅकमेल करीत होती, ते क्लिपींगही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. याविषयी श्री. सिल्वा यांना विचारले असता ,आम्ही ती वापरत असलेला मोबाईल जप्त केला असून तो हैदराबाद येथील वैद्यकीय चाचणीसाठी पोलिस प्रयोगशाळेत पाठवून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या मोबाईलवरील क्लिपींग तिने पुसून टाकले असले तरी ते आम्ही पुन्हा मिळवू शकतो, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
मात्र, गेले अनेक दिवस पोलिसांनी रसिका हिला मोकळे सोडून तिला पुरावे नष्ट करण्यासाठी पुरेपूर वेळ दिला असल्याची जोरदार चर्चा सध्या वाळपई भागात सुरू झाली आहे.

मतदारयाद्यांत घुसडली असंख्य बोगस नावे

.. तर कोर्टात जाऊ; पिळर्ण मंचचा कडक इशारा

पणजी, दि.१९ (प्रतिनिधी) - विविध मामलेदारांनी तयार केलेल्या नव्या मतदारयाद्यांत मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नावे घुसडण्यात आल्याचा प्रकार माहिती कायद्याअंतर्गत उघड झाला आहे. आता या याद्या त्वरित रद्द करून येत्या १५ दिवसांत त्याबाबतची सारी प्रक्रिया नव्याने सुरू केली नाही तर उच्च न्यायालयात धाव घेऊ, असा झणझणीत इशारा पिळर्ण नागरिक मंचाने दिला आहे.
आज येथे बोलावलेल्या पत्ररिषदेत ऍड.यतीश नाईक यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी मंचचे अध्यक्ष प्रकाश बांदोडकर, सचिव अरुण पॉल फर्नांडिस आदी हजर होते. राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या मतदारयाद्यांत सुमारे पन्नास हजार नव्या मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. या याद्या तयार करणाऱ्या मामलेदारांनी यासाठी घालून दिलेल्या नियमांची पूर्तता न करताच ही नावे मतदारयाद्यांत समाविष्ट करण्यात आली आहेत, असा आरोप ऍड.नाईक यांनी केला. त्यांनी त्यासंबंधी माहिती हक्क कायद्याखाली मिळवलेल्या कागदपत्रांचा पुरावाही सादर केला.
या एकूण प्रकाराबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र केल्यानंतर राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या खुलाशात चक्क माफी मागण्याचा प्रकार घडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गोव्याच्या मतदारयाद्यांत बोगस मतदारांचा समावेश होणे ही गोमंतकीयांसाठी धोक्याची सूचना आहे. त्यामुळे या याद्याच रद्द होणे गरजेचे आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी राज्याचा सुवर्णमहोत्सव विकास आराखडा तयार करण्यासाठी नेमलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीला या प्रकरणाची माहिती देणारे निवेदन सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात कसे प्रकार सुरू आहेत याची माहिती डॉ. माशेलकर यांना व्हावी व त्यांनी यासंबंधी सरकारला योग्य ते आदेश द्यावेत या उद्देशानेच हे निवेदन सादर करणार असल्याचेही ऍड. नाईक म्हणाले.
सर्व आवश्यक दाखले व कागदपत्रांची छाननी करूनच मतदारयाद्या तयार केल्या जाव्यात, बोगस मतदारांचा समावेश असलेल्या याद्यांचा वापर करून राज्यात एकही निवडणूक घेण्यास मंचाचा तीव्र विरोध असेल. तशीच गरज भासली तर लढा न्यायालयापर्यंत नेला जाईल, बोगस मतदारांच्या हाती गोव्याचे राजकीय भवितव्य सोपवण्याचा हा कट कदापि साध्य होऊ देणार नाही, असा इशाराही मंचतर्फे देण्यात आला.

तिस्ता सेटलवाड यांना सुप्रीम कोर्टाची चपराक

नवी दिल्ली, दि. १९ - सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जबानीप्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सणसणीत चपराक लगावली आहे.
गोध्रा प्रकरणानंतर नरेंद्र मोदी यांनी दिलेली जबानी आणि यासंदर्भातील तपासाचा तपशील यापैकी कोणताही भाग आम जनतेसाठी खुला केला जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायलयाने आज विशेष चौकशी पथकाला बजावले. ही माहिती केवळ सरकारी वकील आणि संबंधित तपास अधिकारी यांच्यापुरतीच मर्यादित राहायला हवी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. यातील एका प्रकरणात श्रीमती सेटलवाड यांनी सरकारी वकिलांशी संपर्क साधल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सेटलवाड न्यायालयात उपस्थित होत्या. त्यांनीही आपण संबंधित वकिलाशी संपर्क साधल्याचे मान्य केले. मात्र आपण त्यांना कसलीही धमकी दिल्याचा सेटलवाड यांनी इन्कार केला. त्यावर न्यायलयाने, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. आम्ही त्याची नोंद घेतली आहे, असे सांगितले.

Thursday 19 August, 2010

गाडगीळ आत्महत्या प्रकरण रसिका शेट्ये हिला वाळपई येथे अटक

वाळपई, दि. १८ (प्रतिनिधी): वाळपईचे पोस्टमास्तर प्रकाश रामचंद्र गाडगीळ यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या आरोपावरून, नाणूस येथील रशिगंधा उर्फ रसिका शेट्ये या २३ वर्षीय युवतीला आज संध्याकाळी वाळपई पोलिसांनी अटक केली.
गाडगीळ यांच्या आत्महत्येसंबंधात "गोवादूत'ने सातत्याने पाठपुरावा करीत दोषी व्यक्तींवर कारवाई व्हावी ही जनतेची मागणी उचलून धरली होती. यासंबंधात गोवादूतमधील वृत्ताचा संदर्भ देत विधानसभेतही आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. गाडगीळ यांच्या आत्महत्येनंतर वाळपई पोलिसांनी जुजबी चौकशी करताना, २० एप्रिल रोजी रसिका शेट्ये हिला बोलावून माहिती घेतली होती, तथापि त्यानंतर चौकशी थंडावल्याचे दिसून आले. गाडगीळ कुटुंबाची व्यथा वारंवार मांडून व त्याचा सतत पाठपुरावा करीत "गोवादूत'ने पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. चार महिन्यांनी का होईना, अखेर संशयिताला अटक झाल्याने वाळपई परिसरात समाधान व्यक्त केले जात असून, इतरांचाही शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी केली जात आहे. पोलिस निरीक्षक हरिष मडकईकर अधिक तपास करीत आहेत.
दि. १८ एप्रिलच्या मध्यरात्री गाडगीळ यांनी धावे येथे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी पोलिसांनी घरात तपासणी केली असता त्यांना मराठीत लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली होती. त्यात "आपली मैत्रीण रसिका ऊर्फ रशिगंधा नाणूस येथे राहणारी ही आपल्या मोबाईलवर टिपलेले काही छायाचित्र दाखवून पैशांची मागणी करीत आहे. तसेच पैसे न दिल्यास हे छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध करू अशी धमकीही देते" असे यात म्हटले होते. तसेच काही मोबाईलचे क्रमांकही या चिठ्ठीत दिले होते. या क्रमांकावरून धमकी दिली जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. तसेच तिने आपला विनयभंग केल्याची खोटी तक्रार पोलिस स्थानकात देणार असल्याचे सांगूनही धमकावल्याचे या पत्रात गाडगीळ यांनी म्हटले आहे. रसिका हिच्याबरोबर अन्य पाच जणांचा सहभाग असल्याचा आरोप गाडगीळ यांच्या पत्नी प्रज्वलिता हिने केला आहे. वाळपई पोलिस स्थानकात रसिकाने २० एप्रिल रोजी जबानी देताना म्हटले होते की, आपल्या ब्युटी पार्लरसाठी लागणारे सामान हे पोस्टातून येत होते. ते आणण्यासाठी आपण पोस्टात जात असे. यावेळी प्रकाश गाडगीळ यांनी आपल्याशी सुत जुळवण्याचा प्रयत्न केला असता मी त्याला दटावले. तेव्हा तो माफी मागायला लागला असता मी त्याच्याकडे पैसे मागितले, अशी माहिती रसिका हिने सुरुवातीस दिली होती. वाळपई भागातीलच काही व्यक्तींचा या प्रकरणात समावेश आहे, अशी माहिती रसिकाने पोलिसांना दिल्याचे समजते.

वेश्याव्यवसायाशी संबंधित पोलिसांचे धाबे दणाणले..

म्होरक्यासह संशयितांना चौदा दिवसांची कोठडी
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): वेश्याव्यवसाय प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य दलाल कृष्णगोपाळ कुमार याच्याशी संबंध असलेले पोलिस अधिकारी तसेच अन्य पोलिसांची यादी पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी मागितली असल्याची माहिती मिळाली आहे. चार वर्षापासून कुमार गोव्यात वेश्याव्यवसाय जोरात चालवित होता. त्यात त्याला पोलिसांचेही सहकार्य मिळत असल्याचे उघड झाले होते. याच कारणावरून पेडणे पोलिस स्थानकातील एका पोलिस शिपायालाही निलंबित करण्यात आले होते. कुमार याला अटक झाल्याने अनेक पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. अमली पदार्थ व्यवहारात पोलिसांचे साटेलोटे असल्याचे यापूर्वीच उघड झाल्याने बदनाम झालेले गृहखाते आता कोणती पावले उचलते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
कुमार याची गोव्यात करोडो रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. म्हापसा येथे बंगला व अनेक ठिकाणी त्यांनी भूखंड विकत घेतल्याचे उघड झाले आहे. त्याच्या या सर्व मालमत्तेची चौकशी केली जात असून ती जप्त करण्यांचीही तयारी पोलिसांनी चालवली आहे. ही सर्व मालमत्ता वेश्याव्यवसायातून त्याने कमवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आज सायंकाळी अटक करण्यात आलेल्या संशयितांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करून चौदा दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुमार याचे गोव्यात तसेच गोव्याबाहेरही मुली पुरवण्याचे प्रचंड मोठे जाळे आहे. एक मुलगी पुरवण्यासाठी कमीत कमी दहा हजार रुपये तर, अल्पवयीन मुलीसाठी पन्नास हजार रुपये आकारले जात होते, अशीही माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. २००९ साली कुमार याने गोव्यात बराच जम बसवला होता. त्यानंतर वेश्याप्रकरणाच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकू लागल्याने व त्यात एका पोलिसालाही अटक झाल्याने त्याने आपला तळ गोवा शेजारच्या कोकणातील बांदा येथे हलवला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो पुन्हा गोव्यात सक्रिय झाल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हा प्रमुखांना मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला.
पेडणे परिसरातील पोलिस त्याच्या संपर्कात होते. ग्राहकांकडून मुलींची मागणी आल्यानंतर त्यांना तो पेडणे परिसरातच त्या आणून पुरवीत होता. त्यामुळे त्याला पेडण्यातच गाठून अटक करण्याचा वरिष्ठांनी सापळा रचला, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुलींची मागणी आल्यानंतर तो त्या ग्राहकाला आधी कळंगुट येथे जाण्यास सांगत असे. तेथे दुर्गेश राय हा त्याचा म्होरक्या त्या ग्राहकाची खातरजमा करीत असे तसेच तो कोणत्या हॉटेलमध्ये उतरला आहे, याचीही चौकशी केल्यानंतर कुमार याच्याशी संपर्क साधून मुली आणण्यासाठी हिरवा कंदील दिला जात होता. त्यानंतर बांदा येथून या मुलींना पेडणे परिसरात आणून त्या ग्राहकांच्या ताब्यात दिल्या जात होत्या.
मात्र यावेळी कळंगुट येथील त्याच्या म्होरक्यालाच पोलिसांनी आधी अटक केल्याने कुमार अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या छाप्याच्या मोहिमेची सर्व जबाबदारी हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ देसाई यांच्यावर सोपवण्यात आली होती. या कारवाईत उपनिरीक्षक विदेश पिळगावकर, हवालदार संतोष वेंगुर्लेकर, विनय श्रीवास्तव व गोविंद गावस यांनी भाग घेतला, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

