Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 29 January, 2011

कॉंग्रेस सरकारने गोवाच विकायला काढलाय

महामार्ग बदल कृती समितीच्या सभेत पर्रीकर कडाडले
म्हापसा, दि. २८ (प्रतिनिधी): राज्य सरकारने राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली गोमंतकीयांची घोर फसवणूक चालवली असून कॉंग्रेस सरकारने गोवाच विकायला काढल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे केला. येथील टॅक्सीस्टँडवर राष्ट्रीय महामार्ग बदल कृती समितीने आयोजिलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपाठीवर स्थानिक आमदार फ्रान्सिस डिसोझा, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, कृती समितीचे निमंत्रक सुनील देसाई, नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, नगरसेवक संदीप फळारी, गुरुदास वायंगणकर, कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, बस मालक संघटनेचे सचिव सुदीप ताम्हणकर, क्लाऊड अल्वारिस, अशोक प्रभू, सर्वो फर्नांडिस, सतीश लोटलीकर, टुलियो डिसोझा, संदीप कांबळी, मेहमूद खान आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्रीकर म्हणाले, या प्रस्तावित महामार्गामुळे अनेकांची घरे आणि दुकाने जमीनदोस्त होणार आहेत. त्याची चिंता या सरकारला नाहीच. महामार्गाच्या नावाने पैसा खाणे आणि पंधरा टक्के कमिशन लाटणे हाच या सरकारचा एककलमी कार्यक्रम बनला आहे. महामार्गामुळे गोव्याचे विभाजन दोन भागांत होणार आहे. हे महासंकट कोणा थोपवणार?
महामार्गासाठी टोल कोण भरणार, तुफानी वेगाने जाणार्‍या वाहनांमुळे होणार्‍या संभाव्य अपघातांना जबाबदार कोण आणि निसर्गावर जो घाला घातला जाणार आहे त्याबद्दल या सरकारने काही खबरदारी घेतली आहे काय, असे बिनतोड सवाल यानिमित्ताने पर्रीकरांनी कामत सरकारला विचारले. या प्रश्‍नांची उत्तरे देऊनच सरकारने महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात करावी, असे ते म्हणाले.
खुद्द आरोग्यमंत्र्यांनाच ‘पीपीपी’ म्हणजे काय हे माहीत नाही, असा टोलाही त्यांनी म्हापसा जिल्हा इस्पितळाचा संदर्भ देऊन लगावला.
स्थानिक आमदार डिसोझा यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गामुळे जमिनीची फार मोठी हानी होणार आहे. जेव्हा जनविरोधाची धार तीव्र होते तेव्हा सरकारने वेगळा मार्ग चोखाळायचा असतो. मात्र सध्याचे कॉंग्रेस सरकार स्वहित पाहण्यातच दंग आहे. सीलिंकचा भरपूर बोलबाला झाला. त्याचे आठ कोटी रुपये गेले कोठे याचे उत्तर या सरकारने द्यावे. शेतजमीन आणि खाजनाची हानी आरंभलेल्या या सरकारने सारे ताळतंत्रच सोडले आहे. मुख्यमंत्री प्रत्येक विषयाचा अजूनही केवळ अभ्यास करत आहेत! या सरकारचा निषेध करावा तेवढा थोडाच. राष्ट्रीय महामार्ग बदल समितीला आपला जोरदार पाठिंबा आहे.
सुनील देसाई यांनीही या सरकारचा खरपूस समाचार घेतला. तसेच व्यासपीठावरील उपस्थितांची सरकारचा कडाडून निषेध करणारी भाषणे झाली. भाजप मंडलाचे अध्यक्ष राजसिंग राणे यांनी सूत्रसंचालन केले. या सभेला अभूतपूर्व जनसमुदाय उपस्थित होता.

बेकायदा खनिज काढायला आणलेले पोकलिन जप्त

ग्रामस्थांच्या पुढाकाराने पैकुळ सत्तरीत वनखात्याची कारवाई
वाळपई, दि. २८ (प्रतिनिधी): पैकुळ सत्तरी येथे बेकायदा खनिज उत्खननासाठी एका खनिज कंपनीने पाठवलेले पी. सी. एल. अँड टी. २०० कुमात्सू हे पोकलिन गुळेली पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांनी काल रात्री ९ वाजता अडवून वनखात्याच्या ताब्यात दिले. महत्त्वाचे म्हणजे ते कोणत्याही परवानगीशिवाय धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील बोंडला अभयारण्याच्या हद्दीतून या भागात पोचले होते.
लोकांनी पोकलिन अडवून ठेवल्यानंतर वनखात्याला कळविले. त्यानंतर वनखात्याच्या फिरत्या पथकाने ते ताब्यात घेऊन बोंडला येथे नेले व त्यास ‘सील’ ठोकले. मशीनचा चालक अनिल नाईक व साहाय्यक सचिंद्र नाईक (दोघेही रा. अंकोला कारवार) यांना ताब्यात घेतले.
वनखात्याचे लॉरेन्स डायस, उप विभागीय वनाधिकारी धराजीत नाईक यांनी ही कारवाई केली. याकामी डॉ. दत्ताराम देसाई, रणजीत राणे, ऍड. शिवाजी देसाई, विशांत कासार, राघू गावकर, गॅब्रियल डिकॉस्टा, मिलिंद देसाई, नारायण देसाई, शैलेश देसाई आदी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
याप्रसंगी उपवनपाल सुभाष हेन्री यांनी वनकायद्याच्या कलम २० नुसार कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. डॉ. देसाई यांनी सत्तरीत बेकायदा खाणींचे कसे पेव फुटले आहे त्याचा हा पुरावाच असल्याची प्रतिक्रिया दिली.
हे मशीन राजकीय वरदहस्ताशिवाय पैकुळमध्ये आणण्याचे धाडस कुणीही करू शकणार नाही. त्याचप्रमाणे या मशीन चालकाकडे कसलाच परवाना नव्हता, असेही त्यांनी सांगितले. ऍड. देसाई यांनी हे प्रकरण विधानसभा अधिवेशनात मांडले जायलाच हवे, असेही निक्षून सांगितले.
वनखात्यावर दबाव
दरम्यान, हे मशीन बोंडला अभयारण्याच्या गेटमधून येणार असल्याची माहिती लोकांना काल रात्रीच मिळाली होती. त्यांनी ही बाब वनखात्याला कळविली होती. तथापि, वनखात्यावर राजकीय दबाव असल्याची असल्याचे एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या बोलीवर सांगितले. ही गोष्ट जेव्हा लोकांना समजली तेव्हा डॉ. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १०७७ या क्रमांकावर तक्रार केली. त्यावेळी वनखात्याचे अधिकारी पोकलिन अडवल्याच्या ठिकाणी पोचले. त्यावेळी त्यांच्यासमवेत खात्याचे कर्मचारी शांबा सावंत, लक्ष्मण नाईक, काशीनाथ कोनाडकर, जयराम गावकर, दिपक महाले, कल्पेश नाईक उपस्थित होते.
वन अधिकारी अचंबित
ज्यावेळी पंचनामा करण्यात येत होता, त्यावेळी साक्षीदार म्हणून सही करण्यासाठी १० -१२ नागरिकांनी तयारी दाखविली तेव्हा वन अधिकारी अचंबित झाले. पैकुळहून मशील नेले जात असताना ३० - ३५ नागरिक बोंडला अभयारण्यपर्यंत आले होते. अटक केलेल्या वाहनचालकाने मशीनाच्या मालकाचे नाव सतीश सैल व कंत्राटदाराचे नाव संजय चौगुले असल्याचे सांगितले. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सत्तरी युवा मोर्चाने केली आहे. ते मशीन कोणत्याही स्थितीत मालकाच्या ताब्यात देऊ नये, तसेच या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यास त्याचा गंभीर परिणाम होईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील तक्रार २४ तासांत ‘एफआयआर’ नोंदवा

पोलिस अधीक्षकांना नोटीस
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): ‘प्रादेशिक आराखडा- २०२१’ तयार करण्यासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समिती तसेच नगर नियोजन खात्याचे उप नगरनियोजक विनोद कुमार यांच्या विरोधात दाखल केलेल्या पोलिस तक्रारीन्वये २४ तासांत ‘एफआयआर’ म्हणून नोंद करा; अन्यथा न्यायदंडाधिकार्‍यांकडे दाद मागितली जाईल, अशी नोटीसच तक्रारदार प्रकाश बांदोडकर यांनी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना पाठवली आहे.
प्रथमदर्शनी पुराव्यांसह दखलपात्र गुन्ह्यांबाबत पोलिस तक्रार दाखल केल्यास तात्काळ ‘एफआयआर’ नोंद करण्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांवर न्यायालयीन अवमानाची नामुष्की ओढू शकते, असा इशाराही श्री. बांदोडकर यांनी दिला आहे. श्री. बांदोडकर यांनी २१ जानेवारी २०११ रोजी पणजी पोलिस स्थानकांत नोंदवलेल्या तक्रारीत प्रादेशिक आराखडा -२०२१ ची राज्यस्तरीय समिती व विनोद कुमार यांच्याविरोधात पेडणे आणि काणकोण तालुक्याचे आराखडे तयार करण्याबाबत फसवणूक, खोटारडेपणा तथा जनतेविरोधात कट रचल्याचा ठपका ठेवला आहे. या तक्रारीची दखलच पणजी पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे
आज श्री.बांदोडकर यांनी उत्तर गोवा अधीक्षकांना नोटीस पाठवून २४ तासांत याप्रकरणी ‘एफआयआर’ नोंद करण्याची मागणी केली.
या आपल्या नोटिशीत श्री. बांदोडकर यांनी सर्वोच्च न्यायालय व मुबंई उच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा हवाला दिला आहे. पणजी पोलिसांची ही कृती न्यायालयीन अवमानास आमंत्रित करणारी ठरली आहे. त्यासाठी न्यायालयात जाण्यास आपण पुढे-मागे पाहणार नाही, असा इशाराही श्री.बांदोडकर यांनी दिला आहे.
दरम्यान, ‘प्रादेशिक आराखडा २०२१’ च्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष खुद्द मुख्यमंत्रीच आहेत. या समितीवर प्रतिष्ठित मंडळी व वरिष्ठ सरकारी अधिकारी असल्याने त्यांच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. याप्रकरणी पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी नेमकी कोणती भूमिका घ्यावी याबाबत सदर भेटीत चर्चा झाल्याचे कळते.

‘वो तो अभी बच्चा है’

विश्‍वजित राणेंच्या घोषणेला नार्वेकरांचा टोला
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): म्हापसा जिल्हा इस्पितळाच्या खाजगीकरणाला आपण विरोध करतो म्हणून मलेरिया कामगारांच्या भरतीचा घोटाळा उकरून काढून दक्षता खात्यामार्फत त्याची चौकशी करण्याच्या आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या अप्रत्यक्ष धमकीला आपण अजिबात भीक घालत नाही, अशी सडेतोड प्रतिक्रिया हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर यांनी दिली. ‘वो तो अभी बच्चा है’ अशा शब्दांत ऍड. नार्वेकर यांनी विश्‍वजित यांची खिल्ली उडवली.
विश्‍वजित यांनी काल पत्रपरिषदेत बोलताना मलेरिया कामगारांच्या भरतीत घोटाळा झाला होता व त्याची चौकशी आपण दक्षता खात्यामार्फत करण्याचे आदेश आरोग्य सचिवांना देणार असल्याचे सांगितले होते. या सर्व मलेरिया कामगारांची जबानी नोंद करून घेणार असल्याचाही उल्लेख त्यांनी केला होता. हे वक्तव्य करताना विश्‍वजित यांनी
माजी आरोग्यमंत्री नार्वेकर यांच्यावरच शरसंधान केले होते.
दरम्यान, विश्‍वजित राणे यांच्या या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ऍड. नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे प्रकरण घडले होते तेव्हा विश्‍वजित मंत्री नव्हे तर साधे आमदारही नव्हते, असे सांगितले. या सर्व मलेरिया कामगारांनी म्हापसा पोलिस स्थानकावर तत्कालीन उत्तर गोवा जिल्हा कॉंग्रेसचे खजिनदार शिरीष नाईक यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली होती. म्हापसा पोलिसांनी या कामगारांची जबानीही नोंद केली होती. शिरीष नाईक यांनी दिलेल्या जबानीत या कामगारांकडून मिळालेले पैसे कॉंग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी मार्गारेट आल्वा यांना दिल्याचे म्हटले होते. या सर्व प्रकरणास उजाळा देण्याची विश्‍वजित राणे यांना इच्छा असेल तर त्यांनी या प्रकरणाची अवश्य चौकशी करावी, असेही ऍड. नार्वेकर म्हणाले.
नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटले
दरम्यान, आज संध्याकाळी नार्वेकर यांनी आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेतली. आपल्याच सरकाराविरोधात नार्वेकर यांनी चालवलेल्या जोरदार मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या या भेटीचे अनेकांना कोडे पडले आहे. उद्या २९ जानेवारी रोजी नार्वेकर यांच्या नेतृत्वाखालील ‘गोवा डेमाक्रॅटिक फ्रंट’ ची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी नार्वेकर यांना पाचारण केले होते, अशी चर्चा सुरू होती. यासंबंधी नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता कामत यांनी भेटीसाठी आपल्याला आमंत्रित केल्याचे मान्य केले. दरम्यान,या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. तरीदेखील ही चर्चा
जनतेच्या भावनांशी निगडित होती, असे संकेत त्यांनी दिले.

३१ लाखांचे ड्रग्ज आसगावात जप्त

नायजेरियन जोडप्याला अटक
पणजी,दि.२८(प्रतिनिधी): बार्देश तालुक्यातील आसगाव येथे कालच एका नायजेरीयन युवकाकडून तीन लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याची घटना ताजी असतानाच आज हडफडे येथे अमलीपदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून नायजेरीयन जोडप्याकडून सुमारे ३१.५४ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. फेलिक्स ओहीम इव्हबोरोखाय व त्याची पत्नी लालीयानसांगी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने टाकलेल्या छाप्यात फेलिक्स याच्याकडून ३.३४ किलो चरस (३.३४ लाख रुपये) व त्याची पत्नी लालियानसांगी हिच्याकडून ४५० ग्रॅम हेरॉईन (२७ लाख रुपये) व ६.७ ग्राम ‘एलएसडी’ (१.२० लाख रुपये) जप्त करण्यात आले. हे जोडपे हडफडे चॅपेलजवळ भटकत असताना त्यांना अटक करण्यात आली. अमलीपदार्थ विरोधी पथकाला गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

खाजगीकरणाविरोधात आज म्हापशात सभा

पणजी, दि. २८ (विशेष प्रतिनिधी): म्हापसा जिल्हा इस्पितळाचे खाजगीकरण करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी कंबर कसली असतानाच, या निर्णयाला उत्तर गोव्यात विरोध वाढत असून, उद्या (शनिवारी) संध्याकाळी म्हापसा येथे टॅक्सीस्टँडवर गोवा लोकशाही मंचने सर्वपक्षीय जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर, भाजपचे आमदार दयानंद मांद्रेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस अविनाश भोसले व म्हापशाचे नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर आदी नेत्यांची भाषणे होणार आहेत. खाजगीकरण थांबविण्यासाठी जनतेनेच आता पुढाकार घेतला आहे. यापूर्वी भाजपने विधानसभेत आणि सभागृहाबाहेरही जिल्हा इस्पितळाच्या खाजगीकरणास जोरदार विरोध केला आहे.

गोवा भाजयुमोची तिरंगा मोहीम फत्ते!

काश्मीरहून परतलेल्या कार्यकर्त्यांचे जंगी स्वागत
मडगाव, दि. २८(प्रतिनिधी): काश्मीरातील श्रीनगर येथे लाल चौकात प्रजासत्ताकदिनी तिरंगा फडकावण्याच्या मोहिमेवर गेलेला गोवा भाजयुमोचा १५० सदस्यीय चमू ‘एकता यात्रे’ची मोहीम फत्ते करून आज येथे परतला तेव्हा त्याचे अभूतपूर्व जल्लोशात स्वागत करण्यात आले.
‘भारतमाता की जय, वंदे मातरम, जो हमसे टकराएगा मिट्टीमे मिल जाएगा व काश्मीर हिंदुस्तानका ना किसीके बापका’ अशा ललकार्‍या देत येथील कोकण रेल्वे स्टेशनवर मंगला एक्सप्रेसमधून भाजयुमो कार्यकर्ते दाखल झाले तेव्हा गोवा भाजपातर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. या घोषणांनी सारा परिसर दणाणला.
गोवा भाजयुमोचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत व सरचिटणीस सिद्धेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील या चमूच्या स्वागतासाठी आमदार दामू नाईक, दक्षिण गोवा भाजपचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र सावईकर, माजी सभापती विलास सतरकर, माजी आमदार राजेंद्र आर्लेकर,मडगाव भाजप मंडल अध्यक्ष चंदन नायक, भाजयुमोचे रुपेश महात्मे, सुधीर पार्सेकर उपस्थित होते. सर्वांचे त्यांनी हार घालून स्वागत केले.
डॉ. प्रमोद सावंत यांनी मोहिमेची संपूर्ण माहिती दिली. कोलकोताहून सुरू झालेल्या या एकता यात्रेचे नेतृत्व भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केले. एकूण ८५ हजार कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते. त्यातील बहुतेकांना जम्मू सीमेवर अडवण्यात आले. त्यांनी बॅगेत ठेवलेले तिरंगे पोलिसांनी हिसकावून घेतले. तरीही गोव्यातून गेलेले ६ कार्यकर्ते तिरंगा घेऊन पोलिसांना चकवून लाल चौकापर्यंत गेले व त्यांनी प्रजासत्ताकदिनी तेथे तिरंगा फडकावलाच.
भाजपच्या नेत्या सौ. सुषमा स्वराज तेथे आल्या होत्या परंतु त्यांना विमानतळावरून परत पाठविले गेले. त्यामुळे उमर अब्दुल्ला सरकार नेभळट असल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रीय दिनी तिरंगा फडकावणे हा प्रत्येक भारतीयाचा हक्क असून सरकारने तो हिरावून घेऊन आपली निष्क्रियता दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
सिध्देश नाईक यांनी यावेळी आपले अनुभव सांगताना ओमर अब्दुल्ला सरकारच्या सांगण्यावरून केंद्राने लादलेली ही बंदी म्हणजे हिटलरशाही असल्याचे प्रतिपादिले.
आमदार दामू नाईक यांनी उमर सरकार कमकुवत असल्याचे त्यांच्या कृतीतूनच दिसून आल्याची टीका केली. तिरंगा फडकावण्यावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍यांविरुद्ध अवसाघान करणार्‍या या सरकारचे देशभरात हसे झाल्याचे ते म्हणाले.
त्यांनी यासंदर्भात वंदे मातरमवरील बंदीची मागणी, अफजल गुरुची रेंगाळत असलेली फांशी सारखी उदाहरणे दिली. भाजप सत्तेवर आला तर संपूर्ण काश्मीरमध्ये तिरंगा फडकावला जाईल असे त्यांनी जाहीर केले. कॉंग्रेसने सतत लोकांना गृहीत धरून त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न चालविला तर त्या पक्षाचा तो हात मुळापासून उखडला जाईल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला.
ऍड. नरेंद्र सावईकर यांनी या चमूचे स्वागत केले. या चमूत आत्माराम बर्वे, मनोज नायक, भावेश जांबावलीकर, दीपक नार्वेकर, भगवान हरमलकर, विनय गावकर, विशांत गावकर, दिनकर गुरव व इतरांचा समावेश होता. त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे ‘मंगला’मधून व अन्य गाड्यांतून आलेल्या प्रवाशांची उत्सुकता ताणली गेल्याचे चित्र दिसले.
चर्च हल्लाप्रकरणी संघ परिवारनिर्दोष
बंगलोर, दि. २८ : कर्नाटकातील काही चर्चमध्ये २००८ मध्ये घडवून आणण्यात आलेल्या बॉम्बस्ङ्गोट मालिकेची चौकशी करणार्‍या एक सदस्यीय न्यायमूर्ती सोमशेखर आयोगाने भाजप आणि संघ परिवाराला ‘क्लिन चीट’ दिली.
सोमशेखर यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय आयोगाने आज आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला.
करमापांच्या आश्रमात सापडले सहा कोटी
नवी दिल्ली, दि. २८ : सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू असलेले १७ वे करमापा उग्येन त्रिनले दोरजे यांच्या आश्रमातून सहा कोटी रुपये किमतीचे विदेशी चलन आढळून आले असून, हे विदेशी चलन करमापा यांना चीनकडून प्राप्त होत असून, भारतातील बौद्ध धर्मगुरूंवर आपले नियंत्रण असावे, हाच चीनचा यामागील उद्देश असल्याची शंका या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.
पी.जे. थॉमस करणार ३ फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा
नवी दिल्ली, दि. २८ : भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपात अडकलेले केंद्रीय दक्षता आयुक्त पी. जे. थॉमस यांच्याविरोधात भाजपासोबत सर्वोच्च न्यायालयानेही अतिशय कठोर भूमिका घेतल्याने कोंडीत सापडलेल्या केंद्रातील ‘संपुआ’ सरकारने त्यांना राजीनामा देण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे, मात्र सर्वोच्च न्यायालयातील ३ फेब्रुवारीच्या सुनावणीपर्यंत आपण प्रतीक्षा करणार असल्याचे थॉमस यांनी सांगितल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
चारा घोटाळाप्रकरणी ५८ दोषींना शिक्षा
रांची, दि. २८ : विशेष सीबीआय कोर्टाने आज चारा घोटाळा प्रकरणी ५८ जणांना दोषी ठरविले. त्यात सात महिलांचाही समावेश आहे. १९९० मध्ये छैबासा तिजोरीतून सुमारे ८ कोटी रुपये भ्रष्ट मार्गाने काढल्याचा आरोप या सर्व आरोपींवर आहे. न्या. आर. आर. त्रिपाठी यांच्या न्यायालयाने हा निकाल देतानाच तीन आरोपींना या खटल्यातून निर्दोष मुक्त केले. पशुपालन विभागाच्या चार अधिकार्‍यांसह या आरोपींना तीन वर्षांचा कारावास आणि ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा सुनावली. या आरोपींमध्ये बहुतांश जण सरकारी कर्मचारी आहेत.