२७ दिवसांत साखळीत तिसऱ्यांदा पूर

सरकार निद्रिस्त, आम आदमीची झोप उडाली
डिचोली, दि. १८ (प्रतिनिधी): साखळीत आज पहाटे ३ वाजता आलेल्या पुरामुळे सरकारी कामकाज किती गलथान आहे याचा प्रत्यय आला. काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे केरीतील अंजुणे धरण तुडुंब भरले. धरणाला धोका निर्माण होताच रात्री २.३० वाजता साखळीवासीयांना कसलीही सूचना न देता पाणी सोडण्याचा पराक्रम तेथील कर्मचाऱ्यांनी केला. पहाटे ३ वाजता बाजारपेठेत पाणी शिरू लागल्याची माहिती काहीजणांनी नगराध्यक्ष आनंद नाईक यांना दिली. त्यावेळी त्यांनी ताबडतोब सरकारी यंत्रणेला जागे करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारी जावई मात्र निद्रावस्थेत होते. त्यामुळे त्यांचे प्रयत्न विफल ठरले. प्रथम त्यांनी पंपहाऊस सुरू करण्यासाठी पंपहाऊसकडे धाव घेतली, पण पंपहाऊसला भले मोठे कुलूप लावून कर्मचारी आपापल्या घरी खुशालपणे झोप घेत होते. नंतर त्यांनी कार्यकारी अभियंता प्रमोद बदामी यांच्याशी संपर्क साधला असता ते स्वत: ६ वाजता साखळीत आले. त्याचवेळी कर्मचारीही पोचले. नंतर पंपहाऊस सुरू करण्यात आले. ३ वाजताच आनंद नाईक यांनी साखळी पोलिसांना धोक्याची सूचना देणारा सायरन वाजविण्यास सांगितले. त्यावेळी मामलेदारांची परवानगी घेतल्याशिवाय सायरन सुरू करता येणार नाही, असे त्यांना उत्तर मिळाले. सायरन तब्बल ५.३० वाजता वाजला. सकाळी पंपहाऊस बंद का होते, अशी विचारणा केल्यानंतर कार्यकारी अभियंत्याने काहीही उत्तर न देता तेथून पळ काढला. पंपहाऊसवरील बेपर्वाईबद्दल साखळी नगरपालिकेने डिचोली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली असून ताबडतोब व्यापारी, सरकारी, अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात यावी, असे निवेदन दिलेले आहे. साखळी बाजारपेठेत पाणी घुसल्यामुळे फारसे नुकसान झाले नसले तरीही प्रकरण मात्र गंभीर बनलेले आहे. गेल्या २७ दिवसांत तिसऱ्यांदा साखळीत पूर येण्याची घटना घडल्यामुळे व्यापारी वर्गाने संताप व्यक्त केला आहे. आम आदमीचे रक्षण करण्याऐवजी सरकार खुशाल झोपा काढत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे. बंदिरवाडा येथील बिगरगोमंतकीयांच्या झोपड्या या पुराच्या तडाख्यामधून वाचल्या. बोडके मैदान, म्हावळंतर रस्ता, बाजार, नंदिरवाडा, भंडारवाडा या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात पाणी साठले होते.
सरकारने करोडो रुपये पूरनियंत्रण योजनेसाठी खर्च केले. पण त्यासाठी योग्य मनुष्यबळ का दिले नाही,अशी प्रतिक्रियाही काहीजणांनी व्यक्त केली. पूर दिवसा आल्यास त्याविषयी सरकारला कोणीही माहिती देऊ शकतो पण रात्री याचा कसा पत्ता लागेल? त्यामुळे कामगारांना रात्रपाळीसाठी कामाला ठेवा असेही काही नागरिकांनी म्हटले.
प्रतिक्रिया
आनंद नाईक (नगराध्यक्ष)ः काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरापासून आम्हाला पंपहाऊसने तारले होते. पण आज त्याच पंपहाऊसने दगा दिला. आपापल्या जबाबदाऱ्या विसरून तेथील कर्मचारी खुशाल आपल्या घरी झोपा काढत होते. त्यांच्याकडून मला उचित उत्तर अजून मिळालेले नाही. हे प्रकरण गंभीर असून सरकारला याची दखल घ्यावीच लागेल. आम्ही रात्री ११ वाजता नदीची पाहणी केली होती. त्यावेळी पूर येणार म्हणून खात्रीच नव्हती. पर धरणाचे पाणी अचानक सोडल्यामुळे ही आपली ओढवली.
------------------------------------------
दिलीप देसाई (उपनगराध्यक्ष)- वाळवंटीबरोबर इतर लहान नद्यांनाही मोठ्या प्रमाणात पूर आला होता. रात्री २ वाजता हरवळे धबधबा येथील पाण्याची पातळी वाढून ती पायऱ्यापर्यंत आली होती. एकूणच हा पूर नैसर्गिक असून आम्ही त्यापुढे हतबल झालो.
----------------------------------------------------
भानुदास नाईक (मुख्याधिकारी, साखळी)- कोणाकोणाचे किती नुकसान झाले याचा पंचनामा करण्यासाठी ३ तलाठी मागविले आहेत. त्याच्या अहवालानंतर किती नुकसान झाले याचा अंदाज येईल. एकूण झालेला प्रकार मात्र विकासकामांना गालबोट लावून गेला आहे. पंपहाऊससाठी २४ तास कामगारांची गरज आहे. यासाठी आता आम्ही सरकारकडे याविषयी मागणी करणार आहोत.
----------------------------------------------------
सदानंद काणेकर (कोकणी चळवळीचे कार्यकर्ते)- पोर्तुगीज काळात साखळीची जी परिस्थिती आहे आजही तशीच आहे. सरकारने करोडो रुपये पूरनियंत्रणासाठी मोजले. पण सगळे रुपये वाळवंटीत जमा झाले. सरकार पूरनियंत्रणाच्या नावाखाली नको तिथे पैसे खर्च करतात. त्यामुळे हे होतच राहणार. आज वयाची मी ७५ वर्षे गाठली लहान असताना आजोबा पुराविषयी गोष्टी ऐकत होतो त्या आजही तशाच आहे. सरकारी खाऊ वृत्तीच याला जबाबदार आहे.
दिगंबर नाईक (पाळी गट कॉंग्रेस अध्यक्ष) - आमदार हैदराबादला गेले आहेत. आपण एकूण परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना त्यांना दिलेली आहे. त्यांच्यामार्फत सरकारकडे हा प्रश्न मांडला जाईल.

काटेबाग - पैंगिणीत आणखी एक बुडाला

काणकोण, दि. १८ (प्रतिनिधी) : काल दि. १७ रोजी इडगर - पैंगिण येथे एकजण बुडाल्याची घटना ताजी असतानाच आज (दि. १८) काटेबाग - पैंगीण येथे गालजीबाग नदीत आणखी एकजण बुडाल्याची घटना घडली आहे.
काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज काटेबाग - पैंगिण येथील पॅट्रिक फ्रान्सिस बार्रेटो हा ३५ वर्षीय इसम सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गालजीबाग नदीत गळ लावून मासेमारी करण्यासाठी गेला होता. साडे सात वाजण्याच्या सुमारास तो पाण्याच्या प्रवाहात ओढला गेला व बुडाला. घटनेची माहिती मिळताच काणकोण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधाशोध केली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांची व पर्यटन खात्याच्या जीवरक्षकांचीही मदत घेण्यात आली. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत सदर युवकाचा थांगपत्ता लागू शकला नव्हता, अशी माहिती काणकोणचे निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी दिली.
दरम्यान, काल (दि. १७) इडगर - पैंगिण येथील मोहन बाळकृष्ण च्यारी हे ५२ वर्षीय गायक कलाकार गाळये भागात जात असता सकाळी १०.३०च्या सुमारास सिमेंट - कॉंक्रीटच्या निसरड्या झालेल्या बंधाऱ्यावरून चालताना घसरून नदीच्या पात्रात पडले होते व वाहून गेले होते. त्यावेळी पोलिस, अग्निशमन दलाचे जवान व जीवरक्षकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आज संध्याकाळपर्यंत त्यांचाही शोध लागला नव्हता, अशी माहिती निरीक्षक देसाई यांनी दिली.

हिंमत असेल तर वालंकाविरुद्ध निवडणूक लढवून दाखवाच

संतप्त चर्चिल यांचे मिकींना आव्हान
मडगाव, दि. १८ (प्रतिनिधी): हिंमत असेल तर आमदार मिकी पाशेको यांनी वालंकाविरुद्ध बाणावलीतून निवडणूक लढवून दाखवावी, असे प्रतिआव्हान सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी दिले आहे. आज "नानूटे'ल येथे तातडीने घेतलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते.
काल मिकी यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातील कारभाराच्या सीबीआय चौकशीची मागणी करताना विविध आरोपांची सरबत्तीच केली होती. आरोपांची ती जंत्री आज चर्चिल यांनी फेटाळून लावली. पत्रपरिषदेत चर्चिल यांनी बांधकाम खात्यातील अभियंत्यांनाही पाचारण करून बाणावलीतील रस्ते बांधकामाबाबत मिकी यांनी केलेले आरोप कसे बिनबुडाचे आहेत ते कागदपत्रांसह दाखवून दिले. मिकी हे अशिक्षित असल्यामुळे त्यांना कागदपत्रांतील काहीच कळणार नाही, अशी संभावनाही त्यांनी केली.
बांधकाम खात्याने चार महिन्यांपूर्वी केलेला रस्ता या पावसाळ्यात वाहून गेल्याचा जो दावा मिकी यांनी केला आहे त्याचा उल्लेख करत चर्चिल म्हणाले, खात्याने हा रस्ता चार महिन्यांपूर्वी नव्हे तर सात वर्षांपूर्वी बांधला होता. नंतर त्यावर पुन्हा डांबराचा थरदेखील घातला गेलेला नाही. गेल्या उन्हाळ्यात त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम तेवढे खात्याने केले आहे. सदर रस्त्यावरील खड्यांत कवाथे लावण्याचा प्रकार हा बालिशपणा आहे. यात सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेला भाग आक्षेपार्ह असून त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
मिकी यांनी त्यांच्या कारकिर्दीत बाणावलीच्या विकासासाठी काहीही केले नाही याचा चर्चिल यांनी पुनरुच्चार करतानाच कल्वर्ट गोन्साल्विस यांनी पुढे आणलेले प्रस्ताव बाजूला सारले असे सांगितले. नेली रॉड्रिगीस यांनी ग्रामीण विकास यंत्रणेतील भानगडींबाबत केलेल्या आरोपांसंदर्भात ते म्हणाले की, नेलीच तो व्यवहार पाहत होत्या. आता त्यांना त्या पदावर काढून टाकल्यावर कंठ फुटला आहे. या भानगडीची त्यांनाच चांगली माहिती असावी, असे दिसते.
पर्यटन खात्यावर मिकींनी "वर्चस्व' निर्माण केले होते. आता मंत्रिपद गेल्याने ते अधिक वैफल्यग्रस्त होऊन तोंडाला येईल तसे बोलू लागले आहेत, असे चर्चिल म्हणाले. एवढेच नव्हे तर चर्चिल यांनी शिवराळ भाषेत मिकी यांच्या वैयक्तिक जीवनाचीही चिरफाड केली.
आपणावर कोणी कसलेही आरोप केले नाहीत; त्यामुळे आता आपली कसली चौकशी करणार, असा सवाल त्यांनी केला.

रामलिंगम राजूला जामीन मंजूर

हैदराबाद, दि. १८ : हजारो कोटींच्या सत्यम घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी बी. रामलिंगम राजू याला आज आंध्रप्रदेश १७ महिन्यांच्या कारावासानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजा एलांगो यांनी जामीन मंजूर केला. गेल्या वर्षी ७ जानेवारी रोजी त्याला अटक करण्यात आली होती. प्रकृतीच्या कारणावरून त्याला जामीन मंजूर करण्यात आला असून हैदराबादबाहेर न जाण्याची तंबीही देण्यात आली आहे. २० लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.राजूच्या जामिनामुळे आता १४ हजार कोटींच्या सत्यम घोटाळ्यातील सर्व दहाही आरोपी कारागृहाबाहेर आले आहेत.

शाळेचे छत कोसळून १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

डेहराडून, दि. १८ : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे एका प्राथमिक शाळेचे छत कोसळून झालेल्या अपघातात १८ चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले. ही घटना बागेश्वर जिल्ह्यातील कापकोट परिसरात घडली. येथील सुमगड गावात सरस्वती शिशू मंदिरचे वर्ग सुरू असतानाच पावसामुळे छत कोसळले. तेव्हा उपस्थितांपैकी अनेक मुले त्याखाली दबली. सहा विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका झाली. पण, १८ चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले. मुख्यमंत्री रमेश पोखरियाल यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून मृत बालकांच्या आप्तांना ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

गुंड सोहराबुद्दीन चकमकप्रकरण मोदींना 'क्लीन चीट'

नवी दिल्ली, दि. १८ : गुंड सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सीबीआयने "क्लीन चीट' दिली आहे. तसेच यासंदर्भात कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने फेटाळून लावला आहे.
आरोप करणाऱ्या लोकांचा हातमिळवणी करण्यामध्ये हातखंडा आहे. याआधी त्यांनीदेखील असेच साटेलोटे करत सरकारला तारले आहे. त्यामुळे अशी तडजोड करण्यात कोण तरबेज आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. आम्हाला कॉंग्रेेसशी काहीही घेणेदेणे नाही. याप्रकरणी आम्ही सरकारला मुद्यावर आधारीत पाठिंबा देत आहोत', असे भाजपचे ज्येष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कॉंग्रेसने भाजपशी साटेलोटे करत आण्विक उत्तरदायित्व विधेयकाला पाठिंबा मिळविला आहे. याकरिता सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सीबीआये क्लीन चीट दिली आहे, असा आरोप आज राजद, सपा, लोजपा आणि डाव्या पक्षांनी संसदेत केला. त्या आरोपांना उत्तर देताना नायडू बोलत होते.
आण्विक उत्तरदायित्व विधेयकासंबंधी भाजपचे जे आक्षेप होते त्यांची योग्य ती दखल घेत सरकारने त्यात आवश्यक बदल केले आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्यानंतर या विधेयकाला विरोध करण्यात काहीच अर्थ नाही. सरकारला कोंडीत पकडून वैयक्तिक हित साध्य करण्याची आमची प्रवृत्ती नाही, असा टोलाही नायडू यांनी असे आरोप करणाऱ्यांना लगावला.

Wednesday 18 August, 2010

भ्रष्ट बांधकाम खात्याची सीबीआय चौकशी करा

- मिकी पाशेको यांची जोरदार मागणी
कमिशनवर खाते चालल्याचा आरोप राजकारणात घराणेशाही घातक
मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी): भ्रष्टाचाराने बरबटून गेलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील एकंदर कारभाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी बाणावलीचे आमदार व माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केली. त्यासाठी आपण न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा संकेत दिला. भरीव कमिशन घेऊन ठेकेदारांना कामे वाटली जात असल्यामुळे गोव्यातील सर्वच रस्ते निकृष्ट दर्जाचे बनलेले आहेत व त्यासाठीच सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव व त्यांच्यामधील संघर्षाला आता नवा आयाम प्राप्त होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आज बेताळभाटी येथील आपल्या कार्यालयात खास बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बाणावली मतदारसंघातील रस्त्यांबाबत आलेमाव यांनी आपणावर केलेले सर्व आरोप त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह फेटाळून लावले. यावेळी त्यांनी सांगितले की, उलट बाणावलीतील रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामांबाबत बांधकाम खाते मंत्र्याकडून सापत्न भावाची वागणूक दिली गेली. २००७ ते २०१० पर्यंत २० कोटी रु.ची १९ कामे बांधकाम खात्याने अडवून ठेवलेली आहेत व त्यामुळेच बाणावलीतील अंतर्गत व महत्त्वाचे रस्ते खराब झालेले आहेत. २००२ मध्ये सुदिन ढवळीकर हे बांधकाम मंत्री असताना सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते, त्यानंतर ते झालेले नाही. उलट तीन महिन्यांपूर्वी केलेला मुंगुलपर्यंतचा रस्ता पार उखडून वाहतुकीस निरुपयोगी झालेला आहे व त्यावरून सदर खात्यातील भ्रष्टाचाराची कल्पना येते. गोव्यातील राजकारणात घराणेशाही आणावयाच्या प्रयत्नांना त्यांनी जोरदार आक्षेप घेतला व सांगितले लोक आता शहाणे झालेले आहेत, त्यांना नेहमीच फसविता येणार नाही हे लक्षात ठेवण्याची वेळ आलेली आहे.
पत्रकार परिषदेस बाणावलीच्या सरपंच कार्मेलीन फर्नांडिस, माजोर्डाचे विजीतेसांव सिल्वा, बेताळभाटीचे मिंगेल परेरा, उपसरपंच, पंच तसेच जिल्हापंचायत सदस्य श्रीमती नेली रॉड्रिगीस उपस्थित होत्या.
भारतीय स्वातंत्र्यदिनी बाणावली येथे वालांका आलेमाव यांच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी चर्चिल आलेमाव यांनी आपणावर केलेल्या टीकेचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, बाणावलीचा विकास का व कोणामुळे खुंटला हे लोकांना चांगलेच माहीत आहे. विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे असताना बाणावलीतील उमेदवारीची घोषणा करण्याची वेळ त्यांच्यावर का यावी? कचेरीचे उद्घाटन का करावे लागले? असे सवाल आपणास पडल्याचे ते म्हणाले.
यापूर्वी बाणावलीतून पराभव चाखलेल्यांनी भलत्याच गमजा मारण्याचे टाळावे, त्यात त्यांचेच भले आहे असे सांगून बाणावलीतील जनता खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी आहे व त्यांच्या पाठिंब्यामुळेच आपण तीनदा तेथून निवडून आलो. आठ वर्षे मंत्रिपदी असताना सर्व सामान्यांची विकासकामे केली. प्रसारमाध्यमांनाही ते ठाऊक असून, तेच याबाबतीत योग्य न्याय देऊ शकतील असे सांगून, बांधकाम मंत्र्यांनी विकास कामांसंदर्भात जनतेला फसविण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला त्यांनी दिला. लोकांची कामे घेऊन आपण संबंधित खाते प्रमुखांशी संपर्क साधला व त्यांनी आपली कामे केली. कामासाठी कुणाही मंत्र्यांना भेटण्याचा प्रश्नच येत नाही. बाणावलीतील लोक, सरपंच, पंच यांना आपण वारंवार भेटतो आणि त्यांना भेटणेच मी माझे कर्तव्य मानतो, असे ते म्हणाले. आगामी निवडणूक बाणावली की नुवेमधून लढवावी ते आपण जनतेच्या पसंतीनुसार ठरवणार असल्याचे मिकी पाशेको यांनी स्पष्ट केले.
२००७ पासून आपण बाणावलीतील विविध रस्त्यांच्या कामांची अंदाज पत्रकांसह केलेली मागणी पत्रकारांना सादर केली व आपण रस्त्याच्या विकासासाठी प्रस्ताव सादर केले होते की नाही ते तसेच लोकांची दिशाभूल नेमकी कोण करतो ते कळून येईल. माजोर्डा येथील रेल्वे भुयारी मार्ग येत्या मेपर्यंत पूर्ण होणार असून, त्यासाठी आपण कोकण रेल्वेकडे सतत पाठपुरावा केला मात्र भुयारी रस्ता पूर्ण होऊनही त्याला जोडणारे रस्ते करण्यास बांधकाम खाते टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ग्रामीण विकास योजनेची निधी एका नावेली मतदारसंघातच का खर्च केला जातो, असा सवाल त्यांनी केला. बेताळभाटी पंचायतीच्या वरच्या मजल्याचे बांधकाम तीन वर्षांपासून रखडत आहे व त्याला हीच मंडळी जबाबदार आहे असे त्यांनी सांगितले. बांधकाम खात्यात अभियंत्यांना कोणताच अधिकार नसून कोणाला निविदा द्यायच्या व न द्यायच्या हे कमिशनाच्या प्रमाणावर ठरविले जाते असा आरोपही त्यांनी केला.
नेली रॉड्रिगीस यांनी बांधकाम खात्याचे अधिकारी सरपंच व अन्य लोक प्रतिनिधीशी उद्धट वागतात असा आरोप केला. १५ ऑगस्टच्या माजोर्डा ग्रामसभेत रस्त्यांबाबत लोकांनी सरपंचांना जाब विचारला व सरपंचांनी सर्व माहिती सांगताच लोकांनी "रस्ता रोको' आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावेळी अन्य सरपंचांनी बांधकाम खात्याकडून मिळत असलेल्या सापत्न भावाच्या वागणुकीची माहिती दिली. तसेच पत्रकारांना माजोर्डा-कालाता-मुंगुल हे रस्ते नेऊन दाखविले व त्यासाठी सीबीआयमार्फत बांधकाम खात्याच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी उपस्थित सरपंच व पंचांनी केली.

कुडचिरे शाळेत सोमवारपर्यंत इंग्रजी शिक्षिकेची नेमणूक

शिक्षण संचालकांचे पर्रीकर यांना आश्वासन
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): कुडचिरे-डिचोली येथील सरकारी विद्यालयात येत्या सोमवारपर्यंत इंग्रजी विषयाच्या शिक्षिकेची नेमणूक केली जाईल, असे आश्वासन आज शिक्षण खात्याच्या संचालिका सेल्सा पिंटो यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना दिले.
श्री. पर्रीकर यांनी आज विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सावळो पांडुरंग गावकर व पंच सदस्य राजेंद्र उपसकर तसेच अनेक पालकांसमवेत शिक्षण संचालिका सेल्सा पिंटो यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. यावेळी श्रीमती पिंटो यांनी सदर शाळेत येत्या सोमवारपर्यंत इंग्रजी विषयाच्या शिक्षिकेची कंत्राट पद्धतीवर नेमणूक केली जाणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, येत्या सोमवारपर्यंत जर शिक्षण खात्याने नियुक्त केलेली शिक्षिका विद्यालयात पोहोचली नाही तर पुढील कारवाई ठरवली जाईल, असे संघाचे अध्यक्ष गावकर यांनी सांगितले.
गेल्या एका महिन्यापासून सदर शाळेत इंग्रजी विषय शिकवण्यासाठी शिक्षिकाच नसल्याने विद्यार्थ्यांनी वर्गावर बहिष्कार टाकला आहे. कालपासून विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाची शिक्षिका मिळावी यासाठी आंदोलन सुरू केले आहे. आठवी ते दहावीच्या मुलांना इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शेरॉन डायस या शिक्षिकेची २२ जुलै रोजी अन्यत्र बदली झाली होती. त्यानंतर तिच्या जागी दुसऱ्या एका शिक्षिकेची नेमणूक करण्यात आली होती. परंतु, ती शिक्षिका आरोग्य अस्वास्थ्याचे कारण देऊन कामावर रुजू झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एका विषयाची शिक्षिकाच नसल्याने इंग्रजी विषयाची परीक्षाही घेतली गेली नाही, अशी माहिती श्री. गावकर यांनी यावेळी दिली. सरकार शिक्षण क्षेत्रात प्रगती करीत असल्याच्या बाता मारत असे तरी ते सरकारी विद्यालयाला शिक्षकच पुरवू शकत नसल्याने त्याचे पितळ उघडे पडले आहे असा आरोप यावेळी पालक शिक्षक संघाने केला. विद्यार्थ्यांनी कालपासून वर्गावर बहिष्कार टाकला आहे. तरीही शिक्षण खात्याचे डोळे उघडत नसल्यास विद्यार्थी उपोषणालाही बसायला तयार असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

गोवा बचाव अभियानाची 'नगर नियोजन'वर धडक

'डीएलएफ'बाबत पक्षपात?
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): दाबोळी येथे वन क्षेत्रातील जागेत "डीएलएफ'कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या वादग्रस्त प्रकल्पाबाबत केंद्रीय वन व पर्यावरण खात्यातर्फे पाठवण्यात आलेल्या पत्रावरून गोंधळ निर्माण झाल्याने गोवा बचाव अभियानतर्फे आज मुख्य नगर नियोजक मुराद अहमद यांना धारेवर धरण्यात आले.
गोवा बचाव अभियानच्या सहनिमंत्रक सेबिना मार्टिन्स व ऍड.क्लॉड आल्वरिस यांच्या नेतृत्वाखाली अभियानाच्या शिष्टमंडळाने आज मुराद अहमद यांची भेट घेतली. अभियानकडून या प्रकल्पाला विरोध करण्यात आल्याने त्याचे बांधकाम बंद पाडण्यात आले होते. दरम्यान, या प्रकल्पासाठी केंद्रीय वन व पर्यावरण खात्याची परवानगी गरजेची असल्याने सदर कंपनीला या प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रे व नकाशे पाठवण्याचे आवाहन केले होते. याप्रकरणी मंत्रालयाच्या तज्ज्ञ सल्लागार समितीसमोर मेसर्स सरावती कन्स्ट्रक्शनतर्फे पाठवण्यात आलेल्या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुळात या प्रकल्पाचे नकाशे व कागदपत्रांना नगर नियोजन खात्याची मान्यता गरजेची आहे पण या खात्याने अशा कोणत्याही नकाशांना मान्यता दिली नसल्याचे स्पष्टीकरण मुराद अहमद यांनी केले. मुराद अहमद यांनी केलेल्या स्पष्टीकरणावरून एक तर कंपनीतर्फे मंत्रालयाची दिशाभूल करण्याचा प्रकार घडला असावा किंवा कंपनीतर्फे जुनी कागदपत्रेच पाठवण्यात आल्याचा संशय यावेळी ऍड. आल्वारीस यांनी व्यक्त केला. याप्रकरणी येत्या २० ऑगस्ट रोजी दिल्लीत सुनावणी असल्याने नगर नियोजन खात्याकडून लेखी पत्र मिळवण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

अब्दुल मदानीला अखेर अटक

कोलाम, दि. १७ : २००८ साली बंगलोर शहरात झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी आज पीडीपी नेता अब्दुल नासेर मदानी याला अटक केली आहे. याबरोबरच गेल्या काही दिवसांपासून मदानीच्या अटकेवरून जो गोंेधळ सुरू होता, त्यावर आज पडदा पडला आहे.
पीडीपी नेता मदानीने आपण स्थानिक न्यायालयात शरणागती पत्करीत आहोत, असे सांगितल्यानंतर थोड्याच वेळात बंगलोर शहराचे पोलिस उपायुक्त ओंमकारय्या यांनी केरळ पोलिसांच्या मदतीने मदानीवर अटक वॉरंट बजावले.
अन्वरासेरी कॅम्पमधे आज दुपारचा नमाज पढल्यानंतर एका वाहनामधून मदानी बाहेर आले. बाहेर येताच केरळ पोलिसांनी त्यांच्या गाडीला गराडा घातला व कर्नाटक पोलिसांना अटकेची कारवाई पार पाडू दिली. यानंतर पोलिसांनी मदानी यांच्या गाडीचा ताबा घेतला व गाडीत असलेल्या मदानी यांच्या पत्नी आणि सहायकाशिवाय इतर सर्वांना गाडीतून बाहेर काढले. कोलामचे पोलिस अधिकारी हरशिता अत्ताल्लुरी यांच्या देखरेखीखाली ही कारवाई झाली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना त्यांनी सांगितले की कर्नाटक पोलिसांनी मदानीला अटक केली आहे.
मदानी यांना अटक झाली त्यावेळी कोणीही अटक कारवाईला विरोध केला नाही. मात्र मदानीसमर्थक यावेळी घोषणा करीत होते. अटकेनंतर मदानी यांना विमानाने बंगलोरला नेण्यात आले.

वेश्याव्यवसायाच्या प्रमुख दलालासह चौघांना अटक

दोन तरुणींची सुटका
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): गोव्यात वेश्याव्यवसाय चालवणारा मुख्य दलाल कृष्णगोपळ कुमार (४०) याच्यासह त्याच्या अन्य तीन साथीदारांना आज सापळा रचून अटक करण्यात आली. यावेळी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या महाराष्ट्रातील २० व २५ वर्षीय दोन तरुणींची सुटका करण्यात आली.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली हणजूण व पेडणे पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या एका मोहिमेत मालपे पेडणे येथे सापळा रचून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी या प्रकरणात दुर्गेश ऊर्फ दीपक राय बेलपूरी (३१) कळंगुट येथील राज (५०) व राजेश कुमार या तिघांना अटक केली. तसेच, तरुणी पुरवण्यासाठी आणलेले वाहनही जप्त केले असून त्या दोन्ही तरुणींची रवानगी मेरशी येथील सुधारगृहात करण्यात आल्याची माहिती यावेळी निरीक्षक मंजूनाथ देसाई यांनी दिली. या प्रकरणाची पेडणे पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
कृष्णगोपाळ कुमार हा वेश्याव्यवसाय प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभाग, पर्वरी तसेच फोंडा पोलिसांना हवा होता. गोव्यातच तळ ठोकून गेल्या अनेक वर्षापासून तो हा व्यवसाय चालवित होता. मात्र त्याला अटक करण्यात गुन्हा अन्वेषण विभागालाही यश आले नव्हते. अधिक माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून पोलिस या टोळीला अटक करण्याच्या प्रयत्नात होते. गोपाळकृष्ण हा मूळ केरळ राज्यातील असल्याने गोव्यातील त्याचा व्यवसाय दीपक आणि राज सांभाळत होते. पोलिसांनी सर्वांत आधी राज याला अटक करून दीपक व गोपाळकृष्ण यांना अटक करण्यासाठी सापळा रचला. त्यामुळे दोन मुली पाहिजे असल्याचे सांगून बनावट ग्राहक पाठवण्यात आले. यावेळी मालपे पेडणे येथे मुली देण्यासाठी तो आला असता पोलिसांनी मुलीसह कुमार याला अटक केली. कोकणात सावंतवाडी, बांदा येथे या मुली आणून ठेवल्या जात होत्या, अशी माहिती मिळाली असल्याने रात्री पोलिसांनी याठिकाणी असलेल्या एका खोलीवर छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्याठिकाणी काय हाती लागले, याची माहिती मिळू शकली नाही.
गुन्हा अन्वेषण विभागाने छापे टाकून वेश्याव्यवसायात गुंतलेल्या अनेक तरुणींची सुटका केली होती. मात्र मुख्य दलाल कुमार याला ताब्यात घेण्यात त्यांना यश आले नव्हते. तसेच तो मोठी रक्कम मोजून आपली सहीसलामत सुटका करून घेत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. या विषयीचा अधिक तपास पेडणे पोलिस करीत आहेत.