Friday 28 January, 2011

चौपदरीच्या रुंदीकरणाला विरोध व बगल रस्त्यास सर्वोच्च प्राधान्यासाठी

कुडचडे, केपे, सांगेत कडकडीत ‘बंद’
कुडचडे दि. २७ (प्रतिनिधी): चौपदरी रस्त्याचे रुंदीकरण बंद करावे आणि खनिज माल वाहतुकीसाठी बगल रस्त्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे या मागणीसाठीकेपे, कुडचडे व सांगे भागात राखण जागृत मंचने आज (गुरुवारी) पुकारलेला ‘बंद’ शंभर टक्के यशस्वी ठरला. तसेच येत्या १ फेब्रुवारी रोजी सुहास सावर्डेकर यांच्या उपोषणाला सर्वमते पाठिंबा जाहीर करून त्यानंतर सचिवालयावर मोर्चा नेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
कुडचडे, सावर्डे व केपे बाजार, सांगे, कुडचडे, केपे खाजगी बससेवा, ट्रक मालक संघटनेने या बंदला पाठिंबा दिला होता. त्यामुळे हा कडकडीत बंद पाळण्यात आला. या काळात सर्व खनिजवाहू ट्रक, मोटारसायकल व रिक्षा, पेट्रोलपंप पूर्ण बंद होते. त्यापूर्वी सकाळी कांबेडकर चौक परिसरात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला सुमारे हजारभर लोक उपस्थित होते. सांग्याचे आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी सांगितले, बगल रस्त्यासंदर्भात अनेकदा आपण विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला. सरकारकडून त्याची दखलच घेण्यात आली नाही. आमच्या तोंडाला पुसण्यात आली फक्त आश्‍वासनेच.
खनिज मालाच्या वाहतुकीमुळे निर्माण होण्यार्‍या धूळ प्रदूषणाने रोज मरण्यापेक्षा उपोषण करून मरणे योग्य ठरेल. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून आपण आमरण उपोषण करणार आहोत, अशी घोषणा सामाजिक कार्यकर्ते सुहास सावर्डेकर यांनी केली. त्यावेळी उपस्थितांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन सदर उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला.
सावर्डेचे माजी सरपंच नीळकंठ नाईक म्हणाले, अनिल साळगावकर यांना जनतेने लोकसेवा व विकास साधणार असल्याच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून आमदार म्हणून निवडून दिले. मात्र निवडणुकीनंतर त्यांचे दर्शनच दुरापास्त बनले आहे.
या संपूर्ण पट्ट्याला ग्रासून राहिलेल्या खाण उद्योगासंदर्भातील या महत्त्वपूर्ण मागण्या मान्य करवून घेण्यासाठी पणजीत भव्य मोर्चा काढणे गरजेेचे आहे. त्याकरता आपणही सुहास सावर्डेकर यांच्याबरोबर उपोषणास बसणार आहोत, असे माजी नगराध्यक्ष परेश भेंडे यांनी सांगितले.
नगरसेवक प्रदीप नाईक यांनी सांगितले की, स्थानिक पालिकेने बगल रस्ता व चौपदरीकरणासाठी अनेकदा ठराव संमत केले. मात्र सरकारने एकदाही त्याची गंभीर दखल घेतली नाही.
ट्रकमालकांनी आपले सर्व ट्रक मांडवी पुलावर नेऊन सचिवालयावर मोर्चा नेण्याचे ठरवले. माजी आमदार डॉम्निक फर्नांडिस, ऍड. महेश कुडचडकर, भाजपचे रुद्रेश तेंडुलकर, डॉ. अच्युत काकोडकर, ग्राहक मंचाचे संजीव सावंत देसाई यांचीही याप्रसंगी भाषणे झाली.
जाहीर सभा झाल्यावर तेथून कुडचडे बसस्थानक, बाजार, रेल्वेस्थानक व तेथून आमदार श्याम सातार्डेकर यांच्या कार्यालयापर्यंत हातात बॅनर्स व आमदार सातार्डेकर यांच्याविरुद्ध घोेषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आमदार सातार्डेकर यांचा आगळ्या पद्धतीने निषेध करण्यात आला. नंतर सरकारी कार्यालयासमोर सभा घेऊन मोर्चाची सांगता झाली.
कुडचडे व सावर्डे भागातील औषधालये, राष्ट्रीय बँक, पोस्ट ऑफिससह सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्याशिवाय बस व इतर खाजगी वाहने, मोटारसायकल, ट्रक पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते.
केप्याचेे उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस, पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे, मामलेदार सुदिन नातू, पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर, सुदेश नार्वेकर, भानुदास देसाई, राजू राऊत देसाई तथा शीघ्र कृती दलाच्या खास तुकड्या ‘बंद’काळात उपस्थित होत्या.
तिरंगा मुद्यावर भाजप कोर्टात जाणार
नवी दिल्ली, दि. २७ : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथील लाल चौकात तिरंगा ङ्गडकविण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांमध्ये आडकाठी आणण्याच्या राज्य सरकार आणि केंद्रातील संपुआ सरकारच्या घटनाबाह्य आणि बेकायदेशीर भूमिकेच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय भाजपने आज जाहीर केला. तिरंगा ङ्गडकविण्यासाठी निघालेल्या एकता यात्रेचे नेतृत्व करताना अटक झालेल्या सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि अनंतकुमार यांचा भव्य सत्कार करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात अडवाणी बोलत होते.
काळ्या पैशाबाबत कोर्टाची विचारणा
नवी दिल्ली, दि. २७ : विदेशी बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेला काळा पैसा हा संरक्षण सौदा, मादक द्रव्याची तस्करी आणि शस्त्रास्त्र तस्करीतून आलेला असावा, अशी शक्यता वर्तविणार्‍या वृत्तांवर गंभीर चिंता व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला या काळ्या पैशाचा नेमका स्रोत कोणता, तसेच विदेशी बँकांमध्ये खाते असणार्‍या व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध कोणती कारवाई केली, अशी विचारणा केली.
थॉमस यांच्यावरील आरोपांविषयी केंद्र अनभिज्ञ
नवी दिल्ली, दि. २७ : केंद्रीय दक्षता आयुक्त पी. जे. थॉमस यांच्याविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी आरोपपत्र दाखल असल्याची आणि त्यांच्याविरोधात खटला भरण्यासाठी केरळ सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय दक्षता आयुक्त पदावरील व्यक्तीची निवड करणार्‍या उच्चाधिकार समितीला नव्हती, असे शपथपत्र केंद्र सरकारतर्ङ्गे आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या समितीवर सदस्य असलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी, सरकारचे हे शपथपत्र सपशेल खोटे असल्याचा दावा करीत, सरकारचा खोटारडेपणा उघड करणारे वेगळे शपथपत्र आपण दाखल करणार असल्याचे जाहीर केले.
इंधन भेसळीवर नियंत्रण आणणार
नवी दिल्ली, दि. २७ : भेसळखोरांविरुद्ध केंद्र सरकार आक्रमक झाले असून इंधन भेसळीवर सहा महिन्यात नियंत्रण आणणार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री एस. जयपाल रेड्डी यांनी म्हटले आहे. इंधन भेेसळीविरोधात कडक पावले उचलण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी स्वत: पुढाकार घ्यायला हवा. केंद्र सरकारही आपल्याकडून यासंदर्भात काही उपाययोजना करणारच आहे,असे रेड्डी यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे मंत्री, पदाधिकार्‍यांची ‘सीबीआय’ चौकशी व्हावी

भाजपचे राज्यपालांना निवेदन
निवेदनातील ठळक मुद्दे
बेहिशेबी संपत्ती जमा केलेल्या
मंत्री व संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा
कायदा व सुव्यवस्था कोलमडली
‘रॉय’ प्रकरणी स्पष्ट खुलासा करा

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारातील मंत्री व काही पदाधिकार्‍यांनी सत्तेचा दुरुपयोग करून बेहिशेबी मालमत्ता जमवली असून या सर्वांची केंद्रीय संस्थेमार्फत चौकशी करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पक्षाने आज राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांच्याकडे केली. ड्रग्ज प्रकरणांतील ‘रॉय’ ही व्यक्ती गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र नाहीत असा दावा केला जात असेल तर त्याबाबत राज्यपालांनी आपल्या अभिभाषणांत स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन करून राज्यातील प्रशासन पूर्ण ठप्प झाले आहे व कायदा सुव्यवस्था कोलमडल्याची गोष्टही राज्यपालांच्या नजरेस आणून देण्यात आली.
भाजप विधिमंडळ गट व प्रदेश कार्यकारिणी सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांची दुपारी साडेतीन वाजता राजभवनवर भेट घेतली. सरकारच्या अनेक भ्रष्टाचार प्रकरणांची यादीच भाजपतर्फे राज्यपालांना सादर करून त्यासंबंधी निवेदन देण्यात आले. या सर्व प्रकरणांबाबत राज्यपालांनी सरकारकडून खुलासा घ्यावा व ३१ रोजीच्या आपल्या अभिभाषणात त्याचे स्पष्टीकरण जनतेला द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आज येथे बोलावण्लेल्या पत्रपरिषदेत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या भेटीची माहिती पत्रकारांना दिली. प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, भाजप विधिमंडळ उपनेते फ्रान्सिस डिसोझा, आमदार दामोदर नाईक व आमदार रमेश तवडकर याप्रसंगी हजर होते. विद्यमान सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात बरबटले आहे व त्यात आमदारांसह अनेक पदाधिकार्‍यांनीही आपले उखळ पांढरे केल्याचा ठपका पर्रीकर यांनी ठेवला.
बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेमुळे गोव्याची राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच बदनामी झाली आहे. महत्त्वाच्या ‘सीबीआय’ चौकशीची ‘फाइल’ दोन महिने रेंगाळते यावरून प्रशासन कोडमडल्याचे दिसून येते. हे जर खोटे असेल ही ‘फाइल’ गौडबंगाल करून तयार करण्यात आली आहे व त्यामुळे अशा घोटाळेबाज सरकारला सत्तेवर राहण्याचा अजिबात अधिकार नाही, असा जोरदार ठोसा पर्रीकर यांनी लगावला.
राज्यात व केंद्रातही कॉंग्रेसप्रणीत सरकार आहे व सरकारातीलच काही मंत्र्यांवर आयकर खात्याचे छापे पडले आहेत. या प्रकारावरून मंत्र्यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा कहर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व छाप्यांची चौकशी केंद्रीय चौकशी संस्थेतर्फे करण्यात यावी. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची ‘पीपीपी’साठी चाललेली मुजोरी व हाव संपूर्ण आरोग्यसेवेचे तीन तेरा वाजवण्यास कारणीभूत ठरली आहे. लोकायुक्त विधेयक अजूनही समंत होत नाही. लोकायुक्तांची नियुक्ती झाली तर सरकारातील प्रत्येक मंत्री, आमदार व पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे पुराव्यांसह सादर करू, असे आव्हान पर्रीकरांनी दिले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत हे बेकायदा खाण व्यवसायाला पाठीशी घालीत आहेत. अबकारी घोटाळ्याबाबत प्राथमिक पुरावे सादर करूनही या प्रकरणाची चौकशी होत नाही, यावरून सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्रीच भ्रष्टाचारात गुरफटल्याचे दिसून येते. विविध ठिकाणी बेदरकार खनिज वाहतुकीमुळे धूळ प्रदूषण व अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्याविरोधात लोकांत असंतोष पसरत असून लोक रस्त्यावर उतरत आहेत, असेही सांगण्यात आले.
कालपरवापर्यंत राज्यात ड्रग्ज नाहीत म्हणणारे गृहमंत्री आता ड्रग्ज व्यवसाय चालतो हे मान्य करू लागले आहेत. मात्र या प्रकरणातील कथित ‘रॉय’ ही व्यक्ती आपला पुत्र नाही, असा ते दावा करतात. पोलिसच गुन्हेगारी प्रकरणांत सामील असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यामुळे जनतेच्या रक्षकांवरीलच विश्‍वास ढळत आहे. ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. सरकारने या प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशीची शिफारस करणे याचा अर्थच साळगावकर हे चौकशी करण्यात अपयशी ठरले हे दर्शवते. अशाा अधिकार्‍याला मुख्यमंत्री पदक देऊन गौरवण्याचा हेतू काय, असा खडा सवालही पर्रीकरांनी केला.
‘रूटीन’ छापे म्हणजे काय हो?
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्यावर आयकर खात्याने टाकलेले छापे हे ‘रूटीन’ आहेत,असे समर्थन त्यांनी केले होते. ‘रूटीन’ याचा अर्थ नियमित असा होतो. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी बेहिशेबी मालमत्ता गोळा करीत राहावी व आयकर खात्याने त्यांच्यावर छापे टाकत राहावेत, असे त्यांना अभिप्रेत आहे काय, असा टोला पर्रीकर यांनी लगावला.

गोव्यातील ट्रकचालकांनी महाराष्ट्राचे ट्रक रोखले

कळणेतील खाणीवर गोव्यातील ट्रकांना आक्षेप
पेडणे, दि. २७ (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील कळणे खाणीवर गोव्यातील ट्क चालविण्यास त्या राज्यातील ट्रक व्यावसायिकांनी हरकत घेतल्याने, आज त्या राज्यातून गोव्यात येणारे खनिजवाहू ट्रक सातार्डा-न्हयबाग-पोरस्कडे पुलावर रोखण्यात आले. सातार्डा येथे एका कार्यक्रमाला आलेले महाराष्ट्राचे मंत्री नारायण राणे महामार्गावर असतानाच, आंदोलन छेडण्यात आल्याने त्यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले आहे.
श्री. राणे यांनी सध्याच्या वादावर तोडगा काढण्याची ग्वाही दिली असली तरी, महाराष्ट्रातील ट्रक व्यावसायिकांनी गोव्यातील ट्रक कळणे खाणीवर खनिजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यास जोरदार आक्षेप घेण्याचे ठरविले आहे. कोणत्याही स्थितीत गोव्यातील ट्रक कळण्यात चालवू देणार नाही, असे या ट्रक व्यावसायिकांनी आज सांगितले.त्यामुळे संघर्षाचे वातावरण आज तयार झाले.
बांदा व सातार्डा येथे महाराष्ट्रातील ट्रक व्यावसायिकांनी ट्क अडविल्याने नंतर गोव्यात येणारे तेथील ट्रक अडविण्यास सुरवात झाली. पेडण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम देसाई व महाराष्ट्राचे वाहतूक अधिकारी श्री. हावरे यांनी संबंधितांशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. योग्य तोडगा न निघाल्यास महाराष्ट्रातून पेडण्याच्या अन्य भागांत जाणारे खनिजवाहू ट्रकही रोखून धरण्याचा इशारा गोमंतकीय ट्रकचालकांनी दिला आहे.

‘त्या’ क्रेनमुळे लोकांत तर्कवितर्क

कुळे, दि. २७ (प्रतिनिधी): चेंबूर मुंबई येथून त्रिलोक कॉर्पोरेशनच्या मालकीची क्रेन क्र. एम एच ४३ - ८५७ ही मोले चेकनाक्यावर कालपासून थांबवून ठेवल्याने तो लोकांत चर्चेचा विषय ठरला आहे. लॉरी क्र. आर जे ०१ जीए ५४२५ या सोळा चाकी गाडीने सदर क्रेन आमोणा येथे एका प्रसिद्ध कंपनीत आणण्यात येत होती. मात्र वाटेवर वीजवाहिन्या व अन्य गोष्टींचा अडथळा निर्माण होऊ नेय यासाठी सदर क्रेन दोन दिवस ‘आरटीओ’ने अडवून ठेवल्याचे लोकांत बोलले जात आहे. याबाबत मोले आरटीओ कार्यालयात चौकशी केली असता या क्रेनसंदर्भात काही उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

दोन वेगळ्या अपघातांत दोघे जण जागीच ठार

म्हापसा, दि. २७ (प्रतिनिधी): राज्यात आज करासवाडा म्हापसा व व्हाळशी डिचोली येथे झालेल्या दोन वेगळ्या अपघातांत दोघे जण ठार झाले. सकाळी पावणेआठच्या सुमारास कोलवाळ - पणजी बसच्या चाकाखाली येऊन मोहम्मद आमीन नामक अठरा वर्षीय युवक जागीच ठार झाला. तसेच व्हाळशी डिचोली येथे मारुती स्विफ्टची ठोकर बसून बसप्पा हा चाळीस वर्षीय पादचारी जागीच ठार झाला.
करासवाडा म्हापसा येथे घोटनीच्या वहाळाजवळ रस्त्यावरून आमीन चालत निघाला होता. मागून येणार्‍या बसच्या (जीए ०३ के ०४२३) बाजूचा भाग लागल्याने तो पडला आणि पाठीमागचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे तो तेथेच गतप्राण झाला. म्हापसा पोलिसांनी पंचानामा करून मृतदेह बांबोळी येथे सरकारी इस्पितळात पाठवला. सदर युवक करासवाडा येथे भंगार अड्ड्यावर काम करीत होता अशी माहिती मिळाली आहे. बसचा चालक राया कशाळकर याला अटक करण्यात आली आहे.
व्हाळशी डिचोलीत एक ठार
दरम्यान, आमच्या डिचोली प्रतिनिधीने पाठवलेल्या वृत्तानुसार डिचोलीहून म्हापशाला निघालेल्या जीए ०३ सी ६३८६ या क्रमांकाच्या मारुती स्विफ्टची धडक बसून बसाप्पा नामक चाळीस वर्षीय व्यक्ती ठार झाली. बसाप्पा रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी स्विफ्टच्या चालकाने ब्रेक लावला. तरीही बसाप्पा सुमारे ३५ मीटर फरफटत गेला. याप्रकरणी चालक चंद्रसेन दलाई (म्हापसा) याला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

‘सत्तरीचा आराखडा खुला करा’

खाणीसाठी जागा निश्‍चित केल्याचा संशय
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): सत्तरी तालुक्याच्या प्रादेशिक आराखड्यात खाणीसाठी जागा निश्‍चित केल्याचा संशय असल्याने तो आराखडा जनतेसाठी खुला करावा आणि त्यानंतरच तो अधिसूचित करावा, अशी मागणी ‘गोवा बचाव अभियान’ने केली आहे. त्याचप्रमाणे, अधिसूचित करण्यात आलेला सत्तरीच्या आराखड्याला त्वरित स्थगिती दिली जावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अभियानच्या निमंत्रक सबिना मार्टिन्स यांनी आज येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
सत्तरी, पेडणे आणि काणकोणसाठी अधिसूचित करण्यात आलेल्या आराखड्यात सरकारच्या राज्यस्तरीय समितीच्या दुरुस्ती केल्यानंतर तो आराखडा पुन्हा लोकांसाठी उपलब्ध करण्यात आला नाही. त्यामुळे सरकारने त्यात काय बदल केले आहेत, याची कोणालाच माहिती नाही. तसेच, अधिसूचित करण्यात आलेल्या आराखड्यात पुन्हा बदल करण्यात येणार नसल्याची अट सरकारची असल्याने सरकारने हा आराखडा पुन्हा लोकांसाठी खुला करावा, अन्यथा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सत्तरीच्या आराखड्यात खाणीसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्याची शक्यता आहे. या तालुक्याचा आराखडा लोकांच्या सूचनांसाठी ३० दिवसांसाठी खुला करावा असे सांगत राज्यस्तरीय समितीही बेकायदा असल्याचा आरोप यावेळी श्रीमती मार्टिन्स यांनी केला.
सरकारच्याच आदेशानुसार प्रस्तावित आराखडा पंचायत आणि पालिकेत तालुकास्तरीय समितीसमोर सूचनांसाठी खुला ठेवणे बंधनकारक आहे. याठिकाणी लोकांच्या सूचना घेऊन मगच तो आराखडा राज्यस्तरीय समिती समोर पाठवण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र, सत्तरीच्या आराखड्यात राज्यस्तरीय समितीनेच बदल करून तो आराखडा नगर नियोजन खात्याकडे पाठवला व तेथून त्याला मान्यता मिळवून घेतली, असा आरोपही त्यांनी केला.

भाजपचे आंदोलन व जनक्षोभापुढे सरकारची शरणागती

सुरक्षा नंबरप्लेट कंत्राट अखेर रद्द
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): राज्यातील सर्वसामान्य वाहनधारकांवर भुर्दंड घालू पाहणार्‍या सुरक्षा क्रमांकपट्टी कंत्राटातील घोटाळा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी उघडकीस आणल्यानंतर अखेर हे कंत्राटच रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे.
या निर्णयाविरोधात भाजप, वाहतूकदार तसेच खुद्द युवक कॉंग्रेसने जोरदार आंदोलन छेडले होते. ‘शिमनीत उत्च’ या कंपनीबरोबर केलेला यासंबंधीचा करार रद्दबातल ठरवून अखेर जनआंदोलनापुढे सरकारने नमते घेतले आहे. वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी आज यासंबंधीची माहिती दिली.‘शिमनीत उत्च’ या विदेशी कंपनीबरोबर सरकारने २९ फेब्रुवारी २००८ रोजी उच्चसुरक्षा क्रमांकपट्टी उपलब्ध करून देण्यासाठीचा करार केला होता. २६ नोव्हेंबर २००५ रोजी या कंत्राटासाठी सदर कंपनीतर्फे आपला प्रस्ताव सादर केला होता. या कंपनीतर्फे हे कंत्राट मिळवण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांत गोलमाल करण्यात आला होता. तसेच कंपनीच्या एका संचालकांवर फौजदारी खटला सुरू होता ही गोष्ट पर्रीकर यांनी विधानसभेत उघडकीस आणली होती.
या कंत्राटात मोठ्या प्रमाणात दलाली मिळवल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला होता. पर्रीकरांनी केलेल्या पर्दाफाशानंतर मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती या समितीने सादर केलेल्या अहवालात पर्रीकरांचे सर्व आरोप खडे उतरले होते. या अहवालात दर्शवण्यात आलेल्या गैरव्यवहारांचा आधार घेऊनच अखेर सरकारने हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय २५ जानेवारी २०११ रोजी घेतल्याचे अरुण देसाई यांनी सांगितले.
यासंदर्भात भाजपप्रमाणेच अखिल गोवा खाजगी बस मालक संघटना व इतर वाहतूकदार व युवक कॉंग्रेस यांनीही राज्यव्यापी आंदोलन छेडले होते. त्यामुळे सरकारला या कंत्राटाची कार्यवाही स्थगित ठेवणे भाग पडले होते. या कंत्राटाची चौकशी करावी,अशी मागणी करणारी तक्रार बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी दक्षता खात्याकडे केली होती. आता येत्या विधानसभा अधिवेशनात हे प्रकरण पुन्हा डोके वर काढील या भीतीनेच सरकारने हे कंत्राट तात्काळ रद्द केले, अशी प्रतिक्रिया श्री.ताम्हणकर यांनी दिली.
दोषींवर फौजदारी खटले भरा : पर्रीकर
हे कंत्राट रद्द करणे सरकारला भाग पडणार होतेच. हा निर्णय यापूर्वीच घेणे गरजेचे होते; उशिरा का होईना या कंत्राटातील घोटाळा उघड झाला व हे कंत्राट रद्द करणे सरकारला भाग पडले,अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिली. केवळ कंत्राट रद्द करून भागणार नाही तर या घोटाळ्यात सामील असलेल्या दोषींवर फौजदारी खटले तात्काळ दाखल होण्याची गरज आहे, अन्यथा तांत्रिक मुद्दांवर सरकारचा हा निर्णय अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे प्रकरण सरकारवर शेकणार याची चाहूल लागल्यानेच येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच सरकारने हे कंत्राट रद्द करून आपली सुटका करून घेतली आहे, असा टोलाही पर्रीकर यांनी हाणला.

म्हापसा जिल्हा इस्पितळ 'पीपीपी'वरच चालवणार

१५ मार्चपासून सर्व सेवा उपलब्ध
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): म्हापसा पेडे येथे बांधलेले जिल्हा इस्पितळ खाजगी भागीदारीवरच चालवण्यात येणार असून विरोधक व इतर काही आमदार जी वक्तव्ये करत आहेत त्याची आपणास पर्वा नाही, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज येथे केले.
म्हापसा इस्पितळाच्या खाजगीकरणाविरोधात सत्ताधारी व विरोधक आमदारांनी चालवलेल्या आंदोलनासर्ंदभात आरोग्यमंत्र्यांनी आज २७ रोजी कांपाल येथे आरोग्य खात्याच्या परिषद कक्षात पत्रपरिषद आयोजिली होती. ते म्हणाले की, 'पीपीपी' म्हणजे काय ते न समजणारेच जास्त ओरड करत आहेत. म्हापसा येथील इस्पितळ 'पीपीपी' धर्तीवरच सुरू होणार असून बांबोळी येथे असलेल्या सर्व सेवा या इस्पितळात उपलब्ध असतील. तसेच गोव्यातील लोकांना येथे जी आझिलो इस्पितळात फी आकारली जात होती तेवढीच ती जिल्हा इस्पितळातही आकारली जाईल. राजकीय नेत्यांनीच आधी या 'मॉडेल' इस्पितळाचा अभ्यास करावा व मगच काय ते बोलावे.
याप्रसंगी 'पीपीपी सेल'चे प्रमुख अनुपम किशोर यांनी म्हापसा जिल्हा इस्पितळ मार्चच्या १५ तारखेपासून सुरू होणार असल्याचे सांगून 'पीपीपी'मुळे गोवेकरांना कोणताही त्रास होणार नाही असे प्रतिपादन केले. यावेळी आरोग्य सचिव राजीव वर्मा, संचालिका डॉ. राजनंदा देसाई, 'गोमेकॉ'चे डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल उपस्थित होते.

Wednesday 26 January, 2011

श्रीनगरमध्ये आज तिरंगा फडकणारच

भाजपचा निर्धार
सीमेवर एकता यात्रा रोखली

नवी दिल्ली, दि. २५ : उद्या श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा ङ्गडकविण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी श्रीनगरकडे निघालेल्या भाजप-भाजयुमोच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना अडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कंबर कसली असून, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी भाजप कार्यकर्ते वैष्णोदेवीला जाणार्‍या भाविकांचा वेश घेऊन काश्मीरमध्ये घुसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसी बळ वापरून झेंडावंदन रोखण्याचा प्रयत्न करणारे केंद्रातील संपुआ सरकार हे इंग्रजांच्या पावलावर पाऊल टाकत आहे, जणू या देशात तिरंगा फडकाविणे हा गुन्हा ठरत आहे. आणीबाणीची आठवण करून देणारी सरकारची कारवाई निषेधार्ह आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ भाजप नेत्यांनी आज व्यक्त केली. तिरंगा फडकाविण्यासाठी आज श्रीनगरमध्ये जाणार्‍या सुषमा स्वराज, अरुण जेटली व अनंतकुमार यांच्यासह असंख्य नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने देशात संतापाची लाट पसरली आहे. फुटीरवाद्यांनी दिलेल्या धमकीपुढे सरकार नमल्याचेच सिद्ध होते, अशी तीव्र प्रतिक्रिया भाजप नेते शाहनवाझ हुसेन यांनी व्यक्त केली आहे. तिरंगा जाळणार्‍यांना सुरक्षा दिली जात आहे, तर जे तिरंगा फडकाविण्यासाठी जात आहेत, त्यांना मात्र अटक केली जात आहे, अशी टीका सुषमा स्वराज यांनी केली. एकता यात्रा थांबविण्याची सरकारची कारवाई ही ‘ऐतिहासिक चूक’ठरेल असा इशारा अरुण जेटली यांनी दिला.
पंजाबमधून येणारा राष्ट्रीय महामार्ग आय-ए हा काश्मीरमध्ये प्रवेश करण्यासाठी असलेला एकमेव रस्ता मार्ग आहे, तर लखनपूर हे छोटेसे गाव काश्मीरचे एकप्रकारे प्रवेशद्वार आहे. पुलावरून, नदीच्या पात्रातून, तसेच एका कच्च्या रस्त्यावरून त्या गावात प्रवेश करता येतो.
४०० कार्यकर्त्यांना आज जम्मूत अटक करण्यात आली. राज्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने भाजपाच्या रॅलींवर सरकटपणे बंदी टाकली आहे. या कार्यकर्त्यांनी रॅली काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. काही ठिकाणी पोलिस व प्रदर्शनकारी यांच्यात संघर्ष उडाला असता दगडङ्गेक झाली. कालच जम्मू-काश्मीर सरकारने राज्यभरातून भाजपाच्या दीड हजारावर कार्यकर्त्यांना अटक केली.
नेत्यांना ताब्यात घेतले
उद्याच्या लाल चौकातील तिरंगा ङ्गडकविण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भाजपाच्या चार वरिष्ठ नेत्यांचे येथील विमानतळावर आगमन होताच त्यांना ताबडतोब ताब्यात घेण्यात आाले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या चार नेत्यांची नावे अशी आहेत : जुगल किशोर, घारू राम व श्याम चौधरी तसेच उधमपूरचे भाजपा नेते पवन खजुरिया. कालच भाजपा नेत्या सुषमा स्वराज, अरुण जेटली व अनंतकुमार यांना जम्मू विमानतळावर उतरताच ताब्यात घेऊन त्यांना रस्त्याच्या मार्गाने पंजाब राज्यात सोडण्यात आले होते.
भारतीय जनता पक्षाच्या एकता यात्रेला रोखण्यासाठी, जम्मू-काश्मीरचे प्रवेशद्वार समजल्या जाणारे लखनपूर गाव व परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून, काश्मीरकडे जाणार्‍या सर्व मार्गांवर पोलिसांचा खडा पहारा लावण्यात आला आहे. कोणतीही किंमत मोजून एकता यात्रेला रोखण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे. काश्मिर व पंजाबला जोडणारा रावी नदीवरील पूल व नदीच्या पात्रावरही पोलिस चोवीस तास लक्ष ठेवत असून, जम्मू-काश्मीरच्या सशस्त्र पोलिस दलाचे दोन हजार जवान लाठ्या व अश्रुधुराची नळकांडी घेऊन परिसरात तैनात करण्यात आले आहेत. त्या ठिकाणावरून काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार्‍यांना रोखण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे, १०० मीटर लांबीच्या पुलाच्या मध्यावर पहारा देत असलेल्या एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले. या पुलाचा अर्धा भाग काश्मीरमध्ये, तर अर्धा भाग पंजाबच्या हद्दीत असल्याने पुलाच्या अर्ध्या भागात काश्मीरचे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर-पंजाब सीमेवर दोन हजार पोलिस तैनात करण्यात आले असून, त्यांच्या मदतीसाठी आणखी पोलिस सज्ज ठेवण्यात आले आहेत. हे पोलिस भ्रमणध्वनी व वायरलेस संचाद्वारे त्यांच्या वरिष्ठांच्या संपर्कात राहून वेळोवेळी त्यांना परिस्थितीची ताजी माहिती पुरवित आहेत.

‘देशद्रोही कॉंग्रेसचे दहशतवादाला प्रोत्साहन’

तिरंगा प्रकरणी गोवा भाजपचे दणकेबाज आंदोलन
राजधानी पणजीतधरणे व निदर्शने
पंतप्रधानांच्या पुतळ्याचे दहन
कार्यकर्त्यांना जम्मूत अटक, सुटका

पणजी, दि.२५ (प्रतिनिधी): देशाची शान असलेला तिरंगा फडकावू न देणारे कॉंग्रेस व जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे देशद्रोही आहेत. कॉंग्रेस देशद्रोह्यांना आसरा देऊन देशभक्तांना तुरुंगात टाकण्याचे पाप करत असून या कृत्याबद्दल देशातील जनतेने कॉंग्रेसला शासन करायला हवे, असे सणसणीत प्रतिपादन खासदार तथा उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोशियारी यांनी आज येथे केले.
देशाच्या कानाकोपर्‍यांतून श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावयाला जाणार्‍या देशभक्त भाजप कार्यकर्त्यांना कॉंग्रेस व उमर अब्दुल्ला यांच्या सरकारने रोखून धरले आहे. त्याच्या निषेधार्थ आज पणजी कॅप्टन ऑफ पोर्टजवळ भाजपतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्ते व देशप्रेमी नागरिकांना मार्गदर्शन करताना खा. कोशियारी बोलत होते.
ते म्हणाले, कॉंग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वत्र देशविरोधी कारवायांना ऊत आला आहे. कॉंग्रेसचा दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा प्रकार विघातक आहे. त्यामुळे देशाची सुरक्षाच धोक्यात आली आहे .
तिरंग्याला विरोध हा देशद्रोह ः श्रीपाद नाईक
खासदार श्रीपाद नाईक म्हणाले, स्वतंत्र भारतात तिरंगा फडकावता येऊ नये हे दुर्दैवी आहे. तिरंग्याला विरोध करणे म्हणजे देशद्रोहच. त्यामुळे देशद्रोही कॉंग्रेसला माफी नाहीच.
कॉंग्रेसची शंभरी भरली : पर्रीकर
तिरंगा फडकवण्यास विरोध करणार्‍या कॉंग्रेसची शंभरी भरली आहे. देशप्रेमी लोकांना आता सतर्क राहवे लागेल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले.
देशविरोधी शक्तींना बळकटी प्राप्त करून देणारे निर्णय घेणार्‍या कॉंग्रेसचा अंतःकाळ जवळ आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.
प्रदेश भाजप सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर यांनी भाजप ध्वजाचे राजकारण करत नाही; उलट कॉंग्रेसनेच वेळोवेळी ध्वज, व जातीचे राजकारण करून सत्ता बळकावली असल्याचा आरोप केला.
तिरंग्यासंदर्भात पंतप्रधानांनी घेतलेली भूमिका दुर्दैवी असून त्याची किंमत कॉंग्रेसला चुकवावी लागेल, असे आमदार दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले.
संजय हरमलकर, वैदेही नाईक, आमदार फ्रान्सिस डिसोझा, विजय पै खोत, रमेश तवडकर, दामोदर नाईक तसेच राजेंद्र आर्लेकर आदींची कॉंग्रेसचा निषेध करणारी भाषणे झाली. नंतर उपस्थितांनी कॉंग्रेसच्या विरोधात तुफानी घोषणा देत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या यांच्या पुतळ्याचे दहन केले.
दरम्यान गोव्याहून काश्मीरला गेलेल्या सर्वच्या सर्व २०० कार्यकर्त्यांना आज अटक करण्यात येऊन उशिरा त्यांना सोडण्यात आले.