'त्या' चारही दुर्मीळ मूर्ती वस्तूसंग्रहालयात

संचालिका राधा भावे यांनी दिलेली माहिती
पणजी, दि.१७ (सांस्कृतिक प्रतिनिधी): गुळे सत्तरी येथे दत्ता चंद्रकांत परब यांनी शोधून काढलेल्या चारही मूर्ती गोवा पुरातन वस्तुसंग्रहालयात आणल्याची माहिती गोवा पुरातन संग्रहालयाच्या संचालिका सौ. राधा भावे यांनी दिली.
सदर मूर्ती या पुरातन आणि अत्यंत दुर्मीळ असल्याने त्यांचे जतन होणे गरजेचे आहे. म्हणूनच मूर्तींसंदर्भात माहिती मिळताच दत्ता परब यांच्याशी संपर्क करून त्या वस्तूसंग्रहालयात आणण्यात आल्या. या कामात दत्ता परब यांनी मोलाची कामगिरी बजावल्याचेही त्या म्हणाल्या.
त्यामध्ये वेताळाची एक तर तीन देवींच्या मूर्ती आहेत. देवीच्या मूर्तीच्या बाजूला हत्ती असल्याने त्या मूर्ती गजांतलक्ष्मीच्या असल्याचे दिसून येते. तसेच मूर्ती जोडूनच कदंब काळाची निशाणी असल्याने त्या मूर्ती कदंबकाळातील असाव्यात, असा अंदाज आहे. वेताळाची मूर्ती १६ व्या शतकातील असावी, असेही त्या म्हणाल्या.
वेताळ मूर्तीची उंची ८७ इंच आहे. डोक्यावर नागाच्या आकृतीचा मुकुट, गोलाकार डोळे, थोडेसे उघडे तोंड व त्यातून बाहेर दिसणारे सुळे, पीळ घातलेली मिशी, मूर्तीच्या पोटावर विंचवाची आकृती असून बरगड्या स्पष्ट दिसत आहेत. उजव्या हातात तलवार धरलेली असून धारेकडील बाजू मोडली आहे; तर डाव्या हातात पात्र धरले आहे. त्याच्या हातात नागपाश आहे. गळ्यातून पायापर्यंत नरमुंड माळा असून ती पाठीमागेसुद्धा पूर्ण कोरली आहे. पायाकडील भागात ३ इंच व्यासाचे पुरुष व स्त्रियांचे मुखवटे कोरले आहेत. वेताळ संप्रदाय हा सुमारे सातव्या शतकापासून प्रचलित आहे, असे इतिहासकारांचे मत आहे.
गजांतलक्ष्मी पाषाणी मूर्तीची उंची २९ इंच लांबी ५९ इंच व जाडी ६ इंच आहे. हे शिल्प म्हणजे विविध चित्रांचा समूहच. प्रत्येक चित्र म्हणजे एक वेगळा विचार, तत्त्वज्ञान दृष्टिकोन मांडण्यात यशस्वी ठरला आहे. या पाषाणातील मूर्ती पद्मासनात असून तिच्या दोन्ही हातात फुलांसारख्या वस्तू आहेत. डोक्यावर मुकुट व गळ्यात विविध अलंकार आहेत. ही मूर्ती गजांतलक्ष्मी असल्याचे जाणवते. कारण तिच्या दोन्ही बाजूला हत्ती असून ते देवीच्या मस्तकावर घड्यातून जलाभिषेक करत असल्याचे दिसून येते. गजलक्ष्मी स्वरूपात इंद्रायणी धनलक्ष्मी आणि धान्यलक्ष्मीलाही पुजले जाते. देवीच्या हाती वज्र असते तेव्हा ती सप्तमातृकातील इंद्रायणी असते. हातात कणस असते तेव्हा ती धान्यलक्ष्मी ठरते. देशाच्या विविध भागांत ती 'केळबाई' म्हणूनच मान्यता पावली आहे.

मक्का मशिदीतील तो स्फोट 'हुजी'कडून

हिंदू शक्तींना बदनाम करणाऱ्यांना जबर चपराक
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): हैदराबाद येथील मक्का मशिदीत २००८ साली झालेल्या बॉंबस्फोटात हिंदुत्ववादी शक्तींचा हात आहे या केंद्र सरकारने चालवलेल्या प्रचाराला चपराक बसली असून या स्फोटांमागे पाकिस्तानातील हरकत-उल-जिहाद इस्लामी ("हुजी') या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या तपास यंत्रणेने शोधून काढले आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनाची नावे घेऊन त्यांना बदनाम करू पाहणाऱ्या शक्तींना जबर चपराक बसली आहे. तसेच, भारतातील अनेक बॉंबस्फोटांत "हुजी' संघटनेचा सहभाग असल्याचा दावाही या देशांच्या तपास यंत्रणेने केला आहे.
अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी (युनो) "हुजी' या दहशतवादी संघटनेवर बंदी घालताना तसेच या संघटनेचा स्वयंघोषित कमांडर इलियास काश्मिरी याला जागतिक दहशतवादी घोषित करताना या संघटनेचा मक्का मशिदीतील बॉंबस्फोटात सहभाग असल्याचे नमूद केले आहे. काश्मिरी याचा "लष्कर ए तोयबा' तसेच "अल कायदा' या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे.
"अभिनव भारत' या संघटनेवर संशय व्यक्त करण्यापूर्वी भारतातील तपास यंत्रणेनेही या बॉंबस्फोटामागे "हुजी' या संघटनेचा हात असल्याचे सुरुवातीला म्हटले होते. अमेरिकेने म्हटले आहे की, "हुजी'चे भारत आणि पाकिस्तानात जाळे आहे. या संघटनेने या दोन्ही देशांत अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. तसेच, २००७ साली वाराणशीतही या संघटनेने हल्ला घडवला होता.
अमेरिकेतील आर्थिक खाते आणि कायदा खाते यांचा सल्ला घेऊनच या संघटनेवर बंदी घातली आहे. यामुळे अमेरिकेतून "हुजी' या संघटनेला व मोहंमद ईलियास काश्मिरी यास मिळणाऱ्या मदतीच्या स्त्रोतावर नजर ठेवता येणार असल्याचे म्हटले आहे. या बंदीबरोबरच त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच, त्याच्या विदेश दौऱ्यावर आणि हत्यारे बाळगण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. या संघटनेने भारतात आणि पाकिस्तानात घडवून आणलेल्या हल्ल्यांची यादी उघड करण्यात आली आहे. यात मक्का मशिदीतील स्फोटाबरोबरच, हैदराबादेत २००७ साली झालेले दोन बॉंबस्फोट, कराची येथील अमेरिकी दूतावासासमोरील आत्मघातकी हल्लादेखील "हुजी'नेच घडवून आणल्याचे म्हटले आहे.

Tuesday 17 August, 2010

गाडगीळ आत्महत्येप्रकरणी रसिका शेट्येविरुद्ध गुन्हा नोंद

-टोळीचा हात असल्याचा पत्नीचा आरोप

डिचोली, दि. १६ (प्रतिनिधी) - वाळपईचे पोस्टमास्तर प्रकाश गाडगीळ यांच्या आत्महत्येमागे रसिका हिचाच हात असून तिने छळवणूक सुरू केल्यानेच आपल्या नवऱ्याने आत्महत्या केली. तसेच, तिच्या मागे एका मोठ्या टोळीचा हात असून अशा प्रकारे ती अनेकांना लुटत असावी, असा दावा गाडगीळ यांच्या पत्नी प्रज्वलिता यांनी केला आहे. पोलिसांनी तिची कसून चौकशी केल्यास अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात, असे तिने यावेळी सांगितले. दरम्यान, वाळपई पोलिसांनी रसिका हिच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून तिला केव्हाही अटक केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. तिच्या विरोधात खंडणी आणि आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय पोलिस उपअधीक्षक बोसुयट सिल्वा यांनी दिली.
पोलिसांनी सुरू केलेल्या तपासकामात रसिका ही गाडगीळ यांना "ब्लॅकमेल' करीत असल्याचे उघड झाले असून तिच्या खात्यात पैसेही जमा करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रसिकाचे बॅंक खाते गोठवण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
दि. १८ एप्रिलच्या मध्यरात्री गाडगीळ यांनी धावे येथे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी पोलिसांनी घरात तपासणी केली असता त्यांना मराठीत लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली होती. त्यात " आपली मैत्रीण रसिका ऊर्फ रशिगंधा नाणूस येथे राहणारी ही आपल्या मोबाईलवर टिपलेले काही छायाचित्र दाखवून पैशांची मागणी करीत आहे. तसेच पैसे न दिल्यास हे छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध करू अशी धमकीही देते ' असे यात म्हटले होते. तसेच काही मोबाईलचे क्रमांकही या चिठ्ठीत दिले होते. या क्रमांकावरून धमकी दिली जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. तसेच तिने आपला विनयभंग केल्याची खोटी तक्रार पोलिस स्थानकात देणार असल्याचे सांगूनही धमकावल्याचे म्हटले या पत्रात गाडगीळ यांनी म्हटले आहे.
"आम्ही या चिठ्ठीतील हस्ताक्षर गाडगीळ याचेच असल्याचे तपासण्यासाठी त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून त्याच्या अहवालाची वाट पाहत आहोत', असे श्री. सिल्वा यांनी सांगितले.
रसिका हिच्याबरोबर अन्य पाच जणांचा सहभाग असल्याचा आरोप प्रज्वलिता हिने केला आहे. वाळपई पोलिस स्थानकात रसिकाने जबानी देताना म्हटले होते की, आपल्या ब्युटी पार्लरसाठी लागणारे सामान हे पोस्टातून येत होते. ते आणण्यासाठी आपण पोस्टात जात असे. यावेळी प्रकाश गाडगीळ यांनी आपल्याशी सुत जुळवण्याचा प्रयत्न केला असता मी त्याला दटावले. तेव्हा तो माफी मागायला लागला असता मी त्याच्याकडे पैसे मागितले, अशी माहिती प्रज्वलीता हिने यावेळी दिली.
वाळपई भागातीलच काही व्यक्तींचा या प्रकरणात समावेश आहे. त्यामुळे गावातील अनेकांनी मला सहकार्य केले नाही, असा दावा तिने केला आहे. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपासकाम करायला हलगर्जीपणा केल्याने संशयितांनी त्यांच्या संगणकावरील महत्त्वाची माहिती नष्ट केली. पोलिस रसिकाबरोबर असलेल्या संशयितांची चौकशी का करीत नाही, असा सवाल तिने उपस्थित केला आहे. या सर्व गोष्टीमुळे मला गाव सोडणे भाग पडले असल्याचेही ती यावेळी म्हणाली.

...तेव्हाच मंगळसूत्र काढेन
प्रकाश गाडगीळ आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित रसिका ऊर्फ रशिगंधा शेट्ये हिला शिक्षा झाल्यानंतरच गळ्यातील मंगळसूत्र काढेन व कपाळावरील कुंकू पुसेन, अशी प्रतिक्रिया गाडगीळ यांच्या पत्नीने आज "गोवादूत'शी बोलताना व्यक्त केली.

कामगारांच्या वेदनेला शब्दांची धार दिलेले कविवर्य नारायण सुर्वे निवर्तले

ठाणे, दि. १६ - कामगाराच्या वेदनेला शब्दांची धार देणारे, लालबाग-परळमधील गिरणी कामगारांची वेदना सोबत घेऊन जन्मलेले, आयुष्याचे विविध रंग अनुभवलेले, रस्त्यावरल्या जगण्याचे चटके सोसताना त्यांनी कामगार चळवळीची दाहकताही जवळून पाहिलेले ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे आज ठाणे येथील "हेल्थ केअर हॉस्पिटल'मध्ये निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते श्वसनविकार आणि दम्याच्या त्रासाने आजारी होते.
आज सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव प्रभादेवीतील लोकवाङ्मय गृह येथे अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले होते. नंतर संध्याकाळी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गिरणगावातील डाव्या चळवळीत त्यांनी समाजकारणाचे धडे घेतले. आपले ते रस्त्यावरचे आयुष्य हे ' माझे विद्यापीठ ' च आहे असे त्यांनी मानले आणि ते शब्दांतही मांडले.
"कामगार आहे मी तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे'
नारायण सुर्वे यांचा पहिला काव्यसंग्रह ' ऐसा गा मी ब्रह्म! ' १९६२ मध्ये प्रकाशित झाला. त्या सुमारास ते मौज , सत्यकथा , मराठा , मांडवी , वीणा , युगांतर , भारूढ अशा काही नियतकालिकांतून कविता लिहित होते. त्यानंतरच्या चार वर्षांनी त्यांचा दुसरा काव्यसंग्रह आला. ' माझें विद्यापीठ '
कामगार जीवनाशी असलेल्या थेट संबंध असल्यामुळे कवी मनाचे नारायण सुर्वे यांनी शाळेत शिक्षक म्हणून शिकवत असतानाच कामगार चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. १९७० च्या दशकात भारत , तत्कालीन सोव्हिएट महासंघ आणि पूर्वेकडील देशांमध्ये सक्रीय कामगार नेते म्हणून त्यांची नवी ओळख निर्माण झाली. मुंबईतील कामगार संघटनेत काम करताना त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी तीव्र संघर्ष केला. तथापि, त्या मंतरलेल्या काळातही कवितेशी असणारी मैत्री त्यांनी तोडली नाही.
कवितेतून भीषण वास्तव मांडणाऱ्या नारायण सुर्वे यांना १९९८मध्ये "पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना सुवर्ण कमळ आणि १९९९च्या कबीर पुरस्काराने गौरविण्यात आले. परभणी येथे १९९५ मध्ये पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. साहित्य अकादमीवर मराठी साहित्य या विषयासाठी नेमलेल्या सल्लागार समितीवर समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
नारायण सुर्वे यांची साहित्यसंपदा
"ऐसा गा मी ब्रह्म' (१९६२)
"माझे विद्यापीठ' (१९६६)
"सनद जाहीरनामा' ( १९७८)
माणूस कलावंत
आणि समाज
सर्व सुर्वे ( संपादन: वसंत शिरवाडकर )
"कहाणी कवितेची'