सिप्रियानो फर्नांडिस मृत्यूप्रकरण तिघे पोलिस निलंबित

तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): मयडे बार्देश येथील सिप्रियानो फर्नांडिस मृत्यू प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर, उपनिरीक्षक राधेश रामनाथकर व हवालदार संदीप शिरवईकर या तिघांना आज सेवेतून निलंबित करण्यात आले. पोलिस चौकशीत या तिघांनी हलगर्जीपणा केल्याचे सिद्ध झाल्याने आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही माहिती पोलिस अधीक्षक तथा प्रवक्ते आत्माराम देशपांडे यांनी दिली.
पोलिस उपअधीक्षक बोसुएट सिल्वा यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत, सिप्रियानो याला अटक केल्यानंतर पणजी पोलिसांनी पोलिसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सिल्वा यांच्या अहवालाच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली, असे श्री. देशपांडे यांनी सांगितले. मात्र, सिप्रियानोच्या मृत्यू प्रकरणाशी या अधिकार्‍यांचा संबंध असल्याचे अद्याप उघड झालेले नाही. त्याबाबतची चौकशी उपविभागीय न्यायदंडाधिकारी साबाजी शेटये करीत आहेत. निरीक्षक संदेश चोडणकर पोलिस स्थानकात उपस्थित असताना पोलिसी प्रक्रियेत हलगर्जीपणा झाल्याचा ठपका संबंधित अधिकार्‍यांवर ठेवण्यात आला आहे. तसेच, येत्या एका महिन्यात उपअधीक्षक सिल्वा या प्रकरणात अंतिम अहवाल सादर करणार आहेत.
मयत सिप्रियानो यांनी आपल्या प्रेयसीला धमकी दिल्याप्रकरणी त्याला पणजी पोलिसांनी अटक केली होती. मग अमानुष मारहाणीनंतर त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पोलिसांनी दाखल केले होते. यावेळी त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले होते. त्याच्या निधनानंतर त्याच्या प्रेयसीने पत्रकार परिषद घेऊन पणजी पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच कारवाई होत नाही तोवर सिप्रियानोचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा इशारा त्याच्या नातेवाइकांनी दिला होता.
सिप्रियानोचा मृत्यू पोलिस कोठडीत झाला की नाही, याची चौकशी न्यायदंडाधिकारी साबाजी शेट्ये करीत असून येत्या काही दिवसांत त्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्त केला जाणार आहे. दरम्यान, आज (मंगळवारी) सायंकाळी पणजी पोलिस स्थानकातील ‘केस डायरी’ आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
संदेश चोडणकरांचा न्यायालयात अर्ज
उपविभागीय न्यायदंडाधिकारी साबाजी शेट्येे यांच्या चौकशीला आव्हान देणारा अर्ज न्यायालयात करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी हा अर्ज केला आहे. शेट्ये यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार नसल्याचा दावा त्यांनी या अर्जात केला आहे. तसेच, सिप्रियानो याला त्याच्या नातेवाइकांकडूनच मारहाण झाली होती, असा जबाबही एका व्यक्तीकडून न्यायालयासमोर नोंद करून घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.

हे तर मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांचे सेटिंग!

भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकरांचा टोला
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): पोलिस, ड्रग्ज माफिया व राजकारणी यांचे साटेलोटे प्रकरणी ‘सीबीआय’ चौकशीची शिफारस तीन महिन्यांपूर्वीच करण्यात आली व ही ‘फाइल’ सचिवालयात रेंगाळत पडली असा जो दावा सरकारने केला आहे, त्याबाबत भाजपने आश्‍चर्य व्यक्त केले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अधिकृतरीत्या खुलासा करावा,अशी मागणी भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी केली आहे. राज्यात विरोधी भाजप तसेच विविध इतर सामाजिक संघटनांकडून ड्रग्ज प्रकरणी ‘सीबीआय’ चौकशीची मागणी जोर धरू लागल्याने तसेच यासंबंधी ‘एनएसयुआय’ ने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने सरकारचा पर्दाफाश होईल याचे संकेत मिळाल्यानेच आपली कात वाचवण्यासाठी सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोपही श्री.आर्लेकर यांनी केला.
ड्रग्ज प्रकरणावरून सध्या कॉंग्रेस आघाडी सरकारची प्रचंड नाचक्की झाली आहे. हा प्रकार राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचल्याने राज्याची प्रतिमा मलिन झाली आहे. याप्रकरणावरून सरकार अडचणीत येण्याचा धोका ओळखूनच ‘सीबीआय’ चौकशीच्या पूर्व शिफारशीचा हा मुद्दा जाणीवपूर्वक तयार केल्याचा संशयही श्री.आर्लेकर यांनी व्यक्त केला. कालपरवापर्यंत स्थानिक पोलिसांकडून याप्रकरणाची सुरू असलेल्या चौकशीबाबत समाधान व्यक्त करणारे तसेच निलंबित पोलिस निरीक्षक सुनील गुडलर प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करण्याची घोषणा करणारे सरकार आता ‘सीबीआय’चौकशीला मान्यता दिल्याचे सांगते ही गोष्ट पटणारी नाहीच,असेही श्री.आर्लेकर म्हणाले.
विरोधी भाजप सोडाच पण गृहमंत्री रवी नाईक व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडून आपल्याच पक्षाच्या आमदारांना व मंत्रिमंडळाला या गोष्टीची कल्पना का देण्यात आली नाही,असाही सवाल श्री.आर्लेकर यांनी उपस्थित केला आहे, ड्रग्ज प्रकरणाची चोैकशी ‘सीबीआय’ कडे द्यावी या मागणीला भाजपसह सरकार पक्षातील काही आमदारांनीही विधानसभेत जाहीर पाठिंबा दिला होता. कॉंग्रेस विधिमंडळ बैठक तसेच प्रदेश कॉंग्रेस पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीतही या विषयावरून अनेकांनी चिंता व्यक्त केल्याचे प्रसारमाध्यमांतून उघड झाले आहे. त्यामुळे आता आपली सुटका नाही, हे ओळखूनच हे ‘नाटक’ रचण्यात आले असण्याची शक्यताही आर्लेकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ‘एनएसयुआय’ या कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेकडून याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी सरकारकडून ‘सीबीआय’ चौकशीची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात आले नाही. खुद्द न्यायालयालाही अंधारात ठेवण्यापर्यंत सरकार मजल मारू शकते काय, असा सवाल आर्लेकर यांनी उपस्थित केला आहे.
गृहमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडून घडलेला हा प्रकार म्हणजे ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू कुपंथ’ अशा स्वरूपाचा असल्याचा टोल आर्लेकर यांनी हाणला. गृहमंत्री ड्रग्ज प्रकरणामुळे अडचणीत आले असले तरी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे बेकायदा खाण व्यवसाय व अबकारी घोटाळ्यांमुळे संशयाच्या घेर्‍यात सापडले आहेत, त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी आपापल्या गैरव्यवहारांवर पांघरूण घालण्यासाठीच हे ‘सेटिंग’ चालवल्याचा घणाघाती आरोप आर्लेकर यांनी केला.

महामार्ग रुंदीकरणाविरोधात समिती न्यायालयात जाणार

२८ रोजी म्हापशात जाहीर सभेचे आयोजन
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग १७ व ४ (अ) च्या नियोजित मार्गाला विरोध करण्यासाठी न्यायालयात याचिका सादर केली जाईल, असा निर्णय राष्ट्रीय महामार्ग फेरबदल कृती समितीने घेतला आहे. याप्रकरणी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे काम सुरू असून राष्ट्रीय महामार्ग कायद्याची जाण असलेल्यांचीही मदत घेतली जाईल, अशी माहिती समितीचे निमंत्रक सुनील देसाई यांनी आज येथे बोलावलेल्या पत्रपरिषदेत दिली. याप्रकरणी पुन्हा नव्याने आंदोलन सुरू करण्याचा निर्धार समितीने घेतला असून येत्या २८ रोजी म्हापसा टॅक्सी स्थानकावर संध्याकाळी ५ वाजता जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
या सभेला विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, माथानी साल्ढाणा, कामगारनेते ख्रिस्तोफर फोन्सेका, म्हापशाचे नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर,क्लॉड आल्वारीस, तुलीयो डिसोझा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकारने ‘एनएच-४(अ)’ संबंधी अंतिम अधिसूचनाच जारी केली असून एनएच-१७ संबंधी जनसुनावणी सुरू आहे. महामार्ग सर्वेक्षणाचे नकाशे तयार नसताना जनसुनावणी घेण्याचा प्रकार जनतेचा विश्‍वासघात असल्याची टीकाही यावेळी श्री.देसाई यांनी केली. सध्याच्या महामार्गासाठी तयार केलेल्या आराखड्याला समितीचा विरोध कायम आहे. ‘प्रादेशिक आराखडा-२०२१’ नुसारच महामार्गाचे काम व्हावे, असे त्यांनी निक्षून सांगितले.
राणे यांच्या आराखड्याचे काय झाले?
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सभापती प्रतापसिंग राणे यांनी सहापदरी महामार्गासाठी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सहापदरी महामार्गाचे आरेखन तयार केले होते. त्यावेळी एकही बांधकाम पाडण्याची गरज नव्हती. हा आराखडा कुठे गेला, असा सवालही यावेळी करण्यात आला.सध्याच्या महामार्गावरच चौपदरी व सहापदरी रस्ता तयार करून गोमंतकीयांच्या खिशाला टोलची कात्री लावण्याचा हा प्रकारच अन्यायकारक आहे. त्यासाठी सर्वांनी या नियोजित प्रकल्पाला विरोध करण्याची गरज आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

कदंबचे बदली चालक सेवेत कायम होणार

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): गेली १५ ते २० वर्षे कदंब महामंडळात कंत्राट पद्धतीवर बदली चालक म्हणून काम करणार्‍या ६८ चालकांना सेवेत कायम करण्यात येणार आहे. आज त्यासंदर्भात झालेल्या बैठकीत त्या दिशेने पाऊल उचलण्यात आल्यामुळे या अन्यायग्रस्त चालकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
हे ६८ बदली चालक गेली अनेक वर्षे सेवेत कायम करावे यासाठी रोजगार न्यायालयात लढा देत आहेत. त्यंाना सेवेत कायम करण्याचे आश्‍वासनही व्यवस्थापनाकडून अनेकदा देण्यात आले. मात्र पुढे कसलीच कार्यवाही झाली नाही. मात्र कदंबच्या वर्धापनदिनी दिलेल्या आश्‍वासनानुसार आज रोजगार न्यायालयात रोजगार आयुक्त फातिमा रॉड्रिग्ज, कामगार नेते पुती गावकर व कदंबचे कार्मिक अधिकारी टी. के. पावशे यांच्यात बैठक होऊन तीत या सर्व कर्मच्यार्‍या सेवेत कायम करण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. त्यासाठी कदंब महामंडळाने ११ फेब्रुवारीपर्यंत मुदत मागितली आहे. त्या दिवशी या कर्मचार्‍यांना सेवेत कायम केले जाण्याची शक्यता आहे.

Tuesday 25 January, 2011

भीमसेन जोशी यांचे देहावसान

सारा देश गहिवरला; हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
पुणे, दि.२४ (प्रतिनिधी): भारतीय गायकीला ‘भीमसेनी’ थाट देणारे स्वरभास्कर भीमसेन जोशी यांचे आज सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ‘काया ही पंढरी.. आत्मा हा विठ्ठल...’ हा त्यांनीच गायलेला अभंग वैकुंठ स्मशानभूमीत दुमदुमला आणि दुपारी अडीचच्या सुमारास हजारो शोकाकूल चाहत्यांच्या साक्षीने पंडितजींना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे भरून आलेे. पंडितजींच्या अनंत आठवणींचा पट डोळ्यांसमोरून तरळल्याने कंठ दाटून अनेकांना हुंदका आवरला नाही.
वीस दिवसांपूर्वी पंडितजींना अस्वस्थ वाटू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथेच त्यांचा त्रास वाढल्याने कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले होते.
गेले बारा दिवस त्यांच्या प्रकृतीत सतत चढउतार होत होता. काल रविवारीच त्यांचा त्रास वाढला. त्यातूनच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाची बातमी सकाळीच सर्व वाहिन्या व वृत्तसंस्था मुळे सर्वत्र प्रसृत झाल्याने सकाळी नऊ वाजल्यापासूनच त्यांच्या राहत्या घरी म्हणजे सेनादत्त पेठेतील बंगल्यावर शोकाकूल चाहत्यंाची गर्दी सुरु झाली.
हजारोंच्या उपस्थितीत सायंकाळी सव्वाचारच्या दरम्यान येथील वैकुंठस्मशानभूमीवर स्वरभास्कर, भारतरत्न भीमसेन जोशी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस एम कृष्णा उपस्थित होते. कृष्णा यांनी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली. भीमसेन जोशी यांची अंत्ययात्रा निघण्यापूवीं काही मिनिटे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आपले विमान पुण्याला वळवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तीन वाजता अंत्ययात्रा सुरु झाली. घरापासून वैकुंठ स्मशान जवळच असल्याने दहा मिनिटातच ती वैकुंठवर पोहोचली. तेथे प्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण केली. कृष्णा यांना येण्यास वेळ लागल्याने स्मशानभूमीवरच काही वेळ सर्वांना थांबावे लागले. त्यांच्या श्रद्धांजलीनंतर शासकीय मानवंदना, एकवीस बंदुकांची तीन वेेळची सलामी, पोलिस बँडचे
शोकधून वादन आणि श्रद्धांजली शस्त्र असे करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर मंत्राग्नी संस्कार करण्यात आले. अंत्यविधीच्या वेळी त्यांनीच गायिलेले ‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ’ हे भक्तीगीत ध्वनिक्षेपकावर वाजवण्यात येत होते. त्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.
अल्प परिचय
पंडितजींनी भारतातील सामान्य माणसाला शास्त्रीय संगीत आणि भक्तीसंगीत गुणगुणायला भाग पाडले. गाण्याच्या पहिल्या स्वरापासून आक्रमक गायकीने सामान्य माणसाच्या मनाची पकड घेणारे भारतरत्न भीमसेन जोशी हे विसाव्या शतकातील आणि एकविसाव्या शतकातीलही लोकप्रिय गायक. किराणा घराण्याच्या बाजातून शास्त्रीय गायकी आणि भक्तिसंगीत ही त्यांची भारतीय संगीताला अजरामर देणगी मानली जाते. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना २००८ मध्ये देण्यात आला. मराठीत त्यांची लोकप्रियता ‘संतवाणी’ या अभंग गायकीने परिचित आहे. कानडीतही त्यांची संतवाणी लोकप्रिय झाली.
त्यांच्याकडे गायकीची परंपरा आली ती त्यांच्या आजोबांकडून. त्यांचे आजोबा भीमाचार्य हे त्या काळातील नाणावलेले गायक होते. भीमसेन यांना लहानपणापासूनच गायनाचे विलक्षण आकर्षण होते. गाणे शिकण्यासाठी घरातून पळून गेले व मुंबई, विजापूर, जालंदर, कलकत्ता, आदी ठिकाणी चांगल्या गुुरुच्या शोधात भ्रमंती करून गायनकला आत्मसात केली. काही काळ त्यंानी लखनौ आकाशवाणी केद्रावर नोकरीही केली. अखेरीस रामभाऊ कुंदगोळकर म्हणजे सवाई गंधर्व यांच्याकडे गाण्याची दीक्षा घेतली. त्यांनी निरलसपणे गुुरुसेवा करून अतिशय परिश्रमाने पाच वर्षे शिक्षण घेतले. सवाई गंधर्व यांच्या षष्ठब्दीच्या कार्यक्रमात ते प्रथम पुण्याला आले. सवाई गंधर्व यांनी त्यांची किराणा घराण्याची गायनाची परंपरा त्या घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खॉं यांच्याकडून गुरुशिष्य परंपरेत घेतली. त्याचबरोबर सवाई गंधर्व यांनी देवगंधर्व भास्करबुवा बखले व ग्वाल्हेरचे निसार हुसेन खान यांच्याकडे शिक्षण घेऊन किराणा घराण्याची गायकी विकसित केली होती. ती सारी गायकीची परंपरा सवाईगंधर्व यांनी भीमसेन यांना दिली. १९३३ साली म्हणजे अगदी लहानपणी त्यांनी अब्दुल करीम खॉंन यांची ‘पिया बिन नही आवत चैन ’ ही झिंझोटी रागातील ठुमरी त्यांनी ऐकली आणि मनानेच करीम खॉं यांच्याकडे जाऊन शिष्यत्व पत्करायचे ठरविले. त्यावेळी त्यांचे वय ङ्गक्त अकरा वर्षाचे होतेे. पुढे सवाई गंधर्व यांच्याकडून त्यांनी खॉन साहेबांची गायकी शिकली. १९४३ मध्ये त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर पहिले प्रत्यक्ष म्हणजे लाईव्ह गायन केले. ते अवघे बावीस वर्षाचे असताना हिज मास्टर्स व्हाईस या ग्रामोङ्गोन कंपनीने त्यांच्या कानडी आणि हिंदी गायनाचा पहिला अल्बम काढला.
जयपूर घराण्याच्या केसरबाई केरकर आणि इंदूर घराण्याचे अमीरखान यांच्याकडून लयकारीच्या बोल ङ्गिरवण्याच्या व तानङ्गिरकीच्या जाती आत्मसात केल्या. यांचा परिणाम असा झाला की सवाई गंधर्व यांची मूळची स्वरप्रधान गायकी भीमसेन यांनी अधिक आक्रमक, अधिक गतीमान आणि पहिल्या सुरापासून पकड घेणारी अशी केली. त्यांच्या या वैशिष्ठयामुळे त्यांचेे स्थान संगीत विश्वात अजरामर मानले जाते. रामकृष्ण पटवर्धन, माधव गुडी, पंडीत विनायक तोर्वी, श्रीकांत देशपांडे, उपेंद्र भट, आनंद भाटे, आणि त्याचा मुलगा श्रीनिवास यांचा समावेश त्यांच्या शिष्यवर्गात आहे.
भीमसेन जोशी यांचे वैशिष्ट्य असे की, सामान्य माणूस आणि शास्त्रीय गायनाची आवड असणारे अशा सर्व प्रकारच्या श्रोत्यांना त्यांचे गायन आवडत असे. भीमसेनजी हे चतुरस्र गायक असले तरी त्यांचे आवडते राग म्हणजे शुद्धकल्याण, मिया की तोडी, पूरिया धनश्री, मुलतानी, भीमपलास, दरबारी आणि रामकली. भीमसेनजींनी ङ्गारसे चित्रपटांचे पार्श्वगायन केलेले नाही, पण जे केले ते मात्र अजरामर झाले. पुण्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव ही देशातील संगीत वैभवाची शान मानली जाते. तो महोत्सव भीमसेनजींनी १९५३ मध्ये सुरू केला.

नामवंतांची आदरांजली
राष्ट्रपती प्रतिभा पाटील ः हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पंडितजींनी सामान्य माणसापर्यंत पोहोचवले त्यातून त्या संगीताला लोकप्रियतेची उंची मिळाली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ः भीमसेनजींच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राचे ङ्गार मोठे नुकसान झाले आहे. ते गाताना असे वाटत असे की, त्यांच्या सुरात सारा भारत बोलत आहे. किराणा घराण्याच्या शैलीतून त्यांनी भारतीय संगीत शिखरावर नेलेे.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग ः भीमसेनजींच्या निधनाने देशाची अपरिमीत हानी झाली आहे. त्यांची गायकी म्हणजे ईश्‍वरी आविष्कारच होय.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ः पंडितजींना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले होते तरी जनसामान्याच्या हृदयात त्यांना जे स्थान मिळाले होते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा ः भीमसेनजी कर्नाटकचे व महाराष्ट्राबरोबरच सार्‍या देशाचेही होते. त्यांच्या निधनाबद्दल कर्नाटक सरकार एक दिवसाचा राज्य पातळीवरील शोक पाळत आहे.
भीमसेन जोशी यांचे निधन झाल्याचे कळल्यावर बेंगळुरू येथून दिल्लीला जाणारे विमान घेऊन येडियुराप्पा पुण्याच्या दिशेने आले व त्यांनी भीमसेनजींना येथील सेनादत्त पेठेतील त्यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.
सुप्रसिद्ध धृपद धमाल गायक सईदुद्दीन डागर ः ते या शतकाचे तानसेन होते. आम्हा डागरमंडळींवर त्यांनी मनापासून प्रेम केले होते.
सुरेश तळवळकर ः ते ङ्गक्त परमेश्वरासाठी आणि त्या दृष्टीने स्वतःसाठी गात असत. त्यातून आम्ही धन्य होत होतो.
पडितजींचे चिरंजीव राघवेंद्र जोशी ः आम्ही त्यांना सप्तसुरांचे योगी मानतो.
संजीव अभ्यंकर ः मी संगीताच्या क्षेत्रात स्थिरावलो याला ते कारण घडले. मी बारा वर्षांचा असताना माझे गाणे ऐकले व त्यांनी माझ्या आई वडिलांना असे सांगितले की, या मुलाची गायकी ज्ञानेश्वर कुळातील आहे.
अमजद अली खान ः ते किराणा घराण्याचे गायक होते हे सर्वांना माहीत आहे पण आज असे निश्चित म्हणता येईल की ते स्वतःच एक घराणे होते.
चित्रकार रवी परांजपे ः गेल्या पन्नास वर्षांत भारतीय संगीताला कमी लेखण्याची जगात एक पद्धती पडली होती. तो प्रकार पंडितजींच्या गायकीने मागे पडला.
आनंद मोडक ः ते पुढील काही युगांचे मार्गदर्शक ठरले आहेत.
नर्तिका मनिषा साठे ः भारतीय कलाकारांना हा धक्का पचवणे कठीणच.

जनतेत चर्चेचा विषय रखडलेली ‘ती’ फाइल आणि सरकारचे ‘मौन’

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): पोलिस, ड्रग्स माफिया व राजकारणी साटेलोटे प्रकरण ‘सीबीआय’ कडे देण्याची शिफारस खुद्द गृहमंत्री रवी नाईक यांनी १५ नोव्हेंबर २०१० रोजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे सादर केली. या शिफारशीला मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही मान्यता दिली; परंतु गेले तीन महिने ही फाइल सचिवालय पातळीवर रेंगाळत राहिल्याची खळबळजनक माहिती आता उघड झाली आहे. या ‘फाइल’ चे रेंगाळणे व त्याबाबत सरकारी पातळीवर पाळण्यात आलेले ‘मौन’ हाच आता चर्चेचा विषय बनला आहे.
राज्यातील ड्रग्स माफिया आणि पोलिस तथा राजकारण्यांशी असलेले त्यांचे कथित साटेलोटे हा विषय गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’मार्फत व्हावी यासाठी विरोधी भाजप तसेच अन्य संघटनांकडून जोरदार मागणी झाली होती. याप्रकरणावरून विधानसभा कामकाज बंद पाडण्याचे प्रकार घडल;े तसेच ‘एनएसयुआय’ या कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईपर्यंत ‘सीबीआय’ चौकशीची शिफारस केल्याची माहिती गुप्त का ठेवण्यात आली, याचे कोडे अनेकांना पडले आहे. या गोष्टीची आता वाच्यता झाल्यानंतर आज खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेल्या ‘सीबीआय’ चौकशीची मागणी सचिवालय पातळीवर नेमकी कोणत्या कारणासाठी रेंगाळली याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, या फाइलला मुख्य सचिवांनी मान्यता देऊन विशेष सचिवांकडे पाठवली. विशेष सचिवांनीही या शिफारशीला मान्यता देऊन ती पुढील प्रक्रियेसाठी अवर सचिव पातळीवर पाठवली; तरीही निव्वळ ५१ दिवस ही ‘फाईल’ सचिवालय पातळीवर रेंगाळत पडल्याचे आता उघड झाले आहे. याप्रकरणी गृह खात्यातील सूत्रांकडे चौकशी केली असता त्यांनी थेट विशेष सचिवांकडे अंगुलिनिर्देश करून त्याबाबतचे स्पष्टीकरण वरिष्ठांकडूनच घ्यावे, असे पत्रकारांना सांगितले.
एकीकडे हा विषय सचिवालय पातळीवर रेंगाळत असताना त्याबाबतची वाच्यता गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांकडून का झाली नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दरम्यान, १९ जानेवारी २०११ रोजी ‘सीबीआय’ चौकशीच्या प्रस्तावाला अखेर मान्यता देण्यात आली असून येत्या विधानसभा अधिवेशनात त्यासंबंधीची घोषणा करून विरोधकांची हवाच काढून घेण्याची सरकारची व्यूहरचना होती, अशीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
‘रॉय’बाबत साशंकता
या एकूण प्रकरणी ‘रॉय’ नामक व्यक्तीचा जो उल्लेख केला जात आहे ती व्यक्ती रॉय नाईक नसून वेगळीच असल्याचेही सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या अटाला व दुदू या ड्रग्स माफियांशी ‘रॉय’ नामक अनेक व्यक्ती संपर्कात होत्या,असेच चौकशीच आढळून आल्याचेही सांगण्यात येत आहे. काही ‘रॉय’ नामक व्यक्तींच्या जबान्याही पोलिसांनी नोंद करून घेतल्या असून त्यांनी ड्रग्स माफियांशी असलेल्या संबंधांची कबुली आपल्या जबानीत दिल्याचेही सांगण्यात येत आहे.

आम आदमीचा जप करणार्‍या ‘कॉंग्रेसकडून लोकांची लूट’

भाजप महिला मोर्चाचा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर भव्य मोर्चा
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): वाढत्या महागाईच्या निषेधार्थ गगनभेदी घोषणा देत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चातर्फे आज मुख्यमंत्र्यांच्या येथील बंगल्यावर भव्य मोर्चा नेण्यात आला आणि आल्तिनो परिसर त्यामुळे दणाणून गेला. ‘आम आदमीचे सरकार’ असा नारा देणारे कॉंग्रेसचे सरकार फक्त धनाढ्यांचे आहे. गेल्या पाच वर्षांत विविध वस्तूंबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचे दर भरमसाट वाढले आहेत. याला कारण केंद्रातील व राज्यातील कॉंग्रेसची सरकारेच आहेत, अशी खरमरीत टीका प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ. कुंदा चोडणकर यांनी आज येथे केली.
भाजप माहिला मोर्चातर्फे कॉंग्रेसने वाढवलेल्या महागाईविरुद्ध आंदोलनाला सुरुवात झाली असून आता हे आंदोलन गावागावांत नेण्यात येणार आहे. सामान्यांना वार्‍यावर सोडलेल्या या सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत अशी मागणीही सौ चोडणकर यांनी केली. मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर भव्य मोर्चा नेऊन त्यांना महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे निवेदन दिल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
महिला मोर्चाच्या दक्षिण गोवा अध्यक्ष कृष्णी वाळके यांनी, कॉंग्रेसच्या लोकविरोधी धोरणावर कडाडून टीका केली. कॉंग्रेसने दलाल पोसल्यामुळे महागाई वाढली असून शेतकरी व ग्राहक यांचे संघटन झाल्यास महागाई कमी होईल असे त्या म्हणाल्या.
सरचिटणीस वैदेही नाईक यांनी या वेळी विद्यमान राज्य व केंद्र सरकारकडे कोणताही ठोस कार्यक्रम नसल्यामुळे महागाई दिवसेंदिवस वाढत असलेल्याचे निवेदन केले. प्रदेश सचिव शिल्पा नाईक निना नाईक आदींनी, कॉंग्रेसविरुद्ध सार्वत्रिक लढा उभारण्याची गरज व्यक्त केली.
सौ. चोडणकर, नगरसेविका वैदेही नाईक, कृष्णी वाळके, प्रदेश भाजपा सचिव व जिल्हा पंचायत सभासद
शिल्पा नाईक, प्रदेश सचिव नीना नाईक, उत्तर गोवा उपाध्यक्ष शुभांगी वायंगणकर, नगरसेविका दीक्षा माईणकर, ज्योती मसुरकर, सोनिया आस्नोडकर, प्रतिमा शेट्ये आदी महिला नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आल्तिनो येथे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर गोव्यातील विविध भागांतून आलेल्या महिला जमल्या व महागाई विरोधात जोरदार घोषणा देत वातावरण तापवले.
महागाई वाढवणार्‍या कॉंग्रेसचा जोरदार शब्दात धिक्कार करत येणार्‍या या महिलांना पोलिसांनी अडवताच अध्यक्ष सौ. चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील पंधरा जनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांचा भेट घेतली व महागाई विरोधी निवेदन दिले. महागाई कमी करा, जीवनावश्यक वस्तूंचे दर तरी स्थिर ठेवावेत, अशी मागणी करून गेल्या पाच वर्षात वाढलेल्या महागाईचे पत्रकच मुख्यमंत्र्यांना यावेळी सुपूर्त करण्यात आले. निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा कॉंग्रेसविरोधी जोरदार घोषणा देत चर्च चौकातून भाजप कार्यालयापर्यंत आला व तेथे मोर्चाचा समारोप झाला.

‘स्वरास्त’ जनार्दन वेर्लेकर

‘भारतरत्न’ पं. भीमसेन जोशी यांचा बुलंद, घनगंभीर स्वर यापुढे भर मैङ्गलीत घुमणार नाही. जसे सुर्यकोटी समप्रभः तसेचत्यांच्या निधनाने साक्षात स्वरभास्कर मावळला आहे. मावळतीचा सूर्य नेहमीच हुरहुर लावतो. मात्र रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल लपलेला असतो. मावळतीला जाताना उद्या तुमच्यासाठी मी पुन्हा उगवेन हे आश्‍वासन देऊन तो जातो. त्याचे मावळणे ही आमच्यासाठी तात्पुरती विरहावस्था असते. पंडितजी गेले ते पुन्हा न उगवण्यासाठी. म्हणून त्यांचे स्वराकाशातून मावळणे हा साक्षात स्वरास्त आहे. जसा तानसेन पुन्हा होणे नाही तसा भीमसेन हा गायकही पुन्हा होणे नाही हे अटळ वास्तव. ते स्वीकारायला मात्र मन राजी नाही. कारण पंडितजींचे गाणे हा आमचा निखळ स्वरानंद आहे आणि राहील. आमच्या पिढीचे भाग्य थोर की असा भीमसेन ‘याचि देही याचि डोळा’ आम्ही पाहिला आणि ऐकला. त्यांची तेजस्वी गायकी सुर्यकुलाशी नाते सांगणारी. निश्‍चयाच्या बळातून आणि तपश्‍चर्येच्या अग्निदिव्यातून ती तावूनसुलाखून निघाली आणि अखिल संगीत जगताला वंदनीय ठरली. पंडितजींच्या स्वरप्रवासाचा वेध घेणे हे त्यांच्या मंतरलेल्या मैङ्गलीत चिंब भिजण्यासारखेच आनंददायी आहे.
पंडितजींचे पिताश्री गुरुराज जोशी यांनी आपल्या विश्‍व विख्यात मुलाचे चरित्र लिहिले आहे. रथसप्तमीच्या शुभदिनी काशीमुक्कामी विद्यार्जनासाठी वास्तव्य असताना त्यांना एकाएकी मंदिरातून अविरत घंटानाद ऐकू येत असल्याचा भास झाला आणि तो ऐकत असताना भीमसेन यांचा गदग येथे जन्म झाल्याची सुवार्ता त्यांच्या कानी आली. एकप्रकारे हा दैवी साक्षात्कारच असे त्यांना वाटले. बालवयापासून छोट्या भिमण्णाला संगीताच्या सुरांनी पछाडले. शाळेतून येता जाताना हॉटेलमध्ये वाजणार्‍या ध्वनिमद्रिका ऐकताना त्याची पावले रेंगाळत थबकत. तल्लीन होऊन तो ती गाणी ऐकत राही. एकदा स्वारी लग्नाच्या बरातीत बँडवादन ऐकण्यात तल्लीन झाली आणि मिरवणुकीबरोबर निघाली. किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खॉं यांच्यासारखे गाणे मला गाता आलं पाहिजे, असा बालवयातच त्याला ध्यास लागला. पिताश्रींनी मुलाचा संगीताकडे असलेला कल पाहून त्याच्यासाठी गुरु शोधला. ते मुलाला रामभाऊ कुंदगोळकर ऊर्ङ्ग सवाई गंधर्व यांच्याकडे गेले. मात्र त्यांनी भिमण्णाला शिकवायला नकार दिला. निराश न होता घरातल्या घरात मुलाच्या शिक्षणाची सोय मग पिताश्रींनी केली. काही काळ ही शिकवणी चालली. मात्र एका तिरीमिरीत छोट्या भिमण्णाने गृहत्याग करण्याचा निर्णय घेतला आणि गुपचूप तो अमलात आणला. इथून सुरू झाली एका ध्येयवेड्या साधकाची वणवण भटकंती. पुणे, ग्वाल्हेर, दिल्ली, कोलकाता, जालंधर अशी अनिर्बंध मुशाङ्गिरी करीत मिळेल तिथे गुरुजनांकडून विद्याधन गोळा करण्याचा त्याला ध्यास लागला. पैशाअभावी विनातिकीट रेल्वे प्रवास करताना तिकिटचेकरने पकडल्यावर प्रसंगी गाणे ऐकवून त्याने आलेल्या संकटातून आपली सुटका करवून घेतली. जालंधर येथे होणार्‍या वार्षिक हरीवल्लभ संगीत समारोहात भिमण्णाची योगायागाने गाठ पडली ती पं. विनायकराव पटवर्धन यांच्याशी. त्यांनी भीमण्णाला तू इथे काय करतोस असे विचारले. ‘मला संगीत शिकायचंय’ ˆ भीमण्णाने आपले मन बुवांपाशी उघड केले. ‘मग एवढ्या दूरवर कशाला आलास?’ रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे का नाही गेलास? ते तुझ्याच गावाजवळ तर राहातात आणि बुवांचे हे शब्द पडत्या ङ्गळासारखे झेलून स्वारी स्वघरी परतली. मधल्या काळात भिमण्णा आकाशवाणीवर गायला. त्याने छोट्या मोठ्या नोकर्‍या केल्या. अनेक गुरुजनांकडून सेवाभावी वृत्तीने शिकला. संगीताच्या जोडीने व्यायाम करुन शरीर पिळदार बनवलं. स्वगृही परतलेला भिमण्णा पुन्हा एकदा पं. रामभाऊ कुंदगोळकर यांची तालीम मिळावी या एकाच महत्त्वाकांक्षेने झपाटला आणि त्याच्या सुदैवाने यावेळी मात्र रामभाऊंनी या शिष्याला गुरुगृही राहून शिकण्याची अनुज्ञा दिली. वर्ष ˆ दीड वर्ष रामभाऊंनी या मुलांची सत्त्वपरीक्षा पाहिली. त्याला ङ्गक्त कामाला जुंपून घेतलं. मोठ मोठे हंडे दूरवरून पाणी भरून आणायचे हे त्याचे काम. भिमण्णाने कोणतीही कुरकूर न करता इमाने इतबारे हे काम केले. अक्षरशः घाम गाळला आणि आपल्या गुरुची मर्जी संपादन केली. एकदाचं गुरुजींचं मन द्रवलं आणि मग भीमण्णाच्या रीतसर तालमीला सुरुवात झाली. पं. रामभाऊ कुंदगोळकर हे उस्ताद अब्दुल करीम खॉं यांचे पट्टशिष्य. किराणा घराण्याची ध्वजपताका ङ्गडकावण्याचा मान उस्तादजींचा. त्यांच्या भावपूर्ण, सुरेल गायकीचा वारसा रामभाऊंनी जोपासला आणि तो भिमण्णा, गंगुबाई हनगल, ङ्गिरोझ दस्तुर यांच्यासारख्या शिष्योत्तमांना मुक्तकंठाने शिकवला. एकदा तालमीच्यावेळी भिमण्णाचा सूर नीट लागला नाही. दुरून ऐकणार्‍या रामभाऊंनी बसल्या जागेवरुन हातातला सुपारी कातरण्याचा आडकित्ता भिमण्णाच्या दिशेने ङ्गेकला. रामभाऊंचा नेम चुकला नाही. कपाळावर तो आदळला. रक्त वाहू लागलं. पं. भीमसेन जोशी यांना नंतर आयुष्यभर या जखमेचा व्रण कपाळावर मिरवावा लागला. पुणे येथे दर वर्षी डिसेंबर महिन्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव आयोजित करण्यात येतो. पं. भीमसेन जोशी यांनी पाच दशकांहून अधिक काळ या समारोहाचे सुकाणू सांभाळले. हा जागतिक कीर्तीचा समारोह म्हणजे पंडितजींनी आपल्या गुरुंना वाहिलेली स्वरांजली. गेल्या तीन ˆ चार वर्षांचा अपवाद वगळता या समारोहाची सांगता पंडितजींच्या गाण्याने व्हायची आणि हजारो रसिक भल्या सकाळी पंडितजींच्या स्वरांच्या अमृतवर्षावात चिंब होऊनच घरोघरी परतायचे. सवाई गंधर्व समारोहाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला मी सपत्नीक हजेरी लावली होती. प्रथेप्रमाणे भल्या पहाटे पंडितजींनी आपल्या गाण्याने या समारोहाची सांगता केली. दरवर्षी अडीच ˆ तीन तास गाणारे पंडितजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या पहाटे जेमतेम पाऊण तास गायले. एकच ख्याल आणि अभंगाने सांगता केली. शेवटी गदगदलेल्या कंठाने उद्गारले ‘जमेल तशी सेवा केली आहे. गोड मानून घ्या’. पंडितजींच्या या विनम्र साधेपणाने अवघा जनसागर हेलावला. विशेष म्हणजे पंडितजींच्या या संपुर्ण गाण्याचे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन थेट प्रक्षेपण करण्यात आले.
गेली तीन ˆ चार वर्षे सवाई गंधर्व समारोहात पंडितजी गाऊ शकले नाहीत. किराणा घराण्याची दिग्गज गायिका प्रभा अत्रे या आता शेवटी गाऊन समारोहाचा समारोप करीत असतात. मात्र एकदा तरी पंडितजी सवाई गंधर्व समारोहाच्या ठिकाणी आपली अल्पकाळ उपस्थिती लावत असायचे. रंगमंचाजवळ त्यांची कार आणली जायची आणि गाडीत बसूनच ते सर्वांना अभिवादन करायचे. काहीच बोलायचे नाहीत. सरत्या वर्षी डिसेंबर महिन्यात हे संमेलन झालं; मात्र त्यांनी हा नेम चुकवला नाही. वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेलं हे छायाचित्र डोळे भरुन मी पाहिलं आणि दुधाची तहान जणू ताकावर भागवली.
पुढल्या वर्षी सवाई गंधर्व संगीत समारोह होईल तो मात्र पहिल्यांदाच पंडितजींच्या अनुपस्थितीत. ‘देव नाही देव्हार्‍यात’ असे तमाम रसिकजनांना वाटत राहील. रसिकजनांनाच कशाला त्या समारोहात सहभागी होणार्‍या सर्व लहानथोर कलाकारांना पंडितजींच्या दर्शनाला आणि आशीर्वादाला आपण मुकलो याची हळहळ वाटतचराहील. किराणा घराण्याचे बुरुज एकापाठोपाठ कोसळले त्याचे आम्ही साक्षी आहोत. पं. ङ्गिरोझ दस्तुर आणि गंगुबाई हनगल यांच्यानंतर Last of the Romans म्हणायला हवेत असे पं. भीमसेन जोशी हे किराणा घराण्याचे एकमेव मुकुटमणी होते. त्यांच्या निधनाने अखिल संगीताविश्‍वाला आपल्या तेजःपुंज गाण्याने स्वरांकित करणारा एक स्वरभोगी गायक काळाच्या पडद्याआड गेला आहे. यमन, पुरीया, शुद्ध कल्याण, मालकंस, दरबारी, ललत, तोडी हे राग अनाथ झाले आहेत. संतवाणी मूक झाली आहे.
‘जो भजे हरीको सदा’ या भजनाला आता विलक्षण एकाकी वाटत रहाणार. ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगली’ हा अभंग आळवताना तुमचं गदगदणारं शरीर, तुमची देहबोली यापुढे आम्हा अभाग्यांना कुठून दिसणार? पंडितजी, आम्हाला तुम्ही अजून हवे होता.