महापालिका बैठकीत प्रचंड गोंधळ; चौकशी समिती स्थापन

दुकान वाटप घोटाळाप्रकरण

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - पणजी महापालिका बाजारातील दुकान वाटप प्रकरणात झालेल्या घोटाळ्यावर बोलावण्यात आलेल्या विशेष बैठकीत प्रचंड गदारोळ माजला. ज्या नगरसेवकांवर या घोटाळ्यांचा आरोप झाला आहे, त्यांनी तर अक्षरशः अकांडतांडव करून या बैठकीला मासळी बाजाराचेच स्वरूप आणले होते. तसेच, ज्यांच्या दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहे, त्यांना दुकानाची कागदपत्रे सादर करण्यास पंधरा दिवसांची शेवटची मुदत देण्यात आली आहे. या गोंधळात सत्ताधारी गटातीलच काही नगरसेवकांनी आरोपप्रत्यारोप करायला सुरुवात गेली. तर, महापौर कॅरोलिना पो आणि माजी महापौर टोनी रॉड्रिगीस यांचीही या मुद्यावरून बरीच शाब्दिक चकमक झाली. शेवटी या प्रकरणावर उजेड टाकण्यासाठी पालिका समितीची स्थापना करण्यात येऊन मध्येच राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. या अचानक सुरू झालेल्या राष्ट्रगीताच्यावेळी काही नगरसेवक आपल्या आसनावर बसून होते. त्यामुळे राष्ट्रगीताचाही या बैठकीत अपमान करण्यात आला.
पणजी महापालिका बाजार संकुलातील दुकाने लाखो रुपयांत विकण्यात आल्याचा घोटाळा विरोधकांनी उघडकीस आणल्यानंतर आज यावर खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ४.३० वाजता बैठकीला सुरुवात होताच बैठकीत प्रचंड गदारोळ सुरू झाला. विरोधकांनी घोटाळ्याबद्दल बोलायला सुरुवात करताच प्रचंड गदारोळ सुरू झाला. यावेळी नगरसेवक उदय मडकईकर, स्वीकृत नगरसेवक दया कारापूरकर यांनी तावातावाने बोलायला सुरुवात केली. तसेच, कोणी घोटाळा केला, असा उलट प्रश्न करून दुकान वाटपाची पालिकेकडे कोणतीही कागदपत्रे असल्यास ती दाखवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी २००३ पासूनची कोणतीही कागदपत्रे पालिकेत उपलब्ध नसल्याचे पालिका आयुक्त एल्विस गोम्स यांनी सांगितले. यावेळी महापौर कॅरोलिना पो यांनी आपल्या कार्यकाळात हा घोटाळा झाला नसल्याचा दावा करीत तो यापूर्वीच झाला होता, असा आरोप केला. त्यावेळी माजी महापौर टोनी रॉड्रीगीस यांनी उभे राहून सरळ पो यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. "मी तीन वर्षे महापौर होतो. तेव्हा कोणताही घोटाळा झाला नाही. तसेच, पालिकेचे दुकान फोडून त्याला नवीन शटर बसवण्याची हिंमत कोणाची झाली नाही, असा दावा करून हे सर्व तुमच्यात कार्यकाळात सुरू आहे' असा आरोप श्री. रॉड्रिगीस यांनी श्रीमती पो यांच्यावर केला. तसेच, या दुकानांची कोणतीही कागदपत्रे सापडत नसल्यास त्याला पालिकेच्या प्रशासन वर्गाला जबाबदार धरा, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याने त्याची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत केली जावी, अशी जोरदार मागणी यावेळी नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी केली. मात्र ही मागणी ताबडतोब फेटाळून लावण्यात आली. पालिकेतील दुकानांकडून कोणतीही महसूल पालिकेला येत नाही, त्यामुळे पालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. ही दुकाने पालिकेची मालमत्ता आहे, असा दावा यावेळी अविनाश भोसले यांनी केला.
दुकानांचे वाटप मनमानीपणे करण्यात आले आहे, असा आरोप होताच, श्री. रॉड्रिगीस यांनी ही दुकाने ज्यांची आहेत, त्यांच्याशी रक्ताचे नाते असलेल्याच व्यक्तीच्या नावे ती करावीत, अशी सूचना बाबूश मोन्सेरात यांनी केल्याची आठवण यावेळी करून दिली. जुना बाजार मोडल्यानंतर जे लोक रस्त्यावर बसून विक्री करीत होते, त्यांनीही याठिकाणी दुकाने देण्यात आल्याचा आरोप यावेळी उदय मडकईकर यांनी केला. याची २००३ सालापासून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी मडकईकर यांनी केली.
काही नगरसेवकांकडे वीस वाहने आहेत, हे महापौर यांचे वक्तव्य एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने नगरसेवक उदय मडकईकर यांनी महापौरांवर जोरदार हल्ला चढवला. कोण हा नगरसेवक, त्याचे नाव महापौरांनी उघड करावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. यावेळी बिथरलेल्या महापौरांनी सरळ त्याठिकाणी पत्रकारांना बसण्यासाठी असलेल्या जागेकडे बघत त्या वर्तमानपत्राचे कुणी असल्यास त्याने उभे राहून त्या बातमीबद्दल स्पष्टीकरण द्यावे, असे फर्मान सोडले. शेवटी काही नगरसेवकांनीच महापौरांना खाली बसण्यास भाग पाडले. शेवटी गोंधळातच या बैठकीचा समारोप करण्यात आला.

जनरोषामुळे खासदारांची वेतनवाढ लांबणीवर

-रवींद्र दाणी
नवी दिल्ली, दि. १६ - खासदारांच्या वेतनात पाच पट वाढ करणारे विधेयक काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. चार प्रमुख मंत्र्यांच्या आक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आला, असे समजते.
सध्या खासदारांना दरमहा १६ हजार रुपये वेतन दिले जाते. ते वाढवून भारत सरकारच्या सचिवांपेक्षा एक रुपयाने जास्त म्हणजे ८०००१ रुपये एवढे करण्याची शिफारस खासदारांचे वेतन व भत्ते ठरविणाऱ्या समितीने केली होती. विशेष म्हणजे सरकारच्या सूचनेनुसार समितीने आपल्या शिफारसी तयार केल्या होत्या. समितीला आपले कामकाम तातडीने पूर्ण करुन याबाबतीत आपल्या शिफारसी करण्यास सांगण्यात आले होते. याच समितीने खासदारांचे वेतन ८०००१ रुपये करण्याची शिफारस केली होती.
मंत्रिमंडळात मतभेद
सरकारने या शिफारसींवर विचार करुन खासदारांचे वेतन दरमहा ५० हजार रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला होता व तसा निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेतला जाणार होता. पण अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सध्याच्या स्थितीत असा निर्णय घेणे उचित ठरणार नाही, असे बैठकीत सांगितले. महागाई, राष्ट्रकुल स्पर्धा , काश्मीर या आघाडीवर सरकारला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. अशा पार्श्वभूमीवर सरकारने खासदारांचे वेतन वाढविण्याचा निर्णय घेतल्यास त्यावर प्रतिकुल प्रतिक्रिया नोंदविली जाईल, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही सध्याच्या स्थितीत ही वाढ करणे योग्य होणार नाही असे सांगितल्याचे कळते.
तीन गट
खासदारांच्या वेतनवाढीच्या मुद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन गट पडले होते, असे सांगताना एक सूत्र म्हणाले, काही मंत्री वेतन वाढविण्याच्या विरोधात होते, काहींचा वेतनवाढीस पाठिंबा होता तर काहींनी वेतनवाढीचा प्रस्ताव काही काळासाठी स्थगित ठेवण्याची सूचना केली.मंत्रिमंडळाने वेतनवाढीचा प्रस्ताव फेटाळलेला नाही तर तो फक्त स्थगित ठेवला आहे, असे एका वरिष्ठ मंत्र्याने नंतर प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले. मात्र खासदारांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव ५० हजाराचा आहे की ८०००१ रुपयांचा आहे हे सांगण्यास या मंत्र्याने असमर्थता व्यक्त केली.

पणजीत आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शन

ऑक्टोबरमध्ये आयोजन, सत्तर लाख खर्च अपेक्षित

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - राज्यात पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय "पर्यटन मार्ट'चे (खास प्रदर्शन) आयोजन येत्या १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान पणजीच्या कांपाल येथील बांदोडकर मैदानावर करण्यात येणार असून यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवसायिक भाग घेणार आहेत. त्यासाठी सुमारे ६५ ते ७० लाख रुपये खर्च येणार आहे. ही माहिती पर्यटन विकास महामंडळाचे संचालक निखिल देसाई यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन संचालक स्वप्निल नाईक, राल्फ डिसोझा, शाल्डन सतवानी व गौरीश धोंड उपस्थित होते.
या मार्टसाठी गोव्याच्या शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना सामावून घेतले आहे. यामुळे पर्यटनाला अधिक बळकटी येईल. तसेच यासंदर्भात गोव्याने महाराष्ट्र, कर्नाटकशी हातमिळवणी केली असली तरी त्यामुळे गोव्यात येणारे पर्यटक कमी होणार नाही, असा दावा देसाई यांनी केला.
या "मार्ट'साठी आर्थिक मदत मिळवण्याकरिता केंद्रीय पर्यटन खात्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे केंद्राकडून २५ लाख रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे. या मार्टचा गोव्याला लाभ होणार आहे. याठिकाणी येणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवसायातील व्यक्तींच्या सुचनांचा फायदा होणार असून त्याद्वारे गोव्यातील पर्यटन व्यवसायामध्ये बदल केले जातील, असे स्वप्निल नाईक यांनी सांगितले. गोव्याला दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशीविदेशी पर्यटक भेट देतात. त्यांना कशा स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देता येतील यादृष्टीने सदर मार्ट फायदेशीर ठरेल, असा आशावाद याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

काश्मीरातील दीर्घ कारवाईत तिघा दहशतवाद्यांचा खातमा

श्रीनगर, दि. १६ - जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सोरन घाटीतील (ठाणामंडी तालुका) घनदाट जंगलात राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिस यांनी संयुक्तपणे दहशतवाद्यांविरुद्ध सुरू केलेली कारवाई ५० तासांनंतर संपली आहे. सलग तीन दिवस चाललेल्या या कारवाईत कारवाईत तिघे दहशतवादी ठार झाले असून ३८व्या राष्ट्रीय रायफलचा एक जवान (एस के सिंह) शहीद झाला आहे.
मेजर सुशील महापात्रा, खास अधिकारी इफ्तिकार मलिक, हवालदार नासीर अहमद आणि अद्बुल रझाक हा नागरिक असे तिघे या कारवाईदरम्यान जखमी झाले आहेत. मेजर महापात्रा यांना गंभीर जखमी झाल्यामुळे लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अन्य तिघांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, चकमकीत ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. त्यांची ओळख पटली आहे. दहशतवाद्यांची नावे अनुक्रमे सज्जद काश्मीरी, अबू कामरान आणि झरगर अशी आहेत.

Monday 16 August, 2010

लेनला वास्तव स्वीकारायचे नाही

खुद्द लेन नमूद करतो, The British Resident Grant Duff wrote his book with the purpose of portraying Shivaji as plunderer and a freebooter and his Swaraj movement as historical accident, a forest fire in the pearched grass of Sahyadri mountains..... In opposition to Grant Duff, virtually every Maharshtrian writer after Phule saw Shivaji as the father of a nation, a liberationist .... what was never really questioned was the primordial category of 'nation' and nobility of that nation's father Shivaji (पृ ७०). येथे नोंद केली पाहिजे की ग्रॅंट डफसुद्धा शिवाजीचे राज्य न म्हणता स्वराज्य म्हणतो.
परत एकदा लेनचे मानसिक दुखणे येथे बळावते. त्याला भारत हा एक देश आहे हे वास्तव स्वीकारायचेच नाही. त्याच्या मते महाराष्ट्रीय इतिहासकार आणि लेखकांनी हा एक सूत्रात बांधलेला देश आहे या गृहीतकालाच स्वीकारू नये.
लेनने शिवचरित्र संदर्भात तीन प्रमुख व्यक्तींच्या दृष्टिकोनांची चर्चा केली आहे. तो लिहितो की अनेक लेखकांचे लिखाण लक्षात घेऊनही 'I will confine my discussion here to consideration of three turn - of - the - century figures who represent distinct movements or visions, and employ the Shivaji legend with differing ideological strategies in conceiving and independence from Britain (पृ. ७०). त्यात पहिले नाव श्री. केळुस्करांचे आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र लिहून १९०७ साली छत्रपती शाहूंना समर्पण केले. दुसरे नाव लोकमान्य टिळकांचे आहे. लोकमान्य टिळकांनी शिवचरित्र लिहिले नाही, पण शिवाजी उत्सव सुरू केला आणि स्वराज्य विषयक चळवळीला स्फूर्तिस्थान दिले.
लो. टिळकांच्या या उपक्रमाबाबत लेन लिहितो, 'He saw in Shivaji a hero who in earlier age rejected the legitimacy of status quo Islamicate rule, just as he himself hoped to reject the legitimacy of Biritish rule. (पृ. ७२)
तिसरे नाव म. गो. रानडे यांचे. रानड्यांनी `The rise of Maratha Power' हा प्रबोधनात्मक ग्रंथ लिहिला. एक नमूद केले पाहिजे की या वेळेपर्यंत शिवचरित्रांची साधने गोळा करण्यास सुरुवात झाली नव्हती.
न्या. रानड्यांनी शिवाजीकालीन सामाजिक स्थितीची मीमांसा करताना त्यावेळी झालेल्या जनजागृतीच्या मागे संतांची शिकवण आणि सामाजिक प्रबोधन यावर भर दिला. त्याला शिवाजी महाराजांच्या सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाची जोड लाभताच स्वराज्य निर्माण झाले. लेनच्या मते रानड्यांच्या या ग्रंथाने - जे शिवचरित्र नव्हते - भारतीयांमध्ये राष्ट्रीय भावनेचा उदय झाला.
या संदर्भात न्या. रानड्यांचा हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिण्याचा हेतू काय होता याबाबत लेनने निरर्थक प्रश्न उपस्थित केले आहेत. 'Who was Ranade writing for? His British employers? To convince them that they ruled a nation that, like theirs, had gone through a kind of Reformation and enligtenment that gave the region a Vernacular language, tolerant inclusive national religion and a common patriotism that overcame class distinctions? or was he writing for his fellow indian reformers, who were committed to the idea that the colonial period would be a period of education, a school in which Indians could learn the fundamentals of nation building, religious tolerance, enlightened social reform, egalitarian patriotism? or was he responding to a sort of internalised external audience, the British interlocutor now deeply lodged in his double consciousness? (पृ. ७५)
वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सहजपणे मिळतात. रानडे ज्यांची नोकरी करत होते त्या इंग्रजी राज्यकर्त्यांना पटवून देण्याची - ते ही एक पुस्तक लिहून- शक्यता नव्हती. तसे असते तर इंग्रज केव्हाच भारत सोडून चालते झाले असते. भारतीय आशा आकांक्षांशी सहमत असणाऱ्या ब्रिटीश नागरिकांची संख्या नगण्य होती. त्यांना पुस्तकातील मजकूर पटला असता तरी राज्यकर्त्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या कामी तो आला नसता. राहता राहिले भारतीय नागरिक! ते पारतंत्र्याच्या जोखडाखाली, लो. टिळकांच्याच शब्दांत सांगायचे तर ते थंड झालेल्या गोळ्याप्रमाणे निष्क्रिय होऊन पडले होते. त्यात प्राण ओतण्याचे काम या रानड्यांनी केले असे लो. टिळकांनी न्या. रानड्यांवर लिहिलेल्या श्रद्धांजलीपर लेखात रानड्यांच्या कार्याचे मूल्यमापन केले आहे. ते "एतद्देशीयांमध्ये' जागृती आणण्यासाठी झटत होते.