‘रॉय’चे नाव काढण्यासाठी पोलिसांकडून धमक्या

न्यायालयात तक्रार दाखल
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): ड्रग प्रकरणात सादर झालेल्या तक्रारीतील ‘रॉय’ नावाचा उल्लेख काढून टाकण्यासाठी गृहमंत्री हे गुन्हा अन्वेषण विभागातील पोलिस अधिकार्‍यांचा वापर करून तक्रारदारांना धमकावत असल्याची तक्रार न्यायालयात करण्यात आली आहे.
काशिनाथ शेट्येव डॉ. केतन गोवेकर यांनी अमली पदार्थविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांच्यासमोर ही लेखी तक्रार केली आहे. सदर तक्रार, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक मंगलदास देसाई, उपअधीक्षक शांबा सावंत व निरीक्षक सुदेश नाईक यांच्याविरुद्ध केली असून विशेष चौकशी पथकाला (‘एसआयटी’) येत्या २४ तासांत या तक्रारीची दखल घेऊन संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले जावे, अशी याचना श्री. शेटये यांनी केली आहे. ‘यात राजकीय व्यक्तीच्या मुलाचा सहभाग असल्याने पोलिस स्वतंत्रपणे याची सखोल चौकशी करू शकत नाही. त्यामुळे न्यायालयाने देखरेख ठेवून सदर प्रकरणी पंधरा दिवसांपासूनचा तपास अहवाल मागवावा,’ अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये पर्दाफाश केलेला उपनिरीक्षक आलेला सुनील गुडलर याच्यासह ‘वेणू बन्सल’ व ‘रॉय’ यांच्यावर त्वरित गुन्हा नोंद करण्याची मागणी करून काशिनाथ शेटये यांच्यासह अन्य १२ जणांनी तक्रार केली होती. यातील तक्रारदारांना धमकावण्यात आले असल्याचा दावा श्री. शेट्येे यांनी केला आहे.
न्यायालयात केलेल्या तक्रारीत म्हटल्यानुसार, १२ जानेवारी रोजी गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक सुदेश नाईक यांनी तिळामळ येथील गौतम बेने, मडगाव येथील सोनाली नाईक व प्रशांत नाईक, नावेली येथील नवीन देसाई आणि कुडचडे येथील प्रदीप काकोडकर या तक्रारदारांच्या घरी जाऊन त्यांना ‘रॉय’ याचे नाव तक्रारीतून वगळण्यासाठी धमकावण्यात आले. तक्रारदारांमध्ये एक महिलाही असून तिच्याा घरी जाताना सदर अधिकारी आपल्यासोबत महिला पोलिसांना न घेता गेला होता, असाही आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
गृहमंत्री, अधीक्षक मंगलदास देसाई, उपअधीक्षक शांबा सावंत यांच्या आदेशानंतर ‘रॉय’ हे नाव तक्रारीतून वगळले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी सुदेश नाईक नामक अधिकारी देत होता; तर हा ‘रॉय’ आपला मुलगा नसल्याचे स्पष्टीकरण रवी नाईक यांनी देऊन गोव्यात ‘रॉय’ नावाचे अनेक व्यक्त असल्याचे म्हटले आहे.
--------------------------------------------------------------
पोलिसांकडून इतरांची नावे गुलदस्त्यातच!
दरम्यान, काशिनाथ शेट्ये यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी निलंबित उपनिरीक्षक सुनील गुडलर व ‘इतरां’वर गुन्हा नोंद केला असून ‘इतर कोण’ हे मात्र सांगण्याचे धाडस पोलिस करीत नाहीत. त्या इतरांची नावे सांगण्यास टाळाटाळ करीत ‘इतर कोण, हे आम्ही अद्याप स्पष्ट केलेले नाही’ असे ‘एसआयटी’चे प्रमुख ओमप्रकाश कुडतडकर यांनी सांगून सारवासारव केली. काशिनाथ शेटये यांनी तक्रारीत केलेल्या प्रत्येक मुद्यावर चौकशी केली जाईल, असे पोलिस प्रवक्ते आत्माराम देशपांडे यांनी सांगितले. मात्र, गुडलरला अटक होणार काय, या प्रश्‍नावर ‘कोणत्याही तक्रारीत अटक करणे बंधनकारक नाही,’ असे सांगून गरज भासल्यास तपास अधिकारी अटक करू शकतात, असा खुलासा त्यांनी केला. शेट्ये यांनी आपल्या तक्रारीत केलेल्या या दोन नावांवर पोलिसांनी मौन का पाळले आहे, याचेच कोडे सर्वांना पडलेले आहे. मात्र, शेट्ये यांनी तक्रारीत नमूद केलेल्या सर्वांची नावे तक्रारीत नोंद केल्याचे ‘एसआयटी’च्या एका पोलिस अधिकार्‍याने मान्य केले. शेट्ये यांनी केलेल्या तक्रारीत श्री. बन्सल व ‘रॉय’ या दोघांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, त्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

खारीवाड्यातील ३६० घरांवर कोणत्याही क्षणी कारवाई

वास्को, दि. २४ (प्रतिनिधी): खारीवाडा किनार्‍याजवळच्या ३६० घरांवर बुलडोझर फिरवून १५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयासमोर अहवाल सादर करण्यासाठी पालिका यंत्रणा कामाला लागली आहे. यासंदर्भात पुढची पावले उचलण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी पालिका मुख्याधिकार्‍यांना उद्या (मंगळवारी) सर्व कागदपत्रांसह आपल्या दालनात पाचारण केल्याने ३६० कुटुंबीयांवर कोणत्याही क्षणी संकट कोसळण्याची शक्यता बळावली आहे.
खारीवाडा किनार्‍यावर असलेल्या ३६० घरांना ‘एमपीटी’ (मुरगाव पोर्ट ट्रस्ट) च्या विस्तारीकरणासाठी तसेच इतर काही कारणांसाठी हटवण्याकरिता सुमारे दोन वर्षांपूर्वी ताब्यात घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर खास याचिका दाखल करण्यात आली होती. सदर भागातील ३६० बांधकाम जमीनदोस्त करून संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर ठेवण्याचा आदेश यापूर्वी देण्यात आला होता. ही माहिती पालिका सूत्रांनी दिली. यावेळी संबंधित बांधकामांपैकी ३० बांधकाम मालकांनी प्रशासकीय लवादासमोर जाऊन सदर आदेशावर स्थगिती आणण्यात यश मिळवले होते. सदर आदेशानंतर मुरगाव नगरपालिकेने इतर बांधकामावरही कारवाई न केल्याने न्यायालयाने, उर्वरित बांधकामांवर कशा स्वरूपाची कारवाई केली, असा सवाल उपस्थित केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सदर प्रकारणी मुरगाव पालिका मंदगतीने कारवाई करत असल्याचे नजरेला पडताच त्याची दखल घेत न्यायालयाने नुकत्याच झालेल्यासुनावणीदरम्यान दखल घेतली. येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत खारीवाडा येथील सदर ३६० घरांवर कारवाई करून त्याबाबतचा संपूर्ण अहवाल सादर करण्यास सांगितल्याने पालिकेपुढे पेच निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
याबाबत अधिक माहितीसाठी काही पत्रकारांनी मुरगाव नगराध्यक्ष सौ. सुचेता शिरोडकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागेल, एवढेच त्यांनी स्पष्ट केले.
न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका कारवाई करणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, बांधकाम कृती दल व अन्य यंत्रणांना पालिकेने (मुख्याधिकारी) पत्र लिहून सुरक्षा मागितल्याचे सांगण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाबाबत पावले उचलण्यासाठी
मुख्य सचिव संजीव श्रीवास्तव यांनी सदर प्रकारावर चर्चा करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी गोपाळ पार्सेकर यांना उद्या (मंगळवारी) आपल्या कार्यालयात याबाबतची सर्व कागदपत्रे घेऊन बोलवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान खारीवाडा येथील ३६० घरावर कारवाई करण्याचा निर्णय पक्का झाल्यास तेथील वातावरण तंग होण्याची शक्यता दिसत आहे.
१३ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकार्‍यांनी मागितलेली सुट्टीही रद्द करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजले.

जेटली, स्वराज यांना जम्मूत रोखले

विमानतळावरच धरणे, भाजप कार्यकर्त्यांची जोरदार नारेबाजी
नवी दिल्ली, दि. २४ : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौकात येत्या प्रजासत्ताक दिनी ‘तिरंगा’ ङ्गडविण्यासाठी निघालेली भाजपाची एकता यात्रा सीमेवरच रोखण्यासाठी राज्य सरकारने सीमा सील करून सशस्त्र दलांचा तगडा पहारा बसविला असतानाच, ‘तिरंग्या’ची सूत्रे स्वीकारण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते अनंतकुमार यांनी श्रीनगरकडे कूच केली. तथापि, त्यांनाही जम्मू विमानतळावरच अडविण्यात आले.
रविवारी भाजपाचे शेकडो कार्यकर्त्यांना सीमेवरच रोखून त्यांना काश्मिरात प्रवेशबंदी करण्यात आली होती. अनेक कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली. याच अनुषंगाने हे नेते एकता यात्रेची पुढील सूत्रे सांभाळण्यासाठी निघाले. तथापि, जम्मू विमानतळावरच त्यांना अडविण्यात आले आणि शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. विमानतळावरूनच या नेत्यांना दिल्लीला परत जाण्यास सांगण्यात आले. तथापि, या नेत्यांनी परत जाण्यास नकार दिला. यावेळी विमानतळाबाहेर उपस्थित असलेल्या शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा ङ्गडकवित सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
केंद्र आणि राज्य सरकारच्या राष्ट्रविरोधी धोरणांचा निषेध करीत जेटली, स्वराज आणि अनंतकुमार यांनी विमानतळावरच धरणे दिले. जम्मू-काश्मिरातील स्थिती आज अतिशय भयानक झालेली आहे. आणिबाणीसदृश्य स्थिती निर्माण करण्यात आली आहे. आम्ही भारताचे नागरिक आहोत. या देशाच्या कोणत्याही भागात जाण्याच आम्हाला स्वातंत्र आहे. पण, आमच्या या स्वातंत्र्यावर गदा आणण्यात येत आहे, असा आरोप यावेळी अनंतकुमार यांनी केला.
‘‘भारतात कुठेही तिरंगा ङ्गडकविण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला असताना श्रीनगरात तिरंगा ङ्गडकविण्यामुळे देशाचे विभाजन होईल, असा विचार पंतप्रधान कसा करू शकतात,’’ असा सवाल जेटली यांनी यावेळी केला.
दरम्यान, नवी दिल्लीत भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनीही केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला. नागरिकांना आज आपल्या देशात मुक्तपणे वावरू दिले जात नाही. याचा आम्ही तीव्र धिक्कार करतो, असे त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य शासनाने कितीही प्रयत्न केले तरी लाल चौकात तिरंगा ङ्गडकविण्याचा आमचा निर्धार कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशद्रोह्यांना राजेशाही वागणूक अन् देशभक्तांचा छळ!
केंद्राच्या धोरणाचा गडकरींकडून निषेध

भाजपाची एकता यात्रा सीमेवरच अडविण्याच्या जम्मू-काश्मीर आणि केंद्रातील संपुआ सरकारच्या कारवाईचा भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी निषेध केला. या देशात देशद्रोह्याना राजेशाही वागणूक दिली जाते आणि देशभक्तांचा छळ केला जात आहे, असा आरोप गडकरी यांनी यावेळी केला.
आपल्या पक्षाची एकता यात्रा थांबविल्यामुळे काश्मिरात दहशतवादी शक्तींना आणखी बळ मिळेल आणि दहशतवाद वाढेल, असा इशाराही गडकरी यांनी दिला. देशाच्या कोणत्याही भागात राष्ट्रध्वज ङ्गडकविण्याचे स्वातंत्र्य या देशातील प्रत्येक नागरिकाला असताना जणू, श्रीनगर हे भारताचे अंग नसल्याप्रमाणे आम्हाला तिथे तिरंगा ङ्गडकविण्यापासून रोखले जात आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, पाच दिवसांच्या चीन दौर्‍यावर असलेले गडकरी यांचे आज र्गांगझू येथे आगमन झाले. तिथूनच त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्याशी ङ्गोनवरून चर्चा केली आणि केंद्र व राज्य सरकारतर्ङ्गे आणण्यात येत असलेल्या अडथळ्यांविषयी माहिती जाणून घेतली. भाजपाची एकता यात्रा रोखून केंद्र सरकारने दहशतवाद्यांना त्यांच्यासाठी सारा देश मोकळे असल्याचे संकेतच दिले आहेत. यामुळे राज्यातील आणि देशातील दहशतवादी कारवायांमध्ये आणखीच वाढ होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
आता राष्ट्रपतींनीच हस्तक्षेप करावा!
भाजपाची एकता यात्रा थांबविल्यानंतर अरुण जेटली, सुषमा स्वराज यासारख्या वरिष्ठ नेत्यांनाही अडविण्यात आल्यानंतर भाजपाने राष्ट्रपतीा प्रतिभा पाटील यांच्याकडे धाव घेतली असून, ‘आता राष्ट्रपतीनीच आता या प्रकरणी हस्तक्षेप करावा,’ अशी विनंती केली आहे.
‘आमच्या तीन वरिष्ठ नेत्यांना जम्मू विमानतळावर अडविण्यात आले आहे. ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आपल्या हस्तक्षेप करण्याची नितांत गरज आहे,’ असे पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंग यांनी राष्ट्रपतींना ङ्गोनवरून कळविले.
हा देश आपला आहे. या देशात कुठेही राष्ट्रध्वज ङ्गडकविण्याचा देशवासियांना अधिकार असल्याने आपणच आता केंद्र सरकारशी बोला आणि भाजयुमोला श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा ङ्गडकविण्याची परवानगी द्या, अशी विनंती आपण राष्ट्रपतींनाा केली असल्याचे राजनाथसिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जम्मू-काश्मीर सीमेवर पाच हजार जवान तैनात
येत्या २६ जानेवारी रोजी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा ङ्गडकविण्याच्या आपल्या योजनेवर भाजयुमो व भाजपा ठाम असल्याने जम्मू-काश्मीर व पंजाबच्या सीमेवर ५ हजार सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना जम्मू-काश्मीरच्या सीमेत घुसू न देण्यासाठी ही सीमाच सील करण्यात आली आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने आज पीटीआयला सांगितले. पंजाबमधून जम्मूत जाण्यासाठी जी सात प्रवेशाची ठिकाणे आहेत ती सील करण्यात आली आहेत. राष्ट्रीय एकता यात्रा लखनपूर येथे पोहोचली आहे. यात्रेत युवती व महिलांचा सहभाग राहील हे लक्षात घेऊन महिला पोलिसांच्याही दोन पलटणी तैनात करण्यात आल्या आहेत. दंगाविरोधी वाहने, वॉटर कॅनन याबरोबरच कंेंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवानही तैनात करण्यात आले असून त्यांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.

कर्नाटकच्या राज्यपालांना हटवा!

भाजपची राष्ट्रपतींकडे तक्रार
- भारद्वाजांची वागणूक उद्धट व घटनाबाह्य
नवी दिल्ली,दि.. २४ : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेतली आणि कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांच्या अतिशय उद्धट आणि घटनाबाह्य वागणुकीची तक्रार नोंदविली. यावेळी शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना निवेदन दिले. त्यात ‘राज्यपालांना तात्काळ माघारी बोलावण्यात यावे,’ अशी जोरदार मागणीही करण्यात आली आहे.
अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात कर्नाटकातील २३ खासदार आणि अनेक मंत्री व आमदारांचा समावेश होता. ‘‘गेल्या वर्षी जूनमध्ये राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हापासूनच राज्यपाल भारद्वाज यांनी भाजप सरकारवर जणू राजकीय सूडच उगविण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकात घटनात्मक व्यवस्था कायम राखण्यासाठी भारद्वाज यांना माघारी बोलावणे अतिशय आवश्यक आहे,’’ अशा तक्रारीचे निवेदन अडवाणी यांनी राष्ट्रपतींना सादर केले.
राष्ट्रपती भवनातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अडवाणी म्हणााले की, राज्यपालांचे वागणे घटनाबाह्य आहे. त्यामुळे त्यांना केंद्राने माघारी बोलावणे आवश्यक झाले आहे. त्यांच्या घटनाबाह्य वागण्याचे आणि सुरुवातीपासून त्यांनी आपल्या सरकारविरुद्ध केवळ राजकीय कार्यक्रम राबविल्याचे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आम्ही निवेदनात दिलेली आहेत.
‘भारद्वाज यांची या घटनादत्त पदावरील नियुक्ती देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याच्या दिशेचे पहिले पाऊल आहे, असा आरोप करताना, ‘राज्यपालांची मानसिकता आणि वागणे हे पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीचेच तसेच घटनात्मक अधिकारी म्हणून कमी आणि कॉंगे्रसचा कार्यकर्ता म्हणून जास्त राहिले आहे,’ अशी टीका भाजपाने या निवेदनात केली आहे.
राज्यपालांनी जावेच : येडियुरप्पा
आपल्यावर खटला दाखल करण्याची परवानगी देणारे कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांना माघारी बोलावण्यात यावे, अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांनी केली आहे. कर्नाटक सरकार विरोधात त्यांनी जी वक्तव्ये केली आहेत त्यासंदर्भात भाजप अवमान याचिका दाखल करणाल आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.
राज्यपालांच्या विरोधात नव्याने आरोप करताना ते म्हणाले, कर्नाटक सरकार व माझ्याविरोधात ज्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्या सर्व राजभवनात तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे राज्यपाल भारद्वाज तसेच राज्यासाठी ही बाब चांगली राहील की, कोणते राज्य आपल्यासाठी चांगले राहील हे त्यांनीच निश्‍चित करून तिकडे जावे, असे येदीयुरप्पा म्हणाले.
कर्नाटकच्या राज्यपाल पदाचा कार्यभार हाती घेतलेल्या दिवसापासून या भाजपाशासित राज्याची प्रतिमा डागाळण्याचाच ते सातत्याने उद्योग करत आले आहेत, असा आरोप येडियुरप्पा यांनी केला. कर्नाटक सरकारच्या विरोधात अपमानजनक प्रतिक्रिया दिल्याबद्दल भारद्वाज यांनी बिनशर्त माङ्गी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. २२ जानेवारी रोजी राज्यात जो बंद पाळण्यात आला त्यात राज्याला जबर आर्थिक ङ्गटका बसला आहे, त्यासाठीही त्यांनी राज्यपाल भारद्वाज यांना दोषी धरले आहे. राज्यपाल भारद्वाज यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्यासंदर्भात तसेच इतर कायदेशीर बाबींच्या माध्यमातून त्यांच्याविरोधात लढा देण्याचा विचार करत आहे, याकडे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी लक्ष वेधले.
मॉस्को विमानतळावर बॉम्बस्ङ्गोट; २० ठार
मॉस्को, दि.२४ : मॉस्कोतील डोमोदिदोवो विमानतळावर आज (सोमवार) झालेल्या आत्मघाती बॉम्बस्ङ्गोटात २० जण ठार झाले.रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमध्ये विमानतळावरून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. विमानतळावरील प्रवाशांचे सामान तपासण्याच्या ठिकाणी हा स्ङ्गोट झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

कॅटरिना, प्रियंकाच्या घरांवर आयकर छापे
मुंबई, दि. २४ : कॅटरिना कैङ्ग आणि प्रियंका चोप्रा या बॉलीवूड अभिनेत्र्यांच्या मुंबईतील घरांवर आयकर विभागाने आज छापे मारले. करचोरी केल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी सात वाजेपासूनच या दोघींच्या मुंबईतील घरांवर छापे मारण्यास सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. मुंबईत प्रियंकाचे घर वर्सोवा, तर कॅटरिनाचे घर वांद्रे परिसरात आहे.

राहुल द्रविडच्या आजीचे निधन
इंदूर, दि. २४ : क्रिकेटपटू राहुल द्रविड याची आजी मनोरमा काळे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारीच होत्या. त्यांच्या पार्थिवावर इंदूर येथील रामबाग स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुब्रतो रॉयविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट
नवी दिल्ली, दि. २४ : सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयाने जामीनपात्र वॉरन्ट जारी केल्याचे वृत्त आहे.
सहारा इंडियाने राबविलेल्या एका गृहनिर्माण योजनेत ङ्गसवणूक केल्याप्रकरणी रॉय यांच्याविरुद्ध हे वॉरन्ट जारी झाले आहे. मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी विनोद यादव यांनी दिल्ली पोलिसांना या वॉरन्टनुसार, कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

१९ ङ्गेब्रुवारीला गोध्राचा निकाल घोषित होणार
अहमदाबाद, दि. २४ : गोध्रा जळितप्रकरणाचा न्यायालयीन निकाल येत्या १९ ङ्गेब्रुवारीला घोषित होणार आहे. नऊ वर्षांपूर्वी अयोध्येहून परतणार्‍या साबरमती एक्सप्रेसच्या एका डब्याला गोध्रा रेल्वेस्थानकाजवळ आग लावून देण्यात आली होती. यात जवळपास ५८ लोक मृत्युमुखी पडले होते. मृतांत बहुतांश अयोध्येहून परतणार्‍या कारसेवकांचा समावेेश होता. यानंतरच गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या होत्या.

Monday 24 January, 2011

रॉय, बन्सल व गुडलरविरोधात गुन्हा नोंद

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) - स्टिंग ऑपरेशनमध्ये कथित ड्रगविक्री करताना दिसत असलेला उपनिरीक्षक सुनील गुडलर याच्यासह गोवा पोलिस खात्यातील माजी उपमहानिरीक्षक व सध्या अरुणाचल प्रदेश पोलिस खात्याचे उपमहानिरीक्षक वेणू बंसल, तसेच राजकीय वजन असलेला‘रॉय’ यांच्याविरुद्ध आज गुन्हा अन्वेषण विभागाने गुन्हा नोंद केला.
अमली पदार्थाची विक्री, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान या गुन्ह्याखाली वरील तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भा.दं.सं. ३८०, ४०९, १२०(ब), भ्रष्टाचार विरोधी कायदा ७, ११, १२, १३(१)सी, १४(१)ड, तसेच अमली पदार्थ विरोधी कायदा ८ (सी), २८, २९, ३०, ३१, आणि ५९(२)(ब) ही कलमे लावण्यात आली आहेत.
याविषयी काशीनाथ शेटये व अन्य १२ जणांनी काही दिवसांपूर्वी तक्रार सादर केली होती. त्यात त्यांनी गुडलर याच्यासह तक्रारीत वेणू बंसल व ‘रॉय’ या नावाचा उल्लेख करून दि. ७ जानेवारी रोजी गुन्हा अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर चालढकलपणा करणार्‍या गृहखात्याने अखेर आज या तक्रारीची दखल घेतली.
प्राथमिक चौकशी केल्यानंतर वरील संशयितांवर तक्रार नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गोवा पोलिस खात्याच्या इतिहासात पहिल्यांदाच गोवा पोलिस खात्यात सेवा बजावून बदली होऊन गेलेल्या आयपीएस अधिकार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या तिघांच्याही चौकशीतून धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. तसेच, ‘रॉय’ या व्यक्तीचाही शोध घेणे आता गुन्हा अन्वेषण विभागाला बंधनकारक होणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास राज्य सरकार खात्याने स्थापन केलेली विशेष चौकशी समिती करीत आहे.
ड्रग माफिया ‘दुदू’ याची बहीण ‘आयाला’ व त्याची प्रेयसी झरिना या दोघांनी मिळून स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यात अमली पदार्थविरोधी पथकातील उपनिरीक्षक सुनील गुडलर हा चरस विक्री करीत असल्याचा दावा आयाला व झरिना यांनी केला होता. तसेच त्यात गुडलर यांनी, आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना हप्ता द्यावा लागतो असे म्हटले होते. याची प्राथमिक चौकशी करण्याची जबाबदारी गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आली होती. त्या अहवालात या स्टिंग ऑपरेशनमध्ये तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यास हिरवा कंदील देण्यात आला.
गुडलर याचा ‘रॉय’ या ‘ड्रगलॉर्ड’कडेही संबंध असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, राजकीय वजन वापरून रॉय याने गुडलर याची अमली पदार्थविरोधी पथकात बदली केली होती. तसेच आपल्या ड्रग व्यवसायाला मदत करण्यासाठी त्याची ही बदली केली होती, असा दावा तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत केला आहे. ‘रॉय’ या व्यक्तीचे राज्य सरकारातील मंत्र्याशी नाते असल्याचाही दावा करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपअधीक्षक मोहन नाईक करीत आहे.

म्हणे रॉयचा शोध घेणार!
पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला हा ‘रॉय’ कोण याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. गेले अनेक दिवस हे नाव सतत चर्चेत आहे. पोलिसांनी आज जरी गुन्हा नोंद केला असला तरी, रॉयबद्दल अधिक तपशील मात्र त्यात नाही, उलट आता गुन्हा नोंद झाल्याने या रॉयचा शोध घेण्यात येणार असल्याचे सांगून पोलिसांनी जनतेलाच बुचकळ्यात टाकले आहे.

खलप यांच्या कायदा आयोग अध्यक्षपद नियुक्तीला आव्हान देणार

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) - जनतेचे हित लक्षात घेऊन माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांच्या गोवा कायदा आयोगाच्या अध्यक्षपदावरील नेमणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान देणार असल्याचे ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी आज स्पष्ट केले.
रमाकांत खलप यांच्या विरोधात असलेले ३ आरोप मागे घेण्याच्या गोवा सरकारच्या राजकीय निर्णयालाही आव्हान दिले जाणार असल्याचे ऍड. रॉड्रिगीस यांनी म्हटले आहे. ज्या दिवशी ऍड. खलप यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली, त्यावेळी त्यांच्याविरोधात बँक भ्रष्टाचारासंबंधात ३ खटले प्रलंबित अवस्थेत होते, याकडेही ऍड. रॉड्रिगीस यांनी लक्ष वेधले आहे.
जाणीवपूर्वक ठकबाजी करून म्हापसा अर्बन कॉ-ऑप. बँकेला करोडो रुपयांचे नुकसान केल्याबद्दल ऍड. खलप तसेच इतरांविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० सह अनेक कलमांखाली तीन आरोपपत्रे दाखल करण्यात आली होती, हा मुद्दाही ऍड. रॉड्रिगीस यांनी निदर्शनास आणला आहे.
कायदा आयोगाचे अध्यक्ष हे कुठल्याही पक्षाशी बांधील असता कामा नये परंतु, रमाकांत खलप हे सक्रिय राजकारणी असून गोव्यातील कॉंग्रेस पक्षाचे ते प्रवक्ते असल्याची टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य वगळता देशातील सर्व कायदा आयोगाचे अध्यक्ष हे सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत व आयोगाचे सदस्य हे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असल्याची माहिती त्यांनी दिली.
रमाकांत खलप यांची आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली नेमणूक ही कोणत्याही गुणवत्तेवर आधारीत नसून सर्व नियम व परंपरा धाब्यावर बसवून त्यांचे राजकीय पुनर्वसन करून त्यांना कॅबिनेट दर्जा बहाल करता यावा यासाठी करण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

प्रमुख पोलिस ठाण्यांतील सीसीटीव्ही बंदच!

हेतुपूरस्सर नादुरूस्त?

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) ः लाखो रुपये खर्च करून राज्यातील पोलिस स्थानकात बसवण्यात आलेले ‘सीसीटीव्ही’ बंद स्थितीत असल्याचे आढळून आले आहे. राज्यातील महत्त्वाच्या पोलिस स्थानकात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कित्येक महिन्यांपासून नादुरुस्त असल्याचे उघड झाले आहे. त्याचप्रमाणे किनारपट्टीवरील अत्यंत महत्त्वाचे असलेल्या हणजूण पोलिस स्थानकात तर ‘सीसीटिव्ही’च बसवण्यात आलेली नाही, अशी माहिती हाती लागली आहे. खुद्द पोलिस खात्यानेच ही माहिती दिली.
पोलिस स्थानकात घडणार्‍या प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही द्वारे नजर राहिल्यास आपण अडचणीत येऊ या भीतीनेच हे सीसीटिव्ही नादुरुस्त करण्यात आले आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सध्या पोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीमुळे गाजत असलेले राजधानीतील पोलिस स्थानक, आगशी, म्हापसा, पेडणे, फोंडा व डिचोली या स्थानकांत बसवण्यात आलेले सीसीटिव्ही बंद आहेत. तर, जुने गोवे, कळंगुट, पर्वरी, कुळे आणि वाळपई पोलिस स्थानकांतील सीसीटिव्ही सुरू असल्याची माहिती पोलिस खात्याने दिली आहे. स्कार्लेट खून प्रकरणात वादग्रस्त ठरलेले आणि त्यानंतर करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या नवीन पोलिस स्थानकात सीसीटिव्ही बसवण्यात आलेली नाही. या पोलिस स्थानकात का सीसीटिव्ही बसवण्यात आलेले नाहीत, याचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.
पणजी पोलिस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर, निरीक्षकांच्या केबीन, संशयित गुन्हेगारांना ठेवण्यात येणार्‍या ठिकाणी तसेच तक्रार नोंद करून घेणार्‍या ठिकाणी बसवलेले सीसीटिव्ही बंद आहेत. हे सीसीटिव्ही सुरू असते तर, सिप्रियानो याला पोलिस कोठडीत मारहाण झाली हे सिद्ध करण्यासाठी पणजी पोलिसांना बरीच मदत झाली असती. परंतु, हे सीसीटिव्ही चालू अवस्थेत नसल्याने अनेक संशयाला वाट मोकळी झाली आहे.
बंद स्थितीत असलेले सीसीटीव्ही दुरुस्त करण्याचे परिश्रम पोलिस खाते का घेत नाही, यावरच शंका निर्माण झाली आहे. यापूर्वी राज्याच्या सीमेवरील चेक नाक्यावर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही नादुरुस्त करण्यात आले होते. काहींवर तर, कपडा टाकून झाकून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले होते.
पोलिस स्थानकात कोणकोण व्यक्ती अधिकार्‍यांना भेटायला येतात, रात्रीच्या वेळी पोलिस स्थानकात काय घडते, लोकांशी कसे वर्तन केले जाते, तक्रार देण्यासाठी येणार्‍या लोकांना किती वेळ ताटकळत राहावे लागते, याची माहिती वरिष्ठांना लागू नये, यासाठीच लाखो रुपयांचे हे सीसीटिव्ही बंद स्थितीत आहे का, असे अनेक प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित झाले आहेत. डॉ. केतन गोवेकर यांनी माहिती हक्क कायद्यानुसार मागितलेल्या माहितीतून ही माहिती उघडकीस आली आहे.

ही तर ङ्गुटीरतावाद्यांसमोर शरणागतीच : अडवाणी

नवी दिल्ली, द. २३
श्रीनगरमधील लाल चौकात येत्या २६ जानेवारीला तिरंगा ङ्गडकविण्याची जी योजना भाजयुमोने आखली आहे त्याला पंतप्रधानांनी जी हरकत घेतली आहे त्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले आहे की, उलट, लाल चौकात आम्ही तिरंगा ङ्गडकवू देणार नाही, अशी जी धमकी ङ्गुटीरतावाद्यांनी दिली आहे त्याकडे बघता राज्य सरकारने एकप्रकारे ङ्गुटीरतावाद्यांसमोर शरणागतीच पत्करली आहे, असे म्हणता येईल.
शांततेचा भंग होईल म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी करणारे हे सरकार, लाल चौकात आम्ही तिरंगा ङ्गडकूच देणार नाही, अशी प्रक्षोभक विधाने करणार्‍या ङ्गुटीरतावाद्यांप्रति मात्र मवाळ भूमिका घेत आहे. खरे तर राज्य सरकारने त्यांच्याविरोधात कडक भूमिका घ्यावयास हवी, असे अडवाणी म्हणाले.
श्रीनगरच्या लाल चौकात आम्ही शांततेच्या मार्गाने तसेच आदरपूर्वक तिरंगा ङ्गडकवू असे वारंवार म्हणणार्‍या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याची काही एक गरज नाही. ‘लेट्स नॉट द स्टेट सरेंडर टू सेपरॅटिस्ट’ या मथळ्याखाली अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये हे विचार व्यक्त केले आहेत.
पंतप्रधानांच्या कालच्या वक्तव्याचा उल्लेख करत अडवाणी यांनी आशा व्यक्त केली की, पंतप्रधानांना हे समजेल की, भाजयुमो कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा राजकीय लाभ उठवायचा नव्हता. उलटपक्षी ते तर ङ्गुटीरतावाद्यांना आव्हान देत होते. जम्मू-काश्मीरचे सरकारच खरे तर ङ्गुटीरतावाद्यांना शरण आलेले आहे, अशी स्थिती दिसत आहे.
एकीकडे राष्ट्रवाद्यांना २६ जानेवारीसारख्या प्रजासत्ताक दिनी लाल चौकात तिरंगा ङ्गडकवू द्यायचा नाही आणि दुसरीकडे ईदेच्या दिवशी याच चौकात ङ्गुटीरतावादी पाकिस्तानचा झेंडा ङ्गडकवितात, याला काय म्हणावयाचे. मागील वर्षी ङ्गुटीरतावाद्यांनी अशाचप्रकारे पाकिस्तानचा झेंडा ङ्गडकविला होता. सर्वसामान्य भारतीय व्यक्तीला राष्ट्रध्वज ङ्गडकवू देण्याचे स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी कॉंगे्रसचेच खा. नवीन जिंदल यांनी यासंदर्भात दिलेल्या लढ्याचे त्यांनी स्मरण करून दिले. राष्ट्रध्वजासंदर्भात जे नवे नियम तयार झाले आहेत त्याकडेही अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लक्ष वेधले आहे.
पंतप्रधानांचे वक्तव्य खेदजनक : जेटली
राजकीय लाभासाठी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचा कोणीही गैरङ्गायदा घेऊ नये, हे पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे वक्तव्य अत्यंत खेदजनक आहे, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.
श्रीनगरमधील लालचौकात तिरंगा ङ्गडकविणे म्हणजे देशाचे विभाजन, असा विचार पंतप्रधान करूच कसा शकतात, अशी विचारणा जेटली यांनी केली आहे.
श्रीनगरकडे निघालेल्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी अटक करण्यात येत आहे तर काही ठिकाणी अडकवून ठेवण्यात येत आहे. भाजयुमो कार्यकर्त्यांच्या श्रीनगर प्रवेशाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक मार्गांचा अवलंब करीत आहे. श्रीनगरकडे जाणार्‍या सर्व रस्त्यांवर नाकेबंदी करणे ही बाब अस्वीकार्य व लोकशाहीविरोधी आहे, असे जेटली म्हणाले.
तिरंगा ङ्गडकविणे ही प्रक्षोभक कृती आहे का, अशी विचारणा करून राष्ट्रवाद्यांच्या विरोधात कारवाई करणे व ङ्गुटीरतवाद्यांना अभयदान देणे, असे का? याचे स्पष्ट उत्तर पंतप्रधान व कॉंगे्रस पक्षाने द्यावे, असे जेटली म्हणाले. १९५३ साली हेच झाले त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनाही जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करण्यापासून असेच रोखण्यात आले होते. ५७ किंवा ५८ वर्षांंनंतर तीच कृती सरकार पुन्हा एकदा करत आहे. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की ङ्गुटीरतावाद्यांसमोर शरणागती पत्करण्याच्या सरकारच्या मानसिकतेत कोणताही बदल झालेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अतिरेकी म्हणून चुकीने
अटक करण्यात आलेल्या
युवकांना शासन मदत करणार
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २३ जानेवारी
विविध अतिरेकी कारवायांत ज्या मुस्लिम युवकांना चुकीने अटक करण्यात आलेली आहे त्यांच्या पुनर्वसनासाठी शासन मदत करण्यास पुढे सरसावले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना अधिकृत सूत्रांनी सांगितले की, केवळ अतिरेकी आहे या संशयावरू न अटक करण्यात आलेल्या व ङ्गार काळापासून कारागृहात असलेल्या परंतु नंतर निष्पाप आढळून आलेल्या मुस्लिम युवकांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना आर्थिक, कायदेशीर तसेच इतर मदत करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. अशा युवकांच्या पुनर्वसनासाठी तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी जे काही करणे शक्य आहे ते भारत सरकार करेल, असे सूत्रांनी सांगितले. हा प्रस्ताव मान्य झाला तर केवळ जे मुस्लिम युवक निष्पाप आहेत असे आढळून येईल त्यांनाच ही मदत केली जाईल.
मालेगाव, मक्का मशीद, अजमेर दर्गा व समझोता एक्सप्रेस स्ङ्गोटप्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी काही मुस्लिम युवकांना संशयित म्हणून अटक केलेली आहे. यापैकी काही युवक तर जामिनावर मुक्तही आहेत. अशा मुस्लिम युवकांची संख्या जवळपास ५० आहे.