कांदोळी येथे होडी उलटून दोघे बुडाले

म्हापसा, दि. १५ (प्रतिनिधी) - कांदोळी येथे समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या सदानंद शांताराम कांदोळकर (४६) व संजय भालचंद्र हरमलकर (३०) टिटोवाडा नेरुल या दोघा जणांना आज समुद्रात रुतून बसलेल्या रिव्हर प्रिन्सेस जहाजानजीक जलसमाधी मिळाली, तर दोघे सुखरूप बचावले. ही घटना सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. एकाचा मृतदेह मिळाला असून रात्री उशिरापर्यत संजय याचा मृतदेह हाती लागलेला नव्हता. किनारा रक्षक दलाच्या साहाय्याने उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.
अधिक माहितीनुसार, सदानंद कांदोळकर, त्याचा भाऊ गोपाळकृष्ण कांदोळकर, केरी पेडणे येथील त्यांचा कामगार भोलाराम सुनील दास (३६) व नेरुल येथील संजय हरमलकर हे चौघे पहाटे पाच वाजता फायबरची बोट घेऊन मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात उतरले होते. समुद्र खवळलेला असल्याने एका मोठ्या लाटेत त्यांची होडी समुद्रात उलटली व चौघेही पाण्यात फेकले गेले. त्यातील गोपाळकृष्ण व भोलाराम या दोघांना पोहून समुद्राच्या किनाऱ्यावर येण्यात यश आले. तर, सदानंद व संजय यांचा उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. घटनेनंतर किनाऱ्यावर असलेल्या जीवरक्षकाने त्यांना वाजवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्याला यश आले नाही. अथक प्रयत्नानंतर सदानंद याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठविला. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संजय याचा मृतदेह शोधण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक गौरेश परब करीत आहेत.

घटक राज्यावेळी विशेष दर्जा का घेतला नाही ?

शशिकलाताईंचा प्रतिटोला

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)- गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार आहेत. त्यांनी सुरू केलेल्या काही गोष्टींचा पाठपुरावा करण्यातही अपयशी ठरलेल्या सरकारला त्यांना दूषणे देण्याचा कोणताच अधिकार पोहचत नाही. गोव्याला विशेष राज्याचा दर्जा हा मुक्तीनंतर नव्हे तर गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यावेळी पदरात पाडून घेणे योग्य होते, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा स्व.भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कन्या शशिकलाताई काकोडकर यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोव्याला विशेष राज्याचा दर्जा न मिळण्यामागे गोवा मुक्तीनंतरच्या तत्कालीन नेतृत्वावर अर्थात अप्रत्यक्ष भाऊसाहेब बांदोडकर यांच्यावरच ठपका ठेवण्याचा प्रकार काल घडला. यासंबंधीचे वृत्त दै. "गोवादूत' मधून प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या वृत्तासंबंधी अनेकांनी कामत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे पत्रकारांवरच दोष ठेवत आपल्या तोंडी कुणीतरी चुकीचे वृत्त घातल्याची भूमिका घेतली. राजभवनावर चहापानावेळी आपण मुख्यमंत्र्यांना या वृत्तासंबंधी विचारले, असे ताई यांनी एका वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आपण असे म्हटलेच नाही,असा पवित्रा कामत यांनी त्यावेळी घेतला,असे त्यांनी नमूद केले. मुक्तीनंतर गोव्याला संघप्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता व त्यामुळे त्याकाळात गोव्याला विशेष राज्याचा दर्जा मिळवून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गोव्याला खरोखरच विशेष राज्याचा दर्जा मिळावा अशी जर कॉंग्रेसची इच्छा होती, तर १९८७ साली गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला, त्यावेळी ही मागणी पदरात पाडून का घेण्यात आली नाही, असा प्रतिसवाल श्रीमती काकोडकर यांनी यावेळी केला.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी या वृत्ताबाबत मौन धारण करणेच पसंत केले. आपण मुख्यमंत्र्याशी यासंबंधी बोललो तेव्हा त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य केल्याचा इन्कार केला, अशी माहिती ढवळीकर यांनी दिली. या वृत्तामुळे राज्यातील भाऊ समर्थकांत मात्र तीव्र नाराजी पसरली आहे. गोव्याचे वाटोळे करण्यासाठी पुढे सरसावलेल्या नेत्यांनी भाऊंच्या स्वच्छ प्रतिमेवर चिखलफेक करण्याचा दुरान्वयेही प्रयत्न करू नये, अन्यथा अशा वाचाळगिरीला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराच यावेळी त्यांनी दिला.

वालंका बाणावलीतूनच निवडणूक लढविणार

चर्चिल आलेमाव यांनी दंड थोपटले

मडगाव, दि.१५ (वार्ताहर) - "कॉंग्रेसचे तिकीट मिळो वा न मिळो, पण वालंका येत्या विधानसभा निवडणुकीत बाणावलीतून रिंगणात उतरणारच,' असे स्पष्ट संकेत सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल यांनी आज बाणावली येथे दिले. त्यामुळे यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष ठरणार असल्याचे स्पष्ट झाले.
आज स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर बाणावली येथील होली ट्रिनिटी चर्चजवळील अवर लेडी ऑफ ऍझम्पशनमध्ये वालंका यांच्या प्रचार कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. एकप्रकारे त्यांच्या प्रचाराचा नारळच फोडल्यासारखा बार उडवून देण्यात आला.
चर्चिलखेरीज नगरविकास मंत्री ज्योकिम आलेमाव, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष श्रीमती मारिया रिबेलो, मडगावचे नगराध्यक्ष साव्हियो कुतिन्हो, प्रतिमा कुतिन्हो,फातिमा आलेमाव, जिल्हापंचायत सदस्य, नावेली व बाणावली मतदारसंघांतील सरपंच पंच यांची व्यासपीठावर गर्दी होती.
वालंकाच्या पाठीशी लोकांची ताकद एकवटली आहे. ती ओळखून पक्षाने तिला तिकीट द्यायला हवे. ते दिले तर बरेच झाले; पण ते मिळाले नाही तर ती लोकांच्या पाठिंब्यावर रिंगणात उतरेल हे नक्की. यासंदर्भात त्यांनी नावेलीत आपणाला लोकांनी दिलेले प्रेम व पाठिंबा याचे उदाहरण दिले. त्यावरून कॉंग्रेस नेत्यांनी योग्य तो बोध घ्यायला हवा, असेही ते म्हणाले. त्यांनी नाव न घेता मिकी पाशेकोंवर टीका केली व तेथील खुंटलेल्या विकासाला तेच जबाबदार असल्याचे सांगितले.आता बाणावलीतील विकासकामांबाबत वालंकाशी संपर्क साधा व ती पूर्ण करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
घराणेशाहीच्या राजकारणावर बोलणाऱ्यांची त्यांनी निर्भत्सना केली. येथे घराणेशाहीचा प्रश्र्नच उद्भवत नाही नेहरू व गांधी घराण्याने देशासाठी काम केले. म्हणूनच लोकांनी त्यांच्या हाती सत्ता दिली, असे ते म्हणाले.
मंत्री ज्योकिम आलेमाव यांनी कॉंग्रेसने गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्र्वासनाला जागून वालंकाला तिकीट द्यायलाच हवे, तिला ते हमखास मिळेल, अशी खात्री व्यक्त केली. त्यांनी बाणावलीतील लोक आजवरच्या घडामोडींतून योग्य तो धडा घेतील असे सांगताना हा मतदारसंघ म्हणजे कोणाची खासगी मालमत्ता नव्हे, असा टोला मिकी समर्थकांना लगावला. वालंकाविरुद्ध अफवा उठविणाऱ्यांनी बाणावलीत तिच्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
आपले आजवरचे काम पाहून कॉंग्रेसकडून आपणास बाणावलीतून तिकीट मिळेल असा विश्वास वालंका आलेमाव यांनी व्यक्त केला. मात्र यदाकदाचित ते मिळाले नाही तर आपण लोकांप्रत जाऊन त्यांचा कौल मागेन. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवेन त्यासाठी कोणाशीही टक्कर देण्यास आपण समर्थ आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पंचायत अध्यक्ष श्रीमती मारिया रिबेलो यांनी आपणाविरुद्ध अपप्रचार करणाऱ्यांचा समाचार घेताना, आपले संपूर्ण कुटुंब वालंकाबरोबर असल्याचे जाहीर केले. ऍड माईक मेहता, ऍड. प्रतिमा कुतिन्हो, कल्वर्ट गोन्साल्विस, घनःश्याम शिरोडकर, बबीता वाझ, अँथनी पिंटो व इतरांची भाषणे झाली. कार्यक्रमाला बाणावलीतील हजारांहून अधिक चर्चिलसमर्थक हजर होते. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडावा - पंतप्रधान

राजधानी दिल्लीत स्वातंत्र्यदिन उत्साहात

नवी दिल्ली, दि. १५ - नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून थेट चर्चेच्या टेबलावर यावे असे आवाहन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज ६४व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याप्रसंगी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केले. पंतप्रधानांनी सलग सातव्या वर्षी लाल किल्ल्यावर तिंरगा फडकावला.
महागाई कमी करणे आणि शेतकऱ्यांचे हित जपणे यासाठी अनेक सवलती देण्यात येत आहेत. धान्याची बाजारभावांपेक्षा जास्त किमतीने खरेदी करण्यात येत आहे. या सगळ्यामुळे तिजोरीवर पडणारा ताण सहन करणे कठीण झाल्यामुळेच आम्ही पेट्रोल आणि डिझेलवर कर लागू करून महसुली उत्पन्न मिळवत आहोत. परिस्थिती अशी आहे की, इंधनाच्या दरावर नियंत्रण ठेवणे अवघड झाले आहे. तरीही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी शक्य ते प्रयत्न करू, असे पंतप्रधान म्हणाले.
देशाच्या विकासासाठी औद्योगिक आणि कृषी उत्पन्नात वाढ होण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. कृषी विकासाचा दर किमान चार टक्के राहावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. देशातील प्रत्येकाला उत्तम शिक्षण आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी ठोस कार्यक्रम राबवत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील सगळ्या राजकीय पक्षांना तसेच सरकारविरोधी आंदोलने करणाऱ्या गटांना चर्चेचे जाहीर आमंत्रण दिले.

उत्कर्षा मृत्युप्रकरणी तपास पूर्ण

आता प्रतीक्षा "व्हिसेरा' अहवालाची

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) - उत्कर्षा परब या ब्रह्माकरमळी येथील युवतीचे अपहरण आणि मृत्युप्रकरणी सुरुवातीच्या तपासकामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून दोघा पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या तपासाचा अहवाल तयार झाला असून तो पोलिस खात्याचे उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. "या प्रकरणाचा तपासकाम पूर्ण झाले असून आम्ही केवळ "व्हिसेरा'च्या अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत. तो हाती येताच संशयितांवर आरोपपत्र दाखल केले जाणार आहे'' असे आज उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी सांगितले.
उत्कर्षाच्या खुनाचे पडसाद नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात उमटल्यानंतर डिचोलीचे उपविभागीय पोलिस उपअधीक्षक बॉसेट सिल्वा यांना या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणारी उत्कर्षा हिला खोटी माहिती देऊन पळवून नेण्यात आले. त्यानंतर तिला एका ठिकाणी कोंडून ठेवण्यात आले. तेथे तिला विष घातलेला शिरा दिल्याने तिचा मृत्यू झाला, असा आरोप मयत उत्कर्षाच्या वडिलांनी तिच्या मामीवर करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात मामी सौ. गावकर व तिच्या आई वडीला अटक करून पोलिस कोठडीत टाकले होते. सध्या या तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
उत्कर्षाचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूमागील नेमके कारण डॉक्टरांना सापडले नव्हते. त्यामुळे तिचा "व्हिसेरा' हैदराबाद येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. या व्हिसेराचा अहवाल येताच तिला विष देऊन मारण्यात आले होते की अन्य कोणत्या कारणामुळे तिचा मृत्यू झाला हे उघड होणार आहे.
सुरुवातीला संशयितांवर कारवाई करण्यास वाळपई पोलिस स्थानकाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी दिरंगाई केल्याचा आरोप करून स्थानिक लोकांनी पोलिस स्थानकावर मोर्चा काढला होता. पोलिस राजकीय दबावाखाली येऊन संशयितांना संरक्षण देत असल्याचा आरोप करताच पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले होते. तसेच, वरिष्ठांनी याची दखल घेतल्यानंतर निरीक्षक वायंगणकर व पोलिस उपनिरीक्षक तेरेंझ वाझ यांची पोलिस मुख्यालयात बदल करण्यात आली होती.
विधानसभा अधिवेशनात विरोधकांनी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांना चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आले होते. मात्र तो अहवाल विधानसभा सुरू असताना पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे आता वरिष्ठ पोलिस अधिकारी या अहवालावर कोणती भूमिका घेतात याकडे वाळपईवासीयांचे लक्ष लागले आहे.