खबरदार तिरंगा ङ्गडकवाल तर ...

केंद्र सरकारचीच उलटी भाषा

-संपुआ सरकारची दडपशाही
-कर्नाटकातून जम्मूकडे जाणारी गाडी गनिमी काव्याने परतवली
-छत्तीसगडमधून जम्मूकडे जाणारी गाडीही रद्द
-देशभरात भाजपा कार्यकत्यार्र्ंची धरपकड
-राष्ट्रध्वज ङ्गडकवण्याचा भाजयुमोचा निर्धार कायम

नवी दिल्ली/अहमदनगर, दि. २३
कुठल्याही परिस्थितीत प्रजासत्ताकदिनी श्रीनगरच्या लाल चौकात भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज ङ्गडकवणारच, असा निर्धार भाजयुमोने केला असतानाच, हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी संपुआ सरकारने दडपशाहीचा अवलंब सुरू केला असून, कर्नाटकमधून तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांची रेल्वेगाडी महाराष्ट्राच्या सीमेवरून परत पाठवली आणि छत्तीसगडमधून यात्रेसाठी जाणार्‍या कार्यकर्त्यांची रेल्वेगाडीच ऐनवेळी रद्द केली. याशिवाय तिरंगा यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण काश्मीर खोर्‍यात कडक सुरक्षा ठेवण्यात आली असून, देशभरात भाजपा कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे.
केंद्र आणि जम्मू-काश्मीर सरकारने कितीही दडपशाही केली तरी प्रजासत्ताकदिनी श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज ङ्गडकविण्यावर आपण ठाम असल्याचे, भाजयुमोने आज पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी कर्नाटक भाजयुमोचे कार्यकर्ते बंगलोर येथून २३ डब्यांच्या एका विशेष रेल्वेगाडीतून श्रीनगरकडे निघाले होते. कार्यकर्ते गाढ झोपेत असताना मध्यरात्रीनंतर अडीच वाजता ही गाडी मनमाड स्थानकाजवळ येताच पोलिसांनी ही गाडी थांबविली आणि गाडीचे इंजीन दुसर्‍या बाजूला लावले. पोलिसांची कुमक असलेले आणखी दोन डबे जोडून कडक सुरक्षा व्यवस्थेत गाडी बंगलोरकडे रवाना केली. पोलिस, राज्य राखीव पोलिस दल आणि रेल्चे पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करताना गाडीतील सर्व दिवे बंद करण्यात आले होते.
ही गाडी पहाटे सोलापूरला पोहोचतात आपण परतीच्या मार्गावर जात असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी अक्कलकोट स्थानकापासून एक किमी अंतरावर कडपगाव ङ्गाटा येथे चेन ओढून गाडी थांबवली आणि प्रचंड घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोलापूरचे भाजपा आमदार सिद्धरामअप्पा पाटील आणि असंख्य कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी झालेल्या सभेत कर्नाटक भाजयुमोचे अध्यक्ष सुनील कुमार यांनी सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला.
रायपूरची विशेष गाडी रद्द
दरम्यान, तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी छत्तीसगड भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आरक्षित केलेली विशेष गाडी रेल्वे प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता ऐन वेळेवर रद्द केल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी रायपूर रेल्वे स्थानकात संपुआ सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यातून सुमारे ३५०० भाजयुमो कार्यकर्ते जाणार होते. श्रीनगरला जाण्यासाठी सर्व कार्यकर्ते रेल्वेस्थानकावर पोहोचले असतानाच दुपारी दोन वाजता निघणारी ही गाडी रेल्वे प्रशासनाने रद्द केल्याची घोषणा केली. नाराज कार्यकर्त्यांनी संपुआ सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून रेल्वेस्थानक दणाणून सोडल्यामुळे परिस्थिती चिघळू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त कुमक तैनात केली.
खोर्‍यात कडक सुरक्षा
जम्मू-काश्मीर सरकारने भाजयुमोच्या तिरंगा यात्रेला मनाई केली असल्याने भाजपा कार्यकर्ते श्रीनगरमध्ये दाखल होऊ नये यासाठी सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहेे. श्रीनगरकडे कूच करण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी निमलष्करी दलाच्या सुमारे १०० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पंजाबमधून राज्याच्या कठुआ जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी प्रवेश करू नये यासाठी लखनपूर आणि नागरी नरोला येथेही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय, उधमपूर व खोर्‍याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या जवाहर बोगद्याच्या दोन्ही बाजूला निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेच्यादृष्टीने दरवर्षी स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी हा बोगदा काही तासांकरता बंद ठेवण्यात येतो. यावेळी तिरंत्रा यात्रा रोखण्यासाठी हा बोगदा २५ जानेवारीपासूनच बंद करण्याच्या पर्यायावर प्रशासन विचार करत आहे. दरम्यान, तिरंगा यात्रा अयशस्वी करण्यासाठी संपूर्ण देशभरात भाजपा कार्यकर्त्यांची जोरदार धरपकड सुरू आहे. जम्मू येथील भाजपा कार्यालयाभोवती पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या या दडपशाहीचा कडक शब्दात निषेध केला आहे. दरम्यान, जम्मूधील भाजपा कार्यालयावर कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून जणू काही पोलिसांनी हे कार्यालय आपल्या ताब्यातच घेतले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

‘व्हीजन २०३५’ दस्तावेजात गोव्याचा विकास हाच मुख्य मुद्दा - डॉ. माशेलकर

मडगाव, दि.२३ (प्रतिनिधी)
विकासाबाबत सरकारला राजकीय अभिनिवेेश बाळगता येणार नाही, गोव्याची प्रगती याच मुद्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल व त्याच अटीवर आपण ‘गोवा व्हीजन २०३५’ दस्तावेज समितीचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यानुसारच आपण या समितीच्या शिफारशींचा दस्तावेज सरकारला सादर करणार आहोत, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गोमंतकीय शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे केले.
गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त उच्च शिक्षण विभागाने कला व संस्कृती खात्याच्या व सुवर्णमहोत्सव समितीच्या सहकार्याने आयोजित युवा मेळावा कार्यक्रमात गोव्यातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मते जाणून घेतल्यावर ते बोलत होते. थोर शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर तसेच गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप देवबाागकर हेही रवींद्र भवनात आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित होते.
२०३५ पर्यंंतचा गोवा कसा असावा याबाबतचा दस्तावेज सादर करण्याचे काम सरकारने या समितीकडे सोपवले आहे. आगामी पंचवीस वर्षांतील गोवा कसा असावा याबाबत युवकांच्या मनोभावना जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.
विद्यार्थ्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता व्यक्त केलेल्या मतांबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले, खाण व पर्यटन व्यवसाय हा आर्थिक विकासासाठी अत्यावश्यक आहे. तो माडीत काढता येणार नाही. मात्र त्यावर निर्बंध घालता येतील. सरकारने ते करायला हवे. गोवा हे शिक्षणाचे केंद्र होते, आहे व यापुढेही असेल.
संपत्तीसाठी शिक्षण अशी सांगड घालू नका असा सल्ला त्यांनी दिला व त्या संदर्भात सीडीचे उदाहरण दिले. सरकार वा अन्य कोणावर बेजबाबदारपणाचा आरोप न करता आपण स्वतः जबाबदार नागरिक बनावे. त्यासंदर्भात इंडोनेशिया व चीनमधील नागरिकांनी स्वतः वर घालून घेतलेले निर्बंध लक्षात घ्या. प्रत्येकात संवेदनशीलता असण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. युवकांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त करताना आपल्या जीवनातील हा सर्वांत संस्मरणीय कार्यक्रम ठरेल असे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी, युवकांनी व्यक्त केलेल्या भावनांशी सहमती व्यक्त केली. ते म्हणाले, विकास हवाच पण तो साधताना निसर्गाची किमान हानी होईल हे पाहणे महत्त्वाचे. दस्तावेज तयार करताना युवकांकडून आलेल्या सूचनांची दखल घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. युवकांनी केलेल्या सूचना सरकारला डावलता येणार नाहीत. युवकांना फेसबुकसारख्या माध्यमांतून आपले हे विचार इतरांपर्यंत पोहोचवून जनमत तयार करता येईल, असेही ते म्हणाले.
डॉ. दिलीप देवबागकर यांनी शिक्षणव्यवस्थेत पारदर्शकता असण्याच्या गरजेवर भर दिला त्यादृष्टीने सुरू असलेले प्रयत्न तोकडे आहेत. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षण देण्याची सूचनाही त्यांनी केली. संजय तळवडकर, डॉ. बबीता आंगले व अनंत अग्नी यांनी सूत्रसंचालन केले.

Sunday 23 January, 2011

‘हायक्विप’ कंत्राटात महाघोटाळा : दामू नाईक

ज्योकीम आलेमाव, विजय सरदेसाईंच्या अटकेची मागणी
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): सोनसोडो कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ‘मेसर्स हायक्विप प्रोजेक्ट्स प्रा. ली.’ च्या कंत्राटात सुमारे पाच कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे महालेखापालांच्या अहवालात उघड झाले आहे. याप्रकरणी गोवा राज्य नगरविकास प्राधिकरण (जीसुडा)चे अध्यक्ष नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव व तत्कालीन उपाध्यक्ष तथा प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विजय सरदेसाई यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा, अशी जोरदार मागणी भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते आमदार दामोदर नाईक यांनी केली.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार दामोदर नाईक यांनी ‘हायक्विप’ प्रकल्प घोटाळ्याचा पर्दाफाश केला. केंद्रात ‘कॅग’ अहवालामुळे ज्या पद्धतीने ए. राजा यांचे बिंग फुटले त्याच पद्धतीने हा घोटाळाही उघड झाला असून गोव्यातही कॉंग्रेसचे ‘मिनी राजा’ कार्यरत आहेत हे यामुळे सिद्ध होते, असा टोलाही यावेळी आमदार नाईक यांनी हाणला. हा घोटाळा लोकलेखा समितीसमोर चर्चेसाठी येणार असून त्यानंतर या बाबतीत पोलिस तक्रार करण्याचाही निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. सोनसोडो कचरा प्रकल्पावर आज राज्य सरकारला २२ कोटी रुपये खर्च करावे लागतात याला सर्वस्वी हेच नेते जबाबदार आहेत. कचरा प्रकल्पावरही आपले उखळ पांढरे करून घेण्याच्या या घाणेरड्या कृतीमुळे सरकारी तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे व त्यामुळे याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणेच योग्य ठरेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, वित्त खाते तथा दक्षता खात्याकडून आक्षेप घेण्यात आला असतानाही गैरपद्धतीने हे कंत्राट देण्यात आले. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष करार करण्यापूर्वीच सदर कंपनीला सुमारे ६८.१५ लाख आगाऊ देण्यात आले. या कंत्राटात आपला सहभाग नाही, असा आव आणून हात झटकणारे विजय सरदेसाई हेही या घोटाळ्यात गुंतले आहेत असे सांगून त्याचे कागदोपत्री पुरावेच यावेळी आमदार दामोदर नाईक यांनी सादर केले. ‘जीसुडा’ च्या विविध बैठकांच्या इतिवृत्तांताच्या प्रती तसेच ते बैठकीला हजर असल्याचे दर्शवणारी त्यांच्या सह्यांची कागदपत्रेही आमदार दामोदर नाईक यांनी सादर केली. कोणतेही लोकप्रतिनिधीपद नसताना या पदावर त्यांची नेमणूक करून नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी त्यांना चरण्यासाठी कुरणच मिळवून दिल्याचा ठपकाही श्री. नाईक यांनी ठेवला. विजय सरदेसाई यांच्याकडून सध्या मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी जो अमाप पैसा खर्च केला जात आहे त्याचा स्त्रोत काय, याचा खुलासा त्यांनी करावा, असे सरळ आव्हान आमदार नाईक यांनी दिले.
दरम्यान, ‘जीसुडा’ च्या बैठकांची अनेक कागदपत्रे गहाळ झाली आहेत व त्याबाबतही गुन्हा नोंद करण्याची गरज आहे. सोनसड्यावर कुजलेल्या कचर्‍यामुळे येथील लोकांना जो त्रास सहन करावा लागतो त्याला पूर्णतः ज्योकीम व विजय सरदेसाई कारणीभूत आहेत, अशी टीका करतानाच, मुळात ‘जीसुडा’ च्या उपाध्यक्षपदी विजय सरदेसाई यांची नेमणूक नगरविकासमंत्र्यांनी कोणत्या आधारावर केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘कॅग’ अहवालामुळे हे प्रकरण लोकलेखा समितीसमोर येणार आहे. आपण या समितीचा एक सदस्य असल्याने त्याची पूर्ण चौकशी करणार असून प्रसंग आलाच तर पोलिस तक्रारही करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कामत, हरिप्रसाद यांच्याकडून गृहखात्याची भलावण लांच्छनास्पद : मिकी

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): गोव्यातील युवा पिढीला विनाशाकडे नेणार्‍या ड्रग्ज व्यवहारावरून मुख्यमंत्री दिगंबर कामत व कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी ज्या पद्धतीने गृह खात्याची भलावण केली आहे तो प्रकारच मुळी लांच्छनास्पद असल्याचा जबरदस्त टोला राष्ट्रवादीचे नेते तथा बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांनी हाणला. गृहमंत्र्यांविरुद्ध पुरावे नाहीत असा आव आणणार्‍या हरिप्रसाद यांना
रवी नाईक व रॉय नाईक भाजीविक्रेते किंवा मासेविक्रेत्यांप्रमाणे बाजारात ड्रग्ज विक्री करणार, असे अभिप्रेत आहे काय, असा ठोसाही त्यांनी यावेळी लगावला.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मिकी पाशेको यांनी कॉंग्रेसचे प्रभारी हरिप्रसाद यांच्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला. गोव्यातील पोलिस, ड्रग्ज व राजकारण्यांच्या साटेलोटे प्रकरणांबाबत प्रसारमाध्यमांनी रेटाच लावला आहे. या बाबतीत अनेक स्टींग ऑपरेशन्स झाली व त्यात या साट्यालोट्यांचा धडधडीत पर्दाफाशही झाला. खुद्द उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या प्रकरणी गंभीर ताशेरे ओढले आहेत. एवढे होऊनही कॉंग्रेस श्रेष्ठींना काहीच माहिती नाही, असा आव हरिप्रसाद आणीत असतील तर ते गोमंतकीय जनतेला मूर्ख समजत आहेत. ‘एनएसयूआय’ या कॉंग्रेस पक्षाच्या विद्यार्थी विभागाचे अध्यक्ष सुनील कवठणकर यांनी या बाबतीत सोनिया गांधी व राहुल गांधी यांना निवेदन सादर करून या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’मार्फत करावी, अशी मागणी केली आहे. ही निवेदने कुठे कचरा टोपलीत टाकली की काय, असा घणाघाती सवालही त्यांनी यावेळी केला. गोव्याचा सर्वनाश करू पाहणार्‍या या भ्रष्ट नेत्यांपासून या भूमीचे रक्षण करावयाचे आहे व त्यासाठी सर्वांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. ड्रग्ज प्रकरणावरून येत्या काळात राज्यात मोठे जनआंदोलन उभारले जाणार असून त्याला आपला पूर्ण पाठिंबा असेल, असेही ते म्हणाले.
नार्वेकरांना पाठिंबा
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. दयानंद नार्वेकर यांनीही उघडपणे ड्रग्ज व्यवहार तथा कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करून उघडपणे सरकारवर शरसंधान केले आहे व या आंदोलनात त्यांना आपला पूर्ण पाठिंबा असेल, अशी घोषणा मिकी पाशेको यांनी केली. येत्या विधानसभा अधिवेशनात पुन्हा एकदा या प्रकरणाच्या ‘सीबीआय’ चौकशीची मागणी होणार आहे व राष्ट्रवादीचा या मागणीला पूर्ण पाठिंबा राहील, असेही त्यांनी सांगितले. हरिप्रसाद व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडून या व्यवहाराला पाठीशी घालण्याचा हीन प्रकार होणे ही अत्यंत शरमेची गोष्ट असून ते गोव्याच्या भवितव्याकडेच खेळ मांडत असल्याची टीकाही श्री. पाशेको यांनी केली. सरकारातील आमदार तथा मंत्र्यांनी निदान आता तरी आपले तोंड उघडायला हवे; अन्यथा गोमंतकीयांना अधिक मूर्ख बनवण्याचा डाव सर्वांच्याच अंगलट येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी लिंडन मोंतेरो व केनीथ सिल्वेरा हजर होते.
सिप्रियानो मृत्युप्रकरणी प्रत्यक्षदर्शीचा गौप्यस्फोट
सिप्रियानो फर्नांडिस याला पोलिस स्थानकांत ठेवण्यात आले होते तेव्हाच त्याचा मृत्यू झाला होता हे स्पष्टपणे जाणवत होते, अशी माहिती या घटनेचे प्रत्यक्षदर्शी केनीथ सिल्वेरा यांनी दिली. सिप्रियानो याला पोलिसांकडून कोणत्या पद्धतीची वागणूक मिळाली असेल हे त्याला पाहिल्यानंतरच कळून येत होते, असेही ते म्हणाले. दरम्यान, आपण प्रत्यक्षदर्शी या नात्याने जाहीरपणे वृत्तमाध्यमांकडे माहिती दिल्याने आपल्याला धमकीचे फोन आल्याची तक्रारही सिल्वेरा यांनी पोलिसांकडे केली आहे. आपल्या विरोधातही अशाच पद्धतीची खोटी तक्रार दाखल करून पोलिस स्थानकांत बोलावण्यात आले होते व त्याचवेळी सिप्रियानो तिथे मृतावस्थेत पडला होता, असेही ते म्हणाले. सिप्रियानोच्या बाबतीत घडलेला हा प्रकार आपल्याही बाबतीत घडणार नाही कशावरून या भीतीने आपलीही पाचावर धारण बसली, असेही तो म्हणाला.