ओमर अब्दुल्लांवर बूट फेकून हल्ला!

श्रीनगर, दि. १५ - जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनाचा सोहळा सुरू असताना आज मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावर एका पोलिस उपनिरीक्षकाने बूट फेकून हल्ला केला. या घटनेनंतर लगेच हल्लेखोरास अटक करण्यात आली. या घटनेने तेथे उपस्थित असलेले सर्वजण अचंबित झाले.
मुख्यमंत्र्यांनी तिरंगा फडकावला, त्यानंतर ध्वजाला सलामी देण्याआधीच त्यांच्या दिशेने एक जोडा आला. मात्र बरेच अंतर असल्यामुळे हल्लेखोर पोलिसाने फेकलेला जोडा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला नाही. या घटनेनंतर पकडण्यात आलेल्या पोलिसाची चौकशी सुरू झाली आहे. स्वातंत्र्यदिनाचा सोहळा जोडाफेकीच्या व्यत्ययानंतर पुन्हा सुरू झाला आणि नंतर तो निर्विघ्न पार पडला. संबंधित पोलिस अधिकाऱ्याची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मान्यवर व्यक्तींच्या जोडे भिरकावण्याची जणू फॅशनच आली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यावर ब्रिटनमध्ये अशाच प्रकारे जोडा भिरकावण्यात आला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण आहे. फुटीर नेत्यांच्या नेतृत्वाखाली वारंवार आंदोलने होत आहे. चेहरा झाकलेल्या तरुणांचे गट सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करत आहेत. पकडण्यात आलेल्या काही तरुणांनी पैसे मिळत असल्याने दगडफेक केल्याचे कबूल केले आहे. मात्र दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात स्थानिकांचे बळी गेल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे. आतापर्यन्त चाळीसपेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे. याच सगळ्या प्रकाराचा निषेध म्हणून पोलीस उपनिरिक्षकाने मुख्यमंत्र्यावर जोड्याने हल्ला केला.

"नागरिक बातमीदार' स्पर्धा हा प्रशंसनीय पायंडा

बक्षीस वितरण सोहळ्यात पर्रीकर यांचे प्रतिपादन
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)- वृत्तपत्रांनी निव्वळ बातमीदारी न करता लोकांपर्यंत पोहोचणे ही आता काळाची गरज बनली आहे. त्यासाठी लोकांना लिहिते केले पाहिजे. "नागरिक बातमीदार' या अनोख्या स्पर्धेद्वारे "गोवादूत'ने नेमका याच गोष्टीवर प्रकाश टाकला आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे केले.
"गोवादूत'तर्फे आयोजित "नागरिक बातमीदार' स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. "गोवादूत'च्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यात विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर, ख्यातनाम साहित्यिक तथा गोवा सरकारचे वृत्तपत्र सल्लागार विष्णू सुर्या वाघ, "गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट'चे ("गूज') अध्यक्ष प्रकाश कामत, "गोवादूत'चे संपादक राजेंद्र देसाई, कार्यकारी संपादक गंगाराम म्हांबरे, सहसंपादक सुनील डोळे, कार्मिक व्यवस्थापक विलास कामत, इतिहास अभ्यासक डॉ. प्रमोद पाठक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. पर्रीकर म्हणाले, अलीकडे मराठी वाचणाऱ्यांची संख्याच घटत चालली आहे. इंग्रजीचे स्तोम वाढत चालले आहे. शिवाय इंटरनेटसारख्या सुविधा हाताशी उपलब्ध झाल्यामुळे पूर्वीसारखे वाचन केले जात नाही. गोव्यातील राजकीय परिस्थितीबद्दल सांगायचे तर जी मागणी विरोधकांनी सभागृहात सातत्याने लावून धरली होती त्यावर मंत्री सभागृहाबाहेर स्वतःची भूमिका मांडतात याला काय म्हणावे? अनेकदा अधिवेशन सुरू असतानाच एखादी मोठी घटना घडली तर तो मुद्दा विधानसभेत का मांडला नाही, असा प्रश्न लोक आपणास विचारतात. वस्तुस्थिती अशी आहे की, सभागृहात मांडायचे सर्व प्रश्न एक महिना आधी विधानसभा सचिवालयाला सादर करावे लागतात. नंतरच त्यावर चर्चा केली जाते. त्यामुळे कितीही तीव्र इच्छा असली तरी तो मुद्दा त्वरेने मांडता येत नाही. अनेकांना ही बाब माहीत नसते. साहजिकच संबंधित मंडळी आमच्याकडेही संशयाने पाहतात. सभागृहाच्या नियमांत राहूनच आम्हाला जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागते.
श्री. वाघ म्हणाले, समस्त गोमंतकियांचे जिव्हाळ्याचे प्रश्र्न हाताळणाऱ्या "गोवादूत'ने सामान्य नागरिकासाठी "नागरिक बातमीदार' ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करून गोव्यातील पत्रकारितेला सर्वस्वी वेगळे वळण दिले आहे. सरकारच्या जास्तीत जास्त चुका शोधून काढून त्या प्रसिद्ध करणे हीच खरी पत्रकारिता असून याबाबतीत गोवादूत इतर दैनिकांच्या खूपच पुढे आहे. त्यामुळे "गोवादूत' सामान्यांचे प्रश्न मांडणारे गोव्यातील आघाडीचे दैनिक बनले आहे.
दबाव व तणाव सहन करण्याची ताकद ज्या पत्रकारात असते तोच खरा पत्रकार. ग्रामीण भागातील पत्रकारावर तेथील राजकीय व्यक्तींचा मोठा दबाव असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील वार्ताहर वादग्रस्त पण जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या पाठवत नाहीत. पाठवल्या तरी अनेक वर्तमानपत्रे त्या छापत नाहीत. "गोवादूत' मात्र त्याला अपवाद ठरला आहे. ज्या वर्तमानपत्रात विचार आहे ते वर्तमानपत्र चिरंतन टिकते, असेही त्यांनी नमूद केले.
प्रकाश कामत यांनी सांगितले, आपल्या देशातील बहुतांश बड्या वर्तमानपत्रांची मालकी उद्योगपतींकडे असल्याने जो तो परस्परांना सांभाळून घेण्यापायी खऱ्या बातमीवर अन्याय करताना दिसतो. जाहिरातींपायी गळेकापू स्पर्धा सुरू असल्याने ग्रामीण भागांतील समस्यांना कोणी वालीच उरलेला नाही. गोवादूतने आयोजित केलेल्या नागरिक बातमीदार स्पर्धेसारख्या उपक्रमांमुळे त्या समस्यांना वाचा फुटण्यास मदत होईल. गोव्यातील अन्य वृत्तपत्रांच्या तुलनेत "गोवादूत' अशा समस्यांना प्रसिद्धी देण्यात आघाडीवर आहे.
राजेंद्र देसाई यांनी स्वागत आणि प्रास्तविक करताना सांगितले की, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांच्यावरील अन्यायांना वाचा फोडणे हे व्रतच गोवादूतने अंगिकारले आहे. त्यावर विचार करताना "गोवादूत'चे मुख्य प्रतिनिधी किशोर नाईक गावकर यांना "नागरिक बातमीदार' स्पर्धेची कल्पना सुचवली आणि आम्ही ती प्रत्यक्षात उतरवली. या स्पर्धेला गोव्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मात्र वाचकांनी केवळ एवढ्यावरच समाधान न मानता आणखी जोमाने लिहित राहणे गरजेचे आहे.
श्री. पर्रीकर, श्री .वाघ व प्रकाश कामत यांच्या हस्ते पुढील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. राज्य विजेते श्रीकृष्ण धोंड (डिचोली), तालुकास्तरीय - संचित म्हाऊसकर ( सत्तरी), स्वप्निल गावकर (सांगे), गुरूनाथ फातर्पेकर (केपे), अरुण कामत (बार्देश), सतीश जुटेकर (सासष्टी), प्रगती चणेकर (पेडणे), व महेश पारकर (फोंडा). उत्तेजनार्थ - सुतेज साकोर्डेकर , रमेश किनळकर , पद्माकर चणेकर, सुनिता गावडे ,विनय गावकर व अक्षय नाईक.
स्पर्धेचे परीक्षण विष्णू वाघ, प्रकाश कामत व प्रा. राजेंद्र केरकर यांनी केले. स्पर्धकांच्या वतीने श्रीकृष्ण धोंड , संचित म्हाऊसकर, गुरूनाथ फातर्फेकर, अरुण कामत, महेश पारकर , पद्माकर चणेकर व विनय गावकर यांनी मनोगत व्यक्त केले. गंगाराम म्हांबरे यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली . सूत्रनिवेदन सीताराम नाईक यांनी केले. सुनील डोळे यांनी आभार मानले.

Sunday 15 August, 2010

पोवाडे म्हणजे चरित्र नव्हे!

गोव्यातील एका वृत्तपत्राच्या दि. १९ जुलै २०१० च्या अंकातील बातमीप्रमाणे शिवाजी महाराजांनी दापोली तालुक्यातील कळशी गावाजवळची ६५४ एकर जमीन मुस्लिम पीर याकुब बाबरला दान केली होती. ती जमीन अल्पसंख्याक मुस्लिम लोकांच्या वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित केली जावी, अशी सूचना राज्यमंत्री नसीम खान यांनी केली. सध्या त्या जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. ते हटविण्यासाठी मूळ दानपत्राचा आधार घेऊन सर्व जमीन वक्फ बोर्डाला मिळावी हे सिद्ध करण्यासाठी कुणीतरी मुस्लिम लेखक शिवचरित्राचे पुनर्लेखन करेल. त्यात महाराजांच्या मुस्लिम पीर आणि संतांना दिलेल्या दानपत्रांचा प्रामुख्याने उल्लेख असेल. महाराजांच्या चाकरीत असलेल्या मुस्लिम सरदारांचा, प्रत्यक्ष सेवेत असलेल्या मदारी मेहतर इत्यादींचा उल्लेख असेल. त्याच्या आधारे ती जमीन परत मिळविण्याचा प्रयत्न होईल. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या चरित्रातील तोच पैलू त्यांना मुसलमानांचे रक्षणकर्ते ठरविण्यासाठी वापरला जाईल. त्याचा अर्थ असा नव्हे की इतिहास बदलला. इतिहास लिहिणाऱ्यांची फार तर इतिहासकालीन घटनांची समीक्षा बदलली असे म्हणता येईल.
महात्मा फुलेंनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांच्या पोवाड्याच्या संदर्भात लेन लिहितो - Although Phule used the Shivaji story to develop an ideology of nonbrahmin protest, he was dependent on the popular oral tradition of the Shivaji narrative (पृ. ६७) हे खरेच आहे. म. ज्योतिबा फुलेंच्या काळात एक ग्रॅंट डफ सोडला तर ऐतिहासिक साधनांचा उपयोग करून लिहिले गेलेले शिवचरित्र उपलब्ध नव्हते, ग्रॅंट डफनेही शिवाजी महाराजांना कलुषित दृष्टीनेच रंगविले आहे. म. फुलेंनी डफच्या चरित्रावरून आणि इतर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे शिवचरित्राची नव्या दृष्टिकोनातून समीक्षा केली एवढेच म्हणता येईल. म. फुलेंच्या पोवाड्यातून लेनला सामाजिक विसंवादच दिसला. तो पुढे लिहितो - Whereas the stories of Shivaji and his brave comrades that Phule repeated became central to the patriotic narrative, his idiosyncratic reading of history as a struggle of Aryans and non-Aryans was not widely influential ( पृ६८). एवढेच नव्हे तर आज महाराष्ट्राच्या राजकारणात शिवाजी महाराजांच्या नावाचा उदोउदो केला जातो; पण ज्या क्षेत्रीय शेतकऱ्यांचा राजा म्हणून म. फुलेंनी शिवाजी महाराजांच्या गौरव केला त्या शेतकऱ्यांना हजारोंच्या संख्येने हताश होऊन आत्महत्या करण्याची पाळी येते हेही वास्तव नाकारता येणार नाही. ते क्षेत्रीय मराठ्यांच्या राज्यात घडते.
१८५७च्या स्वातंत्र्य समरानंतर इंग्रजांनी जवळपास पूर्ण देशात शांतता व दडपशाहीने सुव्यवस्था प्रस्थापित केली असली तरी त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांमुळे त्यांच्याविषयी प्रजेत असंतोष निर्माण होत होता. सर्वसामान्य लोकांपर्यंत स्वातंत्र्य गेल्याची जाणीव होत होती. एकीकडे वासुदेव बळवंत फडके सशस्त्र प्रतिकार करत होते तर दुसरीकडे दादाभाई नौरोजींनी खुद्द इंग्लंडमध्ये जाऊन इंग्रजांच्या पार्लमेंटमध्ये भारताचे आर्थिक दुखणे वेशीवर टांगले होते. अशा वेळी महाराष्ट्रात शिवचरित्रापासून स्फूर्ती घेणारे आणि शिवचरित्रांच्या आधारे चळवळीला वैचारिक बैठक देणारे लोक पुढे आल्यास नवल काय? परिपूर्ण ऐतिहासिक साधनांच्या अभावी राजाराम शास्त्री भागवत आणि एकनाथ अण्णाजी जोशी यांच्या सारख्यांनी लिहिलेल्या पोवाड्यांमध्ये शिवाजी महाराजांचे राष्ट्रभक्तीच्या भावनेतून केलेले गुणगान म्हणजे ऐतिहासिक चरित्र नव्हे. त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील संशोधकांनी शिवचरित्रांच्या साधनांचा शोधून काढून त्यांची शहानिशा करून शिवचरित्र ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहिण्यास सुरुवात केली.

मुख्यमंत्र्यांकडून औचित्यभंग

गोव्याला विशेष दर्जा न मिळवून दिल्याचा भाऊसाहेबांवर ठपका
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या किनारी नियमन विभाग कायद्यामुळे सध्या गोव्याच्या किनारी भागातील मच्छीमार बांधवांवर निर्वासित होण्याचे जे संकट ओढवले आहे त्याला अप्रत्यक्षरीत्या गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हेच कारणीभूत असल्याचे धक्कादायक विधान राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी करून सर्वांनाच अचंबित केले.
सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एन्व्हायरनमेंट, गोवा श्रमिक पत्रकार संघटना ("गूज') व गोवा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी याविषयाला चुकीच्या पद्धतीने तोंड फोडले. एकीकडे राज्यात भाऊसाहेब बांदोडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असतानाच गोव्याला विशेष राज्याचा दर्जा मिळवण्यात अपयशी ठरलेल्या कॉंग्रेसकडून आता याचे खापर अप्रत्यक्षपणे गोव्याचे भाग्यविधाते असलेल्या भाऊसाहेबांच्या डोक्यावर फोडण्याचा अश्लाघ्य प्रकार घडतो आहे. आज खुद्द मुख्यमंत्र्यांनीही त्याचाच कित्ता गिरवून या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर औचित्यभंग केला, अशी नाराजी उपस्थितांनी व्यक्त केली.
गोवा मुक्तीनंतर तत्कालीन गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्याला विशेष दर्जा बहाल करण्याची विनंती पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे केली असती तर आज कदाचित गोव्याची परिस्थिती वेगळी दिसली असती. सध्याच्या परिस्थितीत राज्याला केंद्राकडून विशेष दर्जा प्राप्त होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचेही ते म्हणाले. राज्याला तेव्हा विशेष दर्जा बहाल झाला असता तर किनारी नियमन विभाग कायद्यातून गोव्याला सूट मिळू शकली असती व मच्छीमार बांधवांवर ओढवलेले संकटही ओढवले नसते, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल १४ वर्षांनी गोवा मुक्त झाला व त्यामुळे गोव्याला दोन पंचवार्षिक योजनांपासूनही वंचित राहावे लागले. अशा परिस्थितीत गोवा मुक्तीनंतर काही ठरावीक मागण्यांचा आग्रह धरून गोव्याला विशेष दर्जा देण्यासाठी स्व. बांदोडकर यांच्याकडून प्रयत्न झाले असते तर नेहरूंनी विशेष आढेवेढे न घेता त्या तात्काळ मान्यही केल्या असत्या, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली. गोव्याला विशेष दर्जा मिळाला असता तर आज राज्यासमोरील अनेक प्रश्नांवर सहजपणे तोडगा निघू शकला असता,असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यातील किनारी भागांत पूर्वापारपासून वास्तव्य करून असलेल्या पारंपरिक मच्छीमार बांधवांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किनारी नियमन विभाग कायद्यातून गोव्याला सूट मिळवून देणे गरजेचे आहे. राज्य सरकारकडून केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयाकडे याचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. ही सूट केवळ पारंपरिक मच्छीमार व किनारी भागांत वास्तव्य करणाऱ्या लोकांनाच मिळणार असून त्याचा लाभ व्यावसायिक आस्थापने किंवा बडी हॉटेल्स यांना होणार नाही, याचीही दक्षता सरकारने घेतली आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

आजपासून वास्को सप्ताहाचा शुभारंभ

भाविकांचा महापूर, नामवंतांच्या मैफली
वास्को, दि. १४ (प्रतिनिधी): वास्को शहरात यंदा साजऱ्या होणाऱ्या ११२ व्या श्री दामोदर भजनी सप्ताहासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्याकरिता वास्कोवासीय सज्ज झाले आहेत. उद्या १५ तारखेला दुपारी १२.३० वाजता उद्योजक परेश जोशी यांच्याकडून देव दामोदरासमोर श्रीफळ अपर्ण केल्यानंतर अखंड २४ तासाच्या भजनी सप्ताहाला सुरुवात होणार आहे.
सप्ताहादरम्यान वास्कोतील स्वतंत्र पथ मार्गावर तसेच इतर ठिकाणी लावण्यात येणारी फेरीतील दुकानेही सजली आहेत. त्यांची संख्या सुमारे सातशे आहे. ही माहिती नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनी दिली. सप्ताहादरम्यान शहर पूर्ण स्वच्छ रहावे याची पुरेपूर दक्षता घेतली जाईल, असा निर्वाळाही त्यांनी दिला.
या प्रसिद्ध सप्ताहाला गोव्याबरोबरच गोव्याबाहेरून येणाऱ्या भक्तगणांना कुठल्याच प्रकारचा त्रास न व्हावा यासाठी पूर्ण काळजी घेण्यात येणार आहे असे वास्को दामोदर भजनी सप्ताह समितीचे अध्यक्ष प्रताप राणे यांनी सांगितले.
सप्ताहादरम्यान वास्कोतील वेगवेगळ्या ठिकाणी सहा समाजाकडून आयोजिण्यात आलेल्या गायनाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारण्यात आले असून प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर तसेच इतर नामवंत गायकांच्या मैफली याप्रसंगी वास्कोत रंगणार आहेत.
हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी वास्को पोलिसांनी पूर्ण सज्जता ठेवल्याचे उपअधीक्षक महेश गावकर यांनी सांगितले. सप्ताहाच्यादरम्यान एकूण ३०० पोलिस विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. यात २७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. २५० पोलिस दक्षिण गोव्यातून मागवण्यात आले आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी विविध ठिकाणी आठ टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
देव दामोदराच्या मंदिरासमोर पोलिस बूथ उभारण्यात आला आहे. तेथे कोणालाही संपर्क साधण्याची मुभा देण्यात आली आहे.
सप्ताहाच्यादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी १२८ वाहतूक पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत. वास्कोच्या सेंट अँन्ड्रु चर्चसमोरून सप्ताहादरम्यान स्वतंत्र पथ मार्ग बंद (इंडियन ऑयल जंक्शन पर्यंत) करण्यात आला आहे. या काळात (दि १५ ते २४ पर्यंत) एफ.एल.गोम्स मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली आहे.

दहशतवादाचे निर्दालन करूया

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे आवाहन
नवी दिल्ली, दि. १४ : वेगाने फोफावत चाललेल्या दहशतवादाने केवळ भारतालाच नव्हे तर जागतिक शांततेला फार मोठा धोका निर्माण केला आहे. ही विषवल्ली वेळीच ठेचून काढण्यासाठी देशवासीयांनी कमालीची एकजूट दाखवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी देशाच्या ६४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना केले.
त्या म्हणाल्या, देशाच्या कोणत्याही भागातून दहशतवादी आणि दहशतवादी कृत्यांना कसलाच पाठिंबा मिळता कामा नये. त्यादृष्टीने आपण सर्वांनीच दक्ष राहायला हवे. कारण मानवाची, समाजाची एकत्रित ताकद ही या दहशतवादापेक्षा फार मोठी आहे. तिचा आविष्कार घडवण्याची वेळ आली आहे. जगाला एकत्रित बांधून ठेवायचे असेल तर मानवता हा एकचि धर्म या तत्त्वाचा अवलंब केला पाहिजे. त्यासाठी कुटुंबव्यवस्था हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. मानवाच्या उन्नतीसाठी प्रचंड योगदान देण्याची क्षमता भारतात निश्चितच आहे. त्यातून आपण एक महान राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो.
स्वतंत्र भारतासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा होम पेटवला अशा सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करूया. आपल्या इतिहासावर एक नजर टाकूया. कारण इतिहासच आपल्याला भविष्यातील योजना आखण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम करत असतो. देशाला लाभलेल्या संपन्न संस्कृतीचाही आपल्याला विसर पडता कामा नये. हातात हात गुंफून आपण जर धैर्याने विविध आव्हानांचा सामना केला तर एक राष्ट्र म्हणून आपली मान जागतिक पातळीवर सतत उंच राहिल, असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

'गुगल'वर भारतात 'बंदी'ची शक्यता

सिंगापूर, दि. १४ : सुरक्षेच्या कारणास्तव 'गुगल', 'स्काइप' या इंटरनेट ब्राऊजर्सवर भारतात बंदी येण्याची शक्यता आहे.
सध्या याच कारणावरून 'ब्लॅकबेरी' या मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीवर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. इंटरनेटच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या कंपन्यांबाबत सरकार चिंतेत आहे. दूरसंचार मंत्रालय व गृह मंत्रालय यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये याबाबत विचार करण्यात आला असून सरकार तातडीने महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. ब्लॅकबेरीबाबतचा निर्णय सरकार ३१ ऑगस्टपर्यंत घेणार आहे. ब्लॅकबेरीच्या निर्णयानंतर सरकार गुगल व स्काइपवरील बंदीबाबत विचार करणार आहे. गूगल, ब्लॅकबेरी, स्काइप यांच्या माध्यमातून माहिती, छायाचित्रे, सूचना सहजपणे आदान-प्रदान करता येऊ शकतात. यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे दहशतवादाचा प्रसार होण्याचा धोका सरकारने व्यक्त केला आहे. भारतात 'गुगल'चा सर्वाधिक वापर केला जातो. अंदाजे ४ कोटी नागरिक गूगलचा उपयोग करतात. जगातील इतर देशांमध्ये गुगल व स्काइपचा वापरही जास्त आहे.

ख्यातनाम उद्योगपती बी.जी. शिर्के निवर्तले

पुणे, दि. १४ : पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलाचे शिल्पकार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ज्येष्ठ उद्योगपती बी. जी. शिर्के यांचे आज (शनिवारी) पहाटे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते.
शिर्के उद्योग समुहाचे संस्थापक बाबुराव गोविंदराव शिर्के यांनी अनेक अवाढव्य प्रकल्प उभारले. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी शिर्के समुहाला एक आंतरराष्ट्रीय किर्तीचा उद्योगसमुह म्हणून विकसित केले. पुण्याच्या बालेवाडी क्रीडासंकुलाचे शिल्पकार, दुबईतील अनेक मशिदी आणि वसाहतींचे निर्माते, नवी मुंबई प्रकल्पातील एक प्रमुख विकासक म्हणून शिर्के यांची ओळख होती.
एका शेतकरी कुटुंबात १ ऑगस्ट १९१८ रोजी त्यांचा जन्म झाला. शिक्षणाची परंपरा नसलेल्या घरात जन्मलेल्या शिर्के यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. ज्ञान संपादनाचा ध्यास घेतलेल्या शिर्के यांनी कमवा आणि शिका या तत्वाचे पालन करत आपले शिक्षण पूर्ण केले. ते १९४३ मध्ये सोओइपीमधून ते सिव्हिल इंजिनिअर झाले. वाई-पसरणी परिसरातील पहिला सिव्हील इंजिनिअर होण्याचा मान पटकावणा-या शिर्के यांनी शिक्षण पूर्ण होताच एक वर्षाच्या आत उद्योग क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी १९४४ मध्ये स्थापन केलेल्या सुप्रीम कस्ट्रक्शन कंपनीने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती केली.
किर्लोस्कर समुहाच्या अनेक प्रकल्पात सहभागी झालेल्या शिर्के यांनी मुंबई-बंगळुरू महामार्ग, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वांद्रे-कुर्ला संकुलातील स्पोर्टस कॉम्प्लेक्स, हिंजवडी आयटी पार्क, चेन्नईतील विप्रो आयटी पार्क यासह देशाविदेशात अनेक मोठ्या प्रकल्पांचे बांधकाम केले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये अनेक सरकारी प्रकल्प शिर्के उद्योग समुहाने बांधले. सामाजिक जाणिवेतून शिर्के यांनी कंपनीच्या उत्पन्नातूनच गरिबांसाठी दर्जेदार घरे बांधली आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणास केंद्राची मंजुरी

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरण प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
मुंबई- गोवा महामार्गाचे रुंदीकरण व्हावे असा प्रस्ताव केंद्राला सादर करून पाच वर्षे उलटली तरीही हा प्रस्ताव विविध कारणांस्तव रखडत होता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अलीकडेच याप्रकरणी केंद्रीय वाहतूकमंत्री कमलनाथ यांच्याशी चर्चा केली व अखेर या प्रस्तावाला चालना देण्याचा शब्द कमलनाथ यांनी त्यांना दिला. या संपूर्ण प्रकल्पाचा उपयुक्तता अहवाल तयार करण्यात येणार असून हे काम महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात येणार असून सहा महिन्यात हा अहवाल तयार करू,असे आश्वासन छगन भुजबळ यांनी केंद्राला दिल्याची माहिती एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
याप्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे पनवेल ते गोवा या सुमारे ४०० किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यासाठी अंदाजे ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.उपयुक्तता अहवालावर ३ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या महामार्गावरील रस्ता अपघातांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या २३२ दिवसांत केवळ रायगड जिल्ह्यात १४३ अपघातांत ११२ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. वाढत्या अपघातांमुळे अलीकडच्या काळात पत्रकार तथा सामाजिक संस्थांतर्फे रास्तारोकोंचे प्रकारही वाढले आहेत.

दोषींवर कठोर कारवाई

राष्ट्रकुल भ्रष्टाचारप्रकरणी पंतप्रधान कडाडले
नवी दिल्ली, दि. १४ : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील भ्रष्टाचारात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज (शनिवार) आयोजित केलेल्या बैठकीत सांगितले.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी क्रीडामंत्री एम. एस. गिल, नगरविकास मंत्री एस. जयपाल रेड्डी, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, सुरेश कलमाडी तसेच राष्ट्रकुल स्पर्धेच्या संयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झालेल्या गैरव्यवहाराची माहिती घेऊन, चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, स्पर्धेच्या ठिकाणाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान भेट देणाची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि स्पर्धेच्या आयोजनात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत असल्याने शुक्रवारी (ता. १३) कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या समितीत चर्चा झाली होती. या चर्चेत मनमोहनसिंग आणि युपीएच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या.